Saturday, August 22, 2026

🇮🇳 सीमेवरील सैनिकांसाठी कोरेगावच्या विद्यार्थ्यांनी बांधला प्रेमाचा धागा...





🇮🇳 सीमेवरील सैनिकांसाठी कोरेगावच्या विद्यार्थ्यांनी बांधला  प्रेमाचा धागा......🇮🇳

=======================================

देशाच्या सीमेवर कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस, प्रखर ऊन आणि अनेक संकटांना सामोरे जात मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोरेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अनोखा  उपक्रम राबविला.

शाळेत ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत ‘राखी तयार करणे’ हा उपक्रम उत्साहात घेण्यात आला. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पकतेने, आकर्षक व रंगीबेरंगी राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या. या राख्यांमध्ये केवळ रंग, सजावट आणि कलाकुसर नव्हती, तर त्यामध्ये देशाच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिकांविषयीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना गुंफलेली होती.

‘सीमेवर उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाला आम्ही आमच्या भावासारखे मानतो. त्याच्या हातावर ही राखी बांधता आली नाही, तरी आमच्या प्रेमाचा हा धागा त्याच्यापर्यंत नक्की पोहोचावा,’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या.

आपल्या लाडक्या बहिणींच्या हातून राखी बांधून घेण्याऐवजी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या मनगटावर या राख्या पोहोचाव्यात, हा या उपक्रमामागील भावनिक उद्देश होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्या सीमेवरील भारतीय सैनिकांना पाठविण्यात आल्या.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ कलाकुसरीचा आनंद मिळाला नाही, तर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सैनिकांप्रती आदर आणि सामाजिक बांधिलकी यांचे संस्कारही मिळाले. छोट्याशा हातांनी तयार केलेली ही राखी सीमेवर तैनात जवानांच्या मनगटावर पोहोचताना त्यांना आपल्या देशातील बालमनांचे प्रेम आणि शुभेच्छा नक्कीच जाणवतील.

या उपक्रमातून ‘राखीचा धागा छोटा असला, तरी त्यामागची भावना संपूर्ण राष्ट्राला जोडणारी आहे,’ असा हृदयस्पर्शी संदेश कोरेगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला.

शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. 

यावेळी शाळा नं.१ चे मुख्याध्यापक सदाशिव वारे,शाळा नं.२ चे मुख्याध्यापक धनाजी माने,सहाय्यक शिक्षिका शुभांगी भोसले,रुपेश्री पोळ, तेजस्विनी फाळके,दिपाली वारे,तेजस्विनी माळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरगांवच्या पोस्ट ऑफिस कर्मचारी पूजा पाटील उपस्थित होत्या. 

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

- धनाजी माने.....✍️

 

Tuesday, August 04, 2026

राजभवनातील ती अविस्मरणीय भेट... आज आठवणींमध्ये जिवंत झालेले, दादा !










 "राजभवनातील ती अविस्मरणीय भेट...आज आठवणींमध्ये जिवंत झालेले  डॉ. डी. वाय. पाटील ( दादा )"

===============================

🙏भावपूर्ण श्रद्धांजली... 

माजी राज्यपाल, पद्मश्री  यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक संवेदनशील, दूरदृष्टीचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

राजकारणात त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. मात्र, त्यांची खरी ओळख ही एक द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, समाजहितैषी आणि शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारे व्यक्तिमत्त्व अशीच कायम राहील.

त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच मन नकळत   २०१० मधील ,तब्बल सोळा वर्षांपूर्वीच्या एका  अविस्मरणीय आठवणीत हरवून गेले...

त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा  राजभवनातील ती संस्मरणीय भेट..फेब्रुवारी २०१० मध्ये  CCRT नवी दिल्ली यांच्या वतीने "भारताची सांस्कृतिक विविधता" या विषयावरील दहा दिवसांच्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली होती. हे प्रशिक्षण त्रिपुराची राजधानी आगरतळा  येथे २४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०१० या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणात देशातील तब्बल २२ राज्यांतील १२६ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सांगली  जिल्ह्यातून त्यावेळी  दहा शिक्षकांची निवड झाली होती. 

या प्रशिक्षणादरम्यान आम्हाला त्रिपुरा राज्याच्या राजभवनात जाऊन तत्कालीन राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील (दादा ) यांची भेट घेण्याचा बहुमान लाभला. आजही तो दिवस डोळ्यांसमोर अगदी जिवंत उभा राहतो.

राजभवनातील वातावरणात कोणताही  दुरावा नव्हता. उलट राज्यपालांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याचे मनापासून आपलेपणाने स्वागत केले, अभिनंदन  केले आणि अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. भारताची सांस्कृतिक विविधता, राष्ट्रीय एकात्मता, शिक्षणाची भूमिका आणि शिक्षकांची जबाबदारी यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी अत्यंत साधेपणाने विचार मांडले.

विशेष म्हणजे, त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांसमवेत भोजन केले. सर्वासाठी बसची सोय केली ,त्रिपुरा मधील महत्वाच्या ठिकाणांची सफर घडवली.त्या काही क्षणांत आम्हाला एखाद्या राज्यपालांपेक्षा   एका प्रेमळ, स्नेहशील आणि प्रेरणादायी शिक्षणतज्ज्ञाचा सहवास लाभल्याची भावना मनात निर्माण झाली. निरोप घेताना त्यांनी आमच्या संपूर्ण चमूला शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातील कार्यासाठी प्रेरणा दिली.

आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्या भेटीतील प्रत्येक क्षण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभा राहिला. आयुष्यात काही व्यक्तींची भेट अल्पकाळाची असते, पण त्यांचा प्रभाव मात्र आयुष्यभरासाठी मनावर कोरला जातो.                आदरणीय  डॉ. डी. वाय. पाटील ( दादा) हे माझ्यासाठी अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते.

त्यांनी शिक्षणक्षेत्रात उभारलेला ज्ञानाचा दीप पुढील अनेक पिढ्यांना दिशा देत राहील. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांनी दिलेले विचार सदैव स्मरणात राहतील.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏼

— धनाजी माने.....✍️


४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन

  ४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! ======================== गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या  डोळ्यांत दाटला आठवणींचा ...