Saturday, January 24, 2026

बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

 



बाबासाहेब परीट



मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्रात लेखन,निवेदनशैली या दोन्ही अंगांनी प्रभाव टाकणारी काही मोठी नावं समोर येतात.

यामध्ये पु.लं .देशपांडे. ,व.पु.काळे. ,ग.आ. कुलकर्णी ,मतकरी-धारप,शंकर पाटील,आप्पासाहेब खोत अशा दिग्गजांनी हे क्षेत्र विविध  अंगांनी आणि रंगांनी समृद्ध केले.

असेच एक नव्यापिढीतील नाव समोर येत

बाबासाहेब परीट .

बाबासाहेब परीट हे ग्रामीण कथाकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. आतापर्यंत सात मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्याची आणि कथा सादर करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. त्यांनी स्वतःच लिहिलेल्या कथा सादर केल्या आहेत व त्या गाजल्याही आहेत. त्यांची 'शिकार ' ही कथा चांगलीच गाजली आहे. 

सिंगापूर येथे झालेल्या तिसऱ्या विश्व साहित्य संमेलनाम ध्येही सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली होती. दोन वेळा दिल्ली येथे झालेल्या साहित्य अकादमीच्या संमेलनातही त्यांना संधी मि ळाली होती. गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनात शिकार कथा सादर केली होती. यावर्षी सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित केले होते. त्यांनी गस्त ही कथा सादर केली.त्यांच्या कथांमधून वारणा खोऱ्यातील ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन घडते.

बाबासाहेब परीट हे केवळ एक प्राथमिक शिक्षक नसून ते कथालेखक व ग्रामीण साहित्याचे अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील साहित्य परंपरा आणि जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाला आहे. शिक्षक वर्गाची मान अभिमानाने उंचावली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षक, अधिकारी व कर्मचारी कथाकथन स्पर्धेत शिराळा तालुक्यातील बिळाशीचे सुपुत्र, जिल्हा परिषद शाळा, धसवाडीचे उपक्रमशील शिक्षक, ख्यातनाम ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी कथेचे बहारदार सादरीकरण केले. त्यांनी प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी त्यांनी स्वलिखित 'गस्त' ही कथा उत्तमरित्या सादर केली. सामाजिक व्यंगावर भाष्य करून जीवनाची मूलभूत तत्वे त्यांनी आपल्या कथेतून मांडली आणि उपस्थितांची मने जिंकली.


महाराष्ट्रातून सुमारे चाळीसहून अधिक अधिकारी, कर्मचारी व शिक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धा तालुकास्तर, केंद्र, जिल्हा, विभाग व नंतर राज्यस्तरावरील अंतिम स्पर्धा गडचिरोली येथे घेण्यात आल्या.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. गडचिरोली येथे ही स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातून निवडक कथाकारांनी यात सहभाग नोंदवला होता. परीट यांनी आपल्या कथेतून ग्रामीण जीवनाचा अस्सल गाभा, लोकसंस्कृतीची ताकद आणि समाजात दडलेली संवेदनशीलता यांचे अत्यंत प्रभावी चित्रण केले. त्यांच्या शब्दांनी आणि सादरीकरणाच्या शैलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


श्री. परीट यांच्या यशाबद्दल सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील, भारत सरकारचे दिल्ली येथील उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील, महाराष्ट्र राज्य लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे - पाटील, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, रायगडचे उप-वन संरक्षक राहुल पाटील, गडचिरोलीच्या उपजिल्हाधिकारी स्मिता पाटील - बेलपत्रे, सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, सांगली शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, सांगलीच्या उपशिक्षणाधिकारी डॉ. श्रीमती विमल माने,  गटशिक्षणाधिकारी,अजिंक्य कुंभार, सुनिल आंबी, पोपटराव मलगुंडे, शिक्षण विस्तार अधिकारी छाया माळी, बाजीराव देशमुख, रविंद्र लोंढे केंद्रप्रमुख प्रफुल्ल काळे,सुधाकर पाटील, पोपट जाधव या शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व शिक्षक तसेच साहित्य वर्तुळातून ,आप्पासाहेब खोत, दि.बा.पाटील,रमजान मुल्ला, स्वाती शिंदे, दीपक स्वामी ,महादेव माने,हिम्मत पाटील, धनाजी माने  तसेच राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्याकडूनही त्यांचे अभिनंदन  होत आहे.

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत त्यांनी मिळवलेल्या यशामुळे सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे हे निश्चित . यावेळी बोलताना , बाबासाहेब परीट म्हणाले की 

" हे यश केवळ माझ्या एकट्याचे नसून, माझे आई-वडील, सहकारी शिक्षक अधिकारी, विविध क्षेत्रातील कार्यरत मित्र परिवार आणि क्रांतिकारी भूमीचे आहे."

 - धनाजी माने.....✍️


Saturday, January 17, 2026

कोरेगांवच्या मातीचा अभिमान













“खेळात जिंकलेले उपविजेतेपद आणि गावकऱ्यांच्या प्रेमाने जिंकलेली मने – 

जिल्हा परिषद शाळा कोरेगांव.”

================================

🏆 कोरेगांवच्या मातीचा अभिमान : जिल्हा परिषद शाळा कोरेगांवच्या चिमुकल्यांची झेप जिल्हास्तरावर 🏆


कोरेगांव गाव आज अभिमानाने उभे आहे. कारण या गावातील जिल्हा परिषद शाळा कोरेगांव येथील चिमुकल्या खेळाडूंनी खो-खो या पारंपरिक भारतीय खेळात छोट्या गटात जिल्हास्तरीय उपविजेतेपद पटकावत केवळ पदकच नाही, तर संपूर्ण गावाचे मन जिंकले आहे.

ही कामगिरी फक्त एका स्पर्धेतील यश नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्दीची, चिकाटीची आणि आत्मविश्वासाची जिवंत साक्ष आहे. मातीवर खेळत मोठी होणारी ही मुले आज जिल्ह्याच्या क्रीडामंचावर चमकली आणि “आम्हीही कुणापेक्षा कमी नाही” हे ठामपणे सिद्ध केले.

🎶 वाद्यांच्या गजरात ,फटाक्यांची जोड अभिमानाची मिरवणूक

या ऐतिहासिक यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी कोरेगांव गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ढोल-ताशा,हालगी-घुमके , टाळ्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. गावात रांगोळी काढून ठिकठिकाणी या खेळाडूंचे औक्षण केले.पेढे भरवले.एक भावनिक व मन भरुन टाकणारे क्षण या बालचमु खेळाडूंनी अनुभवले.गावकऱ्यांच्या मोठ्यामनाची प्रचिती या विद्यार्थ्यांना आली.

 गावातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक आज आनंदाने फुलून गेला होता.

"एक- दोन कोरेगांव ", "आमची शाळा - जिल्हा परिषद शाळा " असा जिल्हा परिषद शाळा कोरेगांवचा जयघोष करत खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांत चमक स्पष्ट दिसत होती.

या मिरवणुकीत शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही मिरवणूक केवळ खेळाडूंचा सन्मान नव्हती, तर शाळा आणि गाव यांच्यातील अतूट नात्याचा सुंदर उत्सव होती.

 शिक्षकांचे ,क्रिडाप्रेमींचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द

या यशामागे विद्यार्थ्यांचे नियमित सराव, शिस्तबद्ध जीवन आणि शिक्षकांचे ,क्रिडाप्रेमींचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन हे प्रमुख कारण ठरले. मर्यादित सुविधा असूनही शिक्षकांनी मुलांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य दिशा दिली.

उन्हा-पावसाची तमा न बाळगता, अभ्यासासोबत खेळाचा समतोल राखत या मुलांनी केलेली मेहनत आज फळाला आली आहे.

 ग्रामीण शाळेचा आत्मविश्वास

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून, ती संस्कार, आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकासाची शाळा आहे, हे या यशाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ही कामगिरी कोरेगांव गावातील इतर विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा ठरणार असून, खेळ, शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घालणाऱ्या शाळेची भूमिका अधिक ठळक झाली आहे.

 भविष्याकडे आशेने पाहताना

आज उपविजेतेपद मिळाले असले, तरी या चिमुकल्यांच्या डोळ्यांत विजेतेपदाची स्वप्ने चमकत आहेत. गावकऱ्यांचे प्रेम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ असेच कायम राहिले, तर उद्या हीच मुले राज्य व राष्ट्रीय पातळीवर कोरेगांवचे नाव उज्वल करतील, यात शंका नाही.

कोरेगांवच्या मातीत जन्मलेल्या या चिमुकल्यांनी दाखवलेली जिद्द आणि यशाची भूक हीच या गावाची खरी ओळख आहे.

🌼 जिल्हा परिषद शाळा कोरेगांवच्या या गौरवशाली यशाला मनापासून सलाम! 

आज या चिमुकल्या खेळाडूंनी केवळ एक उपविजेतेपद मिळवलेले नाही, तर आत्मविश्वास, एकजूट आणि मेहनतीचे मोल संपूर्ण गावासमोर उभे केले आहे. जिल्हा परिषद शाळा कोरेगांव ही केवळ शाळा नसून, ती स्वप्न घडवणारी आणि भविष्याला दिशा देणारी एक संस्कारशाळा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोरेगांवच्या मातीत वाढलेली ही मुले उद्या मोठ्या मैदानांवर झळकतील, हा विश्वास आज अधिक दृढ झाला आहे. शिक्षकांचे ,क्रिडाप्रेमींचे मार्गदर्शन, पालकांचे आशीर्वाद आणि गावकऱ्यांचे प्रेम असेच कायम राहिले, तर यशाची ही मिरवणूक थांबणार नाही.

🌟✌️ही सुरुवात आहे… कोरेगांवच्या नावाला उज्वल करणाऱ्या अनेक सुवर्णक्षणांची! 🌟

   - धनाजी माने.....✍️





Tuesday, September 02, 2025

🙏भावपूर्ण श्रद्धांजली !💐

 

🙏भावपुर्ण श्रद्धांजली : समाजाभिमानी नेता व प्रगतशील शेतकरी -सुभाष नामदेव पाटील (तात्या)

२ सप्टेंबर २०२५ रोजी ,वयाच्या ७३व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.ते तात्या या नावाने सर्वपरिचित होते.

  तात्या !  हे नाव उच्चारताच  प्रत्येकाच्या मनात आदर, आपुलकी आणि प्रेरणेची छाप उमटते.

तात्या हे केवळ शेतकरी नव्हते, तर एक मार्गदर्शक, समाजाभिमानी नेता आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व होते.

 सरपंच, सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले .सोसायटी संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.  

इटकरे गावाचे श्रद्धास्थान असणाऱ्या तुकाईदेवीच्या देवालयाचा  जिर्णोद्धारही त्यांनीच त्यांच्या काळात केला. तुकाईदेवालय परिसर या परिसरातील एक पर्यटन स्थळ म्हणून आज नावारूपाला येत आहे यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.

त्यांनी प्रगतशील शेतकरी म्हणूनही आधुनिक शेतीत नवे प्रयोग करून दाखवले. शेतीच्या अभ्यासासाठी त्यांनी इस्राएलचाही दौरा केला. व  पाण्याचे महत्व जाणून त्यांनी तो प्रयोग आपल्या इटकरे येथील शेतीवर केला. 

कुणाच्या स्वप्नातही नसेल अशा खडकावरती त्यांनी नंदनवन फुलवले.

जवळजवळ वीस एकर क्षेत्रावर जेसीबी पोकलॅण्ड, बुलडोझर अशा अवजड  अवजारांचा वापर करून त्यांनी ही शेती हाताखाली आणली. व या शेतीवर नवनवे प्रयोग केले. पुढील अनेक पिढ्यांसाठी व तहयात नवनिर्मिती करणारी शेती निर्माण करून ती फुलवली.

केळीसारख्या पिकांचे त्यांनी या क्षेत्रामध्ये विक्रमी उत्पादन घेतले. व इंच आणि इंच जमिनीचा वापर करून त्यांनी बांधावरतीही वनराई फुलवली बांधावरती सुपारी, नारळ ,आंबा यासारख्या पुढील अनेक पिढ्यांना उत्पादन देणाऱ्या वनराईची नवनिर्मिती केली. जणू काळाकुट्ट दगडावरती त्यांनी नंदनवनच फुलवले.

त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. 

सर्वसामान्य व गरीब कुटुंबात जन्माला येऊनही  कष्ट, चिकाटी आणि धडाडीच्या जोरावर त्यांनी आपले घर, शेती आणि समाजकारण उभे केले.

तात्यांचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्यांचे कुटुंब. घरातील प्रत्येकाला त्यांनी मेहनतीची शिकवण दिली. त्यांच्या मुला-मुलींनी व नातवंडांनी शिक्षण व उद्योग क्षेत्रात  परंपरा पुढे चालवली आहे. आज त्यांची नातवंडे देशात व परदेशात शिक्षण घेत आहेत, काही उद्योगधंद्यात आपले स्थान निर्माण करत आहेत. "सुमनराज हायटेक फर्म" ही त्यांच्याच प्रेरणेने उभी राहिलेली संस्था आज यशस्वीपणे कार्यरत आहे.

तात्या साधेपणाने जगले, त्यांच्या वागण्यात मोठेपणाचा कधीच डामडौल नव्हता.

 प्रत्येकाला त्यांनी कधी आपुलकीने तर कधी प्रसंगी रागाहूनही हात दिला, संकटात आधार दिला. 

माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी खऱ्या अर्थाने कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे आधार दिला, सुखदुःखात साथ दिली. त्यामुळे त्यांचे जाणे हे केवळ कुटुंबापुरतेच नाही, तर आमच्यासारख्या असंख्य लोकांसाठी वैयक्तिक हानी आहे.

आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर  त्यांच्या कुटुंबीयांना देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना !

तात्यांच्या शिकवणी, त्यांच्या कष्टाची परंपरा आणि समाजकारणाचा वारसा पुढील पिढ्यांना नक्कीच दिशा देत राहील.

🙏 तात्या, आपण दिलेला आधार, आपुलकी आणि प्रेरणा आम्ही विसरणार नाही. आपण आमच्यासाठी कायम प्रेरणास्थान राहाल. भावपूर्ण श्रद्धांजली! 🌹

     - धनाजी माने ….✍️

  dhanajimane.blogspot.com



Saturday, July 12, 2025

"शिष्याचे नम्र अभिवादन: गुरूच्या हृदयाला स्पर्शणारी कहाणी"


🎁 गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळालेलं आयुष्यभराचं बक्षीस – एक शिष्याचं पत्र ⤵️

#गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नव्हे, तर आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक खास दिवस. #शिक्षक म्हणून गेली कित्येक वर्षे काम करत असताना अनेक विद्यार्थी भेटले, अनेक अनुभव गाठीशी जमा झाले. पण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जे काही अनुभवलं, ते शब्दांत मांडणं कठीण आहे – आणि म्हणूनच या लेखातून मी हे सर्व शेअर करत आहे.


आज सकाळी मला माझा एक विद्यार्थ्यी शुभम याचं पत्र आल. हे पत्र वाचताना माझ्या डोळ्यांत #अश्रू उभे राहिले.आम्ही पती-पत्नी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात काम करीत असताना या विद्यार्थ्यांना २० वर्षापुर्वी अध्यापन केले होते.६२ पैकी ५२ विद्यार्थी त्यावेळी ४ थी शिष्यवृत्ती मद्धे यशस्वी झाले होते. त्यातील एका विद्यार्थ्याने पाठवलेल पत्र ,सध्या तो #इंजिनिअर आहे.

 एक शिक्षक म्हणून आयुष्यात खूप काही मिळवलं, पण हे पत्र म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्यभरासाठीचं अमूल्य बक्षीस आहे. 

🔖तुम्ही स्वतःच ते वाचा :शिष्य शुभमचं पत्र...

===================

आदरणीय सर & मॅडम,

मी तुमचा शिष्य शुभम,

गुरु ब्रम्हा, गुरु विष्णु, गुरू देवो महेश्वरा,

गुरु साक्षात परब्रह्म, तसमैसी गुरु नमः🙏🏻

आज गुरुपौर्णिमा, याचेच औचित्य साधून प्रथम तुम्हा दोघांना वंदन करतो आणि तुमच्यासाठी दोन शब्द🙏🏻


मी इंग्लिश माध्यमातून मराठी माध्यमांमध्ये इयत्ता २ री मध्ये आपल्या गावच्या प्राथमिक शाळेत पहिल्या सत्रात मध्यातून प्रवेश घेतला. त्यावेळी तुम्ही वर्ग शिक्षक होता. माझे वडील तुमच्याकडे माझ्या प्रवेशासाठी मला घेऊन आले होते. त्यावेळी मला मराठीचा 'म' सुद्धा माहिती नव्हता. तुम्ही माझ्या वडीलांना वर्गातील इतर मुलांची तयारी दाखवली. त्या वेळी खूप मागे होतो. मला इतकी समज नव्हती आणि मी पूर्ण कच्च्या माती सारखा होतो. नंतर माझी तुमच्या मार्गदर्शना खाली घडायला सुरुवात झाली. मराठी साठी शून्य असणारा मी इयत्ता ३ मध्ये पूर्ण वर्ग मध्ये तिसरा आलो. हे फक्त तुमच्यामुळे. तिथून एक वेगळा आत्मविश्वास तुम्ही माझ्या मध्ये निर्माण केला आणि तिथून पुढे मागे वळून ही पाहील नाही. तुम्ही दाखवलेला विश्वास आणि तो आत्मविश्वास आजही माझ्या सोबत आहे. ही कच्ची माती आता एका पूर्ण परिपक्व मडक रूपात बनलेला आहे.


लहान असताना आम्ही सर्वच तुम्हाला खूप घाबरत होतो. तेव्हा वाटायचं की तुम्ही आम्हाला मारता म्हणून आम्ही तुम्हाला घाबरत होतो, पण नंतर समजले की ती भीती तुमच्याबद्दल असलेल्या आमच्या मनातल्या आदरा प्रति होती. या आजच्या स्पर्धेच्या युगात जे काही मी पाय घट्ट करून उभा आहे ते फक्त तुम्ही आमच्या सुरवातीच्या काळात रचलेल्या मजबूत पायामुळेच शक्य झाले आहे.


आज गुरुपौर्णिमा, गुरुला वंदन करण्याचा दिवस पुन्हा एकदा तुम्हाला वंदन करतो, तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहुदेत. काही चुकी झाली असल्यास क्षमस्व 🙏🏻

धन्यवाद.

तुमचा आज्ञाधारी शिष्य,

शुभम

______________________________

हे पत्र वाचून मी खूप वेळ शब्दच हरवून बसलो. अशा वेळी शिक्षकाच्या भूमिकेतील "गुरू" ही संकल्पनाच नव्याने उमगते. कधी कुणाच्या आयुष्यात आपण काय बीज पेरलं याची कल्पनाही नसते, आणि अशा वेळी शिष्य स्वतःहून त्याचा उल्लेख करतो, तेव्हा समाधानाचं उधाण येतं. या पत्राला उत्तर देताना माझ्या मनात भावनांचा कल्लोळ होता. शब्द जुळवणंही कठीण जात होतं, पण त्याच वेळेस खूप काही बोलावंसं वाटत होतं. 


🔖म्हणून मी शुभमला खालीलप्रमाणे उत्तर पाठवलं:---माझं उत्तर – एक गुरू म्हणून 

____________________________

प्रिय शुभंम,

सप्रेम आशीर्वाद.

तुझं गुरुपौर्णिमेनिमित्ताने पाठवलेलं पत्र वाचलं आणि डोळ्यांत अश्रू तरळले. एका गुरूसाठी याहून मोठं बक्षीस दुसरं काही असूच शकत नाही. तुझ्या आठवणींनी मन पुन्हा त्या जुन्या दिवसांत हरवून गेलं.


तू इयत्ता दुसरीत आमच्या शाळेत आला होतास, ते क्षण आजही आठवतात. त्या वेळचा तुझा निरागस चेहरा, कुतूहल, आणि भाषेचं अज्ञानही तुझ्या डोळ्यांतील चमक लपवू शकलं नाही. मला तुझ्यात एक प्रतिभाशाली विद्यार्थी पहिल्या दिवसापासून दिसला होता. आणि मी फक्त एक गुरु म्हणून तुला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला.


तू स्वतःच खूप मेहनती होतास, आणि जेव्हा एखादा विद्यार्थी संधी मिळाल्यावर झपाटून शिकतो, प्रगती करतो, तेव्हा त्याच्या यशात गुरूचा नव्हे तर त्या विद्यार्थ्याच्या जिद्दीचा अधिक वाटा असतो. तुला इयत्ता तिसरीत आलेलं यश म्हणजे केवळ सुरुवात होती — त्यानंतर तू सतत प्रगती करत गेलास, हे पाहून मला खूप आनंद होतो.


तू म्हणतोस की, "मी एक कच्ची माती होतो आणि परिपक्व मडक झालो" — हे ऐकून समाधान वाटतं की, त्या मातीला योग्य आकार देण्यात थोडं योगदान आमचंही होतं. पण या मडक्याला मजबुती आणि उपयोगीपणा तू स्वतःच्या कष्टांनी दिलास.


तू आमच्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता, आदर आणि प्रेम मनाला स्पर्शून गेले. शिक्षक म्हणून हा क्षण अत्यंत समाधानाचा आहे.

तुला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. तू आयुष्यात कितीही उंच भरारी घेत जा, पण मातीचा गंध आणि मूळ कधी विसरू नकोस. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.


गुरुचं खरं यश हेच की त्याचा शिष्य यशस्वी होतो आणि मनाने नम्र राहतो. तू हे दोन्ही सिद्ध केलं आहेस.

सदैव तुम्हा सर्व विद्यार्थ्यांनवर मुलांनप्रमाणे प्रेम करणारे तुमचे

माने सर आणि मॅडम

_________________________

एकूणच हे दोन्ही पत्र वाचताना शिक्षक म्हणून तुमच्याही डोळ्यांत पाणी तरळलं असेल. शिक्षक आणि शिष्य यांचं नातं इतकं नाजूक आणि तरीही इतकं गहिरं असतं की शब्द अपुरे पडतात. शुभमसारखा शिष्य मिळणं ही शिक्षकासाठी आयुष्यभराची संपत्ती आहे.आणि असे अनेक विद्यार्थी मला माझ्या आयुष्यात मिळाले. यामध्ये मला आजही त्यांचे फोन येतात .

नॉर्वे मद्धे असणारा अक्षय,अमेरिकेत असणारा संग्राम , महाराष्ट्र पोलीसमद्धे असणारा जयकर , कुवेतमद्धे असणारा प्रतिक तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अभिनव,सुशांत, अनिकेत, सुरज ,प्रवीण गावडे ,मंगेश ,आदित्य, मयूर, रोहन ,सत्यम,जयेश ,हर्षद,अजिंक्य, स्वप्निल,प्रणव, राहुल,साहिल, अभिजीत ,अमर ,अनिल रणजीत,ऋषिकेश ,सौरभ ,सुरेश ,संतोष ,धीरज, महेश हे सर्व विद्यार्थी त्यावेळच्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्काने यशस्वी झाले होते.अनेक विद्यार्थ्यांनी तर २५२ ते २७४ इतकी  मार्कस  मिळवली होती.  यशस्वी झालेले हे विद्यार्थी आजही कृतज्ञतापूर्वक मागे फिरून पाहतात.  आठवणी काढतात. संपर्क साधतात ,भेटतात.माझा वाढदिवस स्मरणात ठेवून शक्य असेल ते विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी येऊन जातात.तसेच तुषार व सुहास हे तर वेळोवेळी आमच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी करतात ,असेल ती भाजी -भाकरी आमच्या समवेत खातात ,गप्पा मारतात ,सुखदुःख शेअर करतात... तेव्हा मन भरून येत गहिवरून येतं. आयुष्यातील हे सर्वात मोठ बक्षीस मिळाल्याचं समाधान मिळतं.


हा लेख मी खास त्या क्षणाच्या साक्षीदारासाठी लिहिला आहे – ज्यांनी मला “गुरू” या शब्दाचा खरा अर्थ पुन्हा एकदा शिकवला.

- धनाजी माने....✍️

 _______________________

🔖 अमेरिकेतून आणखी एका माझ्या संग्राम या विद्यार्थ्याने पाठवलेल पत्र -

[7/5, 12:57 AM] Sangram Nikam: 

"I want to sincerely thank you sir for giving me the best education. Your guidance, patience, and dedication have shaped who I am today. I’m truly grateful for everything you've taught me, both inside and outside the classroom."


[7/5, 12:59 AM] Sangram Nikam:  "In the USA, it's not easy to learn everything, especially without strong communication. But you and Madam helped me so much and taught me many important things. I’m truly grateful for your support, guidance, and patience. Thank you for helping me grow."

 ____________________________


Tuesday, May 13, 2025

मनाचा हळवा कोपरा – वेदांत आणि वेदिका






=======================

मनाचा हळवा कोपरा – वेदांत आणि वेदिका यांचे उज्ज्वल यश !

========================

काही क्षण हे आयुष्यात अक्षरशः ठसा उमटवून जातात. काळजाच्या इतक्या जवळचे होतात की त्या क्षणांची आठवण येताना डोळे नकळत ओलावतात.

माझ्यासाठी हा असाच एक सोनेरी क्षण आहे. आज मला मामा म्हणून जे समाधान, जो अभिमान वाटतो आहे, त्याला शब्दांत बांधणं खरंतर अवघडच आहे.

माझा लाडका भाचा #वेदांत… किती आठवणी आहेत त्याच्या बालपणाच्या. लहानपणी खेळण्यामधील हनुमानाची गदा  धरून “जय हनुमान !” म्हणणारा वेदांत आज खऱ्या अर्थाने देशासाठी उभा राहिलाय. 

UPSEE - NDA परीक्षेत देशभरातून १६० वा क्रमांक मिळवणं हे काही सोपं नव्हतं – वर्षानुवर्षांचे कष्ट, अभ्यास, शिस्त आणि अपार समर्पण यामागे आहे. त्याहून अधिक गौरवाची गोष्ट म्हणजे Service Selection Board-SSB मध्ये संपूर्ण देशातून ७ वा  क्रमांक मिळवून त्याची NDA मध्ये अंतिम निवड झाली - ही निवड म्हणजे केवळ एका मुलाचं यश नाही, तर कुटुंबाचं,  संस्कारांचं आणि  देशसेवेच्या संस्कृतीचं यश आहे.

त्याचं मनोबल, त्याची शारीरिक आणि मानसिक तयारी, आणि त्याचे देशप्रेम – हे सर्व पाहिलं की वाटतं, हा मुलगा खरोखरच भारतीय सैन्याचा गौरव ठरेल. वेदांत आता केवळ माझा भाचा नाही – तर , तो आता देशाच्या मातृभूमीचा सुपुत्र झाला आहे.

आणि त्याचबरोबर, माझी चिमुरडी भाची समीक्षा ( वेदिका) – अभ्यासात लहानपणापासून हुशार, शांत, पण खूप चिकाटीची. पुस्तकांत गुंतलेली, परीक्षांबद्दल जागरूक आणि नेहमी आई-वडिलांचं नाव उजळवण्याच्या प्रयत्नात असणारी मुलगी. 

आज १३ मे २५ रोजी १० वी चा रिझल्ट समजला... ती १० वी बोर्ड परीक्षेत ९७.२०%  गुण मिळवले.या तिच्या उज्ज्वल यशाने डोळ्यांत आनंदाश्रू आले.ऊर अभिमानाने भरुन आला.

 हे यश काही एका परीक्षेपुरतं मर्यादित नाही – हे तिच्या आत्मविश्वासाचं, सातत्याचं आणि मजबूत स्वप्नांच्यापाठी चालण्याच्या इच्छाशक्तीचं प्रतीक आहे.

ती फक्त गुण मिळवणारी मुलगी नाही – ती भविष्यात समाजाला दिशा देणारी एक तेजस्वी किरण आहे, हे मला ठाम वाटतं. आई-वडिलांनी तिला दिलेले संस्कार ,मूल्य, शिक्षिकांनी केलेलं मार्गदर्शन आणि तिच्या स्वतःच्या मेहनतीचा संगम म्हणजेच हे तिचे यश आहे.

आज वेदांत आणि वेदिका  दोघंही वेगवेगळ्या वाटांनी, पण एकाच दिशेने – प्रगतीच्या, सन्मानाच्या आणि प्रेरणेच्या मार्गावर निघाले आहेत. त्यांचं हे यश केवळ आकड्यांमध्ये नाही, तर ते मनात खोलवर रुजलेल्या संस्कारांमध्ये आहे. त्यांच्या या यशात त्यांनी एक उदाहरण घालून दिलं आहे – ' की स्वप्नं पाहणं आणि ती पूर्ण करण्यासाठी लढणं, यातूनच खरं यश जन्म घेतं. '

मामा या नात्याने मी आज अभिमानाने डोळे मिटतो आणि अंतःकरणातून एकच प्रार्थना करतो – देव यांना सदैव योग्य मार्ग दाखवो, हे असेच यशाच्या पायऱ्या चढू देत , आणि या मुलांनी आपल्या यशाने अनेकांचे जीवन उजळवो.

वेदांत आणि समीक्षा – आज तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणा बनला आहात. तुमच्या यशाने आमच्या मनात नवी स्वप्नं जागी केली आहेत. तुमचा मामा म्हणून, माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका आज तुमच्या यशासाठी गूंजतो आहे. मामा म्हणून मी अभिमानाने आणि प्रेमाने नतमस्तक आहे. तुमच्या यशाची ही केवळ सुरुवात आहे – आकाश अजून मोठं आहे आणि उडण्यासाठी पंख तुमच्याकडे आहेतच!Keep it up !👍 Dear Vedant & Vedika

तुमचा मामा !

- धनाजी माने.....✍️




 

बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...