=====================================
“ रमजान ईदची खीर थांबली… पण नातं अजूनही श्वास घेत आहे”
=====================================
आज २१ मार्च ‘रमजान ईद’… सणाचा दिवस. आनंद, गोडवा, आपुलकी, भेटीगाठी यांचा दिवस. पण आज मनात काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय… एक अनामिक हुरहूर, डोळ्यांत नकळत येणारे अश्रू, आणि मनाच्या कोपऱ्यात निर्माण झालेली एक खोल पोकळी.
गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच असा दिवस उगवला आहे, जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातील किणी गावातून बालम मुजावर सरांची गोड खीर माझ्या घरी पोहोचली नाही…
आणि याचं कारण एकच—सर आता या जगात नाहीत.
मागच्या महिन्यात, अगदी अल्पशा आजाराने त्यांचे वयाच्या ७४- ७५ रीत निधन झाले . आयुष्य किती अनिश्चित आहे, हे कळतं… पण काही माणसं अशी असतात, की त्यांचं जाणं स्वीकारणं फार कठीण होतं. बालम मुजावर सर त्यापैकीच एक. हसतमुख ,प्रेमळ स्वभाव ,वयाने माझ्यापेक्षा २५ एक वर्षानी मोठे, वडिलधारे .
सन २००१… माझी बदली कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली हून घुणकी येथे झाली. नवीन ठिकाण, अनोळखी वातावरण, नवीन सहकारी… त्या सगळ्यात एक साधं, शांत, प्रेमळ व्यक्तिमत्त्व माझ्या आयुष्यात आलं—बालम मुजावर सर.
पहिल्याच भेटीत त्यांच्या बोलण्यातली आपुलकी, वागण्यातला साधेपणा, आणि मनातली माणुसकी जाणवली. हळूहळू ओळख वाढली, संवाद वाढले… आणि ती ओळख एका सुंदर नात्यात रूपांतरित झाली—जिवाभावाच्या मैत्रीत.
धर्म वेगळे होते—मी हिंदू, ते मुस्लिम. पण आमच्यात कधी धर्माचा अडसर आला नाही. उलट त्या भिन्नतेतच एक सुंदर एकात्मता निर्माण झाली.
प्रत्येक ‘रमजान ईद’ला सर किणीहून खास माझ्यासाठी खीर घेऊन इटकरे येथे यायचे. पुढे मी इस्लामपूर (ईश्वरपूरला ) राहिला आलो पुढे ते एवढा प्रवास करत वयाच्या सत्तर पंच्याहत्तरीतही येत होते. कधी समीर तर कधी इम्रान ही सरांची मुल सरांच्या सोबत असायची.
माझ्याकडे येण्यापूर्वी ते त्यांचे तांदूळवाडी येथील समवयस्क सहकारी शिक्षक बाजीराव पाटील सर यांच्याकडे खीर देऊन पुढे माझ्या घरी यायचे.
हा नियम अखंड याग तवर्षीच्या ' रमजान ईद ' पर्यंत सुरुच होता.
सरांच्या माझ्या घरी चहापाणी,गप्पा-गोष्टी व्हायच्या ,सुख-दु:ख शेअर व्हायची.माझ्या मुलांना आशीर्वाद द्यायचे आणि हसतमुख चेहऱ्याने ही स्वारी निरोप घ्यायची. मागच्या रमजान ईदचा निरोप हा त्यांचा शेवटचा निरोप ठरला.....।
खरचं ,खरचं सरांनी आनलेली ती खीर फक्त एक गोड पदार्थ नव्हती… ती होती त्यांच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची, आणि माणुसकीची भेट. त्या खिरीचा प्रत्येक घास म्हणजे त्यांच्या मनातली आपुलकी अनुभवणं होतं.
दिवाळीच्या सणात किणीला त्यांच्या घरी मी तर कधी माझा मुलगा तर कधी माझे कुटुंब लाडू, करंज्या, चकली, चिवडा, असा फराळ घेऊन जायचो. त्यांच्या घरात दिवाळीचा उजेड पसरायचा आणि आमच्या मनात ईदचा गोडवा जागा व्हायचा.गळाभेट व्हायची ते आम्हाला दुवा -शुभाशीर्वाद द्यायचे.
खरचं,ही केवळ सणांची देवाणघेवाण नव्हती… ही होती संस्कृतींची, भावनांची,माणुसकीची आणि मनांची देवाणघेवाण....
एक-दोन नव्हे, तब्बल चोवीस वर्षे , दोन तपांची ही परंपरा अखंड चालू होती. वेळ बदलली, परिस्थिती बदलली, आयुष्य पुढे सरकलं… पण आमचं नातं आणि ही परंपरा कधीच बदलली नाही......
प्रत्येक वर्षी ' ईद ' जवळ आली की मनात एक आनंद असायचा—“मुजावर सर येणार… खीर घेऊन येणार…” पण यावर्षी…दरवाज्याकडे पाहणं झालं, पण सर आलेचं नाहीत.सरांचा फोन येईल असं वाटलं, पण तोही आलाच नाही .आणि तेव्हा जाणवलं—आता सर कधीच येणार नाहीत…
आज त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव मनाला वेदना देत आहे. घरात सगळं होत, पण काहीतरी आजच्या ईदच्या दिवशी हरवलंय असं वाटलं.जणू त्या खिरीसोबतच आपल्या आयुष्यातला एक गोडवा कायमचा हरवला आहे याची जाणीव आज प्रकर्षाने झाली.
आदरणीय बालम मुजावर सर ! हे फक्त एक शिक्षक नव्हते… ते होते एक जिवंत मूल्य. त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं, की खरा धर्म कोणता तर माणुसकीचा.
त्यांनी कधी भाषणांतून ऐक्य सांगितलं नाही… पण त्यांनी ते जगून दाखवलं. त्यांच्या एका छोट्याशा कृतीतून—दरवर्षी खीर घेऊन येण्यात—इतकं मोठं तत्त्वज्ञान दडलं होतं, की ते शब्दांत मांडणं कठीण आहे.
आजच्या काळात, जेव्हा धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जातात, तेव्हा बालम मुजावर सरांसारखी माणसं त्या भिंती तोडून प्रेमाचे पूल बांधतात.
त्यांचं जाणं म्हणजे केवळ एक व्यक्ती गमावणं नाही… तर एक विचार, एक परंपरा, एक जिवंत उदाहरण आहे.
पण तरीही…त्यांची आठवण आहे, त्यांच्या आठवणींचा सहवास आहे, त्यांनी दिलेली शिकवण आहे. आज खीर नाही… पण त्यांनी दिलेली गोडी अजूनही मनात दरवळते आहे.
आज ते नाहीत… पण त्यांनी जपलेलं माणुसकीच नातं अजूनही जिवंत आहे.आणि म्हणूनच मनातून एकच आवाज येतो—
“सर, तुम्ही या जगात आज नाही आहात… पण तुमचं प्रेम, तुमची माणुसकी, आणि आपलं नातं—हे कधीच संपणार नाही सर !”
🙏Dear Mujavar Sir ! Miss you lot !😢😢
- धनाजी माने....✍️




