Sunday, September 06, 2026

४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन



 


४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…!

========================

गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या डोळ्यांत दाटला आठवणींचा पाऊस…

५ सप्टेंबर २०२६… रात्रीचे सात वाजले होते.स्थळ होते — रघुनाथ यादव यांचे नवीन घर.नेहमीसारखी ती एक साधी संध्याकाळ नव्हती…ना तो केवळ मित्रांचा गेट-टुगेदर होता…ना तो फक्त जुन्या वर्गमित्रांच्या भेटीचा कार्यक्रम होता…ती होती तब्बल ४२ वर्षांनी पुन्हा एकदा गुरु-शिष्यांच्या नात्याला उजाळा देणारी, आठवणींना जागवणारी आणि मनाला आतून हलवून टाकणारी एक अविस्मरणीय संध्याकाळ!

ज्यांच्या हातून अक्षरओळख झाली, ज्यांनी जगण्याचे धडे दिले, ज्यांनी गरीब परिस्थितीतही शिक्षणाची वाट दाखवली, अशा आपल्या तत्कालीन गुरुजनांना भेटण्यासाठी ४२ वर्षांपूर्वीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आले होते.

कोणी पुण्याहून आले होते…कोणी मुंबईहून…कोणी दूरवरून कुटुंबासह  आले होते…वर्षे बदलली होती… चेहरे बदलले होते… प्रत्येकाच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या बदलल्या होत्या… पण गुरुंबद्दलची श्रद्धा आणि वर्गमित्रांबद्दलची मैत्री मात्र तशीच होती!

गुरुंच्या चरणी कृतज्ञतेचा अभिषेक….....कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.त्यानंतर आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या तत्कालीन शिक्षकांना आणि वर्गमित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्या क्षणी वातावरण काहीसे गंभीर झाले…जवळ असलेले अनेक चेहरे आठवले…कधी वर्गात आपल्या शेजारी बसलेले मित्र आठवले…शिक्षकांचा प्रेमळ आवाज आठवला…आणि क्षणभर ४२ वर्षांचे अंतर जणू विरघळून गेले.

यानंतर तत्कालीन अध्यापन करणारे प्राथमिक शाळेतील शिक्षक आदरणीय आप्पासाहेब पाटील, शंकर पाटील आणि संपत पाटील या गुरुजनांचा विद्यार्थ्यांनी अत्यंत भावपूर्ण सत्कार केला.यावेळी शिक्षक दिनानिमित्त सध्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे धनाजी माने यांचा व सरळ सेवेतून शिक्षिका म्हणून निवड झालेली साक्षी गावडे या दोघांचाही यावेळी सत्कार  करण्यात आला

गुरुंचे पाय धुऊन त्यांचे पूजन करण्यात आले.कपडे, शाल, श्रीफळ आणि मूर्ती भेट देऊन गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.हा केवळ सत्कार नव्हता…

तो होता —“गुरुजी, तुम्ही आम्हाला जे दिलंत, त्याची परतफेड या जन्मात कधीच होऊ शकणार नाही; पण तुमच्याप्रती असलेली कृतज्ञता आम्ही मनापासून जपली आहे…”

या भावनेचा एक छोटासा प्रयत्न! गुरुंच्या चरणी नतमस्तक होताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.कार्यक्रमातील अनेक क्षणांपैकी एक क्षण म्हणजे माजी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावना.आपल्या विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगताना ते म्हणाले —“आयुष्यात अनेक विद्यार्थी घडवले. त्यातील  काही विद्यार्थी आजही आमच्या वार्धक्यात स्मरणात आहेत. आपल्या हलाखीच्या गरीब परिस्थितीतही येलूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून त्यावेळी आमचाही त्यांनी मान वाढवलेला होता असे  विद्यार्थीही आज येथे आहेत.त्यांनी विविध क्षेत्रात आपला नावलौकिक केला आहे.याचा गुरु म्हणून मलाही अभिमान वाटतो.”

गुरुंच्या मुखातून आपल्या विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या संघर्षाची आठवण ऐकताना अनेकांच्या मनात जुन्या आठवणींचा पट उलगडत गेला.गुरु आपल्या विद्यार्थ्यांना विसरत नाहीत…कारण विद्यार्थ्यांचे यश हेच त्यांच्या आयुष्याचे खरे प्रमाणपत्र असते !

४२ वर्षांनंतरही मैत्रीचा धागा तुटला नव्हता…..काळ कितीही पुढे गेला तरी काही नाती काळाच्या ओघात विरत नाहीत.शाळा सुटली…गाव बदलले…नोकऱ्या लागल्या…कोणी शेतीत रमले.....मुले मोठी झाली…कोणी मुंबईला गेले…कोणी बाहेर देशात गेले....पुन्हा मायभूमीत परतले...कोणी पुण्याला स्थायिक झाले…पण मनाच्या एका कोपऱ्यात “आपला वर्ग… आपले मित्र… आपले गुरुजी…”  हे जग कायम तसेच राहिले.

या कार्यक्रमात  व्यासपीठावर येऊन गुरुजनांबद्दलच्या संस्कारित, गोड आणि मनाला भिडणाऱ्या आठवणी सांगितल्या.

कधी हशा पिकला…कधी जुन्या खोड्या आठवल्या…कधी एखाद्या मित्राची आठवण झाली…गुरुजनांचा मार आठवला...हयात नसणारे धिप्पाड शरीराचे, शिस्तप्रिय व गणितामध्ये हातखंडा असणारे कै.राजाराम पाटील गुरुजी यांच्या आठवणींनी व काळाच्या पडद्याआड झालेल्या मित्रांच्या आठवणींनी  डोळे पाणावले.बालपणीचे ते निरागस दिवस जणू पुन्हा एकदा सर्वांना जगता आले.

गोड जेवणापेक्षा गोड होत्या आठवणी…कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे गोड जेवणाचा आस्वाद घेतला.पण खरी मेजवानी होती ती आठवणींची! जेवण झाल्यानंतरही कोणालाच घरी जाण्याची घाई नव्हती.रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगल्या.आपल्या आयुष्यातील सुख-दुःखाच्या आठवणी शेअर झाल्या.“काय दिवस होते ते…”

“आठवतंय का गुरुजी असं म्हणाले होते…असा मार खाल्ला, असे इंग्रजी त्यांनी शिकवले...अशी गाणी शिकवली .... अशी गणिते शिकवली...आपण त्या वेळी असं केलं होतं…”

अशा असंख्य आठवणींनी रात्र सरत गेली.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होते…पण निरोपाची वेळ आली तेव्हा मात्र मन जड झाले. “पुन्हा लवकर भेटू…” असे म्हणत प्रत्येकाने एकमेकांचा निरोप घेतला.गाड्या निघून गेल्या…रस्ते शांत झाले…रात्र गडद झाली…पण त्या घरात घडलेल्या आठवणींचा उजेड मात्र प्रत्येकाच्या मनात कायमचा राहिला.दोन महिन्यांची मेहनत… आणि एका अविस्मरणीय दिवसाचे स्वप्न साकार झाले ! हा कार्यक्रम  यशस्वी होण्यामागे अनेकांची मेहनत होती.गेली दोन महिने या कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच रामचंद्र पवार (नाना), रघुनाथ यादव,पंचायत समिती सदस्य प्रदिप कांबळे, केमिकल इंजिनिअर -दीपक पवार आणि त्यांचे सर्व वर्गमित्र मैत्रीणी झटत होते.

कोणाला फोन करायचा…कोणाला प्रत्यक्ष भेटायचे कोणाचा संपर्क शोधायचा…मुंबई-पुण्यातील मित्रांशी संपर्क साधायचा…गुरुजनांना कार्यक्रमासाठी आणायचे…या सर्वांसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अखेर फळाला आले.एकेक मित्र जोडत गेले…एकेक आठवण जागी होत गेली…आणि अखेर ४२ वर्षांनी संपूर्ण वर्ग एकाच छताखाली जमला!

गुरु-शिष्य नाते… काळाच्या पलीकडचे!

आजच्या वेगवान आणि धावपळीच्या जीवनात नाती जपणे कठीण झाले आहे.मोबाईलमध्ये शेकडो संपर्क असतात; पण मनापासून बोलण्यासाठी वेळ नसतो.सोशल मीडियावर हजारो मित्र असतात; पण मनातील आठवणी शेअर करण्यासाठी माणसे कमी पडतात.अशा काळात ४२ वर्षांनी एकत्र येऊन आपल्या गुरुंच्या चरणी नतमस्तक होणारे हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने समृद्ध आहेत.कारण त्यांनी केवळ आपल्या गुरुंचा सत्कार केला नाही…तर त्यांनी आपल्या बालपणाचा, आपल्या संस्कारांचा, आपल्या शाळेचा आणि आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या त्या दिवसांचा सत्कार केला!

गुरुजी, तुम्ही दिलेल्या संस्कारांची शिदोरी आजही आमच्याजवळ आहे…

गुरु म्हणजे केवळ धडा शिकवणारी व्यक्ती नव्हे.

गुरु म्हणजे परिस्थितीशी लढण्याची जिद्द.

गुरु म्हणजे आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ.

आज ४२ वर्षांनंतरही आपल्या गुरुंच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली—शाळा सुटते…पण गुरुंचे संस्कार कधीच सुटत नाहीत! वर्ग सुटतो…पण वर्गमित्रांची मैत्री मनातून कधीच सुटत नाही.काळ पुढे जातो…पण बालपणाच्या आठवणी मनाच्या वहीत कायमच्या कोरल्या जातात.हा केवळ स्नेहमेळावा नव्हता…

हा कार्यक्रम होता—गुरुंच्या ऋणाची जाणीव करून देणारा,मैत्रीच्या नात्याला पुन्हा उजाळा देणारा,हरवलेल्या आठवणी शोधून काढणारा,

आणि गेलेल्या काळाला पुन्हा एकदा स्पर्श करून देणारा…एक अत्यंत भावूक, संस्कारित आणि अविस्मरणीय सोहळा!

४२ वर्षांपूर्वी वेगवेगळ्या दिशांनी निघालेले ते विद्यार्थी…आज पुन्हा एकदा त्याच आठवणींच्या वळणावर भेटले.आणि मनात एकच भावना घेऊन परतले—

“काही भेटी या केवळ भेटी नसतात…

त्या आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा आठवणी असतात!”

५ सप्टेंबर २०२६ ची ती रात्रही अशीच एक अविस्मरणीय आठवण बनून राहिली…!

गुरुजनांना मनःपूर्वक नमन ! सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मैत्रीला मनापासून सलाम! आणि हा सुंदर सोहळा साकारण्यासाठी झटलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !

एकूणच....“गुरुंच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतेची ही फुले…आणि ४२ वर्षांनी पुन्हा फुललेली मैत्री…  हेच  

या अविस्मरणीय भेटीचे खरे फलित आहे ! ”

— धनाजी माने ......✍️


४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन

  ४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! ======================== गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या  डोळ्यांत दाटला आठवणींचा ...