Sunday, September 06, 2026

४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन



 


४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…!

========================

गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या डोळ्यांत दाटला आठवणींचा पाऊस…

५ सप्टेंबर २०२६… रात्रीचे सात वाजले होते.स्थळ होते — रघुनाथ यादव यांचे नवीन घर.नेहमीसारखी ती एक साधी संध्याकाळ नव्हती…ना तो केवळ मित्रांचा गेट-टुगेदर होता…ना तो फक्त जुन्या वर्गमित्रांच्या भेटीचा कार्यक्रम होता…ती होती तब्बल ४२ वर्षांनी पुन्हा एकदा गुरु-शिष्यांच्या नात्याला उजाळा देणारी, आठवणींना जागवणारी आणि मनाला आतून हलवून टाकणारी एक अविस्मरणीय संध्याकाळ!

ज्यांच्या हातून अक्षरओळख झाली, ज्यांनी जगण्याचे धडे दिले, ज्यांनी गरीब परिस्थितीतही शिक्षणाची वाट दाखवली, अशा आपल्या तत्कालीन गुरुजनांना भेटण्यासाठी ४२ वर्षांपूर्वीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आले होते.

कोणी पुण्याहून आले होते…कोणी मुंबईहून…कोणी दूरवरून कुटुंबासह  आले होते…वर्षे बदलली होती… चेहरे बदलले होते… प्रत्येकाच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या बदलल्या होत्या… पण गुरुंबद्दलची श्रद्धा आणि वर्गमित्रांबद्दलची मैत्री मात्र तशीच होती!

गुरुंच्या चरणी कृतज्ञतेचा अभिषेक….....कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.त्यानंतर आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या तत्कालीन शिक्षकांना आणि वर्गमित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्या क्षणी वातावरण काहीसे गंभीर झाले…जवळ असलेले अनेक चेहरे आठवले…कधी वर्गात आपल्या शेजारी बसलेले मित्र आठवले…शिक्षकांचा प्रेमळ आवाज आठवला…आणि क्षणभर ४२ वर्षांचे अंतर जणू विरघळून गेले.

यानंतर तत्कालीन अध्यापन करणारे प्राथमिक शाळेतील शिक्षक आदरणीय आप्पासाहेब पाटील, शंकर पाटील आणि संपत पाटील या गुरुजनांचा विद्यार्थ्यांनी अत्यंत भावपूर्ण सत्कार केला.यावेळी शिक्षक दिनानिमित्त सध्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे धनाजी माने यांचा व सरळ सेवेतून शिक्षिका म्हणून निवड झालेली साक्षी गावडे या दोघांचाही यावेळी सत्कार  करण्यात आला

गुरुंचे पाय धुऊन त्यांचे पूजन करण्यात आले.कपडे, शाल, श्रीफळ आणि मूर्ती भेट देऊन गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.हा केवळ सत्कार नव्हता…

तो होता —“गुरुजी, तुम्ही आम्हाला जे दिलंत, त्याची परतफेड या जन्मात कधीच होऊ शकणार नाही; पण तुमच्याप्रती असलेली कृतज्ञता आम्ही मनापासून जपली आहे…”

या भावनेचा एक छोटासा प्रयत्न! गुरुंच्या चरणी नतमस्तक होताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.कार्यक्रमातील अनेक क्षणांपैकी एक क्षण म्हणजे माजी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावना.आपल्या विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगताना ते म्हणाले —“आयुष्यात अनेक विद्यार्थी घडवले. त्यातील  काही विद्यार्थी आजही आमच्या वार्धक्यात स्मरणात आहेत. आपल्या हलाखीच्या गरीब परिस्थितीतही येलूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून त्यावेळी आमचाही त्यांनी मान वाढवलेला होता असे  विद्यार्थीही आज येथे आहेत.त्यांनी विविध क्षेत्रात आपला नावलौकिक केला आहे.याचा गुरु म्हणून मलाही अभिमान वाटतो.”

गुरुंच्या मुखातून आपल्या विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या संघर्षाची आठवण ऐकताना अनेकांच्या मनात जुन्या आठवणींचा पट उलगडत गेला.गुरु आपल्या विद्यार्थ्यांना विसरत नाहीत…कारण विद्यार्थ्यांचे यश हेच त्यांच्या आयुष्याचे खरे प्रमाणपत्र असते !

४२ वर्षांनंतरही मैत्रीचा धागा तुटला नव्हता…..काळ कितीही पुढे गेला तरी काही नाती काळाच्या ओघात विरत नाहीत.शाळा सुटली…गाव बदलले…नोकऱ्या लागल्या…कोणी शेतीत रमले.....मुले मोठी झाली…कोणी मुंबईला गेले…कोणी बाहेर देशात गेले....पुन्हा मायभूमीत परतले...कोणी पुण्याला स्थायिक झाले…पण मनाच्या एका कोपऱ्यात “आपला वर्ग… आपले मित्र… आपले गुरुजी…”  हे जग कायम तसेच राहिले.

या कार्यक्रमात  व्यासपीठावर येऊन गुरुजनांबद्दलच्या संस्कारित, गोड आणि मनाला भिडणाऱ्या आठवणी सांगितल्या.

कधी हशा पिकला…कधी जुन्या खोड्या आठवल्या…कधी एखाद्या मित्राची आठवण झाली…गुरुजनांचा मार आठवला...हयात नसणारे धिप्पाड शरीराचे, शिस्तप्रिय व गणितामध्ये हातखंडा असणारे कै.राजाराम पाटील गुरुजी यांच्या आठवणींनी व काळाच्या पडद्याआड झालेल्या मित्रांच्या आठवणींनी  डोळे पाणावले.बालपणीचे ते निरागस दिवस जणू पुन्हा एकदा सर्वांना जगता आले.

गोड जेवणापेक्षा गोड होत्या आठवणी…कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे गोड जेवणाचा आस्वाद घेतला.पण खरी मेजवानी होती ती आठवणींची! जेवण झाल्यानंतरही कोणालाच घरी जाण्याची घाई नव्हती.रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगल्या.आपल्या आयुष्यातील सुख-दुःखाच्या आठवणी शेअर झाल्या.“काय दिवस होते ते…”

“आठवतंय का गुरुजी असं म्हणाले होते…असा मार खाल्ला, असे इंग्रजी त्यांनी शिकवले...अशी गाणी शिकवली .... अशी गणिते शिकवली...आपण त्या वेळी असं केलं होतं…”

अशा असंख्य आठवणींनी रात्र सरत गेली.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होते…पण निरोपाची वेळ आली तेव्हा मात्र मन जड झाले. “पुन्हा लवकर भेटू…” असे म्हणत प्रत्येकाने एकमेकांचा निरोप घेतला.गाड्या निघून गेल्या…रस्ते शांत झाले…रात्र गडद झाली…पण त्या घरात घडलेल्या आठवणींचा उजेड मात्र प्रत्येकाच्या मनात कायमचा राहिला.दोन महिन्यांची मेहनत… आणि एका अविस्मरणीय दिवसाचे स्वप्न साकार झाले ! हा कार्यक्रम  यशस्वी होण्यामागे अनेकांची मेहनत होती.गेली दोन महिने या कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच रामचंद्र पवार (नाना), रघुनाथ यादव,पंचायत समिती सदस्य प्रदिप कांबळे, केमिकल इंजिनिअर -दीपक पवार आणि त्यांचे सर्व वर्गमित्र मैत्रीणी झटत होते.

कोणाला फोन करायचा…कोणाला प्रत्यक्ष भेटायचे कोणाचा संपर्क शोधायचा…मुंबई-पुण्यातील मित्रांशी संपर्क साधायचा…गुरुजनांना कार्यक्रमासाठी आणायचे…या सर्वांसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अखेर फळाला आले.एकेक मित्र जोडत गेले…एकेक आठवण जागी होत गेली…आणि अखेर ४२ वर्षांनी संपूर्ण वर्ग एकाच छताखाली जमला!

गुरु-शिष्य नाते… काळाच्या पलीकडचे!

आजच्या वेगवान आणि धावपळीच्या जीवनात नाती जपणे कठीण झाले आहे.मोबाईलमध्ये शेकडो संपर्क असतात; पण मनापासून बोलण्यासाठी वेळ नसतो.सोशल मीडियावर हजारो मित्र असतात; पण मनातील आठवणी शेअर करण्यासाठी माणसे कमी पडतात.अशा काळात ४२ वर्षांनी एकत्र येऊन आपल्या गुरुंच्या चरणी नतमस्तक होणारे हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने समृद्ध आहेत.कारण त्यांनी केवळ आपल्या गुरुंचा सत्कार केला नाही…तर त्यांनी आपल्या बालपणाचा, आपल्या संस्कारांचा, आपल्या शाळेचा आणि आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या त्या दिवसांचा सत्कार केला!

गुरुजी, तुम्ही दिलेल्या संस्कारांची शिदोरी आजही आमच्याजवळ आहे…

गुरु म्हणजे केवळ धडा शिकवणारी व्यक्ती नव्हे.

गुरु म्हणजे परिस्थितीशी लढण्याची जिद्द.

गुरु म्हणजे आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ.

आज ४२ वर्षांनंतरही आपल्या गुरुंच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली—शाळा सुटते…पण गुरुंचे संस्कार कधीच सुटत नाहीत! वर्ग सुटतो…पण वर्गमित्रांची मैत्री मनातून कधीच सुटत नाही.काळ पुढे जातो…पण बालपणाच्या आठवणी मनाच्या वहीत कायमच्या कोरल्या जातात.हा केवळ स्नेहमेळावा नव्हता…

हा कार्यक्रम होता—गुरुंच्या ऋणाची जाणीव करून देणारा,मैत्रीच्या नात्याला पुन्हा उजाळा देणारा,हरवलेल्या आठवणी शोधून काढणारा,

आणि गेलेल्या काळाला पुन्हा एकदा स्पर्श करून देणारा…एक अत्यंत भावूक, संस्कारित आणि अविस्मरणीय सोहळा!

४२ वर्षांपूर्वी वेगवेगळ्या दिशांनी निघालेले ते विद्यार्थी…आज पुन्हा एकदा त्याच आठवणींच्या वळणावर भेटले.आणि मनात एकच भावना घेऊन परतले—

“काही भेटी या केवळ भेटी नसतात…

त्या आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा आठवणी असतात!”

५ सप्टेंबर २०२६ ची ती रात्रही अशीच एक अविस्मरणीय आठवण बनून राहिली…!

गुरुजनांना मनःपूर्वक नमन ! सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मैत्रीला मनापासून सलाम! आणि हा सुंदर सोहळा साकारण्यासाठी झटलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !

एकूणच....“गुरुंच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतेची ही फुले…आणि ४२ वर्षांनी पुन्हा फुललेली मैत्री…  हेच  

या अविस्मरणीय भेटीचे खरे फलित आहे ! ”

— धनाजी माने ......✍️


Saturday, August 22, 2026

🇮🇳 सीमेवरील सैनिकांसाठी कोरेगावच्या विद्यार्थ्यांनी बांधला प्रेमाचा धागा...





🇮🇳 सीमेवरील सैनिकांसाठी कोरेगावच्या विद्यार्थ्यांनी बांधला  प्रेमाचा धागा......🇮🇳

=======================================

देशाच्या सीमेवर कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस, प्रखर ऊन आणि अनेक संकटांना सामोरे जात मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोरेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अनोखा  उपक्रम राबविला.

शाळेत ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत ‘राखी तयार करणे’ हा उपक्रम उत्साहात घेण्यात आला. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पकतेने, आकर्षक व रंगीबेरंगी राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या. या राख्यांमध्ये केवळ रंग, सजावट आणि कलाकुसर नव्हती, तर त्यामध्ये देशाच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिकांविषयीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना गुंफलेली होती.

‘सीमेवर उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाला आम्ही आमच्या भावासारखे मानतो. त्याच्या हातावर ही राखी बांधता आली नाही, तरी आमच्या प्रेमाचा हा धागा त्याच्यापर्यंत नक्की पोहोचावा,’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या.

आपल्या लाडक्या बहिणींच्या हातून राखी बांधून घेण्याऐवजी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या मनगटावर या राख्या पोहोचाव्यात, हा या उपक्रमामागील भावनिक उद्देश होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्या सीमेवरील भारतीय सैनिकांना पाठविण्यात आल्या.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ कलाकुसरीचा आनंद मिळाला नाही, तर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सैनिकांप्रती आदर आणि सामाजिक बांधिलकी यांचे संस्कारही मिळाले. छोट्याशा हातांनी तयार केलेली ही राखी सीमेवर तैनात जवानांच्या मनगटावर पोहोचताना त्यांना आपल्या देशातील बालमनांचे प्रेम आणि शुभेच्छा नक्कीच जाणवतील.

या उपक्रमातून ‘राखीचा धागा छोटा असला, तरी त्यामागची भावना संपूर्ण राष्ट्राला जोडणारी आहे,’ असा हृदयस्पर्शी संदेश कोरेगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला.

शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. 

यावेळी शाळा नं.१ चे मुख्याध्यापक सदाशिव वारे,शाळा नं.२ चे मुख्याध्यापक धनाजी माने,सहाय्यक शिक्षिका शुभांगी भोसले,रुपेश्री पोळ, तेजस्विनी फाळके,दिपाली वारे,तेजस्विनी माळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरगांवच्या पोस्ट ऑफिस कर्मचारी पूजा पाटील उपस्थित होत्या. 

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

- धनाजी माने.....✍️

 

Tuesday, August 04, 2026

राजभवनातील ती अविस्मरणीय भेट... आज आठवणींमध्ये जिवंत झालेले, दादा !










 "राजभवनातील ती अविस्मरणीय भेट...आज आठवणींमध्ये जिवंत झालेले  डॉ. डी. वाय. पाटील ( दादा )"

===============================

🙏भावपूर्ण श्रद्धांजली... 

माजी राज्यपाल, पद्मश्री  यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक संवेदनशील, दूरदृष्टीचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

राजकारणात त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. मात्र, त्यांची खरी ओळख ही एक द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, समाजहितैषी आणि शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारे व्यक्तिमत्त्व अशीच कायम राहील.

त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच मन नकळत   २०१० मधील ,तब्बल सोळा वर्षांपूर्वीच्या एका  अविस्मरणीय आठवणीत हरवून गेले...

त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा  राजभवनातील ती संस्मरणीय भेट..फेब्रुवारी २०१० मध्ये  CCRT नवी दिल्ली यांच्या वतीने "भारताची सांस्कृतिक विविधता" या विषयावरील दहा दिवसांच्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली होती. हे प्रशिक्षण त्रिपुराची राजधानी आगरतळा  येथे २४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०१० या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणात देशातील तब्बल २२ राज्यांतील १२६ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सांगली  जिल्ह्यातून त्यावेळी  दहा शिक्षकांची निवड झाली होती. 

या प्रशिक्षणादरम्यान आम्हाला त्रिपुरा राज्याच्या राजभवनात जाऊन तत्कालीन राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील (दादा ) यांची भेट घेण्याचा बहुमान लाभला. आजही तो दिवस डोळ्यांसमोर अगदी जिवंत उभा राहतो.

राजभवनातील वातावरणात कोणताही  दुरावा नव्हता. उलट राज्यपालांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याचे मनापासून आपलेपणाने स्वागत केले, अभिनंदन  केले आणि अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. भारताची सांस्कृतिक विविधता, राष्ट्रीय एकात्मता, शिक्षणाची भूमिका आणि शिक्षकांची जबाबदारी यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी अत्यंत साधेपणाने विचार मांडले.

विशेष म्हणजे, त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांसमवेत भोजन केले. सर्वासाठी बसची सोय केली ,त्रिपुरा मधील महत्वाच्या ठिकाणांची सफर घडवली.त्या काही क्षणांत आम्हाला एखाद्या राज्यपालांपेक्षा   एका प्रेमळ, स्नेहशील आणि प्रेरणादायी शिक्षणतज्ज्ञाचा सहवास लाभल्याची भावना मनात निर्माण झाली. निरोप घेताना त्यांनी आमच्या संपूर्ण चमूला शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातील कार्यासाठी प्रेरणा दिली.

आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्या भेटीतील प्रत्येक क्षण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभा राहिला. आयुष्यात काही व्यक्तींची भेट अल्पकाळाची असते, पण त्यांचा प्रभाव मात्र आयुष्यभरासाठी मनावर कोरला जातो.                आदरणीय  डॉ. डी. वाय. पाटील ( दादा) हे माझ्यासाठी अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते.

त्यांनी शिक्षणक्षेत्रात उभारलेला ज्ञानाचा दीप पुढील अनेक पिढ्यांना दिशा देत राहील. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांनी दिलेले विचार सदैव स्मरणात राहतील.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏼

— धनाजी माने.....✍️


Friday, July 31, 2026

पहिला क्रमांक... आणि विश्वासाचा शेवट?


 

पहिला क्रमांक... आणि विश्वासाचा शेवट?

कधी कधी एखादी बातमी वाचताना डोळे  शब्दांवरून पुढे सरकत नाहीत. मनात एकच प्रश्न घुमत राहतो—हे खरंच घडू शकतं?

===================================

२०१६ च्या एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणारा एक अधिकारी... गुणवत्तेचा आदर्श मानला गेलेला चेहरा... आणि त्याच अधिकाऱ्याविरोधात लाचखोरीचे गंभीर आरोप. एसीबीने तक्रारीची पडताळणी करण्यासाठी सापळा रचला आणि पुढे घडलेल्या घटनांनी संपूर्ण राज्याला हादरवून सोडले. 

२०१६ च्या एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेल्या वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांच्यावर ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप झाल्याचे वृत्त वाचणात आले आणि धक्काच बसला.

लाच घेतल्याची रक्कम ऐकून विश्वासच बसेना .

अबब ! ४५ लाखाची लाच !

खरच , या प्रकरणाचा अंतिम  निकाल भविष्यात काय यायचा तो येईल.....पण... घटनेने समाजाच्या मनात अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण केले आहेत.

खरं तर, भ्रष्टाचाराची प्रत्येक घटना सरकारी तिजोरीवरचा डाका नसते; ती गरिबाच्या घासावरचा घाला असते.

ज्या शेतकऱ्याने उन्हातान्हात घाम गाळला, त्याच्या अनुदानाचा मार्ग भ्रष्टाचारामुळे अडतो. ज्या विधवेला पेन्शनची गरज आहे, तिच्या फाईलला गती मिळत नाही. ज्या विद्यार्थ्याच्या डोळ्यांत शिक्षणाची स्वप्ने आहेत, त्याच्या शिष्यवृत्तीचा प्रवास विलंबतो. एका अधिकाऱ्याच्या कथित लालसेची किंमत लाखो सामान्य नागरिक रोज मोजत असतात.

आजही गावातील गरीब माणूस सरकारी कार्यालयात जाताना आपल्या खिशात कागदपत्रांपेक्षा जास्त आशा घेऊन जातो. त्याला वाटते—"सरकार माझे आहे. अधिकारी माझे आहेत. न्याय मिळेल.

" पण जेव्हा अधिकाराचा वापर सेवेसाठी नव्हे तर स्वार्थासाठी होत असल्याची चर्चा समाजात पसरते, तेव्हा त्या आशांचा चुराडा होतो.

स्पर्धा परीक्षेचा पहिला क्रमांक मिळवणे हे बुद्धिमत्तेचे प्रतीक असू शकते; पण चारित्र्याचा पहिला क्रमांक मिळवण्यासाठी आयुष्यभर परीक्षा द्यावी लागते. पद मोठे असणे ही प्रतिष्ठा नाही; त्या पदाचा प्रामाणिक वापर करणे हीच खरी प्रतिष्ठा आहे.

आज समाजाला इमारती, कार्यालये आणि मोठमोठे प्रकल्प यापेक्षा जास्त गरज आहे ती विश्वासार्ह अधिकाऱ्यांची. कारण विकासाची पायाभरणी सिमेंटने होत नाही; ती प्रामाणिकपणाने होते.

भ्रष्टाचाराची बीजे रुजली की लोकशाहीची मुळे कमकुवत होतात. मग गरीब न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाही, शेतकरी शासनावर विश्वास ठेवत नाही, तरुण प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे करतो आणि समाजात निराशेचे सावट दाटू लागतात.

म्हणूनच अशा प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेगवान चौकशी होणे अत्यावश्यक आहे. दोषी असेल तर कठोर शिक्षा झाली पाहिजे; निर्दोष असेल तर त्यालाही न्याय मिळाला पाहिजे. कारण कायद्याचे राज्य हे भावनांवर नव्हे, तर पुराव्यांवर उभे असते.

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी...

प्रिय भावी अधिकारी,

तुम्ही अभ्यास करता ते केवळ नोकरीसाठी नाही; तर लाखो नागरिकांच्या विश्वासाचे ओझे आपल्या खांद्यावर घेण्यासाठी करता. तुमच्या स्वाक्षरीत  एखाद्या गरीबाचे भविष्य दडलेले असेल. तुमच्या निर्णयावर एखाद्या शेतकऱ्याचे पीक, विद्यार्थ्याचे शिक्षण, विधवेचा आधार आणि समाजाचा विश्वास अवलंबून असेल.पद हे संपत्ती कमावण्याचे साधन नाही; ते समाजाचे ऋण फेडण्याची संधी आहे.

एकूणच....."बुद्धिमत्ता तुम्हाला अधिकारी बनवेल;पण प्रामाणिकपणा तुम्हाला इतिहासात सन्मानाचे स्थान देईल." स्पर्धा परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणे ही  मोठी गोष्ट आहे; परंतु आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वच्छ चारित्र्याने जगणे हीच खरी सर्वोच्च रँक आहे.

कारण शेवटी...

लोक तुमच्या पदाचा नाही, तर तुमच्या प्रामाणिकपणाचा इतिहास लिहितात.

-धनाजी माने.....✍️


Sunday, July 05, 2026

हरवलेले शिक्षण आणि हताश शिक्षक

 

शिक्षक की बहुउद्देशीय सरकारी कर्मचारी? – एका प्राथमिक शिक्षकाची व्यथा.....।

"शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे."

हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, भाषणांमध्ये बोलतो आणि

शिक्षक दिनी गौरवाने उच्चारतो. परंतु वास्तवात आजचा शिक्षक राष्ट्राचा शिल्पकार कमी आणि बहुउद्देशीय सरकारी कर्मचारी अधिक बनला आहे.आज प्राथमिक शिक्षकाच्या हातात खडू, पुस्तक आणि विद्यार्थ्यांची स्वप्ने यांच्याबरोबरच जणगणनेचे फॉर्म, BLO चे रजिस्टर, ऑनलाइन पोर्टल, बैठकींचे आदेश, विविध सर्वेक्षणे, शासकीय अहवाल आणि सतत बदलणाऱ्या डिजिटल प्रणालींचा प्रचंड भार आहे.प्रश्न असा आहे की एकच शिक्षक एकाच वेळी उत्कृष्ट अध्यापन, दोन-दोन वर्गांचे व्यवस्थापन,मुख्याध्यापकांचा कार्यभार, जणगणना, BLO, ऑनलाइन कामे, बैठका, प्रशिक्षण आणि स्वतःच्या TET/CTET चा अभ्यास कसा करणार?हा प्रश्न केवळ शिक्षकाचा नाही; तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शिक्षणव्यवस्थेच्या भविष्याचा प्रश्न आहे.

शिक्षकाचे मूळ कार्य काय?🔹समाज शिक्षकाकडून मोठ्या अपेक्षा ठेवतो. त्या योग्यही आहेत.शिक्षकाने—विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे,प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष द्यावे,वाचन, लेखन आणि गणित मजबूत करावे,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा,मूल्यशिक्षण, संविधानिक मूल्ये आणि जीवनकौशल्ये विकसित करावीत,पालकांशी सतत संवाद ठेवावा,सतत मूल्यमापन करून प्रत्येक मुलाला पुढे न्यावे.हे सर्व शिक्षकाचे खरे काम आहे.परंतु आज शिक्षकाचा बहुतांश वेळ अध्यापना ऐवजी

प्रशासकीय कामांमध्ये जात आहे.शिक्षकावर वाढत चाललेले अशैक्षणिक कामांचे ओझे ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शिक्षकाचा विचार करा.

🔹त्याच्यावर या साऱ्या अध्यापना व्यतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत— ( यातील थोड्याच कामाची यादी दिली आहे ,कारण ही यादी खूप मोठी आहे )

जणगणना,BLO (मतदार यादी),निवडणूक काम,विविध शासकीय सर्वेक्षणे,विद्यार्थ्यांचे आधार

व अपार आयडी,UDISE+, विविध पोर्टलवरील माहिती,शिष्यवृत्ती, गणवेश, पाठ्यपुस्तके,पोषण आहार नोंदी,ऑनलाइन अहवाल,वरिष्ठांनी मागितलेली तातडीची माहिती,शाळेच्या सर्व प्रशासकीय नोंदी,मुख्याध्यापकांचा अतिरिक्त चार्ज,तालुका, केंद्र, जिल्हास्तरीय बैठका,प्रशिक्षण,विविध स्पर्धा,पालक भेटी,आणि यासोबत दोन-दोन वर्गांचे अध्यापन,या सर्वांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना वेळ कधी देणार?

दोन वर्गांचा एकच शिक्षक अनेक ग्रामीण शाळांमध्ये एकाच शिक्षकाला पहिली-दुसरी किंवा तिसरी-चौथी असे दोन वर्ग एकत्र शिकवावे लागतात.एका वर्गाला शिकवत असताना दुसरा वर्ग स्वअध्ययन करत असतो.एका मुलाच्या शंकेचे निरसन करताना दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होते.अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे वास्तववादी आहे का?

ऑनलाइन कामांचा वाढता डोंगर,डिजिटल युगात तंत्रज्ञान आवश्यक आहे. पण ते शिक्षकाला मदत करणारे असावे, अडथळा निर्माण करणारे नव्हे.

🔹आज शिक्षकाचा मोठा वेळ पुढील गोष्टींमध्ये जातो

नवीन लिंक,नवीन पोर्टल,नवीन पासवर्ड,नवीन माहिती,नवीन अहवालवारंवार तीच माहिती.जर एखादी माहिती वेळेत भरली नाही तर लगेच स्पष्टीकरण.म्हणजे शिक्षकाच्या गुणवत्तेचे मोजमाप विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर नव्हे, तर पोर्टलवरील "Submitted" बटणावर होऊ लागले आहे.बैठकींचे वाढते प्रमाण,महिन्यात अनेक बैठका.ऑनलाइन बैठक.,ऑफलाइन बैठक.क्लस्टर बैठक.तालुका बैठक.प्रशिक्षण.या बैठकींमुळे विद्यार्थ्यांचे अध्यापन किती तास बुडते याचा कधी विचार केला जातो का?

स्वतःच्या अभ्यासासाठी वेळ कुठे?

न्यायालयाच्या एका निर्णयानेआज प्रत्येक शिक्षकाकडून अपेक्षा आहे की तो—TET, CTET उत्तीर्ण व्हावा.नवीन शैक्षणिक धोरण समजून घ्यावे.डिजिटल कौशल्य वाढवावे.नवीन अध्यापन पद्धती शिकाव्यात.हे सर्व आवश्यक आहे.

🔹पण प्रश्न आहे—वेळ कुठे आहे?

मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम ,सततची डेडलाईन.वरिष्ठांचा दबाव.ऑनलाइन चुका होण्याची भीती.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चिंता.पालकांच्या अपेक्षा.कुटुंबाला वेळ देता न येण्याची खंत.या सर्वांचा परिणाम शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे.अनेक शिक्षक निद्रानाश, उच्च रक्तदाब, मधुमेह, चिंता, नैराश्य आणि मानसिक थकवा अनुभवत आहेत.शिक्षक शाळेत उपस्थित असतो; पण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकलेला असतो.कुटुंबाकडे दुर्लक्ष,सकाळी शाळा.सायंकाळी ऑनलाइन काम.

रात्री अहवाल.सुट्टीच्या दिवशी बैठक.स्वतःच्या मुलांबरोबर वेळ नाही.आई-वडिलांसोबत वेळ नाही.जीवनसाथीसोबत संवाद नाही.ही केवळ एका शिक्षकाची नव्हे, हजारो शिक्षकांची वास्तविकता

आहे.

🔹विद्यार्थ्यांचे नुकसान

या परिस्थितीचे सर्वात मोठे नुकसान विद्यार्थ्यांचे होते.त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळत नाही.

वाचन-लेखनाचा सराव कमी होतो.मूल्यशिक्षणासाठी वेळ राहत नाही.कमकुवत विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष

देता येत नाही.आणि शिक्षणाचा दर्जा घसरला की

दोष शिक्षकालाच दिला जातो.

🔹कायदा आणि राष्ट्रीय धोरण काय सांगते?

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की

शिक्षकांवरील अनावश्यक प्रशासकीय कामांचा भार कमी केला पाहिजे, जेणेकरून ते अध्यापनावर लक्ष केंद्रित करू शकतील.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (RTE Act) नुसार शिक्षकांना नियमित अशैक्षणिक कामांसाठी वापरू नये. अपवाद म्हणून केवळ जनगणना, निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापन

यांसारखी मर्यादित कामे दिली जाऊ शकतात.शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक प्रशिक्षण संस्थाही सातत्याने याच भूमिकेचा पुरस्कार करतात की शिक्षकाचा जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांसाठी राखीव असला पाहिजे.

🔹शासनाला काही थेट प्रश्न

एका शिक्षकावर दोन-दोन वर्ग का?रिक्त शिक्षक पदे तातडीने का भरली जात नाहीत?एकाच माहितीची वारंवार मागणी का केली जाते?प्रत्येक बैठकीसाठी शिक्षकांनाच का बोलावले जाते?प्रत्येक नवीन योजनेचा भार शिक्षकांवरच का?हे सर्व समजत असूनही यावर उपाययोजना का होत नाही ?

🔹उपाय काय?

समस्या मांडणे पुरेसे नाही; उपाय आवश्यक आहेत-

प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची तातडीने नियुक्ती."एक शिक्षक – एक वर्ग" हे धोरण

प्रभावीपणे राबविणे.शिक्षकांना अनावश्यक अशैक्षणिक कामांतून मुक्त करणे.जणगणना, BLO आणि इतर प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करणे.एकात्मिक डिजिटल प्रणाली तयार करून एकच माहिती एकदाच घेणे.अनावश्यक बैठका कमी करणे.शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशन उपलब्ध करणे.मुख्याध्यापकांचा अतिरिक्त चार्ज शक्यतो टाळणे.

🔹शिक्षकांच्या वेळेचा आदर करणे.

समाजासाठी संदेश जेव्हा पालक म्हणतात—"माझ्या मुलाला चांगले शिकवा."

तेव्हा शिक्षक मनोमन म्हणतो—"मलाही तेच करायचे आहे. पण माझ्या हातात पुस्तकापेक्षा कागदपत्रे इतर कामेच जास्त दिली गेली आहेत."

🔹शेवटी एक अपेक्षा विचार

शिक्षक हा यंत्र नाही.तो एक संवेदनशील माणूस आहे.त्यालाही कुटुंब आहे.त्यालाही आरोग्य आहे.त्यालाही स्वप्ने आहेत.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याला विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवायचा आहे.जर शिक्षक कागदपत्रांत, पोर्टलमध्ये आणि बैठकींमध्ये,उपक्रमामद्धे अडकून राहिला, तर विद्यार्थ्यांचे

भविष्यही त्या कागदपत्रांतच अडकून राहील.शिक्षकाला सन्मान केवळ शिक्षक दिनी पुष्पगुच्छ देऊन मिळत नाही. त्याला सन्मान मिळतो तो त्याच्या हातातील अनावश्यक कामांचा भार कमी केल्याने, त्याला अध्यापनासाठी पुरेसा वेळ दिल्याने आणि शिक्षणव्यवस्थेवर विश्वास दाखवल्याने.

कारण शिक्षक मजबूत असेल तरच विद्यार्थी सक्षम होतील;

विद्यार्थी सक्षम झाले तरच राष्ट्र सक्षम होईल.

आज ही वेळ शिक्षकांविषयी सहानुभूती व्यक्त करण्याची नाही,

तर शिक्षणव्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्याची आहे. शिक्षकाला पुन्हा एकदा "शिक्षक" म्हणून काम करू देणे हीच खरी शिक्षणसुधारणा ठरेल.मायबाप सरकारने यावर वेळीच साकल्याने विचार करावा व त्वरित यावर उपाय करावेत अशी महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू-भगिनींची मागणी आहे. तर आणि तरच विद्यार्थ्याचे उज्वल भविष्य घडेल अन्यथा येणारा काळ कुणालाच माफ करणर नाही.ना शासन व्यवस्थेला,ना शिक्षकाला ,ना समाजाला हे नक्की !  -         - धनाजी माने….✍️

४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन

  ४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! ======================== गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या  डोळ्यांत दाटला आठवणींचा ...