जिल्हा परिषद शाळांचे गुणवत्ता परीक्षांमध्ये उज्ज्वल यश -वाळवा पंचायत समिती गुणवत्तेत दुसऱ्या क्रमांकावर
============◆===========
सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शोध परीक्षा घेतली. वाळवा तालुक्यातील २१५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. जिल्ह्यात वाळवा तालुका गुणवत्तेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चौथीच्या डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षेत २७ विद्यार्थ्यांनी, सातवीच्या २५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. पहिलीच्या गुणवत्ता शोध परीक्षेत ५३, दुसरी ३९, तिसरी ४९ आणि सहावीच्या २२ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावत उज्ज्वल यश संपादन केले आहे.फेब्रुवारी २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेतलेल्या पाचवीच्या पूर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी उज्ज्वल यश संपादन केले. ६३ शाळांमधील २७९ विद्यार्थी पात्र ठरले. ७६३ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. तालुक्यातील जि. प. शाळा काळमवाडी, नेलें नं. १, महादेववाडी, जाक्राईवाडी, इटकरे,पेठची उर्दू शाळा, इस्लामपूरची उर्दू शाळा या शाळांचे ६० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी पात्र ठरले.
वाळवा तालुक्याचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी, शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन वर्षभर सुरू होते. पंचायत समितीच्या माध्यमातून सरावासाठी प्रत्येक वर्गाच्या पाच सराव चाचण्या घेतल्या होत्या. यामुळेच सर्वच इयत्तांचा गुणवत्तेचा आलेख उंचावला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, अधिकाऱ्यांचे अभिनंदन सांगली जि. प. अध्यक्षा संगीता पाटील, सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील यांनी केले. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून वाढत असलेली विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच उल्लेखनीय आहे. यामुळे ग्रामीण भागातील ओढा जि. प. शाळांकडे पालकांचा ओढा जि. वाढत आहे.
=======================================
बीडीओंचे शैक्षणिक गुणवत्ता आढावा अभियान वाळवा
=====≠==============================
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार गेली दोन वर्षे वाळवा तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता आढावा अभियान राबवत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पहिलीपासून चौथीपर्यंतच्या वर्गाचा गुणवत्ता आढावा घेतला जात आहे. शाळास्तरावर हे अभियान राबवले जात आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी आणि केंद्रप्रमुखांचे पथक तयार केले आहे. वर्षभरात गुणवत्तेचा आढावा घेऊन संबंधित शिक्षकांना सूचना तर गुणवत्तापूर्ण वर्ग असणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले जाते. यामुळे शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी अधिक सतर्क राहत असून सर्व वर्गांच्या गुणवत्तेचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे.
=======================≠===============
जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा वाढता ओढा -
" वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षक सातत्याने व्यापक प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिलीपासून आठवीपर्यंत सुरू असलेल्या गुणवत्ता परीक्षांमुळे वर्गांची तयारी चांगली होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होत आहे. स्पर्धा परीक्षांचा पाया या माध्यमातून भक्कम होताना दिसत आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. " -प्रफुल्ल काळे (केंद्रप्रमुख ,कोरेगांव)
- धनाजी माने.......✍️
( सर्व पालकांना शेअर करा )







