"राजभवनातील ती अविस्मरणीय भेट...आज आठवणींमध्ये जिवंत झालेले डॉ. डी. वाय. पाटील ( दादा )"
===============================
🙏भावपूर्ण श्रद्धांजली...
माजी राज्यपाल, पद्मश्री यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक संवेदनशील, दूरदृष्टीचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
राजकारणात त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. मात्र, त्यांची खरी ओळख ही एक द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, समाजहितैषी आणि शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारे व्यक्तिमत्त्व अशीच कायम राहील.
त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच मन नकळत २०१० मधील ,तब्बल सोळा वर्षांपूर्वीच्या एका अविस्मरणीय आठवणीत हरवून गेले...
त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा राजभवनातील ती संस्मरणीय भेट..फेब्रुवारी २०१० मध्ये CCRT नवी दिल्ली यांच्या वतीने "भारताची सांस्कृतिक विविधता" या विषयावरील दहा दिवसांच्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली होती. हे प्रशिक्षण त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे २४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०१० या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणात देशातील तब्बल २२ राज्यांतील १२६ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सांगली जिल्ह्यातून त्यावेळी दहा शिक्षकांची निवड झाली होती.
या प्रशिक्षणादरम्यान आम्हाला त्रिपुरा राज्याच्या राजभवनात जाऊन तत्कालीन राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील (दादा ) यांची भेट घेण्याचा बहुमान लाभला. आजही तो दिवस डोळ्यांसमोर अगदी जिवंत उभा राहतो.
राजभवनातील वातावरणात कोणताही दुरावा नव्हता. उलट राज्यपालांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याचे मनापासून आपलेपणाने स्वागत केले, अभिनंदन केले आणि अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. भारताची सांस्कृतिक विविधता, राष्ट्रीय एकात्मता, शिक्षणाची भूमिका आणि शिक्षकांची जबाबदारी यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी अत्यंत साधेपणाने विचार मांडले.
विशेष म्हणजे, त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांसमवेत भोजन केले. सर्वासाठी बसची सोय केली ,त्रिपुरा मधील महत्वाच्या ठिकाणांची सफर घडवली.त्या काही क्षणांत आम्हाला एखाद्या राज्यपालांपेक्षा एका प्रेमळ, स्नेहशील आणि प्रेरणादायी शिक्षणतज्ज्ञाचा सहवास लाभल्याची भावना मनात निर्माण झाली. निरोप घेताना त्यांनी आमच्या संपूर्ण चमूला शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातील कार्यासाठी प्रेरणा दिली.
आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्या भेटीतील प्रत्येक क्षण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभा राहिला. आयुष्यात काही व्यक्तींची भेट अल्पकाळाची असते, पण त्यांचा प्रभाव मात्र आयुष्यभरासाठी मनावर कोरला जातो. आदरणीय डॉ. डी. वाय. पाटील ( दादा) हे माझ्यासाठी अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते.
त्यांनी शिक्षणक्षेत्रात उभारलेला ज्ञानाचा दीप पुढील अनेक पिढ्यांना दिशा देत राहील. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांनी दिलेले विचार सदैव स्मरणात राहतील.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏼
— धनाजी माने.....✍️




No comments:
Post a Comment