Thursday, May 28, 2026

जनगणना… आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत


 ===================🇮🇳===================

🇮🇳 जनगणनाआकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत 🇮🇳

==========================

पहाट अजून पूर्ण उजाडायची असते…पूर्वेकडून हलकासा सोनेरी प्रकाश डोकावू लागलेला असतो…गावात कुठेतरी कोंबड्याची बांग ऐकू येत असते…कोणाच्या अंगणात चुल पेटलेली असते…तर कुठे दुधाच्या कॅनची खडखड सुरू झालेली असते…कोण खांद्यावर रुमाल व खोरे ,टिकाव घेऊन शेताची वाट चालत असतो.

आणि अशा सकाळी…एका शिक्षकाच्या हातात मोबाईल, खांद्यावर बॅग,गळ्यात शासनाने दिलेले icard चेहऱ्यावर जबाबदारी आणि मनात देशसेवेची भावना घेऊन सुरू होतो — जनगणनेचा प्रवास….

वरकरणी हे काम खूप साधं,सोप वाटतं ,दिसत…

घराघरात जायचं…माहिती विचारायची…HLO अँपमध्ये माहिती भरायची…आणि पुढच्या घराकडे निघायचं हा शिक्षकाचा प्रवास सुर राहतो.या प्रवासात काही घटना शिक्षकांना त्रास देऊन गेल्या कुठे वाडी वस्तीवर , शेतात कुत्री मागे लागली, तर काहीं शिक्षकांना चावाही घेतल्याच्या घटना घडल्या.काही लोकांनी प्रगणकाशी वादही घातले ...वेळेत काम करण्याचे टार्गेट असल्याने काहींचे या कामगीरीवर असताना अपघात झाले आणि प्राणाशी मुकावे लागले ,तळपत्या उन्हात रानोमाळी भटकावे लागल्याने उष्माघात होऊन काहींना प्राण गमवावे लागले अशा घटना महाराष्ट्रात ,देशात अनेक ठिकाणी घडल्या.या घटना कानावर येऊनही शिक्षक आपले काम करत राहिले.

 खरं सांगायचं तर —जनगणना ही फक्त मोबाईल वर माहिती गोळा करण्याची प्रक्रिया नसते.ती असते…भारत नावाच्या खंडप्राय देशाला ,विशाल कुटुंबाला जवळून अनुभवण्याची संधी.ती असते…प्रत्येक घरामागचं आयुष्य समजून घेण्याची वेळ.ती असते…समाजाच्या धडधडत्या हृदयाला कान लावून ऐकण्याची एक संवेदनशील प्रक्रिया.

कारण प्रत्येक घरामागे एक जिवंत कथा असते…प्रत्येक चेहऱ्यामागे एक लपलेला संघर्ष असतो…आणि प्रत्येक नावामागे एक अपूर्ण स्वप्न दडलंलेलं असतं.

“माणसं मोजताना माणुसकी भेटत जाते…घराघरातून चालताना आयुष्य उलगडत जाते…”

जनगणनेच्या कामासाठी एखाद्या गल्लीत प्रवेश केला की भारताचं खरं चित्र दिसू लागतं…

एका बाजूला उंच इमारती…मोठमोठ्या गाड्या…आधुनिक दरवाजे…डोअरबेल…पंखा तर कुठे थंड एसी…महागडे मोबाईल…ऑनलाइन मीटिंगमध्ये व्यस्त असलेली माणसं…

तर त्याच रस्त्याच्या पुढच्या वळणावर…पत्र्याचं घर…अर्धवट भिंती…उन्हाने तापलेलं छप्पर…ना पंखा ना एसी..दारात उभी चप्पलविना मुलं…तर काही भागात पाण्याच्या हंड्यासाठी रांगेत उभ्या स्त्रियाही दिसतात…

भारत एकाच वेळी दोन टोकांवर जगताना दिसतो.एखाद्या घरात माहिती विचारताना समोर थंड पाण्याची बाटली येते…“सर, बसा ना थोडा वेळ,पाणी घ्या.सरबत करु दे का ? चहा घ्या थोडा…”

तर काही घरात इतकी गरिबी असते की,स्वतःच्या अडचणी सांगतानाही त्यांना संकोच वाटतो.जगण्यासाठी किती त्यांना किती संघर्ष करावा लागत असेल याची जाणीव समोरच त्याच वास्तव पाहून दिसतं.

“टीव्ही आहे का घरी ? डीश आहे की केबल? ” या साध्या प्रश्नावर जेव्हा उत्तर मिळतं —

“साहेब… आमच्याकडे कुठला हो टीव्ही, रोज पोट भरतानाच नाकी नऊ येतं.कुठला टीव्ही नि कुठली केबल …”

तेव्हा मोबाईलच्या स्क्रीनवर भरलेला डेटा अचानक जड वाटू लागतो,अंतकरण गलबलून येत.यांच्यासाठी आपण काहीतरी कराव अस वाटतं पण…वास्तवतेचे आकडे मोबाईल वर भरण्याशिवाय आपण काहीही करु शकत नाही याची जाणीव होते.कारण त्या एका वाक्यामध्ये त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष दडलेला असतो.

“काही घरात सुख ओसंडून वाहतं…काही घरात दुःखही शांत बसलेलं असतं…पण दोन्ही ठिकाणी,जगणं मात्र सुरूच असतं…”

गावागावातून फिरताना अनेक वार्धक्यात असलेले वयोवृद्ध भेटतात…घराच्या ओट्यावर शांत बसलेले आजोबा,आजी…डोळ्यांवर जाड चष्मा…हातात काठी…आणि नजरेत कोणीतरी येण्याची वाट…

“मुलगा पुण्याला / मुंबईला असतो हो…”

“मुलगी लग्न होऊन नांदायला गेली…”

“आम्ही दोघंच असतो घरी…”

इतकंच ते सहज सांगतात.पण त्यांच्या आवाजामध्ये एकटेपणाची खोल दरी दडलेली असते.कुठे एखादी आजी जुन्या काळाच्या गोष्टी सांगते…

“पूर्वी गावात किती माणुसकी होती हो.आज कस सगळं वेगळचं दिसतय , माणसाला आपुलकीच राहिलेली दिसत नाही…”

कुठे एखादा वृद्ध आपल्या मुलाचा फोटो दाखवत अभिमानाने सांगतो —“माझा मुलगा मोठ्या कंपनीत आहे…”पण त्या अभिमानाच्या मागे मुलाच्या सहवासाची ओढ स्पष्ट जाणवत असते.

“मोठी शहरं वाढत गेली…पण गावाकडची अंगणं रिकामी होत गेली…पैशासाठी धावताना,माणसं ,

आणि माणसातील माणुसकी मात्र दूर निघून गेली…”

जनगणनेच्या प्रवासात सर्वात जास्त मन हेलावून टाकतात ती लहान मुलं…कुठे फाटलेल्या कपड्यातलं मूल दारात उभं राहून मोबाईलकडे आश्चर्यानं पाहत असतं…कुठे शाळेच्या जुन्या वहीत चित्र काढणारी मुलगी दिसते…

“मोठं होऊन काय बनायचं ?” 

या प्रश्नावर डोळे चमकतात… “डॉक्टर,पोलीस,शिक्षक,कलेक्टर…”

स्वप्नं खूप मोठी असतात…पण परिस्थिती मात्र खूप छोटी…कधी कधी वाटतं —या मुलांच्या डोळ्यातील आशा जपण्यासाठीच कदाचित देश जगत असावा.

“फाटकी वही असली तरी स्वप्नं मात्र रंगीत असतात…गरीबांच्या मुलांनाही.आकाशाला गवसणी घालायची असते.”

अनेक घरांमध्ये स्त्रियांचा संघर्ष जवळून दिसतो…सकाळी उठल्यापासून  रात्रीपर्यंत घाण्याला जुंपलेल्या बैलासारख काम,काम आणि कामच….घर…मुलं…शेती…जनावरं…स्वयंपाक…हे राहटगाडग सुरुच.आणि तरीही चेहऱ्यावर शांत हास्य..सार दु:ख ऊरात दाबून जगासमोर हसत राहायचं .

कुठे पती गमावलेली आई मुलांना शिकवण्यासाठी धडपडताना दिसते…कुठे मजुरी करून मुलाचं कॉलेज सुरू ठेवणारी आई भेटते.भारतातील अनेक घरांचा खरा कणा अजूनही स्त्रीच आहे, हे प्रकर्षाने जाणवतं.

“स्वतःचं दुःख लपवूनजी संसार हसवत असते…ती आई नावाची स्त्री, खऱ्या अर्थाने देव असते…”

जनगणना करताना अनेक व्यवसायही भेटतात…

सकाळ पासून चहाची टपरी लावणारा तरुण…दिवसभर उन्हात भाजी विकणारी आजी…छोट्याशा दुकानातून संसार चालवणारा दुकानदार…सायकलवरून दूध नेणारा  शेतकरी…त्यांच्या हातावर कष्टाच्या रेषा असतात…पण चेहऱ्यावर हार नसते.कारण भारत अजूनही मेहनतीच्या जोरावर उभा आहे.

“घामाच्या थेंबातून देश उभा राहत असतो…साधा माणूसच भारताचा खरा चेहरा असतो…”

या प्रवासात धर्म, जात, भाषा, परंपरा यांचं वैविध्यही दिसतं…एका गल्लीत अजान ऐकू येते…दुसऱ्या गल्लीत आरतीचा आवाज…भाषा वेगळ्या…वेष वेगळे…खाणंपिणं वेगळं…

पण प्रत्येकाच्या घरात एकच गोष्ट समान असते —उद्याचा दिवस चांगला असावा ही आशा.तेव्हा जाणवतं —भारत फक्त नकाशावरचा देश नाही…तर विविधतेतून धडधडणारं एक विशाल जिवंत कुटुंब आहे.आणि या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम मनाला स्पर्श करते —लोकांचा शिक्षकावर असलेला विश्वास.“मास्तर,सर,गुरुजी तुम्ही आलात म्हणजे काम नीट होईल…”आणि “मॅडम,बाई  तुम्हीही आलात बर वाटलं आम्हाला आधार वाटला.विचारा काय विचारचे ते तुमच्यावर आमचा विश्वास आहे.तुम्ही विचाराल त्याच उत्तर देवू, ”                   

ही वाक्यं ऐकताना जाणवतं —शिक्षक हा फक्त वर्गात शिकवणारा कर्मचारी नसतो.तो गावाचा विश्वास असतो…तो प्रशासनाचा चेहरा असतो…तो समाजाच्या आशेचा आधार असतो.उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतानाही…प्रखर अशा तळपत्या उन्हात…वाडी-वस्तीवर,डोंगर-दऱ्यांतून…गल्लीबोळांतून फिरून…देशासाठी हे राष्ट्रीय कार्य करणारे शिक्षक खरंच समाजाचे शांत सैनिक असतात.

ना प्रसिद्धी…ना पुरस्कार…ना मोठं कौतुक…फक्त एक जबाबदारी —देशाला स्वतःच्या लोकांची खरी ओळख करून देण्याची.

“शिक्षक फक्त धडा शिकवत नाही…तो समाज वाचत असतो…जनगणनेच्या प्रवासात तो भारत अनुभवत असतो…”

आणि दिवस संपतो…संध्याकाळी थकलेलं शरीर घरी परततं…पण मन मात्र अनेक घरांत अडकून राहतं…त्या वृद्ध आजोबांच्या नजरेत…त्या गरीब आईच्या संघर्षात…त्या मुलाच्या स्वप्नांत…त्या चहावाल्याच्या मेहनतीत…शेतकऱ्यांच्या घामात.

मोबाईल मध्ये डेटा सेव्ह होतो…पण मनात मात्र अनेक चेहरे कायमचे साठून राहतात.तेव्हा प्रकर्षाने जाणवतं —जनगणना ही फक्त आकड्यांची मोजणी नसते…ती असते —माणसांच्या आयुष्याची नोंद…

त्यांच्या दुःखांची…त्यांच्या आशांची…त्यांच्या संघर्षांची…त्यांच्या स्वप्नांची…आणि त्यांच्या जगण्याच्या जिद्दीची…

कारण शेवटी…

“घरं मोजताना भारत भेटत जातो…माणसं समजून घेताना स्वतःचं मनही बदलत जातं…जनगणना म्हणजे केवळ सरकारी काम नसतं…ती असते —समाजाच्या धडधडत्या हृदयाला जवळून ऐकण्याची एक संवेदनशील संधी…”

शेवटी यानिमित्ताने परमेश्वर चरणी एकच प्रार्थना , या प्रवासात ज्या- ज्या घरात दारिद्र्य पाहिले त्या-त्या ठिकाणी बरकत होऊदे ! अशा कुटूंबात सुख-समृद्धी येऊदे ! अशा कुटुंबातील चिमुकल्यांनी उराशी बाळगलेली गोड स्वप्ने साकार होऊदेत .

।। जयहिंद जय भारत ,जय जनगणना ।।

Take care all my Dear !

             - धनाजी माने….✍️

https://dhanajimane.blogspot.com/2026/05/blog-post_28.html

#population #worldpopulationday #populationcontrol #people #world #overpopulation #india #worldpopulation #populationday #covid #populationhealth #depopulation #familyplanning #facts #depopulationagenda 

Tuesday, May 26, 2026

जिल्हा परिषद शाळांचे गुणवत्ता परीक्षांमध्ये उज्ज्वल यश .

 


जिल्हा परिषद शाळांचे गुणवत्ता परीक्षांमध्ये उज्ज्वल यश -वाळवा पंचायत समिती गुणवत्तेत दुसऱ्या क्रमांकावर

============◆===========

सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शोध परीक्षा घेतली. वाळवा तालुक्यातील २१५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. जिल्ह्यात वाळवा तालुका गुणवत्तेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चौथीच्या डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षेत २७ विद्यार्थ्यांनी, सातवीच्या २५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. पहिलीच्या गुणवत्ता शोध परीक्षेत ५३, दुसरी ३९, तिसरी ४९ आणि सहावीच्या २२ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावत उज्ज्वल यश संपादन केले आहे.फेब्रुवारी २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेतलेल्या पाचवीच्या पूर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी उज्ज्वल यश संपादन केले. ६३ शाळांमधील २७९ विद्यार्थी पात्र ठरले. ७६३ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. तालुक्यातील जि. प. शाळा काळमवाडी, नेलें नं. १, महादेववाडी, जाक्राईवाडी, इटकरे,पेठची उर्दू शाळा, इस्लामपूरची उर्दू शाळा या शाळांचे ६० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी पात्र ठरले.

वाळवा तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी, शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन वर्षभर सुरू होते. पंचायत समितीच्या माध्यमातून सरावासाठी प्रत्येक वर्गाच्या पाच सराव चाचण्या घेतल्या होत्या. यामुळेच सर्वच इयत्तांचा गुणवत्तेचा आलेख उंचावला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, अधिकाऱ्यांचे अभिनंदन सांगली जि. प. अध्यक्षा संगीता पाटील, सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील यांनी केले. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून वाढत असलेली विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच उल्लेखनीय आहे. यामुळे ग्रामीण भागातील ओढा जि. प. शाळांकडे पालकांचा ओढा जि. वाढत आहे.

=======================================

बीडीओंचे शैक्षणिक गुणवत्ता आढावा अभियान वाळवा

=====≠==============================

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार गेली दोन वर्षे वाळवा तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता आढावा अभियान राबवत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पहिलीपासून चौथीपर्यंतच्या वर्गाचा गुणवत्ता आढावा घेतला जात आहे. शाळास्तरावर हे अभियान राबवले जात आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी आणि केंद्रप्रमुखांचे पथक तयार केले आहे. वर्षभरात गुणवत्तेचा आढावा घेऊन संबंधित शिक्षकांना सूचना तर गुणवत्तापूर्ण वर्ग असणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले जाते. यामुळे शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी अधिक सतर्क राहत असून सर्व वर्गांच्या गुणवत्तेचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे.

=======================≠===============

जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा वाढता ओढा

" वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षक सातत्याने व्यापक प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिलीपासून आठवीपर्यंत सुरू असलेल्या गुणवत्ता परीक्षांमुळे वर्गांची तयारी चांगली होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होत आहे. स्पर्धा परीक्षांचा पाया या माध्यमातून भक्कम होताना दिसत आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. " -प्रफुल्ल काळे (केंद्रप्रमुख ,कोरेगांव)

- धनाजी माने.......✍️

( सर्व पालकांना शेअर करा )

Saturday, May 23, 2026

🇵🇾 भारताची जणगणना – २०२७



 🇵🇾 भारताची जणगणना – २०२७ 🇵🇾==========================

🇪🇬 शिक्षक आणि जणगणना  🇪🇬

“उन्हात तळपणारा माणूस… देश मोजणारा शिक्षक”
“गुरु म्हणजे फक्त वर्गात धडा शिकवणारा माणूस नसतो…तो समाजाच्या प्रत्येक जबाबदारीत खंबीरपणे उभा राहणारा सैनिक असतो.”
मे महिन्याचे अंग भाजून काढणारे ऊन…रस्त्यावर असलेली शांतता…डोक्यावर तळपता सूर्य आणि हातात मोबाईल घेऊन घराघरांत फिरणारा एक शिक्षक…
कुणासाठी तो “सर” आहे,
कुणासाठी “मास्तर”,
तर कुणासाठी फक्त —
“अहो… उद्या या ना!”
देशाची जणगणना सुरू आहे…आणि हजारो शिक्षक या राष्ट्रीय कार्यात स्वतःला झोकून देत आहेत.एका बाजूला अनेक जण आपल्या कुटुंबासोबत कुलू-मनाली, महाबळेश्वर, थंड हवेच्या ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत…तर दुसऱ्या बाजूला शिक्षक उन्हाच्या चटक्यांत घामाने भिजत घराघरांत माहिती गोळा करत आहेत.

“ज्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकतात,
त्याच्याच हातून देशाची सेवा घडत असते.”

शिक्षकांना सुट्ट्या असतात… पगार असतो…म्हणून समाजात अनेकदा टीकाही होते.पण त्या सुट्ट्यांमध्येही हा शिक्षक स्वतःच्या संसाराला बाजूला ठेवून देशाच्या कामासाठी रस्त्यावर उतरतो, हे मात्र कुणाच्या लक्षात येत नाही.
अनेक शिक्षिका आपल्या लहान बाळांना,मुलांना घरी ठेवून सकाळपासून रात्रीपर्यंत फिरत आहेत.घर,संसार, शाळा आणि जणगणना…सगळ्यांचा ताळमेळ घालत त्या शांतपणे काम करत आहेत.

“आईपण आणि कर्तव्य
दोन्ही सांभाळताना,
तिच्या थकलेल्या चेहऱ्यावरही
देशसेवेचे तेज दिसत असते.”

ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर, शेतामधून, डोंगर उतारांवर पायपीट सुरू आहे.रस्ते नाहीत… सावली नाही…फक्त तळपते ऊन आणि चालत राहण्याची जबाबदारी.काही ठिकाणी कुत्र्यांनी चावे घेतले…
काहींना पाण्याचीही सोय नव्हती…तरीही शिक्षक थांबला नाही.कारण त्याला माहिती आहे —
“हे फक्त काम नाही… हे राष्ट्रकार्य आहे.”

शहरी भागात वेगळीच लढाई…गुडघेदुखी असणारे शिक्षक उंच इमारती चढत आहेत.लिफ्ट बंद…
एकेक मजला पार करत माहिती गोळा करावी लागत आहे.पण याहून जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे —
लोकांची वागणूक…
“आमच्या विश्रांतीच्या वेळी का आलात?”
“काय फालतू प्रश्न विचारता?”
“आमच्या सेवा तर काढून घेणार नाही ना ?”
हे प्रश्न ऐकताना शिक्षकाच्या मनात वेदना उसळतात.
कारण वर्गात गेल्यावर ज्या शिक्षकाला विद्यार्थी आदराने उभे राहून नमस्कार करतात,त्याच शिक्षकाला अनेक घरांसमोर उभ्याउभ्याच माहिती मागावी लागते.

“मान देणाऱ्यांची संख्या कमी झाली,
तरी कर्तव्य निभावणारे हात कमी होत नाहीत.”

जणगणनेच्या कामात फक्त उन्हाची झळ नाही…
तर तांत्रिक अडचणींचाही डोंगर आहे.Application login होत नाही…अर्धा-अर्धा तास App लॉक…
Delete option चा गोंधळ…नेटवर्क नाही…भर उन्हात उभे राहून शिक्षक मोबाईलकडे पाहत राहतोलोकांच्या प्रश्नांना उत्तर देतो…आणि पुन्हा प्रयत्न करत राहतो.
दरम्यान, अनेक ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा तासनतास पेट्रोल पंपावर थांबावे लागले.दुपारी लोकांच्या घरी गेल्यावर बोलही खावे लागले.
“कष्ट करणाऱ्याच्या वाट्याला
उन्हे जास्त येतात,
पण इतिहासात नावही
त्यांचेच कोरले जाते.”
 याहून अधिक वेदना तेव्हा होतात,जेव्हा AC मध्ये बसून नियंत्रण करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची भाषा शिक्षकांना समजून घेणारी नसते ,योग्य मार्गदर्शन केले जात नाही याने तो व्यथित होत आहे. 
काही ठिकाणी मात्र अनेक अधिकारी  शिक्षकांना समजून घेताना दिसतात - शंकांचे निरसन कोणत्याही वेळी फोन केला तरी  प्रेमाने आपुलकीने करतातच त्याचबरोबर ..
'भर उन्हात स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन काम करा! टेन्शन घेऊ नका ! "  असे आपुलकीने,आपलेपणाने , आस्तेवाईकपणे सांगतात. त्यामुळे आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीर उभे असल्याचा आधार मिळतो .अनेक ठिकाणी अपमानीत होऊनही  शिक्षक शांत असतो…कारण त्याने आयुष्यभर सहनशीलता शिकवली आहे.विद्यार्थ्यांना संस्कार शिकवले आहेत.तो स्वतः जळतो…
पण दुसऱ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावतो.
खरंच…
जणगणनेच्या या मोहिमेत शिक्षक फक्त घरांची संख्या मोजत नाही…तर तो देशाच्या प्रत्येक माणसाला शासनाशी जोडत असतो.हा घाम फक्त शरीरातून वाहत नाही…तर तो राष्ट्रसेवेच्या मातीमध्ये मिसळत असतो.

“देश घडवणारा शिक्षक
स्वतः मात्र शांत राहतो…
कारण त्याच्या कर्तव्याचा आवाज
कधी गोंधळ करत नाही.”
आज गरज आहे ती शिक्षकांकडे फक्त “कर्मचारी” म्हणून न पाहण्याची…तर त्याच्या त्यागाचा, संयमाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर करण्याची.कारण…जेव्हा देश स्वतःची गणना करत असतो,तेव्हा त्या देशाच्या प्रत्येक दारावर घामाने भिजलेला एक शिक्षक उभा असतो…!
जयहिंद -जय महाराष्ट्र- जय भारत - जय जणगणना. 🙏Take care All my Dear !

- धनाजी माने…..✍️
dhanajimane.blogspot.com
https://www.facebook.com/share/p/1CHuv56fmA/
(  तुमच्या प्रतिक्रिया Blog वर, वेळ काढून जरुर लिहा ...✍️)

जणगणना मोहिमेत........







Thursday, April 02, 2026

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर












भैरवनाथाच्या नावानं चांगभल.......



#मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ पासून मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होणार असुन यानिमीत्ताने विविध #धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.


येथील ग्रामदैवत भैरवनाथाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की; भारत खंडातील दंडकारण्य हा प्रांत महापुण्यस्थळ आहे. जेथे #देवऋषी, महषीॅ,तपस्वी, #मुनिजन नित्य #तपस्या करीत असताना अशा समस्या काशी विश्वनाथांचे क्षेत्ररक्षक द्वारपाल श्री कालभैरव यांची अतिश्रद्धेने पुजा, अर्चा, #ध्यानधारणा करणारी एक #गोपी (गौळण) आपल्या गवळीवाड्यात रहात असे. तो गवळीवाड्याचा भाग आजही गोपी या नावानेच ओळखला जातो. तेथील जमीन ही पिकाऊ आहे व त्या शेतास गोपी हेच नाव सध्या चालु आहे.


एकदा नित्य ध्यान मग्न असणाऱ्या गोपीस गाईची धार काढण्यास सांगीतली असता ती गोपी हातात भांडे घेऊन वांझ कपिला गाईची धार काढण्यासाठी गेली व धार काढू लागली. त्यावेळी भांडे दुधाने भरलेले आहे व खाली फेसाचा मोठा ढीग पडलेला आहे. असा चमत्कार घरातील सर्व माणसांनी पाहीला. धार काढताना भक्तीरसात तल्लीन झालेल्या गोपीस #समाधी अवस्थेतुन दुर केले. त्याचवेळी गाईचा एक खुर त्या फेसावर पडला व त्या फेसरूपी पिंडीमध्ये गोपीला श्री भैरवनाथाचे अलौकीक दर्शन झाले व ती समाधान पावली. ती फेसरूपी #स्वयंभू पिंड, त्यावर गाईच्या खुराचा व्रण अशा स्वरूपात येथे अस्तित्वात आहे. अशा पिंडीची रोज पुजा केली जाते.


संपुर्ण #सोलापुर जिल्हा व परिसरातील #सांगली, #सातारा, #कोल्हापूर, #लातुर, #उस्मानाबाद तसेच #कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी दि. ९ एप्रिल २६ रोजी रात्री दहा वाजता देवाच्या सभा मंडपात वाघ्या मुरळीचा जागरण गोंधळ, शुक्रवारी दि. १० एप्रिल २६ रोजी पहाटे पाच वाजता देवाचा अक्षता सोहळा व याच दिवसाला गावकऱ्यांची अष्टमी म्हटली जाते. या दिवशी गावकरी आपल्या आरत्या घेऊन नाल बसवणे, पुरणपोळीचा नैवद्य देवास दाखवितात. शनिवारी दि. ११एप्रिल २६  रोजी यात्रेकरुंची अष्टमी असते. या दिवशी दाखल झालेले सर्व भाविक आपला नैवद्य #पुजारी, #गडशी-गोसाव्या मार्फत देवास दाखवितात. रविवारी दि. १२ एप्रिल २६ रोजी रात्री दहा वाजता शोभेच्या दारू कामाने या यात्रेची सांगता होणार आहे. याशिवाय यात्रा काळात दररोज रात्री नऊ वाजता देवाचा पालखीसह सवाद्य छबीना निघणार आहे. यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नदान केले जाणार आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय केली आहे. ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी मोहोळ पोलिसांनी चोख #बंदोबस्त ठेवला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान #ट्रस्टी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 - धनाजी माने ,इटकरे ( सांगली ) .....✍️






Saturday, March 21, 2026

“ रमजान ईदची खीर ( शिरखुरमा ) थांबली… पण नातं अजूनही श्वास घेत आहे”







=====================================

“ रमजान ईदची ( शिरखुरमा ) खीर थांबली… पण नातं अजूनही श्वास घेत आहे”

=====================================

आज २१ मार्च ‘रमजान ईद’… सणाचा दिवस. आनंद, गोडवा, आपुलकी, भेटीगाठी यांचा दिवस. पण आज मनात काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय… एक अनामिक हुरहूर, डोळ्यांत नकळत येणारे अश्रू, आणि मनाच्या कोपऱ्यात निर्माण झालेली एक खोल पोकळी.

गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच असा दिवस उगवला आहे, जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातील किणी गावातून बालम मुजावर सरांची गोड खीर( शिरखुरमा ) माझ्या घरी पोहोचला नाही…

आणि याचं कारण एकच—सर आता या जगात नाहीत.

मागच्या महिन्यात, अगदी अल्पशा आजाराने त्यांचे वयाच्या ७४- ७५ रीत निधन झाले . आयुष्य किती अनिश्चित आहे, हे कळतं… पण काही माणसं अशी असतात, की त्यांचं जाणं स्वीकारणं फार कठीण होतं. बालम मुजावर सर त्यापैकीच एक. हसतमुख ,प्रेमळ स्वभाव ,वयाने माझ्यापेक्षा २५ एक वर्षानी मोठे, वडिलधारे .

सन २००१… माझी बदली  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली हून घुणकी येथे झाली. नवीन ठिकाण, अनोळखी वातावरण, नवीन सहकारी… त्या सगळ्यात एक साधं, शांत, प्रेमळ व्यक्तिमत्त्व माझ्या आयुष्यात आलं—बालम मुजावर सर.

पहिल्याच भेटीत त्यांच्या बोलण्यातली आपुलकी, वागण्यातला साधेपणा, आणि मनातली माणुसकी जाणवली. हळूहळू ओळख वाढली, संवाद वाढले… आणि ती ओळख एका सुंदर नात्यात रूपांतरित झाली—जिवाभावाच्या मैत्रीत.

धर्म वेगळे होते—मी हिंदू, ते मुस्लिम. पण आमच्यात कधी धर्माचा अडसर आला नाही. उलट त्या भिन्नतेतच एक सुंदर एकात्मता निर्माण झाली.

प्रत्येक ‘रमजान ईद’ला सर किणीहून खास माझ्याघरी खीर ( शिरखुरमा ) घेऊन  इटकरे येथे यायचे. पुढे मी इस्लामपूर (ईश्वरपूरला ) राहिला आलो पुढे ते एवढा प्रवास करत वयाच्या सत्तर - पंच्याहत्तरीतही येत होते. कधी समीर तर कधी इम्रान ही सरांची मुल सरांच्या सोबत असायची.

माझ्याकडे येण्यापूर्वी ते त्यांचे तांदूळवाडी येथील समवयस्क सहकारी शिक्षक बाजीराव पाटील सर यांच्याकडे खीर देऊन पुढे माझ्या घरी यायचे.

हा नियम अखंडपणे  या तवर्षीच्या ' रमजान ईद ' पर्यंत सुरुच होता.

सरांचा माझ्या घरी चहापाणी,गप्पा-गोष्टी व्हायच्या ,सुख-दु:ख शेअर व्हायची.माझ्या मुलांना आशीर्वाद द्यायचे आणि हसतमुख चेहऱ्याने ही स्वारी निरोप घ्यायची. मागच्या रमजान ईदचा निरोप हा त्यांचा आम्हाला दिलेला  शेवटचा निरोप ठरला.....।

खरचं , सरांनी आनलेला  शिरखुरमा फक्त एक गोड पदार्थ नव्हता… ती होती त्यांच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची, आणि माणुसकीची भेट. त्या खिरीचा प्रत्येक घास म्हणजे त्यांच्या मनातली आपुलकी अनुभवणं होतं.

दिवाळीच्या सणात किणीला त्यांच्या घरी मी ,  तर कधी माझा मुलगा, तर कधी माझे कुटुंब - लाडू, करंज्या, चकली, चिवडा, असा दिवाळीचा फराळ  घेऊन जायचो. 

त्यांच्या घरात दिवाळीचा उजेड पसरायचा आणि आमच्या मनात ईदचा गोडवा जागा व्हायचा.गळाभेट व्हायची ते आम्हाला दुवा -शुभाशीर्वाद द्यायचे.

खरचं,ही केवळ सणांची देवाणघेवाण नव्हती… ही होती संस्कृतींची, भावनांची,माणुसकीची आणि आपलेपणाची देवाणघेवाण....

 एक-दोन नव्हे, तब्बल चोवीस वर्षे , दोन तपांची ही परंपरा अखंड चालू होती. वेळ बदलली, परिस्थिती बदलली, आयुष्य पुढे सरकत गेल… पण आमचं नातं आणि ही परंपरा कधीच बदलली नाही......

प्रत्येक वर्षी ' ईद ' जवळ आली की मनात एक आनंद असायचा—“मुजावर सर येणार…शिरखुरमा  घेऊन येणार…” पण यावर्षी…दरवाज्याकडे पाहणं झालं, पण सर  आलेचं नाहीत.सरांचा फोन येईल असं वाटलं, पण तोही  आलाच नाही .आणि जाणवलं—आता सर कधीच येणार नाहीत…

आज त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव मनाला वेदना देत होती. घरात सगळं होत, पण काहीतरी  आजच्या ईदच्या दिवशी हरवलंय असं वाटलं.जणू त्या खिरीसोबतच आपल्या आयुष्यातला एक गोडवा ,या गोड माणसाच्या जाण्याने कायमचा हरवला आहे याची जाणीव आज प्रकर्षाने झाली.

आदरणीय बालम मुजावर सर ! हे फक्त एक शिक्षक नव्हते… ते होते एक जिवंत मूल्य. त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं, की खरा धर्म कोणता तर, माणुसकीचा.

त्यांनी कधी  भाषणांतून ऐक्य सांगितलं नाही… पण त्यांनी ते जगून दाखवलं. त्यांच्या एका छोट्याशा कृतीतूंन - दरवर्षी खीर घेऊन येण्यात—इतकं मोठं तत्त्वज्ञान दडलं होतं, की ते शब्दांत मांडणं कठीण आहे.

आजच्या काळात आणि भूतकाळात डोकावून पाहिल की लक्षात येत की, जेव्हा धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जातात,, तेव्हा बालम मुजावर सरांसारखी माणसातली अशी देव माणसं त्या भिंती तोडून प्रेमाचे पूल बांधतात,माणुसकीचे,प्रेमाचे,आत्मियतेचे  आणि आपुलकीचे नाते जपतात.

त्यांचं जाणं म्हणजे केवळ एक व्यक्ती गमावणं नाही… तर एक विचार, एक परंपरा गमावणं आहे. याचे सर एक जिवंत उदाहरण आहे.

पण तरीही…त्यांची आठवण आहे, त्यांच्या आठवणींचा सहवास आहे, त्यांनी दिलेली शिकवण आहे. आज खीर ( शिरखुरमा ) नाही… पण त्यांनी दिलेली माया,प्रेम ,आपुलकी ,जिव्हाळा याचा गोडवा अजूनही मनात  घर करुन तसाच आहे.

आज ते  नाहीत… पण त्यांनी जपलेलं माणुसकीच नातं अजूनही जिवंत आहे.आणि म्हणूनच मनातून एकच आवाज येतो—

“सर, तुम्ही या जगात आज नाही आहात… पण तुमचं प्रेम, तुमची माणुसकी, आणि आपलं नातं—हे कधीच संपणार नाही सर !”

🙏Dear Mujavar Sir ! Miss you lot !😢😢

 - धनाजी माने....✍️

जनगणना… आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत

 ===================🇮🇳=================== 🇮🇳 जनगणना … आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत 🇮🇳 ========================== पहाट अजून पूर्ण उज...