कागदावर उतरलेला निरागस जिव्हाळा: जेव्हा दुसरीतील मुलींनी सरांना साद घातली...आठवणींच्या हिंदोळ्यावरचे एक पत्र!
======================
शिक्षक म्हणून काम करताना आपण अनेक गावं फिरतो, अनेक चेहरे पाहतो. पण काही गावं आणि तिथली मुलं काळजाच्या अशा कोपऱ्यात घर करतात की, तिथून बाहेर पडणं कधीच शक्य होत नाही.माझी कामेरी गावांतून शासकीय नियमानुसार बदली दुसऱ्या गावी झाली पण….कामेरी गावच्या त्या शाळेचा कॅम्पस आजही माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. मी ज्या मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होतो, त्याच कॅम्पसमध्ये शेजारच्या मुलींच्या शाळेत माझी पत्नी आजही ज्ञानदानाचं काम करत आहे. याच धाग्याने जोडल्या गेलेल्या इयत्ता दुसरीतील त्या चिमुकल्या मुली... ज्यांच्याशी कधी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने, तर कधी मधल्या सुट्टीत गप्पांच्या ओघात जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जुळले.
बदली झाल्याने २० किलोमीटर वरच्या मी दुसऱ्या शाळेत बदली होऊन गेलोय.आज मी त्या शाळेत प्रत्यक्ष शिकवायला नाही, पण , मी ज्या शाळेत शिकवायला होतो त्या शाळेतल्या मुलांच्या मनातील जागेइतकीच त्या चिमुकल्यां लेकींच्या मनातली माझी जागा आजही तशीच अढळ आहे, याची प्रचिती मला नुकत्याच मिळालेल्या त्या निष्पाप , निरागस लेकींच्या पत्रांतून आली.
मोडक्या-तोडक्या अक्षरात, पण अथांग मायेने एकत्र लिहिलेले पत्र वाचताना काळजाचा ठाव सुटला आणि डोळ्यांच्या कडा कधी ओलावल्या, हे समजलंच नाही.
अक्षरांतून पाझरणारे निखळ प्रेम
दुसरीतील त्या लहानग्या हातांनी धरलेल्या पेन्सिलमधून जे शब्द उमटले आहेत, ते कोणत्याही पदवीपेक्षा मोठे आहेत.
रुचीची 'बासुंदी' आणि हक्काचं आमंत्रण: रुचीने पत्रात विचारलंय, "सर, तुम्ही मला बासुंदी म्हणायचा, आता घरी बासुंदी खायला कधी येणार?" तिला दिलेले ते टोपणनाव तिच्यासाठी आजही किती जिवंत आहे, हे पाहून थक्क व्हायला होतं. ती केवळ बासुंदी खायला बोलवत नाहीये, तर त्या गोडव्याने जपलेली आठवण पुन्हा जागवायला सांगतेय.
श्रावणीची 'भेळ' आणि आर्त साद: श्रावणीने शाळेत होणाऱ्या 'भेळ' पार्टीचं आमंत्रण दिलंय. "तुम्ही आम्हाला खूप खूप आवडता" हे तिचं वाक्य वाचताना वाटलं की, एका शिक्षकासाठी यापेक्षा मोठी दुसरी कोणतीच पावती असू शकत नाही.
समिधाचा तो पहिला रंग: रंगपंचमीचा सण जवळ येतोय आणि या पोरींना वेध लागलेत ते आपल्या सरांना रंग लावण्याचे. समिधा अत्यंत हक्काने सांगते, "मी सगळ्यात आधी तुम्हाला रंग लावणार!" तर सईने चक्क 'पिंकी प्रॉमिस' घेत मला यायचा आग्रह केलाय. सणम, प्रचिती आणि तनुजा यांच्या शब्दांतली ती आर्तता— "सर, तुम्ही कधी येणार? एकदा तरी या ना!"— हे केवळ प्रश्न नसून ते माझ्याबद्दलचं नितांत प्रेम आणि ओढ आहे.
काचेसारखं स्वच्छ नातं
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे मोठी माणसं एकमेकांना विसरून जातात, तिथे या सात-आठ वर्षांच्या मुलींनी जपलेला हा जिव्हाळा थक्क करणारा आहे. त्यांच्या पत्रातील प्रत्येक ओळीत एक निष्पाप भाव आहे. त्यांना राजकारण माहीत नाही, त्यांना व्यवहार माहीत नाही; त्यांना माहीत आहे ते फक्त आपल्या 'सरांना' पुन्हा एकदा पाहणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं.
"शिक्षक केवळ फळ्यावर अक्षरे गिरवून घेत नाही, तर तो मुलांच्या कोऱ्या मनावर मायेचे रंग भरत असतो. आज या मुलींनी पत्राद्वारे माझ्या आयुष्यात प्रेमाचे तेच रंग पुन्हा उधळले आहेत."
माणुसकीची श्रीमंती आणि कृतज्ञता
माझ्या पत्नीच्या माध्यमातून पोहचलेली ही पत्रे केवळ कागदाचे तुकडे नाहीत, तर ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे 'सन्मान' आहेत. एखाद्या मोठ्या व्यासपीठावर मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षाही या चिमुकल्यांच्या पत्रातील 'पिंकी प्रॉमिस' मला अधिक मोलाचं वाटतं.
माझ्या लाडक्या चिमुकल्यांनो (रुची, श्रावणी, सणम, समिधा, प्रचिती, सई आणि तनुजा),
तुमची बासुंदी, तुमची भेळ आणि तो रंगपंचमीचा रंग... हे सगळं माझ्यासाठी काळजाच्या पेटीत जपून ठेवण्यासारखं धन आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या या शिदोरीवरच माझं शिक्षकी आयुष्य आणि पुढील प्रवास समृद्ध होत राहील. तुमचं हे 'पिंकी प्रॉमिस' मी नक्कीच जपण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या त्या हक्काच्या रंगासाठी अन् बासुंदीसाठी लवकरच तुम्हाला भेटायला शाळेत येईन!
रुची, श्रावणी, सणम, समिधा, प्रचिती, सई आणि तनुजा....लेकींनो तुमचं हे निष्पाप ,निरागस प्रेमच आम्हा शिक्षक बंधु-भगिनींची खरी श्रीमंती आहे. 🙏"
धनाजी माने….✍️
( टीप: हा लेख वाचून तुम्हाला तुमच्या शालेय जीवनातील आठवणी आठवल्या का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. )




