Sunday, July 05, 2026

हरवलेले शिक्षण आणि हताश शिक्षक

 

शिक्षक की बहुउद्देशीय सरकारी कर्मचारी? – एका प्राथमिक शिक्षकाची व्यथा.....।

"शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे."

हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, भाषणांमध्ये बोलतो आणि

शिक्षक दिनी गौरवाने उच्चारतो. परंतु वास्तवात आजचा शिक्षक राष्ट्राचा शिल्पकार कमी आणि बहुउद्देशीय सरकारी कर्मचारी अधिक बनला आहे.आज प्राथमिक शिक्षकाच्या हातात खडू, पुस्तक आणि विद्यार्थ्यांची स्वप्ने यांच्याबरोबरच जणगणनेचे फॉर्म, BLO चे रजिस्टर, ऑनलाइन पोर्टल, बैठकींचे आदेश, विविध सर्वेक्षणे, शासकीय अहवाल आणि सतत बदलणाऱ्या डिजिटल प्रणालींचा प्रचंड भार आहे.प्रश्न असा आहे की एकच शिक्षक एकाच वेळी उत्कृष्ट अध्यापन, दोन-दोन वर्गांचे व्यवस्थापन,मुख्याध्यापकांचा कार्यभार, जणगणना, BLO, ऑनलाइन कामे, बैठका, प्रशिक्षण आणि स्वतःच्या TET/CTET चा अभ्यास कसा करणार?हा प्रश्न केवळ शिक्षकाचा नाही; तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शिक्षणव्यवस्थेच्या भविष्याचा प्रश्न आहे.

शिक्षकाचे मूळ कार्य काय?🔹समाज शिक्षकाकडून मोठ्या अपेक्षा ठेवतो. त्या योग्यही आहेत.शिक्षकाने—विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे,प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष द्यावे,वाचन, लेखन आणि गणित मजबूत करावे,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा,मूल्यशिक्षण, संविधानिक मूल्ये आणि जीवनकौशल्ये विकसित करावीत,पालकांशी सतत संवाद ठेवावा,सतत मूल्यमापन करून प्रत्येक मुलाला पुढे न्यावे.हे सर्व शिक्षकाचे खरे काम आहे.परंतु आज शिक्षकाचा बहुतांश वेळ अध्यापना ऐवजी

प्रशासकीय कामांमध्ये जात आहे.शिक्षकावर वाढत चाललेले अशैक्षणिक कामांचे ओझे ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शिक्षकाचा विचार करा.

🔹त्याच्यावर या साऱ्या अध्यापना व्यतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत— ( यातील थोड्याच कामाची यादी दिली आहे ,कारण ही यादी खूप मोठी आहे )

जणगणना,BLO (मतदार यादी),निवडणूक काम,विविध शासकीय सर्वेक्षणे,विद्यार्थ्यांचे आधार

व अपार आयडी,UDISE+, विविध पोर्टलवरील माहिती,शिष्यवृत्ती, गणवेश, पाठ्यपुस्तके,पोषण आहार नोंदी,ऑनलाइन अहवाल,वरिष्ठांनी मागितलेली तातडीची माहिती,शाळेच्या सर्व प्रशासकीय नोंदी,मुख्याध्यापकांचा अतिरिक्त चार्ज,तालुका, केंद्र, जिल्हास्तरीय बैठका,प्रशिक्षण,विविध स्पर्धा,पालक भेटी,आणि यासोबत दोन-दोन वर्गांचे अध्यापन,या सर्वांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना वेळ कधी देणार?

दोन वर्गांचा एकच शिक्षक अनेक ग्रामीण शाळांमध्ये एकाच शिक्षकाला पहिली-दुसरी किंवा तिसरी-चौथी असे दोन वर्ग एकत्र शिकवावे लागतात.एका वर्गाला शिकवत असताना दुसरा वर्ग स्वअध्ययन करत असतो.एका मुलाच्या शंकेचे निरसन करताना दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होते.अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे वास्तववादी आहे का?

ऑनलाइन कामांचा वाढता डोंगर,डिजिटल युगात तंत्रज्ञान आवश्यक आहे. पण ते शिक्षकाला मदत करणारे असावे, अडथळा निर्माण करणारे नव्हे.

🔹आज शिक्षकाचा मोठा वेळ पुढील गोष्टींमध्ये जातो

नवीन लिंक,नवीन पोर्टल,नवीन पासवर्ड,नवीन माहिती,नवीन अहवालवारंवार तीच माहिती.जर एखादी माहिती वेळेत भरली नाही तर लगेच स्पष्टीकरण.म्हणजे शिक्षकाच्या गुणवत्तेचे मोजमाप विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर नव्हे, तर पोर्टलवरील "Submitted" बटणावर होऊ लागले आहे.बैठकींचे वाढते प्रमाण,महिन्यात अनेक बैठका.ऑनलाइन बैठक.,ऑफलाइन बैठक.क्लस्टर बैठक.तालुका बैठक.प्रशिक्षण.या बैठकींमुळे विद्यार्थ्यांचे अध्यापन किती तास बुडते याचा कधी विचार केला जातो का?

स्वतःच्या अभ्यासासाठी वेळ कुठे?

न्यायालयाच्या एका निर्णयानेआज प्रत्येक शिक्षकाकडून अपेक्षा आहे की तो—TET, CTET उत्तीर्ण व्हावा.नवीन शैक्षणिक धोरण समजून घ्यावे.डिजिटल कौशल्य वाढवावे.नवीन अध्यापन पद्धती शिकाव्यात.हे सर्व आवश्यक आहे.

🔹पण प्रश्न आहे—वेळ कुठे आहे?

मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम ,सततची डेडलाईन.वरिष्ठांचा दबाव.ऑनलाइन चुका होण्याची भीती.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चिंता.पालकांच्या अपेक्षा.कुटुंबाला वेळ देता न येण्याची खंत.या सर्वांचा परिणाम शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे.अनेक शिक्षक निद्रानाश, उच्च रक्तदाब, मधुमेह, चिंता, नैराश्य आणि मानसिक थकवा अनुभवत आहेत.शिक्षक शाळेत उपस्थित असतो; पण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकलेला असतो.कुटुंबाकडे दुर्लक्ष,सकाळी शाळा.सायंकाळी ऑनलाइन काम.

रात्री अहवाल.सुट्टीच्या दिवशी बैठक.स्वतःच्या मुलांबरोबर वेळ नाही.आई-वडिलांसोबत वेळ नाही.जीवनसाथीसोबत संवाद नाही.ही केवळ एका शिक्षकाची नव्हे, हजारो शिक्षकांची वास्तविकता

आहे.

🔹विद्यार्थ्यांचे नुकसान

या परिस्थितीचे सर्वात मोठे नुकसान विद्यार्थ्यांचे होते.त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळत नाही.

वाचन-लेखनाचा सराव कमी होतो.मूल्यशिक्षणासाठी वेळ राहत नाही.कमकुवत विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष

देता येत नाही.आणि शिक्षणाचा दर्जा घसरला की

दोष शिक्षकालाच दिला जातो.

🔹कायदा आणि राष्ट्रीय धोरण काय सांगते?

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की

शिक्षकांवरील अनावश्यक प्रशासकीय कामांचा भार कमी केला पाहिजे, जेणेकरून ते अध्यापनावर लक्ष केंद्रित करू शकतील.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (RTE Act) नुसार शिक्षकांना नियमित अशैक्षणिक कामांसाठी वापरू नये. अपवाद म्हणून केवळ जनगणना, निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापन

यांसारखी मर्यादित कामे दिली जाऊ शकतात.शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक प्रशिक्षण संस्थाही सातत्याने याच भूमिकेचा पुरस्कार करतात की शिक्षकाचा जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांसाठी राखीव असला पाहिजे.

🔹शासनाला काही थेट प्रश्न

एका शिक्षकावर दोन-दोन वर्ग का?रिक्त शिक्षक पदे तातडीने का भरली जात नाहीत?एकाच माहितीची वारंवार मागणी का केली जाते?प्रत्येक बैठकीसाठी शिक्षकांनाच का बोलावले जाते?प्रत्येक नवीन योजनेचा भार शिक्षकांवरच का?हे सर्व समजत असूनही यावर उपाययोजना का होत नाही ?

🔹उपाय काय?

समस्या मांडणे पुरेसे नाही; उपाय आवश्यक आहेत-

प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची तातडीने नियुक्ती."एक शिक्षक – एक वर्ग" हे धोरण

प्रभावीपणे राबविणे.शिक्षकांना अनावश्यक अशैक्षणिक कामांतून मुक्त करणे.जणगणना, BLO आणि इतर प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करणे.एकात्मिक डिजिटल प्रणाली तयार करून एकच माहिती एकदाच घेणे.अनावश्यक बैठका कमी करणे.शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशन उपलब्ध करणे.मुख्याध्यापकांचा अतिरिक्त चार्ज शक्यतो टाळणे.

🔹शिक्षकांच्या वेळेचा आदर करणे.

समाजासाठी संदेश जेव्हा पालक म्हणतात—"माझ्या मुलाला चांगले शिकवा."

तेव्हा शिक्षक मनोमन म्हणतो—"मलाही तेच करायचे आहे. पण माझ्या हातात पुस्तकापेक्षा कागदपत्रे इतर कामेच जास्त दिली गेली आहेत."

🔹शेवटी एक अपेक्षा विचार

शिक्षक हा यंत्र नाही.तो एक संवेदनशील माणूस आहे.त्यालाही कुटुंब आहे.त्यालाही आरोग्य आहे.त्यालाही स्वप्ने आहेत.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याला विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवायचा आहे.जर शिक्षक कागदपत्रांत, पोर्टलमध्ये आणि बैठकींमध्ये,उपक्रमामद्धे अडकून राहिला, तर विद्यार्थ्यांचे

भविष्यही त्या कागदपत्रांतच अडकून राहील.शिक्षकाला सन्मान केवळ शिक्षक दिनी पुष्पगुच्छ देऊन मिळत नाही. त्याला सन्मान मिळतो तो त्याच्या हातातील अनावश्यक कामांचा भार कमी केल्याने, त्याला अध्यापनासाठी पुरेसा वेळ दिल्याने आणि शिक्षणव्यवस्थेवर विश्वास दाखवल्याने.

कारण शिक्षक मजबूत असेल तरच विद्यार्थी सक्षम होतील;

विद्यार्थी सक्षम झाले तरच राष्ट्र सक्षम होईल.

आज ही वेळ शिक्षकांविषयी सहानुभूती व्यक्त करण्याची नाही,

तर शिक्षणव्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्याची आहे. शिक्षकाला पुन्हा एकदा "शिक्षक" म्हणून काम करू देणे हीच खरी शिक्षणसुधारणा ठरेल.मायबाप सरकारने यावर वेळीच साकल्याने विचार करावा व त्वरित यावर उपाय करावेत अशी महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू-भगिनींची मागणी आहे. तर आणि तरच विद्यार्थ्याचे उज्वल भविष्य घडेल अन्यथा येणारा काळ कुणालाच माफ करणर नाही.ना शासन व्यवस्थेला,ना शिक्षकाला ,ना समाजाला हे नक्की !  -         - धनाजी माने….✍️

No comments:

हरवलेले शिक्षण आणि हताश शिक्षक

  शिक्षक की बहुउद्देशीय सरकारी कर्मचारी? – एका प्राथमिक शिक्षकाची व्यथा.....। "शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे." हे वाक्य आपण अ...