पहिला क्रमांक... आणि विश्वासाचा शेवट?
कधी कधी एखादी बातमी वाचताना डोळे शब्दांवरून पुढे सरकत नाहीत. मनात एकच प्रश्न घुमत राहतो—हे खरंच घडू शकतं?
===================================
२०१६ च्या एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणारा एक अधिकारी... गुणवत्तेचा आदर्श मानला गेलेला चेहरा... आणि त्याच अधिकाऱ्याविरोधात लाचखोरीचे गंभीर आरोप. एसीबीने तक्रारीची पडताळणी करण्यासाठी सापळा रचला आणि पुढे घडलेल्या घटनांनी संपूर्ण राज्याला हादरवून सोडले.
२०१६ च्या एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेल्या वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांच्यावर ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप झाल्याचे वृत्त वाचणात आले आणि धक्काच बसला.
लाच घेतल्याची रक्कम ऐकून विश्वासच बसेना .
अबब ! ४५ लाखाची लाच !
खरच , या प्रकरणाचा अंतिम निकाल भविष्यात काय यायचा तो येईल.....पण... घटनेने समाजाच्या मनात अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण केले आहेत.
खरं तर, भ्रष्टाचाराची प्रत्येक घटना सरकारी तिजोरीवरचा डाका नसते; ती गरिबाच्या घासावरचा घाला असते.
ज्या शेतकऱ्याने उन्हातान्हात घाम गाळला, त्याच्या अनुदानाचा मार्ग भ्रष्टाचारामुळे अडतो. ज्या विधवेला पेन्शनची गरज आहे, तिच्या फाईलला गती मिळत नाही. ज्या विद्यार्थ्याच्या डोळ्यांत शिक्षणाची स्वप्ने आहेत, त्याच्या शिष्यवृत्तीचा प्रवास विलंबतो. एका अधिकाऱ्याच्या कथित लालसेची किंमत लाखो सामान्य नागरिक रोज मोजत असतात.
आजही गावातील गरीब माणूस सरकारी कार्यालयात जाताना आपल्या खिशात कागदपत्रांपेक्षा जास्त आशा घेऊन जातो. त्याला वाटते—"सरकार माझे आहे. अधिकारी माझे आहेत. न्याय मिळेल.
" पण जेव्हा अधिकाराचा वापर सेवेसाठी नव्हे तर स्वार्थासाठी होत असल्याची चर्चा समाजात पसरते, तेव्हा त्या आशांचा चुराडा होतो.
स्पर्धा परीक्षेचा पहिला क्रमांक मिळवणे हे बुद्धिमत्तेचे प्रतीक असू शकते; पण चारित्र्याचा पहिला क्रमांक मिळवण्यासाठी आयुष्यभर परीक्षा द्यावी लागते. पद मोठे असणे ही प्रतिष्ठा नाही; त्या पदाचा प्रामाणिक वापर करणे हीच खरी प्रतिष्ठा आहे.
आज समाजाला इमारती, कार्यालये आणि मोठमोठे प्रकल्प यापेक्षा जास्त गरज आहे ती विश्वासार्ह अधिकाऱ्यांची. कारण विकासाची पायाभरणी सिमेंटने होत नाही; ती प्रामाणिकपणाने होते.
भ्रष्टाचाराची बीजे रुजली की लोकशाहीची मुळे कमकुवत होतात. मग गरीब न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाही, शेतकरी शासनावर विश्वास ठेवत नाही, तरुण प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे करतो आणि समाजात निराशेचे सावट दाटू लागतात.
म्हणूनच अशा प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेगवान चौकशी होणे अत्यावश्यक आहे. दोषी असेल तर कठोर शिक्षा झाली पाहिजे; निर्दोष असेल तर त्यालाही न्याय मिळाला पाहिजे. कारण कायद्याचे राज्य हे भावनांवर नव्हे, तर पुराव्यांवर उभे असते.
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी...
प्रिय भावी अधिकारी,
तुम्ही अभ्यास करता ते केवळ नोकरीसाठी नाही; तर लाखो नागरिकांच्या विश्वासाचे ओझे आपल्या खांद्यावर घेण्यासाठी करता. तुमच्या स्वाक्षरीत एखाद्या गरीबाचे भविष्य दडलेले असेल. तुमच्या निर्णयावर एखाद्या शेतकऱ्याचे पीक, विद्यार्थ्याचे शिक्षण, विधवेचा आधार आणि समाजाचा विश्वास अवलंबून असेल.पद हे संपत्ती कमावण्याचे साधन नाही; ते समाजाचे ऋण फेडण्याची संधी आहे.
एकूणच....."बुद्धिमत्ता तुम्हाला अधिकारी बनवेल;पण प्रामाणिकपणा तुम्हाला इतिहासात सन्मानाचे स्थान देईल." स्पर्धा परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणे ही मोठी गोष्ट आहे; परंतु आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वच्छ चारित्र्याने जगणे हीच खरी सर्वोच्च रँक आहे.
कारण शेवटी...
लोक तुमच्या पदाचा नाही, तर तुमच्या प्रामाणिकपणाचा इतिहास लिहितात.
-धनाजी माने.....✍️

No comments:
Post a Comment