Sunday, July 05, 2026

हरवलेले शिक्षण आणि हताश शिक्षक

 

शिक्षक की बहुउद्देशीय सरकारी कर्मचारी? – एका प्राथमिक शिक्षकाची व्यथा.....।

"शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे."

हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, भाषणांमध्ये बोलतो आणि

शिक्षक दिनी गौरवाने उच्चारतो. परंतु वास्तवात आजचा शिक्षक राष्ट्राचा शिल्पकार कमी आणि बहुउद्देशीय सरकारी कर्मचारी अधिक बनला आहे.आज प्राथमिक शिक्षकाच्या हातात खडू, पुस्तक आणि विद्यार्थ्यांची स्वप्ने यांच्याबरोबरच जणगणनेचे फॉर्म, BLO चे रजिस्टर, ऑनलाइन पोर्टल, बैठकींचे आदेश, विविध सर्वेक्षणे, शासकीय अहवाल आणि सतत बदलणाऱ्या डिजिटल प्रणालींचा प्रचंड भार आहे.प्रश्न असा आहे की एकच शिक्षक एकाच वेळी उत्कृष्ट अध्यापन, दोन-दोन वर्गांचे व्यवस्थापन,मुख्याध्यापकांचा कार्यभार, जणगणना, BLO, ऑनलाइन कामे, बैठका, प्रशिक्षण आणि स्वतःच्या TET/CTET चा अभ्यास कसा करणार?हा प्रश्न केवळ शिक्षकाचा नाही; तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शिक्षणव्यवस्थेच्या भविष्याचा प्रश्न आहे.

शिक्षकाचे मूळ कार्य काय?🔹समाज शिक्षकाकडून मोठ्या अपेक्षा ठेवतो. त्या योग्यही आहेत.शिक्षकाने—विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे,प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष द्यावे,वाचन, लेखन आणि गणित मजबूत करावे,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा,मूल्यशिक्षण, संविधानिक मूल्ये आणि जीवनकौशल्ये विकसित करावीत,पालकांशी सतत संवाद ठेवावा,सतत मूल्यमापन करून प्रत्येक मुलाला पुढे न्यावे.हे सर्व शिक्षकाचे खरे काम आहे.परंतु आज शिक्षकाचा बहुतांश वेळ अध्यापना ऐवजी

प्रशासकीय कामांमध्ये जात आहे.शिक्षकावर वाढत चाललेले अशैक्षणिक कामांचे ओझे ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शिक्षकाचा विचार करा.

🔹त्याच्यावर या साऱ्या अध्यापना व्यतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत— ( यातील थोड्याच कामाची यादी दिली आहे ,कारण ही यादी खूप मोठी आहे )

जणगणना,BLO (मतदार यादी),निवडणूक काम,विविध शासकीय सर्वेक्षणे,विद्यार्थ्यांचे आधार

व अपार आयडी,UDISE+, विविध पोर्टलवरील माहिती,शिष्यवृत्ती, गणवेश, पाठ्यपुस्तके,पोषण आहार नोंदी,ऑनलाइन अहवाल,वरिष्ठांनी मागितलेली तातडीची माहिती,शाळेच्या सर्व प्रशासकीय नोंदी,मुख्याध्यापकांचा अतिरिक्त चार्ज,तालुका, केंद्र, जिल्हास्तरीय बैठका,प्रशिक्षण,विविध स्पर्धा,पालक भेटी,आणि यासोबत दोन-दोन वर्गांचे अध्यापन,या सर्वांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना वेळ कधी देणार?

दोन वर्गांचा एकच शिक्षक अनेक ग्रामीण शाळांमध्ये एकाच शिक्षकाला पहिली-दुसरी किंवा तिसरी-चौथी असे दोन वर्ग एकत्र शिकवावे लागतात.एका वर्गाला शिकवत असताना दुसरा वर्ग स्वअध्ययन करत असतो.एका मुलाच्या शंकेचे निरसन करताना दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होते.अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे वास्तववादी आहे का?

ऑनलाइन कामांचा वाढता डोंगर,डिजिटल युगात तंत्रज्ञान आवश्यक आहे. पण ते शिक्षकाला मदत करणारे असावे, अडथळा निर्माण करणारे नव्हे.

🔹आज शिक्षकाचा मोठा वेळ पुढील गोष्टींमध्ये जातो

नवीन लिंक,नवीन पोर्टल,नवीन पासवर्ड,नवीन माहिती,नवीन अहवालवारंवार तीच माहिती.जर एखादी माहिती वेळेत भरली नाही तर लगेच स्पष्टीकरण.म्हणजे शिक्षकाच्या गुणवत्तेचे मोजमाप विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर नव्हे, तर पोर्टलवरील "Submitted" बटणावर होऊ लागले आहे.बैठकींचे वाढते प्रमाण,महिन्यात अनेक बैठका.ऑनलाइन बैठक.,ऑफलाइन बैठक.क्लस्टर बैठक.तालुका बैठक.प्रशिक्षण.या बैठकींमुळे विद्यार्थ्यांचे अध्यापन किती तास बुडते याचा कधी विचार केला जातो का?

स्वतःच्या अभ्यासासाठी वेळ कुठे?

न्यायालयाच्या एका निर्णयानेआज प्रत्येक शिक्षकाकडून अपेक्षा आहे की तो—TET, CTET उत्तीर्ण व्हावा.नवीन शैक्षणिक धोरण समजून घ्यावे.डिजिटल कौशल्य वाढवावे.नवीन अध्यापन पद्धती शिकाव्यात.हे सर्व आवश्यक आहे.

🔹पण प्रश्न आहे—वेळ कुठे आहे?

मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम ,सततची डेडलाईन.वरिष्ठांचा दबाव.ऑनलाइन चुका होण्याची भीती.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चिंता.पालकांच्या अपेक्षा.कुटुंबाला वेळ देता न येण्याची खंत.या सर्वांचा परिणाम शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे.अनेक शिक्षक निद्रानाश, उच्च रक्तदाब, मधुमेह, चिंता, नैराश्य आणि मानसिक थकवा अनुभवत आहेत.शिक्षक शाळेत उपस्थित असतो; पण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकलेला असतो.कुटुंबाकडे दुर्लक्ष,सकाळी शाळा.सायंकाळी ऑनलाइन काम.

रात्री अहवाल.सुट्टीच्या दिवशी बैठक.स्वतःच्या मुलांबरोबर वेळ नाही.आई-वडिलांसोबत वेळ नाही.जीवनसाथीसोबत संवाद नाही.ही केवळ एका शिक्षकाची नव्हे, हजारो शिक्षकांची वास्तविकता

आहे.

🔹विद्यार्थ्यांचे नुकसान

या परिस्थितीचे सर्वात मोठे नुकसान विद्यार्थ्यांचे होते.त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळत नाही.

वाचन-लेखनाचा सराव कमी होतो.मूल्यशिक्षणासाठी वेळ राहत नाही.कमकुवत विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष

देता येत नाही.आणि शिक्षणाचा दर्जा घसरला की

दोष शिक्षकालाच दिला जातो.

🔹कायदा आणि राष्ट्रीय धोरण काय सांगते?

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की

शिक्षकांवरील अनावश्यक प्रशासकीय कामांचा भार कमी केला पाहिजे, जेणेकरून ते अध्यापनावर लक्ष केंद्रित करू शकतील.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (RTE Act) नुसार शिक्षकांना नियमित अशैक्षणिक कामांसाठी वापरू नये. अपवाद म्हणून केवळ जनगणना, निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापन

यांसारखी मर्यादित कामे दिली जाऊ शकतात.शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक प्रशिक्षण संस्थाही सातत्याने याच भूमिकेचा पुरस्कार करतात की शिक्षकाचा जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांसाठी राखीव असला पाहिजे.

🔹शासनाला काही थेट प्रश्न

एका शिक्षकावर दोन-दोन वर्ग का?रिक्त शिक्षक पदे तातडीने का भरली जात नाहीत?एकाच माहितीची वारंवार मागणी का केली जाते?प्रत्येक बैठकीसाठी शिक्षकांनाच का बोलावले जाते?प्रत्येक नवीन योजनेचा भार शिक्षकांवरच का?हे सर्व समजत असूनही यावर उपाययोजना का होत नाही ?

🔹उपाय काय?

समस्या मांडणे पुरेसे नाही; उपाय आवश्यक आहेत-

प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची तातडीने नियुक्ती."एक शिक्षक – एक वर्ग" हे धोरण

प्रभावीपणे राबविणे.शिक्षकांना अनावश्यक अशैक्षणिक कामांतून मुक्त करणे.जणगणना, BLO आणि इतर प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करणे.एकात्मिक डिजिटल प्रणाली तयार करून एकच माहिती एकदाच घेणे.अनावश्यक बैठका कमी करणे.शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशन उपलब्ध करणे.मुख्याध्यापकांचा अतिरिक्त चार्ज शक्यतो टाळणे.

🔹शिक्षकांच्या वेळेचा आदर करणे.

समाजासाठी संदेश जेव्हा पालक म्हणतात—"माझ्या मुलाला चांगले शिकवा."

तेव्हा शिक्षक मनोमन म्हणतो—"मलाही तेच करायचे आहे. पण माझ्या हातात पुस्तकापेक्षा कागदपत्रे इतर कामेच जास्त दिली गेली आहेत."

🔹शेवटी एक अपेक्षा विचार

शिक्षक हा यंत्र नाही.तो एक संवेदनशील माणूस आहे.त्यालाही कुटुंब आहे.त्यालाही आरोग्य आहे.त्यालाही स्वप्ने आहेत.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याला विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवायचा आहे.जर शिक्षक कागदपत्रांत, पोर्टलमध्ये आणि बैठकींमध्ये,उपक्रमामद्धे अडकून राहिला, तर विद्यार्थ्यांचे

भविष्यही त्या कागदपत्रांतच अडकून राहील.शिक्षकाला सन्मान केवळ शिक्षक दिनी पुष्पगुच्छ देऊन मिळत नाही. त्याला सन्मान मिळतो तो त्याच्या हातातील अनावश्यक कामांचा भार कमी केल्याने, त्याला अध्यापनासाठी पुरेसा वेळ दिल्याने आणि शिक्षणव्यवस्थेवर विश्वास दाखवल्याने.

कारण शिक्षक मजबूत असेल तरच विद्यार्थी सक्षम होतील;

विद्यार्थी सक्षम झाले तरच राष्ट्र सक्षम होईल.

आज ही वेळ शिक्षकांविषयी सहानुभूती व्यक्त करण्याची नाही,

तर शिक्षणव्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्याची आहे. शिक्षकाला पुन्हा एकदा "शिक्षक" म्हणून काम करू देणे हीच खरी शिक्षणसुधारणा ठरेल.मायबाप सरकारने यावर वेळीच साकल्याने विचार करावा व त्वरित यावर उपाय करावेत अशी महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू-भगिनींची मागणी आहे. तर आणि तरच विद्यार्थ्याचे उज्वल भविष्य घडेल अन्यथा येणारा काळ कुणालाच माफ करणर नाही.ना शासन व्यवस्थेला,ना शिक्षकाला ,ना समाजाला हे नक्की !  -         - धनाजी माने….✍️

Thursday, May 28, 2026

जनगणना… आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत


 ===================🇮🇳===================

🇮🇳 जनगणनाआकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत 🇮🇳

==========================

पहाट अजून पूर्ण उजाडायची असते…पूर्वेकडून हलकासा सोनेरी प्रकाश डोकावू लागलेला असतो…गावात कुठेतरी कोंबड्याची बांग ऐकू येत असते…कोणाच्या अंगणात चुल पेटलेली असते…तर कुठे दुधाच्या कॅनची खडखड सुरू झालेली असते…कोण खांद्यावर रुमाल व खोरे ,टिकाव घेऊन शेताची वाट चालत असतो.

आणि अशा सकाळी…एका शिक्षकाच्या हातात मोबाईल, खांद्यावर बॅग,गळ्यात शासनाने दिलेले icard चेहऱ्यावर जबाबदारी आणि मनात देशसेवेची भावना घेऊन सुरू होतो — जनगणनेचा प्रवास….

वरकरणी हे काम खूप साधं,सोप वाटतं ,दिसत…

घराघरात जायचं…माहिती विचारायची…HLO अँपमध्ये माहिती भरायची…आणि पुढच्या घराकडे निघायचं हा शिक्षकाचा प्रवास सुर राहतो.या प्रवासात काही घटना शिक्षकांना त्रास देऊन गेल्या कुठे वाडी वस्तीवर , शेतात कुत्री मागे लागली, तर काहीं शिक्षकांना चावाही घेतल्याच्या घटना घडल्या.काही लोकांनी प्रगणकाशी वादही घातले ...वेळेत काम करण्याचे टार्गेट असल्याने काहींचे या कामगीरीवर असताना अपघात झाले आणि प्राणाशी मुकावे लागले ,तळपत्या उन्हात रानोमाळी भटकावे लागल्याने उष्माघात होऊन काहींना प्राण गमवावे लागले अशा घटना महाराष्ट्रात ,देशात अनेक ठिकाणी घडल्या.या घटना कानावर येऊनही शिक्षक आपले काम करत राहिले.

 खरं सांगायचं तर —जनगणना ही फक्त मोबाईल वर माहिती गोळा करण्याची प्रक्रिया नसते.ती असते…भारत नावाच्या खंडप्राय देशाला ,विशाल कुटुंबाला जवळून अनुभवण्याची संधी.ती असते…प्रत्येक घरामागचं आयुष्य समजून घेण्याची वेळ.ती असते…समाजाच्या धडधडत्या हृदयाला कान लावून ऐकण्याची एक संवेदनशील प्रक्रिया.

कारण प्रत्येक घरामागे एक जिवंत कथा असते…प्रत्येक चेहऱ्यामागे एक लपलेला संघर्ष असतो…आणि प्रत्येक नावामागे एक अपूर्ण स्वप्न दडलंलेलं असतं.

“माणसं मोजताना माणुसकी भेटत जाते…घराघरातून चालताना आयुष्य उलगडत जाते…”

जनगणनेच्या कामासाठी एखाद्या गल्लीत प्रवेश केला की भारताचं खरं चित्र दिसू लागतं…

एका बाजूला उंच इमारती…मोठमोठ्या गाड्या…आधुनिक दरवाजे…डोअरबेल…पंखा तर कुठे थंड एसी…महागडे मोबाईल…ऑनलाइन मीटिंगमध्ये व्यस्त असलेली माणसं…

तर त्याच रस्त्याच्या पुढच्या वळणावर…पत्र्याचं घर…अर्धवट भिंती…उन्हाने तापलेलं छप्पर…ना पंखा ना एसी..दारात उभी चप्पलविना मुलं…तर काही भागात पाण्याच्या हंड्यासाठी रांगेत उभ्या स्त्रियाही दिसतात…

भारत एकाच वेळी दोन टोकांवर जगताना दिसतो.एखाद्या घरात माहिती विचारताना समोर थंड पाण्याची बाटली येते…“सर, बसा ना थोडा वेळ,पाणी घ्या.सरबत करु दे का ? चहा घ्या थोडा…”

तर काही घरात इतकी गरिबी असते की,स्वतःच्या अडचणी सांगतानाही त्यांना संकोच वाटतो.जगण्यासाठी किती त्यांना किती संघर्ष करावा लागत असेल याची जाणीव समोरच त्याच वास्तव पाहून दिसतं.

“टीव्ही आहे का घरी ? डीश आहे की केबल? ” या साध्या प्रश्नावर जेव्हा उत्तर मिळतं —

“साहेब… आमच्याकडे कुठला हो टीव्ही, रोज पोट भरतानाच नाकी नऊ येतं.कुठला टीव्ही नि कुठली केबल …”

तेव्हा मोबाईलच्या स्क्रीनवर भरलेला डेटा अचानक जड वाटू लागतो,अंतकरण गलबलून येत.यांच्यासाठी आपण काहीतरी कराव अस वाटतं पण…वास्तवतेचे आकडे मोबाईल वर भरण्याशिवाय आपण काहीही करु शकत नाही याची जाणीव होते.कारण त्या एका वाक्यामध्ये त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष दडलेला असतो.

“काही घरात सुख ओसंडून वाहतं…काही घरात दुःखही शांत बसलेलं असतं…पण दोन्ही ठिकाणी,जगणं मात्र सुरूच असतं…”

गावागावातून फिरताना अनेक वार्धक्यात असलेले वयोवृद्ध भेटतात…घराच्या ओट्यावर शांत बसलेले आजोबा,आजी…डोळ्यांवर जाड चष्मा…हातात काठी…आणि नजरेत कोणीतरी येण्याची वाट…

“मुलगा पुण्याला / मुंबईला असतो हो…”

“मुलगी लग्न होऊन नांदायला गेली…”

“आम्ही दोघंच असतो घरी…”

इतकंच ते सहज सांगतात.पण त्यांच्या आवाजामध्ये एकटेपणाची खोल दरी दडलेली असते.कुठे एखादी आजी जुन्या काळाच्या गोष्टी सांगते…

“पूर्वी गावात किती माणुसकी होती हो.आज कस सगळं वेगळचं दिसतय , माणसाला आपुलकीच राहिलेली दिसत नाही…”

कुठे एखादा वृद्ध आपल्या मुलाचा फोटो दाखवत अभिमानाने सांगतो —“माझा मुलगा मोठ्या कंपनीत आहे…”पण त्या अभिमानाच्या मागे मुलाच्या सहवासाची ओढ स्पष्ट जाणवत असते.

“मोठी शहरं वाढत गेली…पण गावाकडची अंगणं रिकामी होत गेली…पैशासाठी धावताना,माणसं ,

आणि माणसातील माणुसकी मात्र दूर निघून गेली…”

जनगणनेच्या प्रवासात सर्वात जास्त मन हेलावून टाकतात ती लहान मुलं…कुठे फाटलेल्या कपड्यातलं मूल दारात उभं राहून मोबाईलकडे आश्चर्यानं पाहत असतं…कुठे शाळेच्या जुन्या वहीत चित्र काढणारी मुलगी दिसते…

“मोठं होऊन काय बनायचं ?” 

या प्रश्नावर डोळे चमकतात… “डॉक्टर,पोलीस,शिक्षक,कलेक्टर…”

स्वप्नं खूप मोठी असतात…पण परिस्थिती मात्र खूप छोटी…कधी कधी वाटतं —या मुलांच्या डोळ्यातील आशा जपण्यासाठीच कदाचित देश जगत असावा.

“फाटकी वही असली तरी स्वप्नं मात्र रंगीत असतात…गरीबांच्या मुलांनाही.आकाशाला गवसणी घालायची असते.”

अनेक घरांमध्ये स्त्रियांचा संघर्ष जवळून दिसतो…सकाळी उठल्यापासून  रात्रीपर्यंत घाण्याला जुंपलेल्या बैलासारख काम,काम आणि कामच….घर…मुलं…शेती…जनावरं…स्वयंपाक…हे राहटगाडग सुरुच.आणि तरीही चेहऱ्यावर शांत हास्य..सार दु:ख ऊरात दाबून जगासमोर हसत राहायचं .

कुठे पती गमावलेली आई मुलांना शिकवण्यासाठी धडपडताना दिसते…कुठे मजुरी करून मुलाचं कॉलेज सुरू ठेवणारी आई भेटते.भारतातील अनेक घरांचा खरा कणा अजूनही स्त्रीच आहे, हे प्रकर्षाने जाणवतं.

“स्वतःचं दुःख लपवूनजी संसार हसवत असते…ती आई नावाची स्त्री, खऱ्या अर्थाने देव असते…”

जनगणना करताना अनेक व्यवसायही भेटतात…

सकाळ पासून चहाची टपरी लावणारा तरुण…दिवसभर उन्हात भाजी विकणारी आजी…छोट्याशा दुकानातून संसार चालवणारा दुकानदार…सायकलवरून दूध नेणारा  शेतकरी…त्यांच्या हातावर कष्टाच्या रेषा असतात…पण चेहऱ्यावर हार नसते.कारण भारत अजूनही मेहनतीच्या जोरावर उभा आहे.

“घामाच्या थेंबातून देश उभा राहत असतो…साधा माणूसच भारताचा खरा चेहरा असतो…”

या प्रवासात धर्म, जात, भाषा, परंपरा यांचं वैविध्यही दिसतं…एका गल्लीत अजान ऐकू येते…दुसऱ्या गल्लीत आरतीचा आवाज…भाषा वेगळ्या…वेष वेगळे…खाणंपिणं वेगळं…

पण प्रत्येकाच्या घरात एकच गोष्ट समान असते —उद्याचा दिवस चांगला असावा ही आशा.तेव्हा जाणवतं —भारत फक्त नकाशावरचा देश नाही…तर विविधतेतून धडधडणारं एक विशाल जिवंत कुटुंब आहे.आणि या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम मनाला स्पर्श करते —लोकांचा शिक्षकावर असलेला विश्वास.“मास्तर,सर,गुरुजी तुम्ही आलात म्हणजे काम नीट होईल…”आणि “मॅडम,बाई  तुम्हीही आलात बर वाटलं आम्हाला आधार वाटला.विचारा काय विचारचे ते तुमच्यावर आमचा विश्वास आहे.तुम्ही विचाराल त्याच उत्तर देवू, ”                   

ही वाक्यं ऐकताना जाणवतं —शिक्षक हा फक्त वर्गात शिकवणारा कर्मचारी नसतो.तो गावाचा विश्वास असतो…तो प्रशासनाचा चेहरा असतो…तो समाजाच्या आशेचा आधार असतो.उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतानाही…प्रखर अशा तळपत्या उन्हात…वाडी-वस्तीवर,डोंगर-दऱ्यांतून…गल्लीबोळांतून फिरून…देशासाठी हे राष्ट्रीय कार्य करणारे शिक्षक खरंच समाजाचे शांत सैनिक असतात.

ना प्रसिद्धी…ना पुरस्कार…ना मोठं कौतुक…फक्त एक जबाबदारी —देशाला स्वतःच्या लोकांची खरी ओळख करून देण्याची.

“शिक्षक फक्त धडा शिकवत नाही…तो समाज वाचत असतो…जनगणनेच्या प्रवासात तो भारत अनुभवत असतो…”

आणि दिवस संपतो…संध्याकाळी थकलेलं शरीर घरी परततं…पण मन मात्र अनेक घरांत अडकून राहतं…त्या वृद्ध आजोबांच्या नजरेत…त्या गरीब आईच्या संघर्षात…त्या मुलाच्या स्वप्नांत…त्या चहावाल्याच्या मेहनतीत…शेतकऱ्यांच्या घामात.

मोबाईल मध्ये डेटा सेव्ह होतो…पण मनात मात्र अनेक चेहरे कायमचे साठून राहतात.तेव्हा प्रकर्षाने जाणवतं —जनगणना ही फक्त आकड्यांची मोजणी नसते…ती असते —माणसांच्या आयुष्याची नोंद…

त्यांच्या दुःखांची…त्यांच्या आशांची…त्यांच्या संघर्षांची…त्यांच्या स्वप्नांची…आणि त्यांच्या जगण्याच्या जिद्दीची…

कारण शेवटी…

“घरं मोजताना भारत भेटत जातो…माणसं समजून घेताना स्वतःचं मनही बदलत जातं…जनगणना म्हणजे केवळ सरकारी काम नसतं…ती असते —समाजाच्या धडधडत्या हृदयाला जवळून ऐकण्याची एक संवेदनशील संधी…”

शेवटी यानिमित्ताने परमेश्वर चरणी एकच प्रार्थना , या प्रवासात ज्या- ज्या घरात दारिद्र्य पाहिले त्या-त्या ठिकाणी बरकत होऊदे ! अशा कुटूंबात सुख-समृद्धी येऊदे ! अशा कुटुंबातील चिमुकल्यांनी उराशी बाळगलेली गोड स्वप्ने साकार होऊदेत .

।। जयहिंद जय भारत ,जय जनगणना ।।

Take care all my Dear !

             - धनाजी माने….✍️

https://dhanajimane.blogspot.com/2026/05/blog-post_28.html

#population #worldpopulationday #populationcontrol #people #world #overpopulation #india #worldpopulation #populationday #covid #populationhealth #depopulation #familyplanning #facts #depopulationagenda 

Tuesday, May 26, 2026

जिल्हा परिषद शाळांचे गुणवत्ता परीक्षांमध्ये उज्ज्वल यश .

 


जिल्हा परिषद शाळांचे गुणवत्ता परीक्षांमध्ये उज्ज्वल यश -वाळवा पंचायत समिती गुणवत्तेत दुसऱ्या क्रमांकावर

============◆===========

सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शोध परीक्षा घेतली. वाळवा तालुक्यातील २१५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. जिल्ह्यात वाळवा तालुका गुणवत्तेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चौथीच्या डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षेत २७ विद्यार्थ्यांनी, सातवीच्या २५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. पहिलीच्या गुणवत्ता शोध परीक्षेत ५३, दुसरी ३९, तिसरी ४९ आणि सहावीच्या २२ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावत उज्ज्वल यश संपादन केले आहे.फेब्रुवारी २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेतलेल्या पाचवीच्या पूर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी उज्ज्वल यश संपादन केले. ६३ शाळांमधील २७९ विद्यार्थी पात्र ठरले. ७६३ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. तालुक्यातील जि. प. शाळा काळमवाडी, नेलें नं. १, महादेववाडी, जाक्राईवाडी, इटकरे,पेठची उर्दू शाळा, इस्लामपूरची उर्दू शाळा या शाळांचे ६० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी पात्र ठरले.

वाळवा तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी, शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन वर्षभर सुरू होते. पंचायत समितीच्या माध्यमातून सरावासाठी प्रत्येक वर्गाच्या पाच सराव चाचण्या घेतल्या होत्या. यामुळेच सर्वच इयत्तांचा गुणवत्तेचा आलेख उंचावला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, अधिकाऱ्यांचे अभिनंदन सांगली जि. प. अध्यक्षा संगीता पाटील, सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील यांनी केले. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून वाढत असलेली विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच उल्लेखनीय आहे. यामुळे ग्रामीण भागातील ओढा जि. प. शाळांकडे पालकांचा ओढा जि. वाढत आहे.

=======================================

बीडीओंचे शैक्षणिक गुणवत्ता आढावा अभियान वाळवा

=====≠==============================

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार गेली दोन वर्षे वाळवा तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता आढावा अभियान राबवत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पहिलीपासून चौथीपर्यंतच्या वर्गाचा गुणवत्ता आढावा घेतला जात आहे. शाळास्तरावर हे अभियान राबवले जात आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी आणि केंद्रप्रमुखांचे पथक तयार केले आहे. वर्षभरात गुणवत्तेचा आढावा घेऊन संबंधित शिक्षकांना सूचना तर गुणवत्तापूर्ण वर्ग असणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले जाते. यामुळे शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी अधिक सतर्क राहत असून सर्व वर्गांच्या गुणवत्तेचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे.

=======================≠===============

जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा वाढता ओढा

" वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षक सातत्याने व्यापक प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिलीपासून आठवीपर्यंत सुरू असलेल्या गुणवत्ता परीक्षांमुळे वर्गांची तयारी चांगली होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होत आहे. स्पर्धा परीक्षांचा पाया या माध्यमातून भक्कम होताना दिसत आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. " -प्रफुल्ल काळे (केंद्रप्रमुख ,कोरेगांव)

- धनाजी माने.......✍️

( सर्व पालकांना शेअर करा )

Saturday, May 23, 2026

🇵🇾 भारताची जणगणना – २०२७



 🇵🇾 भारताची जणगणना – २०२७ 🇵🇾==========================

🇪🇬 शिक्षक आणि जणगणना  🇪🇬

“उन्हात तळपणारा माणूस… देश मोजणारा शिक्षक”
“गुरु म्हणजे फक्त वर्गात धडा शिकवणारा माणूस नसतो…तो समाजाच्या प्रत्येक जबाबदारीत खंबीरपणे उभा राहणारा सैनिक असतो.”
मे महिन्याचे अंग भाजून काढणारे ऊन…रस्त्यावर असलेली शांतता…डोक्यावर तळपता सूर्य आणि हातात मोबाईल घेऊन घराघरांत फिरणारा एक शिक्षक…
कुणासाठी तो “सर” आहे,
कुणासाठी “मास्तर”,
तर कुणासाठी फक्त —
“अहो… उद्या या ना!”
देशाची जणगणना सुरू आहे…आणि हजारो शिक्षक या राष्ट्रीय कार्यात स्वतःला झोकून देत आहेत.एका बाजूला अनेक जण आपल्या कुटुंबासोबत कुलू-मनाली, महाबळेश्वर, थंड हवेच्या ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत…तर दुसऱ्या बाजूला शिक्षक उन्हाच्या चटक्यांत घामाने भिजत घराघरांत माहिती गोळा करत आहेत.

“ज्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकतात,
त्याच्याच हातून देशाची सेवा घडत असते.”

शिक्षकांना सुट्ट्या असतात… पगार असतो…म्हणून समाजात अनेकदा टीकाही होते.पण त्या सुट्ट्यांमध्येही हा शिक्षक स्वतःच्या संसाराला बाजूला ठेवून देशाच्या कामासाठी रस्त्यावर उतरतो, हे मात्र कुणाच्या लक्षात येत नाही.
अनेक शिक्षिका आपल्या लहान बाळांना,मुलांना घरी ठेवून सकाळपासून रात्रीपर्यंत फिरत आहेत.घर,संसार, शाळा आणि जणगणना…सगळ्यांचा ताळमेळ घालत त्या शांतपणे काम करत आहेत.

“आईपण आणि कर्तव्य
दोन्ही सांभाळताना,
तिच्या थकलेल्या चेहऱ्यावरही
देशसेवेचे तेज दिसत असते.”

ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर, शेतामधून, डोंगर उतारांवर पायपीट सुरू आहे.रस्ते नाहीत… सावली नाही…फक्त तळपते ऊन आणि चालत राहण्याची जबाबदारी.काही ठिकाणी कुत्र्यांनी चावे घेतले…
काहींना पाण्याचीही सोय नव्हती…तरीही शिक्षक थांबला नाही.कारण त्याला माहिती आहे —
“हे फक्त काम नाही… हे राष्ट्रकार्य आहे.”

शहरी भागात वेगळीच लढाई…गुडघेदुखी असणारे शिक्षक उंच इमारती चढत आहेत.लिफ्ट बंद…
एकेक मजला पार करत माहिती गोळा करावी लागत आहे.पण याहून जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे —
लोकांची वागणूक…
“आमच्या विश्रांतीच्या वेळी का आलात?”
“काय फालतू प्रश्न विचारता?”
“आमच्या सेवा तर काढून घेणार नाही ना ?”
हे प्रश्न ऐकताना शिक्षकाच्या मनात वेदना उसळतात.
कारण वर्गात गेल्यावर ज्या शिक्षकाला विद्यार्थी आदराने उभे राहून नमस्कार करतात,त्याच शिक्षकाला अनेक घरांसमोर उभ्याउभ्याच माहिती मागावी लागते.

“मान देणाऱ्यांची संख्या कमी झाली,
तरी कर्तव्य निभावणारे हात कमी होत नाहीत.”

जणगणनेच्या कामात फक्त उन्हाची झळ नाही…
तर तांत्रिक अडचणींचाही डोंगर आहे.Application login होत नाही…अर्धा-अर्धा तास App लॉक…
Delete option चा गोंधळ…नेटवर्क नाही…भर उन्हात उभे राहून शिक्षक मोबाईलकडे पाहत राहतोलोकांच्या प्रश्नांना उत्तर देतो…आणि पुन्हा प्रयत्न करत राहतो.
दरम्यान, अनेक ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा तासनतास पेट्रोल पंपावर थांबावे लागले.दुपारी लोकांच्या घरी गेल्यावर बोलही खावे लागले.
“कष्ट करणाऱ्याच्या वाट्याला
उन्हे जास्त येतात,
पण इतिहासात नावही
त्यांचेच कोरले जाते.”
 याहून अधिक वेदना तेव्हा होतात,जेव्हा AC मध्ये बसून नियंत्रण करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची भाषा शिक्षकांना समजून घेणारी नसते ,योग्य मार्गदर्शन केले जात नाही याने तो व्यथित होत आहे. 
काही ठिकाणी मात्र अनेक अधिकारी  शिक्षकांना समजून घेताना दिसतात - शंकांचे निरसन कोणत्याही वेळी फोन केला तरी  प्रेमाने आपुलकीने करतातच त्याचबरोबर ..
'भर उन्हात स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन काम करा! टेन्शन घेऊ नका ! "  असे आपुलकीने,आपलेपणाने , आस्तेवाईकपणे सांगतात. त्यामुळे आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीर उभे असल्याचा आधार मिळतो .अनेक ठिकाणी अपमानीत होऊनही  शिक्षक शांत असतो…कारण त्याने आयुष्यभर सहनशीलता शिकवली आहे.विद्यार्थ्यांना संस्कार शिकवले आहेत.तो स्वतः जळतो…
पण दुसऱ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावतो.
खरंच…
जणगणनेच्या या मोहिमेत शिक्षक फक्त घरांची संख्या मोजत नाही…तर तो देशाच्या प्रत्येक माणसाला शासनाशी जोडत असतो.हा घाम फक्त शरीरातून वाहत नाही…तर तो राष्ट्रसेवेच्या मातीमध्ये मिसळत असतो.

“देश घडवणारा शिक्षक
स्वतः मात्र शांत राहतो…
कारण त्याच्या कर्तव्याचा आवाज
कधी गोंधळ करत नाही.”
आज गरज आहे ती शिक्षकांकडे फक्त “कर्मचारी” म्हणून न पाहण्याची…तर त्याच्या त्यागाचा, संयमाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर करण्याची.कारण…जेव्हा देश स्वतःची गणना करत असतो,तेव्हा त्या देशाच्या प्रत्येक दारावर घामाने भिजलेला एक शिक्षक उभा असतो…!
जयहिंद -जय महाराष्ट्र- जय भारत - जय जणगणना. 🙏Take care All my Dear !

- धनाजी माने…..✍️
dhanajimane.blogspot.com
https://www.facebook.com/share/p/1CHuv56fmA/
(  तुमच्या प्रतिक्रिया Blog वर, वेळ काढून जरुर लिहा ...✍️)

जणगणना मोहिमेत........







Thursday, April 02, 2026

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर












भैरवनाथाच्या नावानं चांगभल.......



#मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ पासून मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होणार असुन यानिमीत्ताने विविध #धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.


येथील ग्रामदैवत भैरवनाथाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की; भारत खंडातील दंडकारण्य हा प्रांत महापुण्यस्थळ आहे. जेथे #देवऋषी, महषीॅ,तपस्वी, #मुनिजन नित्य #तपस्या करीत असताना अशा समस्या काशी विश्वनाथांचे क्षेत्ररक्षक द्वारपाल श्री कालभैरव यांची अतिश्रद्धेने पुजा, अर्चा, #ध्यानधारणा करणारी एक #गोपी (गौळण) आपल्या गवळीवाड्यात रहात असे. तो गवळीवाड्याचा भाग आजही गोपी या नावानेच ओळखला जातो. तेथील जमीन ही पिकाऊ आहे व त्या शेतास गोपी हेच नाव सध्या चालु आहे.


एकदा नित्य ध्यान मग्न असणाऱ्या गोपीस गाईची धार काढण्यास सांगीतली असता ती गोपी हातात भांडे घेऊन वांझ कपिला गाईची धार काढण्यासाठी गेली व धार काढू लागली. त्यावेळी भांडे दुधाने भरलेले आहे व खाली फेसाचा मोठा ढीग पडलेला आहे. असा चमत्कार घरातील सर्व माणसांनी पाहीला. धार काढताना भक्तीरसात तल्लीन झालेल्या गोपीस #समाधी अवस्थेतुन दुर केले. त्याचवेळी गाईचा एक खुर त्या फेसावर पडला व त्या फेसरूपी पिंडीमध्ये गोपीला श्री भैरवनाथाचे अलौकीक दर्शन झाले व ती समाधान पावली. ती फेसरूपी #स्वयंभू पिंड, त्यावर गाईच्या खुराचा व्रण अशा स्वरूपात येथे अस्तित्वात आहे. अशा पिंडीची रोज पुजा केली जाते.


संपुर्ण #सोलापुर जिल्हा व परिसरातील #सांगली, #सातारा, #कोल्हापूर, #लातुर, #उस्मानाबाद तसेच #कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी दि. ९ एप्रिल २६ रोजी रात्री दहा वाजता देवाच्या सभा मंडपात वाघ्या मुरळीचा जागरण गोंधळ, शुक्रवारी दि. १० एप्रिल २६ रोजी पहाटे पाच वाजता देवाचा अक्षता सोहळा व याच दिवसाला गावकऱ्यांची अष्टमी म्हटली जाते. या दिवशी गावकरी आपल्या आरत्या घेऊन नाल बसवणे, पुरणपोळीचा नैवद्य देवास दाखवितात. शनिवारी दि. ११एप्रिल २६  रोजी यात्रेकरुंची अष्टमी असते. या दिवशी दाखल झालेले सर्व भाविक आपला नैवद्य #पुजारी, #गडशी-गोसाव्या मार्फत देवास दाखवितात. रविवारी दि. १२ एप्रिल २६ रोजी रात्री दहा वाजता शोभेच्या दारू कामाने या यात्रेची सांगता होणार आहे. याशिवाय यात्रा काळात दररोज रात्री नऊ वाजता देवाचा पालखीसह सवाद्य छबीना निघणार आहे. यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नदान केले जाणार आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय केली आहे. ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी मोहोळ पोलिसांनी चोख #बंदोबस्त ठेवला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान #ट्रस्टी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 - धनाजी माने ,इटकरे ( सांगली ) .....✍️






हरवलेले शिक्षण आणि हताश शिक्षक

  शिक्षक की बहुउद्देशीय सरकारी कर्मचारी? – एका प्राथमिक शिक्षकाची व्यथा.....। "शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे." हे वाक्य आपण अ...