🇵🇾 भारताची जणगणना – २०२७ 🇵🇾==========================
🇪🇬 शिक्षक आणि जणगणना 🇪🇬
![]() |
| जणगणना मोहिमेत........ |
![]() |
| जणगणना मोहिमेत........ |
#मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ पासून मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होणार असुन यानिमीत्ताने विविध #धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
येथील ग्रामदैवत भैरवनाथाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की; भारत खंडातील दंडकारण्य हा प्रांत महापुण्यस्थळ आहे. जेथे #देवऋषी, महषीॅ,तपस्वी, #मुनिजन नित्य #तपस्या करीत असताना अशा समस्या काशी विश्वनाथांचे क्षेत्ररक्षक द्वारपाल श्री कालभैरव यांची अतिश्रद्धेने पुजा, अर्चा, #ध्यानधारणा करणारी एक #गोपी (गौळण) आपल्या गवळीवाड्यात रहात असे. तो गवळीवाड्याचा भाग आजही गोपी या नावानेच ओळखला जातो. तेथील जमीन ही पिकाऊ आहे व त्या शेतास गोपी हेच नाव सध्या चालु आहे.
एकदा नित्य ध्यान मग्न असणाऱ्या गोपीस गाईची धार काढण्यास सांगीतली असता ती गोपी हातात भांडे घेऊन वांझ कपिला गाईची धार काढण्यासाठी गेली व धार काढू लागली. त्यावेळी भांडे दुधाने भरलेले आहे व खाली फेसाचा मोठा ढीग पडलेला आहे. असा चमत्कार घरातील सर्व माणसांनी पाहीला. धार काढताना भक्तीरसात तल्लीन झालेल्या गोपीस #समाधी अवस्थेतुन दुर केले. त्याचवेळी गाईचा एक खुर त्या फेसावर पडला व त्या फेसरूपी पिंडीमध्ये गोपीला श्री भैरवनाथाचे अलौकीक दर्शन झाले व ती समाधान पावली. ती फेसरूपी #स्वयंभू पिंड, त्यावर गाईच्या खुराचा व्रण अशा स्वरूपात येथे अस्तित्वात आहे. अशा पिंडीची रोज पुजा केली जाते.
संपुर्ण #सोलापुर जिल्हा व परिसरातील #सांगली, #सातारा, #कोल्हापूर, #लातुर, #उस्मानाबाद तसेच #कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी दि. ९ एप्रिल २६ रोजी रात्री दहा वाजता देवाच्या सभा मंडपात वाघ्या मुरळीचा जागरण गोंधळ, शुक्रवारी दि. १० एप्रिल २६ रोजी पहाटे पाच वाजता देवाचा अक्षता सोहळा व याच दिवसाला गावकऱ्यांची अष्टमी म्हटली जाते. या दिवशी गावकरी आपल्या आरत्या घेऊन नाल बसवणे, पुरणपोळीचा नैवद्य देवास दाखवितात. शनिवारी दि. ११एप्रिल २६ रोजी यात्रेकरुंची अष्टमी असते. या दिवशी दाखल झालेले सर्व भाविक आपला नैवद्य #पुजारी, #गडशी-गोसाव्या मार्फत देवास दाखवितात. रविवारी दि. १२ एप्रिल २६ रोजी रात्री दहा वाजता शोभेच्या दारू कामाने या यात्रेची सांगता होणार आहे. याशिवाय यात्रा काळात दररोज रात्री नऊ वाजता देवाचा पालखीसह सवाद्य छबीना निघणार आहे. यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नदान केले जाणार आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय केली आहे. ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी मोहोळ पोलिसांनी चोख #बंदोबस्त ठेवला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान #ट्रस्टी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- धनाजी माने ,इटकरे ( सांगली ) .....✍️
=====================================
“ रमजान ईदची ( शिरखुरमा ) खीर थांबली… पण नातं अजूनही श्वास घेत आहे”
=====================================
आज २१ मार्च ‘रमजान ईद’… सणाचा दिवस. आनंद, गोडवा, आपुलकी, भेटीगाठी यांचा दिवस. पण आज मनात काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय… एक अनामिक हुरहूर, डोळ्यांत नकळत येणारे अश्रू, आणि मनाच्या कोपऱ्यात निर्माण झालेली एक खोल पोकळी.
गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच असा दिवस उगवला आहे, जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातील किणी गावातून बालम मुजावर सरांची गोड खीर( शिरखुरमा ) माझ्या घरी पोहोचला नाही…
आणि याचं कारण एकच—सर आता या जगात नाहीत.
मागच्या महिन्यात, अगदी अल्पशा आजाराने त्यांचे वयाच्या ७४- ७५ रीत निधन झाले . आयुष्य किती अनिश्चित आहे, हे कळतं… पण काही माणसं अशी असतात, की त्यांचं जाणं स्वीकारणं फार कठीण होतं. बालम मुजावर सर त्यापैकीच एक. हसतमुख ,प्रेमळ स्वभाव ,वयाने माझ्यापेक्षा २५ एक वर्षानी मोठे, वडिलधारे .
सन २००१… माझी बदली कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली हून घुणकी येथे झाली. नवीन ठिकाण, अनोळखी वातावरण, नवीन सहकारी… त्या सगळ्यात एक साधं, शांत, प्रेमळ व्यक्तिमत्त्व माझ्या आयुष्यात आलं—बालम मुजावर सर.
पहिल्याच भेटीत त्यांच्या बोलण्यातली आपुलकी, वागण्यातला साधेपणा, आणि मनातली माणुसकी जाणवली. हळूहळू ओळख वाढली, संवाद वाढले… आणि ती ओळख एका सुंदर नात्यात रूपांतरित झाली—जिवाभावाच्या मैत्रीत.
धर्म वेगळे होते—मी हिंदू, ते मुस्लिम. पण आमच्यात कधी धर्माचा अडसर आला नाही. उलट त्या भिन्नतेतच एक सुंदर एकात्मता निर्माण झाली.
प्रत्येक ‘रमजान ईद’ला सर किणीहून खास माझ्याघरी खीर ( शिरखुरमा ) घेऊन इटकरे येथे यायचे. पुढे मी इस्लामपूर (ईश्वरपूरला ) राहिला आलो पुढे ते एवढा प्रवास करत वयाच्या सत्तर - पंच्याहत्तरीतही येत होते. कधी समीर तर कधी इम्रान ही सरांची मुल सरांच्या सोबत असायची.
माझ्याकडे येण्यापूर्वी ते त्यांचे तांदूळवाडी येथील समवयस्क सहकारी शिक्षक बाजीराव पाटील सर यांच्याकडे खीर देऊन पुढे माझ्या घरी यायचे.
हा नियम अखंडपणे या गतवर्षीच्या ' रमजान ईद ' पर्यंत सुरुच होता.
सरांचा माझ्या घरी चहापाणी,गप्पा-गोष्टी व्हायच्या ,सुख-दु:ख शेअर व्हायची.माझ्या मुलांना आशीर्वाद द्यायचे आणि हसतमुख चेहऱ्याने ही स्वारी निरोप घ्यायची. मागच्या रमजान ईदचा निरोप हा त्यांचा आम्हाला दिलेला शेवटचा निरोप ठरला.....।
खरचं , सरांनी आनलेला शिरखुरमा फक्त एक गोड पदार्थ नव्हता… ती होती त्यांच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची, आणि माणुसकीची भेट. त्या खिरीचा प्रत्येक घास म्हणजे त्यांच्या मनातली आपुलकी अनुभवणं होतं.
दिवाळीच्या सणात किणीला त्यांच्या घरी मी , तर कधी माझा मुलगा, तर कधी माझे कुटुंब - लाडू, करंज्या, चकली, चिवडा, असा दिवाळीचा फराळ घेऊन जायचो.
त्यांच्या घरात दिवाळीचा उजेड पसरायचा आणि आमच्या मनात ईदचा गोडवा जागा व्हायचा.गळाभेट व्हायची ते आम्हाला दुवा -शुभाशीर्वाद द्यायचे.
खरचं,ही केवळ सणांची देवाणघेवाण नव्हती… ही होती संस्कृतींची, भावनांची,माणुसकीची आणि आपलेपणाची देवाणघेवाण....
एक-दोन नव्हे, तब्बल चोवीस वर्षे , दोन तपांची ही परंपरा अखंड चालू होती. वेळ बदलली, परिस्थिती बदलली, आयुष्य पुढे सरकत गेल… पण आमचं नातं आणि ही परंपरा कधीच बदलली नाही......
प्रत्येक वर्षी ' ईद ' जवळ आली की मनात एक आनंद असायचा—“मुजावर सर येणार…शिरखुरमा घेऊन येणार…” पण यावर्षी…दरवाज्याकडे पाहणं झालं, पण सर आलेचं नाहीत.सरांचा फोन येईल असं वाटलं, पण तोही आलाच नाही .आणि जाणवलं—आता सर कधीच येणार नाहीत…
आज त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव मनाला वेदना देत होती. घरात सगळं होत, पण काहीतरी आजच्या ईदच्या दिवशी हरवलंय असं वाटलं.जणू त्या खिरीसोबतच आपल्या आयुष्यातला एक गोडवा ,या गोड माणसाच्या जाण्याने कायमचा हरवला आहे याची जाणीव आज प्रकर्षाने झाली.
आदरणीय बालम मुजावर सर ! हे फक्त एक शिक्षक नव्हते… ते होते एक जिवंत मूल्य. त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं, की खरा धर्म कोणता तर, माणुसकीचा.
त्यांनी कधी भाषणांतून ऐक्य सांगितलं नाही… पण त्यांनी ते जगून दाखवलं. त्यांच्या एका छोट्याशा कृतीतूंन - दरवर्षी खीर घेऊन येण्यात—इतकं मोठं तत्त्वज्ञान दडलं होतं, की ते शब्दांत मांडणं कठीण आहे.
आजच्या काळात आणि भूतकाळात डोकावून पाहिल की लक्षात येत की, जेव्हा धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जातात,, तेव्हा बालम मुजावर सरांसारखी माणसातली अशी देव माणसं त्या भिंती तोडून प्रेमाचे पूल बांधतात,माणुसकीचे,प्रेमाचे,आत्मियतेचे आणि आपुलकीचे नाते जपतात.
त्यांचं जाणं म्हणजे केवळ एक व्यक्ती गमावणं नाही… तर एक विचार, एक परंपरा गमावणं आहे. याचे सर एक जिवंत उदाहरण आहे.
पण तरीही…त्यांची आठवण आहे, त्यांच्या आठवणींचा सहवास आहे, त्यांनी दिलेली शिकवण आहे. आज खीर ( शिरखुरमा ) नाही… पण त्यांनी दिलेली माया,प्रेम ,आपुलकी ,जिव्हाळा याचा गोडवा अजूनही मनात घर करुन तसाच आहे.
आज ते नाहीत… पण त्यांनी जपलेलं माणुसकीच नातं अजूनही जिवंत आहे.आणि म्हणूनच मनातून एकच आवाज येतो—
“सर, तुम्ही या जगात आज नाही आहात… पण तुमचं प्रेम, तुमची माणुसकी, आणि आपलं नातं—हे कधीच संपणार नाही सर !”
🙏Dear Mujavar Sir ! Miss you lot !😢😢
- धनाजी माने....✍️
कागदावर उतरलेला निरागस जिव्हाळा: जेव्हा दुसरीतील मुलींनी सरांना साद घातली...आठवणींच्या हिंदोळ्यावरचे एक पत्र!
======================
शिक्षक म्हणून काम करताना आपण अनेक गावं फिरतो, अनेक चेहरे पाहतो. पण काही गावं आणि तिथली मुलं काळजाच्या अशा कोपऱ्यात घर करतात की, तिथून बाहेर पडणं कधीच शक्य होत नाही.माझी कामेरी गावांतून शासकीय नियमानुसार बदली दुसऱ्या गावी झाली पण….कामेरी गावच्या त्या शाळेचा कॅम्पस आजही माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. मी ज्या मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होतो, त्याच कॅम्पसमध्ये शेजारच्या मुलींच्या शाळेत माझी पत्नी आजही ज्ञानदानाचं काम करत आहे. याच धाग्याने जोडल्या गेलेल्या इयत्ता दुसरीतील त्या चिमुकल्या मुली... ज्यांच्याशी कधी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने, तर कधी मधल्या सुट्टीत गप्पांच्या ओघात जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जुळले.
बदली झाल्याने २० किलोमीटर वरच्या मी दुसऱ्या शाळेत बदली होऊन गेलोय.आज मी त्या शाळेत प्रत्यक्ष शिकवायला नाही, पण , मी ज्या शाळेत शिकवायला होतो त्या शाळेतल्या मुलांच्या मनातील जागेइतकीच त्या चिमुकल्यां लेकींच्या मनातली माझी जागा आजही तशीच अढळ आहे, याची प्रचिती मला नुकत्याच मिळालेल्या त्या निष्पाप , निरागस लेकींच्या पत्रांतून आली.
मोडक्या-तोडक्या अक्षरात, पण अथांग मायेने एकत्र लिहिलेले पत्र वाचताना काळजाचा ठाव सुटला आणि डोळ्यांच्या कडा कधी ओलावल्या, हे समजलंच नाही.
अक्षरांतून पाझरणारे निखळ प्रेम
दुसरीतील त्या लहानग्या हातांनी धरलेल्या पेन्सिलमधून जे शब्द उमटले आहेत, ते कोणत्याही पदवीपेक्षा मोठे आहेत.
रुचीची 'बासुंदी' आणि हक्काचं आमंत्रण: रुचीने पत्रात विचारलंय, "सर, तुम्ही मला बासुंदी म्हणायचा, आता घरी बासुंदी खायला कधी येणार?" तिला दिलेले ते टोपणनाव तिच्यासाठी आजही किती जिवंत आहे, हे पाहून थक्क व्हायला होतं. ती केवळ बासुंदी खायला बोलवत नाहीये, तर त्या गोडव्याने जपलेली आठवण पुन्हा जागवायला सांगतेय.
श्रावणीची 'भेळ' आणि आर्त साद: श्रावणीने शाळेत होणाऱ्या 'भेळ' पार्टीचं आमंत्रण दिलंय. "तुम्ही आम्हाला खूप खूप आवडता" हे तिचं वाक्य वाचताना वाटलं की, एका शिक्षकासाठी यापेक्षा मोठी दुसरी कोणतीच पावती असू शकत नाही.
समिधाचा तो पहिला रंग: रंगपंचमीचा सण जवळ येतोय आणि या पोरींना वेध लागलेत ते आपल्या सरांना रंग लावण्याचे. समिधा अत्यंत हक्काने सांगते, "मी सगळ्यात आधी तुम्हाला रंग लावणार!" तर सईने चक्क 'पिंकी प्रॉमिस' घेत मला यायचा आग्रह केलाय. सणम, प्रचिती आणि तनुजा यांच्या शब्दांतली ती आर्तता— "सर, तुम्ही कधी येणार? एकदा तरी या ना!"— हे केवळ प्रश्न नसून ते माझ्याबद्दलचं नितांत प्रेम आणि ओढ आहे.
काचेसारखं स्वच्छ नातं
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे मोठी माणसं एकमेकांना विसरून जातात, तिथे या सात-आठ वर्षांच्या मुलींनी जपलेला हा जिव्हाळा थक्क करणारा आहे. त्यांच्या पत्रातील प्रत्येक ओळीत एक निष्पाप भाव आहे. त्यांना राजकारण माहीत नाही, त्यांना व्यवहार माहीत नाही; त्यांना माहीत आहे ते फक्त आपल्या 'सरांना' पुन्हा एकदा पाहणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं.
"शिक्षक केवळ फळ्यावर अक्षरे गिरवून घेत नाही, तर तो मुलांच्या कोऱ्या मनावर मायेचे रंग भरत असतो. आज या मुलींनी पत्राद्वारे माझ्या आयुष्यात प्रेमाचे तेच रंग पुन्हा उधळले आहेत."
माणुसकीची श्रीमंती आणि कृतज्ञता
माझ्या पत्नीच्या माध्यमातून पोहचलेली ही पत्रे केवळ कागदाचे तुकडे नाहीत, तर ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे 'सन्मान' आहेत. एखाद्या मोठ्या व्यासपीठावर मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षाही या चिमुकल्यांच्या पत्रातील 'पिंकी प्रॉमिस' मला अधिक मोलाचं वाटतं.
माझ्या लाडक्या चिमुकल्यांनो (रुची, श्रावणी, सणम, समिधा, प्रचिती, सई आणि तनुजा),
तुमची बासुंदी, तुमची भेळ आणि तो रंगपंचमीचा रंग... हे सगळं माझ्यासाठी काळजाच्या पेटीत जपून ठेवण्यासारखं धन आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या या शिदोरीवरच माझं शिक्षकी आयुष्य आणि पुढील प्रवास समृद्ध होत राहील. तुमचं हे 'पिंकी प्रॉमिस' मी नक्कीच जपण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या त्या हक्काच्या रंगासाठी अन् बासुंदीसाठी लवकरच तुम्हाला भेटायला शाळेत येईन!
रुची, श्रावणी, सणम, समिधा, प्रचिती, सई आणि तनुजा....लेकींनो तुमचं हे निष्पाप ,निरागस प्रेमच आम्हा शिक्षक बंधु-भगिनींची खरी श्रीमंती आहे. 🙏"
धनाजी माने….✍️
( टीप: हा लेख वाचून तुम्हाला तुमच्या शालेय जीवनातील आठवणी आठवल्या का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. )
🇵🇾 भारताची जणगणना – २०२७ 🇵🇾 ========================== 🇪🇬 शिक्षक आणि जणगणना 🇪🇬 “उन्हात तळपणारा माणूस… देश मोजणारा शिक्षक” “गुरु...