Friday, March 06, 2026

आठवणींच्या हिंदोळ्यावरचे एक पत्र!


 

कागदावर उतरलेला निरागस जिव्हाळा: जेव्हा दुसरीतील मुलींनी सरांना साद घातली...आठवणींच्या हिंदोळ्यावरचे एक पत्र!

======================

​शिक्षक म्हणून काम करताना आपण अनेक गावं फिरतो, अनेक चेहरे पाहतो. पण काही गावं आणि तिथली मुलं काळजाच्या अशा कोपऱ्यात घर करतात की, तिथून बाहेर पडणं कधीच शक्य होत नाही.माझी कामेरी गावांतून शासकीय नियमानुसार बदली दुसऱ्या गावी झाली पण….कामेरी गावच्या त्या शाळेचा कॅम्पस आजही माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. मी ज्या मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होतो, त्याच कॅम्पसमध्ये शेजारच्या मुलींच्या शाळेत माझी पत्नी आजही ज्ञानदानाचं काम करत आहे. याच धाग्याने जोडल्या गेलेल्या इयत्ता दुसरीतील त्या चिमुकल्या मुली... ज्यांच्याशी कधी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने, तर कधी मधल्या सुट्टीत गप्पांच्या ओघात जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जुळले.

​बदली झाल्याने २० किलोमीटर वरच्या मी दुसऱ्या शाळेत बदली होऊन गेलोय.आज मी त्या शाळेत प्रत्यक्ष शिकवायला नाही, पण , मी ज्या शाळेत शिकवायला होतो त्या शाळेतल्या मुलांच्या मनातील जागेइतकीच त्या चिमुकल्यां लेकींच्या मनातली माझी जागा आजही तशीच अढळ आहे, याची प्रचिती मला  नुकत्याच मिळालेल्या त्या निष्पाप , निरागस लेकींच्या पत्रांतून आली. 

मोडक्या-तोडक्या अक्षरात, पण अथांग मायेने एकत्र लिहिलेले पत्र वाचताना काळजाचा ठाव सुटला आणि डोळ्यांच्या कडा कधी ओलावल्या, हे समजलंच नाही.

​अक्षरांतून पाझरणारे निखळ प्रेम

​दुसरीतील त्या लहानग्या हातांनी धरलेल्या पेन्सिलमधून जे शब्द उमटले आहेत, ते कोणत्याही पदवीपेक्षा मोठे आहेत.

​रुचीची 'बासुंदी' आणि हक्काचं आमंत्रण: रुचीने पत्रात विचारलंय, "सर, तुम्ही मला बासुंदी म्हणायचा, आता घरी बासुंदी खायला कधी येणार?" तिला दिलेले ते टोपणनाव तिच्यासाठी आजही किती जिवंत आहे, हे पाहून थक्क व्हायला होतं. ती केवळ बासुंदी खायला बोलवत नाहीये, तर त्या गोडव्याने जपलेली आठवण पुन्हा जागवायला सांगतेय.

​श्रावणीची 'भेळ' आणि आर्त साद: श्रावणीने शाळेत होणाऱ्या 'भेळ' पार्टीचं आमंत्रण दिलंय. "तुम्ही आम्हाला खूप खूप आवडता" हे तिचं वाक्य वाचताना वाटलं की, एका शिक्षकासाठी यापेक्षा मोठी दुसरी कोणतीच पावती असू शकत नाही.

​समिधाचा तो पहिला रंग: रंगपंचमीचा सण जवळ येतोय आणि या पोरींना वेध लागलेत ते आपल्या सरांना रंग लावण्याचे. समिधा अत्यंत हक्काने सांगते, "मी सगळ्यात आधी तुम्हाला रंग लावणार!" तर सईने चक्क 'पिंकी प्रॉमिस' घेत मला यायचा आग्रह केलाय. सणम, प्रचिती आणि तनुजा यांच्या शब्दांतली ती आर्तता— "सर, तुम्ही कधी येणार? एकदा तरी या ना!"— हे केवळ प्रश्न नसून ते माझ्याबद्दलचं नितांत प्रेम आणि ओढ आहे.

​काचेसारखं स्वच्छ नातं

​आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे मोठी माणसं एकमेकांना विसरून जातात, तिथे या सात-आठ वर्षांच्या मुलींनी जपलेला हा जिव्हाळा थक्क करणारा आहे. त्यांच्या पत्रातील प्रत्येक ओळीत एक निष्पाप भाव आहे. त्यांना राजकारण माहीत नाही, त्यांना व्यवहार माहीत नाही; त्यांना माहीत आहे ते फक्त आपल्या 'सरांना' पुन्हा एकदा पाहणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं.

​"शिक्षक केवळ फळ्यावर अक्षरे गिरवून घेत नाही, तर तो मुलांच्या कोऱ्या मनावर मायेचे रंग भरत असतो. आज या मुलींनी पत्राद्वारे माझ्या आयुष्यात प्रेमाचे तेच रंग पुन्हा उधळले आहेत."

माणुसकीची श्रीमंती आणि कृतज्ञता

​माझ्या पत्नीच्या माध्यमातून पोहचलेली ही पत्रे केवळ कागदाचे तुकडे नाहीत, तर ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे 'सन्मान' आहेत. एखाद्या मोठ्या व्यासपीठावर मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षाही या चिमुकल्यांच्या पत्रातील 'पिंकी प्रॉमिस' मला अधिक मोलाचं वाटतं.

​माझ्या लाडक्या चिमुकल्यांनो (रुची, श्रावणी, सणम, समिधा, प्रचिती, सई आणि तनुजा),

तुमची बासुंदी, तुमची भेळ आणि तो रंगपंचमीचा रंग... हे सगळं माझ्यासाठी काळजाच्या पेटीत जपून ठेवण्यासारखं धन आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या या शिदोरीवरच माझं शिक्षकी आयुष्य आणि पुढील प्रवास समृद्ध होत राहील. तुमचं हे 'पिंकी प्रॉमिस' मी नक्कीच जपण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या त्या हक्काच्या रंगासाठी अन् बासुंदीसाठी लवकरच तुम्हाला भेटायला शाळेत येईन!

रुची, श्रावणी, सणम, समिधा, प्रचिती, सई आणि तनुजा....लेकींनो तुमचं हे निष्पाप ,निरागस प्रेमच आम्हा शिक्षक बंधु-भगिनींची खरी श्रीमंती आहे. 🙏"

धनाजी माने….✍️


​( टीप: हा लेख वाचून तुम्हाला तुमच्या शालेय जीवनातील आठवणी आठवल्या का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. )




Saturday, February 07, 2026

लोकशाहीच्या यज्ञात माणुसकीचा सुगंध (वाळवा तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेचा प्रेरणादायी अनुभव)


 
🎯 लोकशाहीच्या यज्ञात माणुसकीचा सुगंध (वाळवा तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेचा प्रेरणादायी अनुभव ) 🎯
===========================
सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती वाळवा येथील निवडणूक प्रक्रिया ही केवळ एक प्रशासकीय कामगिरी न राहता, लोकशाहीच्या यज्ञातील सेवाभावाची आहुती ठरली.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी मा. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन साहेब व मा. तहसीलदार रास्कर मॅडम तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी जी नियोजनबद्धता, संवेदनशीलता आणि माणुसकी दाखवली, ती प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात कायमची कोरली गेली.
निवडणूक म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर हजारो कर्मचाऱ्यांच्या संयमाची, कष्टाची आणि जबाबदारीची परीक्षा असते.
निवडणूक साहित्य देणे व परत जमा करणे ही प्रक्रिया अनेकदा तणाव निर्माण करणारी ठरते.
मात्र यावेळी ही प्रक्रिया सुसूत्र, शिस्तबद्ध आणि वेळेवर पार पडली.
कोणताही गोंधळ नाही, कोणतीही धावपळ नाही —
फक्त नियोजन, संयम आणि समन्वय.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे,
प्रत्येक झोनसाठी अभ्यासू व प्रशिक्षित झोनल अधिकारी नेमण्यात आले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ते १० मतदान केंद्रांचे काम
🎯 वेळेत🎯शांततेत🎯 आणि अत्यंत सुरळीत पार पडले.

यामुळे केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला.संवेदनशील भागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ आदेश देणारे अधिकारी म्हणून नव्हे,तर
👉 आधार देणारे मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.
👉 कर्मचाऱ्यांना धीर दिला.
👉 त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
👉 आणि “आपण एकटे नाही” ही भावना निर्माण केली.
तसेच,
✔️ हव्या तेवढ्याच कागदपत्रांची गरज,
✔️ लखोट्यांची मर्यादित व सुटसुटीत व्यवस्था,
✔️ अनावश्यक औपचारिकतेचा बोजा टाळणे,या सगळ्यामुळे केंद्राध्यक्षांचे काम हलके झालेआणि जबाबदारी आनंदाने पार पडली.

या प्रक्रियेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात एकच भावना होती —
“आपल्यावर विश्वास ठेवणारे अधिकारी आहेत.”
लोकांच्या भोजनाची योग्य काळजी घेतली गेली.कामाचे मानधन वेळेत व योग्य मिळाले.ही केवळ आर्थिक बाब नव्हती,तर कर्मचाऱ्यांच्या श्रमांचा सन्मान होता.
या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने मनापासून भावना व्यक्त केली की —
“अशी नियोजनबद्ध, पारदर्शक आणि माणुसकी जपणारी प्रशासन व्यवस्था अनुभवायला मिळणे हे आमच्यासाठी भाग्याचे आहे.”
आजच्या काळात निवडणूक म्हणजे
➡️ लोकशाहीवरचा विश्वास,
➡️ प्रशासनावरचा विश्वास,
➡️ आणि समाजावरचा विश्वास.
हा विश्वास मा. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन साहेब,मा. तहसीलदार रास्कर मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी वर्गाने
आपल्या कार्यातून अधिक दृढ केला आहे.
🙏 कृतज्ञता आणि सलाम
या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, केंद्राध्यक्ष व पोलिंग स्टाफला मनापासून सलाम.
तुमच्या सेवाभावामुळे लोकशाही अधिक बळकट झाली आहे.
ही निवडणूक प्रक्रिया फक्त एक शासकीय कामकाज न राहता,ती माणुसकीने सजलेली प्रशासनाची प्रेरणादायी गाथा ठरली आहे.
  - धनाजी माने…..✍️
  https://dhunt.in/13nZXV
dhanajimane.blogspot.com
    dhanajimane123@gmail.com




🎯निवडक प्रतिक्रिया -

🎯 [07/02, 10:18 pm] +91 79729 36116: 

या वेळेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मुद्देसूद कागदपत्रे  जमा करण्याचे फॉरमॅट  व इतर कागदपत्रे वेस्टेज न जाता आवश्यक तेवढीच दिल्याने काम करताना त्याच्यामध्ये अचूकता निर्माण झाली व काम सोपे झाले
यामध्ये  निवडणूक निर्णय अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी क्षेत्रीय अधिकारी व यांचे सोबत असलेला संपूर्ण स्टाफ यांचे
नियोजनबद्ध कामकाज अनुभवायला मिळाले तसेच माळी मॅडम  व 39/17 सहकारी सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करू इच्छितो🙏💐💐


🎯 [07/02, 10:32 pm] Pt Vijay Habale Ashta: 

यावेळी खूप चांगले नियोजन होते अजिबात त्रास झाला नाही परफेक्ट नियोजन होते श्रीनिवास अर्जुन साहेब यांचे अभिनंदन....
[07/02, 10:35 pm] +91 99601 31682: यावेळी खूप चांगले नियोजन होते अजिबात त्रास झाला नाही परफेक्ट नियोजन होते श्रीनिवास अर्जुन साहेब यांचे अभिनंदन....🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👍👍👍


🎯 [08/02, 6:26 am] +91 98238 47947: 

या वेळेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मुद्देसूद कागदपत्रे  जमा करण्याचे फॉरमॅट  व इतर कागदपत्रे वेस्टेज न जाता आवश्यक तेवढीच दिल्याने काम करताना त्याच्यामध्ये अचूकता निर्माण झाली व काम सोपे झाले
यामध्ये  निवडणूक निर्णय अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी क्षेत्रीय अधिकारी व यांचे सोबत असलेला संपूर्ण स्टाफ यांचे
नियोजनबद्ध कामकाज अनुभवायला मिळाले तसेच माळी मॅडम  व 39/16 सहकारी सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करू इच्छितो🙏🙏🙏🙏



🎯 [08/02, 9:00 am] +91 98815 50149: 🙏🏻🙏🏻

जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती वाळवा निवडणूक प्रक्रियेमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक कर्तव्य पार पाडण्याची संधी मिळाली.
या निवडणूक प्रक्रियेदरम्यान  निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांनी दिलेले ट्रेनिंग आपल्या झोनचे क्षेत्रीय (झोनल) अधिकारी मा. अभिजीत घोरपडे साहेब यांनी अतिशय उत्तम नियोजन व सहकार्य केले. तसेच प्रत्येक केंद्रावर घोरपडे साहेब यांनी दिलेला वेळ यामुळे काम करताना कोणतीही अडचण आली नाही त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत व संविधानिक पद्धतीने पार पडली.
आम्ही यापूर्वी अनेकवेळा निवडणूक प्रक्रियेत निवडणूक कर्मचारी म्हणून सहभागी झालो आहे; मात्र यावेळी BU, CU तसेच इतर साहित्य जमा-वाटपाची प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित व सुयोग्य नियोजनाने पार पडली, हा एक अतिशय चांगला आणि समाधानकारक अनुभव ठरला.
तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी जेवणाचे उत्कृष्ट नियोजन, कोणताही त्रास न होणे आणि मानधन योग्य पद्धतीने व वेळेत देण्यात आल्याबद्दल संबंधित सर्व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.

रेठरे हरणाक्ष गट ३६ व किल्लेमच्छिंद्रगड गण ७१ 
केंद्र क्रमांक -३ (कि.म.गड)
केंद्रप्रमुख श्री रमेश पाटील व सर्व सहकारी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचेवतीने सर्व प्रशासनाचे
मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहे.                             🙏🏻🙏🏻🙏🏻


🎯 [08/02, 11:02 am] +91 86682 75094: 🙏🏻🙏🏻

सांगली जिल्हा परिषद (३६ रेठरे हरणाक्ष) व पंचायत समिती वाळवा (७१ किल्लेमच्छिंद्रगड) निवडणूक प्रक्रियेमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या निवडणूक प्रक्रियेतील सर्व प्रशासकीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उत्कृष्ट ट्रेनिंग दिले. आमच्या झोनचे क्षेत्रीय (झोनल) अधिकारी मा. अभिजीत घोरपडे  यांनी अतिशय उत्तम नियोजन, मशीन केंद्राच्या ठिकाणी मतदान सुरू होण्यापूर्वी व मतदान संपल्यानंतर मशीनचा वापर करण्याबाबत योग्य ती माहिती दिली व सहकार्य केले. तसेच केंद्रावर घोरपडे साहेब यांनी वेळोवेळी भेटी देऊन मतदानाची नोंद व मशीनचे कार्य याबाबत विचारपूस केली.  वाळवा तालुक्यातील निवडणूक विभागातील सर्व प्रशासकीय सेवकांनी/अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन केले म्हणून काम करताना कोणतीही अडचण आली नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत व संविधानिक पद्धतीने पार पडली.
मी १९९४ पासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. यावेळी BU, CU तसेच इतर साहित्य जमा-वाटपाची प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित व सुयोग्य नियोजनाने पार पडली, हा एक अतिशय चांगला आणि समाधानकारक अनुभव ठरला.
तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी जेवणाचे उत्कृष्ट नियोजन, कोणताही त्रास न होणे आणि मानधन योग्य पद्धतीने व वेळेत देण्यात आले. संबंधित सर्व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.
रेठरे हरणाक्ष गट ३६ व किल्लेमच्छिंद्रगड गण ७१ 
केंद्र क्रमांक -२ किल्ले मच्छिंद्रगड 
केंद्रप्रमुख प्रा.डॉ. रमेश महादेव गेजगे  व सर्व सहकारी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचेवतीने सर्व प्रशासकीय सेवकांचे व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. 
 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻



 🎯 28 वर्षाच्या नोकरीत पहिल्यांदा निवडणूक ड्युटीचा असा सुखद अनुभव आला प्रत्येक वेळी एक विशिष्ट प्रकारचे टेन्शन असायचे साहित्य घेताना आणि जमा करताना खूप गोंधळ आणि गडबड व्हायची पण यावेळी साहित्य जमा करून घेणारे कर्मचारी पण हसत खेळत साहित्य घेत होते त्यामुळे हसत हसत आनंदात कर्तव्य पार पाडता आले झोनल ऑफिसर श्री.बुवा साहेब तर भारी माणूस फोन केला की लगेच फोन उचलायचे आणि अडचण दूर करायचे सर्वच निवडणूक विभागाचे कर्मचारी,अधिकारी,अर्जुन साहेब यांनी अत्यन्त शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक यंत्रणा राबविली आमचे महागडे जर्किन गाडीत विसरले होते पण ड्रायव्हर रास्कर यांनी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आम्हाला परत दिले म्हणजे यावेळी खूप भारी अनुभव आला आता महिन्याला एक निवडणूक झाली तरी हरकत नाही...सर्व टीमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन !
   -विजय हाबळे


🎯 नमस्कार 🙏🏻🙏🏻
जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती वाळवा निवडणूक प्रक्रियेमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली.यापूर्वी मी २०१९ मध्ये काम केले होते.
या निवडणूक प्रक्रियेदरम्यान  निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांनी दिलेले ट्रेनिंग खूप चांगले होते.पृथ्वीराज पाटील यांनी खूप दर्जेदार ट्रेनिंग दिले होते.कुरळप क्षेत्रीय अधिकारी मा.शरद पाटील साहेब यांनी अतिशय उत्तम नियोजन व सहकार्य केले. त्यांनी दिलेला पूर्णवेळ यामुळे काम करताना कोणतीही अडचण आली नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत व संविधानिक पद्धतीने पार पडली.
आम्ही यापूर्वी अनेकवेळा निवडणूक प्रक्रियेत निवडणूक कर्मचारी म्हणून सहभागी झालो आहे; मात्र यावेळी BU, CU तसेच इतर साहित्य जमा-वाटपाची प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित व सुयोग्य नियोजनाने पार पडली, हा एक अतिशय चांगला आणि समाधानकारक अनुभव ठरला.
एकूण सर्व कामकाजाबाबत मा.प्रांतसाहेब,मा. तहसीलदार,इतर 
संबंधित असणारे सर्व प्रशासन अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन !
कुरळप ४३/८६/२८ या आमच्या केंद्रामधील  माझे सहकारी अरुण कांबळे सुनीता पाटील मॅडम राहुल पाटील स्थानिक कर्मचारी धोंडीराम मुळीक यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. 
गावातील स्थानिक पोलिंग एजंट, प्रशासन,पोलीस विभाग, मतदार यांनीही चांगले सहकार्य दिले त्यांचेही आभार.
अशाच पद्धतीने सहकार्य राहिले तर लोकशाही भक्कम आणि आश्वासक करण्याचे पवित्र कार्य करण्यात आपले योगदान देता येईल.
मनःपूर्वक आभार ! 💐🙏🏻          
प्रा डॉ बी के माने 
आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव


🎯 जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती वाळवा या निवडणूक 2026 प्रक्रियेत 36/72/17 भवानीनगर मध्ये केंद्राध्यक्ष म्हणून संधी मिळाली.
आजपर्यंतच्य १५ वर्षाच्या शालेय सेवेमधील झालेल्या निवडणूकीतील सर्वात चांगला आणि समाधानकारक अनुभव आम्हाला या निवडणुकीत मिळाला. साहित्य वाटप ते साहित्य जमा करून घेईपर्यंत सर्व अगदी सोईस्कर करून ठेवले.
निवडणूक झाल्यावर काल एसटी बस मध्ये मनात हाच विचार होता की साहित्य जमा करून घेताना अजून कोणते कोणते डॉक्युमेंट मागतात आणि कोणते सील  करून मागून घेतात आणि कोणते खुले मागतात ही एक मनात धाकदुक होती ( हा आज पर्यंतच्या निवडणुकीत आलेला दुःखद अनुभव) परंतु कालचे झालेले साहित्य वाटप आणि जमा करून घेण्याची प्रक्रिया चा अनुभव अत्यंत चांगला समाधानकारक ठरला.
याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी झोनलऑफिसर व त्यांच्या सर्व टीमच्या सहकार्यांना मनःपूर्वक आभार!
💐💐💐🌹🌹🌹👍👍
खालिद बागवान
एम.ए.उर्दू हायस्कूल, आष्टा


🎯यंदाच्या निवडणुकीच सर्वात मोठं वैशिष्ट्य....

*निवडणूक घेतलीय असंच वाटेनाच..* 
 
ना ढीगभर कागदपत्र, ना पेट्या जमा करताना दंगा, ना मंडपात सिलिंग करतं बसलेलं दृश्य...
🤪🤪😃😃😃

नेहमी असंच असावं ही विनंती...
डॉ. देवेंद्र पाटील


🎯  सर,
मी केंद्राध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अत्यंत तणावपूर्ण व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या क्षणी आपणांस केलेला एक फोन कॉल माझ्यासाठी खूप मोठा मानसिक आधार ठरला. आपल्या मार्गदर्शनामुळे आणि आश्वासक शब्दांमुळे समोर उभ्या राहिलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळाले.
आजवर अनेक निवडणूक प्रक्रियांमध्ये सहभागी झालो आहे; मात्र प्रशासन इतक्या ठामपणे आणि विश्वासाने पाठीशी उभे असल्याचा हा अनुभव पहिल्यांदाच आला. आपल्या तत्काळ हस्तक्षेपामुळे आणि संवेदनशील नेतृत्वामुळे परिस्थिती सुरळीतपणे हाताळता आली.
आपल्या या सहकार्याबद्दल व मोलाच्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार, सर…!!!

प्रा. डॉ. सचिन हुदले


Saturday, January 24, 2026

बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

 



बाबासाहेब परीट



मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्रात लेखन,निवेदनशैली या दोन्ही अंगांनी प्रभाव टाकणारी काही मोठी नावं समोर येतात.

यामध्ये पु.लं .देशपांडे. ,व.पु.काळे. ,ग.आ. कुलकर्णी ,मतकरी-धारप,शंकर पाटील,आप्पासाहेब खोत अशा दिग्गजांनी हे क्षेत्र विविध  अंगांनी आणि रंगांनी समृद्ध केले.

असेच एक नव्यापिढीतील नाव समोर येत

बाबासाहेब परीट .

बाबासाहेब परीट हे ग्रामीण कथाकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. आतापर्यंत सात मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्याची आणि कथा सादर करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. त्यांनी स्वतःच लिहिलेल्या कथा सादर केल्या आहेत व त्या गाजल्याही आहेत. त्यांची 'शिकार ' ही कथा चांगलीच गाजली आहे. 

सिंगापूर येथे झालेल्या तिसऱ्या विश्व साहित्य संमेलनाम ध्येही सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली होती. दोन वेळा दिल्ली येथे झालेल्या साहित्य अकादमीच्या संमेलनातही त्यांना संधी मि ळाली होती. गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनात शिकार कथा सादर केली होती. यावर्षी सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित केले होते. त्यांनी गस्त ही कथा सादर केली.त्यांच्या कथांमधून वारणा खोऱ्यातील ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन घडते.

बाबासाहेब परीट हे केवळ एक प्राथमिक शिक्षक नसून ते कथालेखक व ग्रामीण साहित्याचे अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील साहित्य परंपरा आणि जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाला आहे. शिक्षक वर्गाची मान अभिमानाने उंचावली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षक, अधिकारी व कर्मचारी कथाकथन स्पर्धेत शिराळा तालुक्यातील बिळाशीचे सुपुत्र, जिल्हा परिषद शाळा, धसवाडीचे उपक्रमशील शिक्षक, ख्यातनाम ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी कथेचे बहारदार सादरीकरण केले. त्यांनी प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी त्यांनी स्वलिखित 'गस्त' ही कथा उत्तमरित्या सादर केली. सामाजिक व्यंगावर भाष्य करून जीवनाची मूलभूत तत्वे त्यांनी आपल्या कथेतून मांडली आणि उपस्थितांची मने जिंकली.


महाराष्ट्रातून सुमारे चाळीसहून अधिक अधिकारी, कर्मचारी व शिक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धा तालुकास्तर, केंद्र, जिल्हा, विभाग व नंतर राज्यस्तरावरील अंतिम स्पर्धा गडचिरोली येथे घेण्यात आल्या.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. गडचिरोली येथे ही स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातून निवडक कथाकारांनी यात सहभाग नोंदवला होता. परीट यांनी आपल्या कथेतून ग्रामीण जीवनाचा अस्सल गाभा, लोकसंस्कृतीची ताकद आणि समाजात दडलेली संवेदनशीलता यांचे अत्यंत प्रभावी चित्रण केले. त्यांच्या शब्दांनी आणि सादरीकरणाच्या शैलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


श्री. परीट यांच्या यशाबद्दल सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील, भारत सरकारचे दिल्ली येथील उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील, महाराष्ट्र राज्य लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे - पाटील, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, रायगडचे उप-वन संरक्षक राहुल पाटील, गडचिरोलीच्या उपजिल्हाधिकारी स्मिता पाटील - बेलपत्रे, सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, सांगली शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, सांगलीच्या उपशिक्षणाधिकारी डॉ. श्रीमती विमल माने,  गटशिक्षणाधिकारी,अजिंक्य कुंभार, सुनिल आंबी, पोपटराव मलगुंडे, शिक्षण विस्तार अधिकारी छाया माळी, बाजीराव देशमुख, रविंद्र लोंढे केंद्रप्रमुख प्रफुल्ल काळे,सुधाकर पाटील, पोपट जाधव या शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व शिक्षक तसेच साहित्य वर्तुळातून ,आप्पासाहेब खोत, दि.बा.पाटील,रमजान मुल्ला, स्वाती शिंदे, दीपक स्वामी ,महादेव माने,हिम्मत पाटील, धनाजी माने  तसेच राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्याकडूनही त्यांचे अभिनंदन  होत आहे.

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत त्यांनी मिळवलेल्या यशामुळे सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे हे निश्चित . यावेळी बोलताना , बाबासाहेब परीट म्हणाले की 

" हे यश केवळ माझ्या एकट्याचे नसून, माझे आई-वडील, सहकारी शिक्षक अधिकारी, विविध क्षेत्रातील कार्यरत मित्र परिवार आणि क्रांतिकारी भूमीचे आहे."

 - धनाजी माने.....✍️


Saturday, January 17, 2026

कोरेगांवच्या मातीचा अभिमान













“खेळात जिंकलेले उपविजेतेपद आणि गावकऱ्यांच्या प्रेमाने जिंकलेली मने – 

जिल्हा परिषद शाळा कोरेगांव.”

================================

🏆 कोरेगांवच्या मातीचा अभिमान : जिल्हा परिषद शाळा कोरेगांवच्या चिमुकल्यांची झेप जिल्हास्तरावर 🏆


कोरेगांव गाव आज अभिमानाने उभे आहे. कारण या गावातील जिल्हा परिषद शाळा कोरेगांव येथील चिमुकल्या खेळाडूंनी खो-खो या पारंपरिक भारतीय खेळात छोट्या गटात जिल्हास्तरीय उपविजेतेपद पटकावत केवळ पदकच नाही, तर संपूर्ण गावाचे मन जिंकले आहे.

ही कामगिरी फक्त एका स्पर्धेतील यश नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्दीची, चिकाटीची आणि आत्मविश्वासाची जिवंत साक्ष आहे. मातीवर खेळत मोठी होणारी ही मुले आज जिल्ह्याच्या क्रीडामंचावर चमकली आणि “आम्हीही कुणापेक्षा कमी नाही” हे ठामपणे सिद्ध केले.

🎶 वाद्यांच्या गजरात ,फटाक्यांची जोड अभिमानाची मिरवणूक

या ऐतिहासिक यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी कोरेगांव गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ढोल-ताशा,हालगी-घुमके , टाळ्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. गावात रांगोळी काढून ठिकठिकाणी या खेळाडूंचे औक्षण केले.पेढे भरवले.एक भावनिक व मन भरुन टाकणारे क्षण या बालचमु खेळाडूंनी अनुभवले.गावकऱ्यांच्या मोठ्यामनाची प्रचिती या विद्यार्थ्यांना आली.

 गावातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक आज आनंदाने फुलून गेला होता.

"एक- दोन कोरेगांव ", "आमची शाळा - जिल्हा परिषद शाळा " असा जिल्हा परिषद शाळा कोरेगांवचा जयघोष करत खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांत चमक स्पष्ट दिसत होती.

या मिरवणुकीत शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही मिरवणूक केवळ खेळाडूंचा सन्मान नव्हती, तर शाळा आणि गाव यांच्यातील अतूट नात्याचा सुंदर उत्सव होती.

 शिक्षकांचे ,क्रिडाप्रेमींचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द

या यशामागे विद्यार्थ्यांचे नियमित सराव, शिस्तबद्ध जीवन आणि शिक्षकांचे ,क्रिडाप्रेमींचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन हे प्रमुख कारण ठरले. मर्यादित सुविधा असूनही शिक्षकांनी मुलांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य दिशा दिली.

उन्हा-पावसाची तमा न बाळगता, अभ्यासासोबत खेळाचा समतोल राखत या मुलांनी केलेली मेहनत आज फळाला आली आहे.

 ग्रामीण शाळेचा आत्मविश्वास

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून, ती संस्कार, आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकासाची शाळा आहे, हे या यशाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ही कामगिरी कोरेगांव गावातील इतर विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा ठरणार असून, खेळ, शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घालणाऱ्या शाळेची भूमिका अधिक ठळक झाली आहे.

 भविष्याकडे आशेने पाहताना

आज उपविजेतेपद मिळाले असले, तरी या चिमुकल्यांच्या डोळ्यांत विजेतेपदाची स्वप्ने चमकत आहेत. गावकऱ्यांचे प्रेम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ असेच कायम राहिले, तर उद्या हीच मुले राज्य व राष्ट्रीय पातळीवर कोरेगांवचे नाव उज्वल करतील, यात शंका नाही.

कोरेगांवच्या मातीत जन्मलेल्या या चिमुकल्यांनी दाखवलेली जिद्द आणि यशाची भूक हीच या गावाची खरी ओळख आहे.

🌼 जिल्हा परिषद शाळा कोरेगांवच्या या गौरवशाली यशाला मनापासून सलाम! 

आज या चिमुकल्या खेळाडूंनी केवळ एक उपविजेतेपद मिळवलेले नाही, तर आत्मविश्वास, एकजूट आणि मेहनतीचे मोल संपूर्ण गावासमोर उभे केले आहे. जिल्हा परिषद शाळा कोरेगांव ही केवळ शाळा नसून, ती स्वप्न घडवणारी आणि भविष्याला दिशा देणारी एक संस्कारशाळा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोरेगांवच्या मातीत वाढलेली ही मुले उद्या मोठ्या मैदानांवर झळकतील, हा विश्वास आज अधिक दृढ झाला आहे. शिक्षकांचे ,क्रिडाप्रेमींचे मार्गदर्शन, पालकांचे आशीर्वाद आणि गावकऱ्यांचे प्रेम असेच कायम राहिले, तर यशाची ही मिरवणूक थांबणार नाही.

🌟✌️ही सुरुवात आहे… कोरेगांवच्या नावाला उज्वल करणाऱ्या अनेक सुवर्णक्षणांची! 🌟

   - धनाजी माने.....✍️





Tuesday, September 02, 2025

🙏भावपूर्ण श्रद्धांजली !💐

 

🙏भावपुर्ण श्रद्धांजली : समाजाभिमानी नेता व प्रगतशील शेतकरी -सुभाष नामदेव पाटील (तात्या)

२ सप्टेंबर २०२५ रोजी ,वयाच्या ७३व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.ते तात्या या नावाने सर्वपरिचित होते.

  तात्या !  हे नाव उच्चारताच  प्रत्येकाच्या मनात आदर, आपुलकी आणि प्रेरणेची छाप उमटते.

तात्या हे केवळ शेतकरी नव्हते, तर एक मार्गदर्शक, समाजाभिमानी नेता आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व होते.

 सरपंच, सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले .सोसायटी संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.  

इटकरे गावाचे श्रद्धास्थान असणाऱ्या तुकाईदेवीच्या देवालयाचा  जिर्णोद्धारही त्यांनीच त्यांच्या काळात केला. तुकाईदेवालय परिसर या परिसरातील एक पर्यटन स्थळ म्हणून आज नावारूपाला येत आहे यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.

त्यांनी प्रगतशील शेतकरी म्हणूनही आधुनिक शेतीत नवे प्रयोग करून दाखवले. शेतीच्या अभ्यासासाठी त्यांनी इस्राएलचाही दौरा केला. व  पाण्याचे महत्व जाणून त्यांनी तो प्रयोग आपल्या इटकरे येथील शेतीवर केला. 

कुणाच्या स्वप्नातही नसेल अशा खडकावरती त्यांनी नंदनवन फुलवले.

जवळजवळ वीस एकर क्षेत्रावर जेसीबी पोकलॅण्ड, बुलडोझर अशा अवजड  अवजारांचा वापर करून त्यांनी ही शेती हाताखाली आणली. व या शेतीवर नवनवे प्रयोग केले. पुढील अनेक पिढ्यांसाठी व तहयात नवनिर्मिती करणारी शेती निर्माण करून ती फुलवली.

केळीसारख्या पिकांचे त्यांनी या क्षेत्रामध्ये विक्रमी उत्पादन घेतले. व इंच आणि इंच जमिनीचा वापर करून त्यांनी बांधावरतीही वनराई फुलवली बांधावरती सुपारी, नारळ ,आंबा यासारख्या पुढील अनेक पिढ्यांना उत्पादन देणाऱ्या वनराईची नवनिर्मिती केली. जणू काळाकुट्ट दगडावरती त्यांनी नंदनवनच फुलवले.

त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. 

सर्वसामान्य व गरीब कुटुंबात जन्माला येऊनही  कष्ट, चिकाटी आणि धडाडीच्या जोरावर त्यांनी आपले घर, शेती आणि समाजकारण उभे केले.

तात्यांचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्यांचे कुटुंब. घरातील प्रत्येकाला त्यांनी मेहनतीची शिकवण दिली. त्यांच्या मुला-मुलींनी व नातवंडांनी शिक्षण व उद्योग क्षेत्रात  परंपरा पुढे चालवली आहे. आज त्यांची नातवंडे देशात व परदेशात शिक्षण घेत आहेत, काही उद्योगधंद्यात आपले स्थान निर्माण करत आहेत. "सुमनराज हायटेक फर्म" ही त्यांच्याच प्रेरणेने उभी राहिलेली संस्था आज यशस्वीपणे कार्यरत आहे.

तात्या साधेपणाने जगले, त्यांच्या वागण्यात मोठेपणाचा कधीच डामडौल नव्हता.

 प्रत्येकाला त्यांनी कधी आपुलकीने तर कधी प्रसंगी रागाहूनही हात दिला, संकटात आधार दिला. 

माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी खऱ्या अर्थाने कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे आधार दिला, सुखदुःखात साथ दिली. त्यामुळे त्यांचे जाणे हे केवळ कुटुंबापुरतेच नाही, तर आमच्यासारख्या असंख्य लोकांसाठी वैयक्तिक हानी आहे.

आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर  त्यांच्या कुटुंबीयांना देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना !

तात्यांच्या शिकवणी, त्यांच्या कष्टाची परंपरा आणि समाजकारणाचा वारसा पुढील पिढ्यांना नक्कीच दिशा देत राहील.

🙏 तात्या, आपण दिलेला आधार, आपुलकी आणि प्रेरणा आम्ही विसरणार नाही. आपण आमच्यासाठी कायम प्रेरणास्थान राहाल. भावपूर्ण श्रद्धांजली! 🌹

     - धनाजी माने ….✍️

  dhanajimane.blogspot.com



आठवणींच्या हिंदोळ्यावरचे एक पत्र!

  कागदावर उतरलेला निरागस जिव्हाळा: जेव्हा दुसरीतील मुलींनी सरांना साद घातली...आठवणींच्या हिंदोळ्यावरचे एक पत्र! ====================== ​शिक्...