Monday, May 31, 2021

कथा एका घोंगड्याची.......✍️

 

कथा एका घोंगड्याची.......

◾▪️▪️ #घोंगडे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येत ते मेंढीच्या लोकरी पासून बनविलेले जाड #वस्त्र.पुर्ण काळ्याकुट्ट लोकरीपासून बनवलेले तर कधी पांढरी- काळी लोकर वापरुन तयार केलेले नक्षीदार घोंगडे.घरात , शेतात , थंडीत- पावसात कसेही वापरले तरी #उबच देते.थंडीच्या दिवसात तर अंगावरून काढवतच नाही असे घोंगडे.

पण......हे घोंगडे मात्र जगातील सर्व घोंगड्यानपेक्षा वेगळेच आहे.नुसतीच उब नाही तर ......माझ्यासाठी माया, #प्रेम, आपुलकी ,आपलेपणा,जिव्हाळा, माणुसकी, करुणा,कृतज्ञता आणि प्रेरणाही देणारे हे घोंगडे ठरले.शेवटपर्यंत जरुर वाचा तुम्हालाही हे घोंगडे इतर घोंगड्यानपेक्षा नक्की वेगळे वाटेल.....

( कथा सत्य घटनेवर आधारित......)







सप्टेंबर २००० मधील ही गोष्ट नेहमीप्रमाणे अध्यापनाचे काम वर्गावरती चालले होते, एवढ्यात आवाज आला,
'माने सर आत येऊ का ?"
मी आत येण्यास सांगितले.
समोर, शाळेतील सहाय्यक अध्यापिका सौ. तिवडे मॅडम, सोबत त्यांच्याचवर्गातील महादेव गावडे व हुंदके देत आलेली त्याची आई .

'महादेव, खूप दिवसानंतर शाळेत आलेला.  तो सतत गैरहजरच असायचा, त्याला हृदयविकाराचा त्रास सुरु होता, त्या दिवशी तर तो खूप निस्तेज झालेला, गाल फुगलेले, फटफटीत झालेला चेहरा, त्याच्या बोलण्यातून थकवा जाणवत होता.'

माझ्या हातात मिरजेच्या हॉस्पिटलची कागदपत्रे देत व महादेवला जवळ करीत महादेवची आई मोठ्यानेच रडू लागली.

कागद हातात घेऊन पाहिले, कागदावर महादेवच्या उपचारांच्या खर्चाचे #इस्टिमेट होते. जवळजवळ रु. पन्नास ते नव्वद हजार रक्कमेचा तो तपशील होता. तर.. प्रवास, राहणे व इतर खर्च वेगळाच. एकूणच जवळ-जवळ रु. १ लाखाच्या पुढे जाणारा #खर्च कशातून करायचा हा प्रश्न हताश झालेल्या महादेवच्या कुटुंबाच्या समोर होता. हुंदके देतच महादेवची आई म्हणाली,
'सर! लय दिवस झाले हो! माझा #बाळ सोसतुया ! लय-लय माझं पॉर  हाल सोसतय  बघा ! डाक्टरांनी तर सांगितलंय इलाज लवकर न्हाय झाला तर, मुलगा तुमचा.........."
तिला पुढचा शब्द म्हणण्याचे धाडस होईना, म्हणण्यापेक्षा तिला तो उच्चारताच येईना येवढे रडू कोसळले.

" सर! आमचं हातावरच पॉट, ना जमीन ना दुसरे काय,धनगराच असलो तरी, ना शेरडु , ना मेंढरू, भांगलाय गेलं तर,तुकडा मिळतुया ! आणि एवढा खर्च कशातनं करायचा, माझं बाळ तर एकुलतं एक हाय! खरचं! सर काहीतरी करा हो! "

म्हणून ती हुंदके देत पुन्हा रडू लागली! महादेवही आईच्या अंगाशी बिलगला, आणि आईचा पदर आपल्या तोंडावर घेवून तोही रडू लागला,जणू उपचाराविणा आपल्या पोटचा गोळा तिला आपल्यापासून दूर कुठेतरी जाताना दिसत असावा.साक्षात तिला आपल्या एकूलत्या एक मुलाचा फटफटीत पडलेला चेहरा पाहून त्याचा साक्षात मृत्यू  समोर दिसत असावा.

एकूणच ते दृश्य पाहून, मलाही गहिवरून आलं,  सर्व वर्गामध्ये निरव शांतता पसरली हे सर्व पाहून मुलांनाही वाईट वाटले.

गरिबीच्या नरकयातना काय असतात, हे महादेवच्या आईच्या असहाय्यतेतून जाणवत होते.
त्या दोघांनाही शांत केलं, धीर दिला.
मी विविध दैनिकातून लिहतोय , महादेवच्या या करुन कहाणीला कुठेतरी मांडले जाईल आणि आपल्याला त्याच्या उपचारासाठी मदत मिळेल ,या आशेने , शाळेतील सहाय्यक शिक्षिका तिवडे मॅडम त्यांना माझ्याकडे घेऊन आल्या होत्या.

एवढा  आशेचा धागा पकडून, त्याचा फोटो  विविध माध्यमातून छापून आवाहन केले जाईल,ही आशादायी अपेक्षा ठेवून, त्या मॅडम त्या महादेवच्या आईला घेऊन आल्या होत्या.

मी त्यांना महादेवाचा फोटो काढून देण्यास सांगितले. दवाखान्याच्या खर्चाच्या तपशीलाच्या झेरॉक्स घेतल्या.
त्यानंतर माझे मन सतत बेचैन झाले. सारखा- सारखा त्या महादेवचा निस्तेज चेहरा, त्याचा धोक्याच्या दिशेने सुरु असणारा जीवनप्रवास आणि महादेवच्या आईची असहाय्यता दिसू लागली
.

यावेळी महादेवच्या आईला शक्य तेवढी आम्ही व शिरोलीतील लोकांच्याकडून  आर्थिक मदत गोळा केली, महादेवला ऍडमिट करण्याचा सल्ला दिला.त्याला ऍडमिट करुन त्याच्यावर उपचार सुरु केले.मीही #दोन #तीन वेळ मिरजेला दवाखान्यात जाऊन त्यांना धीर दिला.महादेवच्या कुटुंबातील सदस्यांनाही धीर आला. या आजाराने आपल्या पासून  दुर निघालेला आपला पोर , उपचार सुरु झाल्याने पुन्हा आपल्या कुशीत पुर्वीसारखाच आनंदाने खेळेल या आशा , त्या मातेच्या पल्लवीत झाल्या.

दरम्यान महादेववरती पुरे उपचार होऊन तो सुरक्षित घरी परतेपर्यंत आता आपणही सर्वोतोपरी प्रयत्न करायचे असे ठरवले आणि त्या दिशेने प्रवास सुरु झाला.

फोटो घेतला, माहिती तयार केली.

एका नामांकित दैनिकाच्या  अधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी लिहिण्यास प्रेरणा दिली. आणि माझ्या हातून त्या प्रसंगाला अनुसरून माहिती लिहिली गेली . आणि सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र त्याची ही करूणभरी कहाणी प्रसिद्धही झाली.

त्याचे झगडणे, दारिद्र्याशी आणि हृदयविकारासाशी........या मथळ्याखाली ती माहिती  प्रसिद्ध झाली......

त्या प्रसंगाला अनुसरून  माझ्या कडून लिहले गेले.
मनाला घालमेल करणारे विचार ,कागदावर उतरले.
माझ्या भावनांनाही वाट मोकळी झाली. त्या अमूर्त भावनांना ,या  करुन कहाणीच्या रुपाने मुर्त रुप मिळाले.
ते या रूपाने ........

"दीन भुकेला दिसता कोणी,
घास मुखीचा मुखी घालुनी,
दुःख नेत्रीचे घेता पिऊनी,
नित्य भजतो मानवतेला, तोचि आवडे देवाला ।"

या काव्यपंक्ती आपल्याला हेच सांगतात की, आपल्या सभोवती जर कोणी दुःखी - कष्टी असेल, तर त्याचे दुःख जाणून घ्या. जगात वावरताना डोळस बना, उघड्या डोळ्याने वावरा म्हणजे समजेल की,
आपल्या अवती भोवती, दीन-दुबळे, दुःखी- कष्टी, अश्राप जीव वावरत आहेत. अशा दुःखाशी, संकटाशी एक शाळकरी मुलगा सध्या झगडतो आहे.
एकीकडे त्याचे झगडणे आहे. प्रकृतीशी आणि दुसरीकडे दारिद्र्याशी! अशी वेळ आली आहे. शिरोली (ता. हातकणंगले) येथील कु. महादेव विजय गावडे या १० वर्षाच्या इ. ४ थीत शिकणाऱ्या चिमुकल्या बालकावर, त्याचा प्रत्येक क्षण दुःखाने आणि यातनेने भरलेला आहे. तो शुक्रवार ८ सप्टेंबर, २००० पासून 'वाॅनलेस हॉस्पिटल, मिरज' येथे उपचार घेत असून, त्याच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी रु. ९० हजार ते.१ लाख खर्च येणार आहे.
एवढा पैसा उभा करण्याइतपत त्याच्या घरची परिस्थिती नाही. त्याच्यासाठी शाळकरी मुलांनी व शिक्षकांनी यथाशक्ती मदत केली आहे.
महादेवचे आई-वडिल रोज रोजंदारी करून आपल्या  कुटूंबाला सांभाळतात. महादेवच्या दुसऱ्या वर्षापासून महादेवला हा त्रास  सुरु आहे. घरची हालाखीची परिस्थिती असल्यामुळे आजपर्यंत त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली नाही. महादेवची आई  साश्रुनयनांनी आपली करुणभरी कहाणी हुंदके देत सांगत होती. त्यांची ही वेदना डोळ्यांना दिसत होती. जाणवत होती, दुःखभरीत हुंदके कानांना ऐकू येत होते. अशावेळी स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यांनसाठी जगलास , तरच जगलास! खरे तर या सुविचाराच्या मागेही दुःखितासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हेच आवर्जून सांगितले आहे.

तेव्हा या चिमुकल्या महादेवला वाचवण्यासाठी डी. डी. किंवा चेकद्वारे किंवा रोख, आपल्या सढळ हाताने मदत देणे आपले कर्तव्य आहे. मदत महादेवलाच मिळावी म्हणून हॉस्पिटलमध्ये -
'रिझर्व डोनेशनसाठी त्याचे खाते उघडले आहे.' अशा मथळ्याची माहिती महादेवच्या निस्तेज फोटोसह, सर्वत्र प्रसिद्ध झाली.
समाजाकडून मोठा  प्रतिसाद मिळाला, हजारो , लाखो रुपयांची मदत हा-हा म्हणता काही दिवसातच हॉस्पिटलमध्ये जमा होऊ लागली.

महादेवरती शस्त्रक्रिया या मदतीवरच झाली. सर्व खर्च झाला. रोख १५ ते २० रु हजार रु प्रमाणे कुणी १०००, ५०० रु. यथाशक्ती समाजातील लोकांनी प्रत्यक्ष महादेवच्या आई-वडिल , आजी -आजीबा यांच्याकडे मदत दिली

लाखो रुपये जमा झाले.महादेववरती उपचार झाले , तो पुर्वी सारखा आता जीवन जगू लागला होता.

महादेव, व्यवस्थित होऊन शाळेत येऊ लागला, पेपरमध्ये लिहण्याच्या छंदामुळे  , आपल्या लिखानामुळे आणि या यंत्रणेमधील अधिका-यांनी माहितीला योग्य स्थान दिल्यामुळे एका चिमुकल्या मुलाचा जिव वाचला याचा सार्थ अभिमान वाटलाच. पण एक परमोच्च आत्मिक आनंद मिळाला. हा आत्मिक आनंद काय असतो ,हे प्रत्यक्ष अनुभुतीतूनच अनुभवता येते.ते नाही कधी शब्दात मांडता येत.

या  एका प्रसंगाने आणखी काम करण्याची , लिहण्याची प्रेरणा मिळाली......

असेच एके दिवशी.......नेहमीप्रमाणे, वर्गावर अध्यापन  सुरु होते, शाळेच्या ऑफिसमधून निरोप आला,

"सर ! ऑफिसमध्ये बोलबले आहे. "

"का ? " मी  विचारले

" काही माहिती नाही गावातील लोक आलेत "

निरोप आणनाऱ्यांनी सांगितले


मी ऑफिसमध्ये गेलो तर, महादेवचे आई-वडिल ,महादेवची बहिण , गीता  हातात घोंगडे घेऊन थांबलेले... सोबत काही शिरोलीतील  प्रतिष्ठित व्यक्ती......मुख्याध्यापक,आ.रा.कांबळे, माझे सहकारी 
शिक्षक-बाजीराव पाटील ,नामदेव जाधव ,नामदेव कांबळे , सुनिता पाटील ,शिवाजी चौगुले ,सौ.धेंडे ,सौ.जोशी ,सौ.गुरव मॅडम उपस्थित होते या सर्वांच्या समोर.......

स्वतःच्या हातांनी विनलेले हातातील घोंगडे देत,महादेवचे आई- वडिल म्हणाले 

"सर, ही आमच्या गरिबांच्याकडून भेट, महादेवच्या आजी-आजोबांनी या घोंगड्यासाठी कष्ट घेतलंय आणि हे तुम्हाला द्यायला सांगितलय."

मी भारावून गेलो. त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि पुन्हा आनंदअश्रुंना वाट मोकळी करीत ते म्हणाले
'"सर ! तुम्ही आम्हाला देव भेटलासा, माझ्या पोराचा जीव तुम्हांमुळ वाचला , लय- लय उपकार झाल आमच्यावर !!"

माझ्या वरिष्ठांच्यासमोर आणि प्रतिष्ठित नागरिकांच्यासमोर, बालचमुंच्या साक्षीनं मिळालेल ते घोंगड, मी माझ्या जीवनातील मोठा बहुमान समजतो.शिक्षकी पेशातील, शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च प्रतिष्ठेच्या पुरस्कारापेक्षाही ते घोंगडे मला आजही मोठे वाटते.
महादेवच्या आई-वडिलांनी , आजी -आजोबांनी तयार केलेल्या त्या घोंगड्याच्या प्रत्येक धसीमध्ये प्रेमाची, आपुलकीची आणि कृतज्ञतेची भावना ओतप्रेत भरलेली आहे. मला आजही ते घोंगडे, मायेची उब देतं, विधायक कामासाठी #प्रेरणा देतं , लिहण्याचे बळ देतं. ते घोंगड मला आजही देशातील सर्वोच्च पुरस्कारापेक्षाही मोठ वाटत.

या अशा प्रेरणेमुळेच, मी एक पामर  लिहत राहतो , सुचणाऱ्या भाव -भावनांना शब्दातून वाट मोकळी करत असतो . आपल्यासमोर व्यक्त होतो.ते अशा निरपेक्ष प्रेमामुळेच ,आशीर्वादामुळेच , हे निश्चित !


- धनाजी माने......✍️


(यापुर्वी माझी ही कथा ,लेख...#पुर्वप्रसिद्ध झाले आहेत - #विविध दैनिके, #दिवाळी अंकामधून )

      


Monday, May 24, 2021

सुखही येईल ...आशा घेऊन जगतो आहे.

 सन २०२० /२१ मद्धे करोणामुळे झालेले #लाॅकडाऊन......

 या काळात आपण खेडेगावापासून मोठ- मोठ्या शहरांमध्ये  पाहिले, तर अनेकांचे येणे #बंद झाले होते.  हातावर #पोट असलेल्यांचे होणारे हाल पाहून #मन व्यथित झाले.

बसस्टँडवर विविध वस्तू विकणारे, #फुलवाले, #हमाल,#नाभिक, #प्लंबर, #धोबी, #भेळ-समोसा-वडा वगैरे रस्त्यावर, #रेल्वे स्टेशन,  #मॉल, #सिनेमा याठिकाणचे #विक्रते, दुकानातील, खासगी कार्यालयातील कंत्राटी कामगार असे अनेक #स्वयंरोजगार करणारे व #मजुरी करणारे कामगार अडचणीत आले होते.
कमी #जमीन असलेले बहुसंख्य #शेतकरी
, #कोरडवाहू #शेती करणारे, हंगामी #स्थलांतर करून मजुरीवर #आयुष्य जगणारे. त्यांनाही हाताला काम नव्हते, म्हणजे #कमाई  बंद होती .  या अशा #संघर्षमय काळात 
निर्माण झालेली #व्यथा या कवितेत मांडली आहे......



सुखही येईल ...आशा घेऊन #जगतो आहे.

कुठ-कुठ  #ठिगळं लावणार,
सार आभाळच फाटलयं.
#वर्षा  मागून वर्ष सरले
दुसरेही आता #अर्ध्यावर आले

तरीही आजून #कोंडून घेतलयं
होत ,नव्हत तेवढ ...
आता सार....
संपत आलयं.

ठेवणीत ठेवलेलं नानं आणि
राशितील दाणंही  संपत आलेत.
वातीत घालावे  एवढ्याच 
तेलात,
फोडणी देऊन ,काटकसरीन #जगाव लागतयं.

हातावरचे पोट असुनही,
हाथ आता बंद आहेतं.
#LOCKDOWN चे #बंध मात्र,
आजूनही #घट्ट
आहेत.

गेलेल्या जीवाभावाच्या माणसांच,
#दुःख पचवत ,#मन सारं हारलयं.
जगण्याच्या लढाईत.......
शरीरही #सार थकलयं.

तरीही मी लढणार आहे.
जगण्याची #लढाई #जिंकणार आहे.
#रात्री नंतर दिवस येतोच ना !
हे मला माहीत आहे.

म्हणूनच मी ही लढाई ...
लढतो आहे.
दुःखा नंतर सुखही येईल ...
आशा घेऊन जगतो आहे.

- धनाजी माने....✍️




Monday, May 17, 2021

अरे ! आपण समजत होतो , तेवढे हे भीतीदायक नव्हतेे!


 आपल्या आयुष्यातमद्धे , आपल्या मनात
विविध गोष्टींमुळे एक भीतीचा पगडा निर्माण होतो.याची अनेक कारण असतात.आपल्या आयुष्यात ते आपण वेळोवेळी अनुभवत असतो.आणि ती गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्या अस लक्षात येत की ,

' अरे ! आपण समजत होतो , तेवढे हे भीतीदायक नव्हते, आपण उगीचच मनावर एवढा मोठा दबाव आनला होता. '
करोणामुळे अनेकांच्या मनात अशाच काहीशा भीतीदायक भावना सतत तयार होत आहेत.ज्या प्रसंगामद्धे व्यक्तीला अत्यल्प धोका असताना किंवा अजिबात धोका नसताना त्या गोष्टी बद्दल, प्रसंगा बद्दल सातत्याने व प्रमाणा बाहेर वाटणारी अनामिक भीती मनात तयार आपणच तयार करुन घेतो यालाच भीती म्हणायचे.
मग ती भिती कोणत्याही प्रसंगात तयार होवो.किंवा आज सर्वत्र कोरोणाचे वातावरण असल्याने त्याबाबत तयार झालेली भीती असेल.
याचा अर्थ असा नव्हे की , कोराना गंभीर नाही.
पण ...आपण योग्य खबरदारी घेतली, योग्य ती काळजी घेतली तर भिण्याचे काहीच कारण नाही.
जे योग्य ते काळजी घेत नाहीत तेच कोरोणाने बाधीत होत आहेत.
बर चूक करुन पुन्हा योग्य ती काळजी घेत नाहीत.
यासाठी मनामध्ये अनाठायी भीती न बाळगता योग्य वेळी योग्य ती काळजी , योग्य मार्गदर्शन घेऊन त्यावर मात केली पाहिजे.आणि करताही येते
मनात नकारात्मक विचार न आनता सकारात्मक विचारांची पेरणी करणे हिताचे आणि फायद्याचे आहे.
योग्य ती खबरदारी , योग्य वेेळी घ्या
, आणि मग बघा तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल.

कोरोणा तुमच्याजवळ फिरकणार ही नाही.
तेव्हा मनातील एक अनामिक भिती काढून टाका.
आणि आनंदाने जगा , होईल सर्व ठीक.
All is well 👍 .
- धनाजी माने

Sunday, May 16, 2021

Lockdown..शाळा ,शिक्षक आणि मुल...

 

📌एक अभूतपूर्व संकट सगळ्या जगावर कोसळलं आहे. ते दूर कुठेतरी होतं-आहे असं म्हणता म्हणता, ते आपल्या दारात-घरातच येऊन ठेपलं. जगभरातल्या  सगळ्या आरोग्यव्यवस्था, अर्थव्यवस्था या संकटामुळे ढासळल्या आहेत; तसाच या संकटाचा फटका शिक्षणव्यवस्थेलाही बसला आहे. सुरुवातीचा काळ फार गोंधळाचा होता. या अशा परिस्थितीला आपण कोणीच सामोरे गेलेलो नव्हतो. अचानक आलेलं हे संकट प्रत्येक क्षेत्राला भांबावून टाकणारं होतं. त्याला तोंड कसं द्यायचं, हे सगळ्यांनाच नव्याने शिकायला लागणार होतं. साहजिकच शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद नव्हतं....शाळा आता कधी भरणार ?
चिमुकल्यांच्या गोंगाटाने ,
घुमणारा शाळेचा परिसर  पुन्हा कधी घुमणार ?
असे विविध प्रश्न  मनात ‌येतात.......✍️

Lockdown..शाळा ,शिक्षक आणि मुल.....

शाळा आता कधी भरणार ?
ते निष्पाप, निरागस चेहरे .....
आता समोर कधी दिसणार ?
एकामागुन एक , हे प्रश्नांचेगुंते
कधी सुटणार....?

चिमुकल्यांच्या गोंगाटाने ,
घुमणारा शाळेचा परिसर
आता कसा शांत-शांत....
भकास झालायं.......

कार्यालयाच्या खोलीविना,
बाकी खोल्या lock झाल्यात...
मोठ्या सुट्टीत, मधल्या सुट्टीत
गजबजलेले शाळेच प्रांगण
चिमुकल्यांच्या सोबत खेळण्यास..
आतुर झालयं ,अगदी आई-मुलाच्या भेटीसारखं.

माणसाविणा घरं,
तशा मुलाविणा शाळा झालेतं.
मुलांसाठी गुरु, आणि गुरुसाठी मुले
भेटीसाठी आतूर आहेत.
काहींनी तर ....
कायमचाच निरोप घेतलाय जगाचा,
मुलांच्या भेटीविणाच.

देवा आता नको बघू ,
आणखी परीक्षा......
उघडूदेत सर्व शाळांचे दरवाजे
अगदी पुर्वीसारखे......
तो गोंगाट पुन्हा घुमुदे ,ज्ञानमंदिरात.

बंद कर आता तु ...
तुझी धोक्याची घंटा.
ऐकूदे आम्हाला आणि चिमुकल्यांना
शाळेची ती वाजणारी घंटा.....

- धनाजी माने ....✍️

या गावांचा आदर्श तमाम गावांनीही घ्यायला हवा.

 ◾कोरोनाला लवकरात लवकर रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे. प्रशासन आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत आहे. त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरू न देण्यासाठी आपण आपले वैयक्तिक कर्तव्य पार पाडणे तेवढेच गरजेचे आहे.
विनाकारण बाहेर पडू नका, घरातच बसा, मास्कचा वापर निदान एवढे जरी केले तरी आपण माणुसकी दाखवल्याचा, लोकांचे प्राण वाचवल्याचा, या संकट काळात सेवाधर्म निभावणाऱ्या लोकांना सहाय्य केल्याचा, गाव सावरल्याचा अभिमान बाळगू शकू...
.
.



✌️या गावांचा आदर्श तमाम गावांनीही घ्यायला हवा.


पी.सावळाराम व पांडू मास्तर यांच्या गावात व 
या गावापासून जवळच असणाऱ्या लाडेगांवात ,कोरोणावर मात करण्यासाठी सर्व गाव झटतयं ,चांगल काम घडतयं.
वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी व लाडेगांव या गावांचा आदर्श तमाम गावांनीही घ्यायला हवा.
कोरोणावर मात करण्यासाठी या गावांचा पॅटर्न गावागावात तयार झाला तर भारतातील ग्रामीण भाग  कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही.
येडेनिपाणी म्हटलं की डोळ्यासमोर मराठी भावकवी,  ठाण्याचे नगराध्यक्ष निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी.सावळाराम व स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकार चळवळीतील क्रांतीवीर पांडूरंग गोविंद पाटील उर्फ पांडू मास्तर ही या गावची ग्रेट व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभी राहतात.सावळाराम यांचे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग असणारे
 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गीत यावेळीही लोकांना आठवले. पण........ याचे, यावेळचे  कारण  होते कोरोणा.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही दोन्ही गावे हॉटस्पॉटच्या दिशेने आगेकुच करत होती.
येडेनिपाणीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात ८४ रुग्ण सापडले.तर लाडेगावमद्धे एप्रिल व मे २०२१ दरम्यान गावात तब्बल ७८ रुग्ण झाले.यामद्धे अनेकांनी आपले प्राण गमावले.
या गावानसमोर  मोठे संकट उभे राहिले ,अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. पण....
यावर गावकरऱ्यांनी एकसंघपणे  मात करण्याचे ठरवले.विविध क्षेत्रातील टीम एकत्र आली.
विविध आवाहने करण्यात आली आणि याला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला.
ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने या रुग्णांना मोफत औषधे पुरविली जाऊ लागली.
येडेनिपाणी गावाबाहेरील आश्रमशाळेत लोकांच्या लोकवर्गणीतून  कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले. आपत्ती निवारण समितीने यामध्ये पुढाकार घेतला. दहा ऑक्सिजन बेडच्या या सेंटरमुळे गावातील रुग्णांना येथे मोफत ऑक्सिजन सुविधा मिळते आहे.
सर्वसामान्य रूग्णांना हे सेंटर आधारवड ठरले.
अनेकजण घरीच औषधोपचार घेऊन कोरोनामुक्त झाले.
येडेनिपाणी येथे ग्रामपंचायत सदस्य मारूती कांबळे व इंद्रजित पाटील  रुग्णांची व्यवस्था पहात आहेत.
रुग्णांवर येडेनिपाणीचे सरपंच डॉ. सचिन पाटील  व वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ अंकोलकर यांच्या मार्गदर्शनाने औषधोपचार सुरू आहेत.
वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात ८४ रुग्ण सापडले. मात्र, केवळ चारच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. उर्वरित रुग्ण घरीच औषधोपचार घेऊन कोरोनामुक्त झाले. ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने या रुग्णांना मोफत औषधे पुरविली जात आहेत.
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर गावाबाहेरील आश्रमशाळेत लोकवर्गणीतून कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले. आपत्ती निवारण समितीने पुढाकार घेतला. दहा ऑक्सिजन बेडच्या या सेंटरमुळे गावातील रुग्णांना येथे मोफत ऑक्सिजन सुविधा मिळते आहे.लाडेगांवामद्धेही ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, सहकारी संस्था ,आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत सामूहिक प्रयत्नातून रुग्णसंख्या आटोक्यात आणली आहे.नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू ठेवली आहे. घरोघरी मास्क वाटण्यात आले. गावात जंतूनाशकांची फवारणी केली आहे.गावातील पाणी पुरवठा संस्थेकडून प्रत्येक कुटुंबाला घरोघरी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. एक लाख रुपयांची वर्गणी जमा झाली. गावातील प्राथमिक शाळेतच  १० बेडचे विलगीकरणचा कक्ष सुरू केला. या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांवर सरकारी आणि गावातील डॉक्टरांच्याकडून उपचार सुरु आहेत. रुग्णांना वर्तमानपत्रानपासून ,चहा, नाष्टा, अंडी, गरम पाणी, मनोरंजनासाठी रेडीओ अशा शक्य तेवढ्या सेवा- सुविधा दिल्या जात आहेत.
डॉक्टर जयकर कांबळे हे  घरी उपचार घेणाऱ्यांची विशेष काळजी घेत आहेत.या भीतीदायक वातावरणात रुग्णांच्या नातेवाईकांना ते धीर देत आहेत.
लाडेगांवचे सरपंच रणधीर पाटील, उपसरपंच अरविंद देसाई, कुरळपचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चौगुले ,ग्रामसेवक डी. पी. सिंग,तलाठी प्रियांका हिवरे, आरोग्य सेवक विश्वनाथ पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते या कामी आपला बहुमूल्य वेळ देत आहेत.
या सगळ्या राबणाऱ्या माणसांच्या  ,सेवा करणाऱ्या देवदुतांच्या मनामध्ये  एकच भाव आहे,
'गड्या आपला गाव कोरोणामुक्त राहिला पाहिजे.
आणि गाव - गाड्यातील आपल्या जीवाभावाच्या माणसांचा जीव वाचला पाहिजे. '
- धनाजी माने.....✍️

यासाठीच ही लढाई लढतो आहे.

◾ऊस तोढ कामगार आपल्या कुटुंबाला, जिवाभावाच्या लोकांना सोडून प्रचंड जोखमीचे,हलाखीचे- ऊसतोडीचे काम करतात. महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या कामगारांचे मागासपण आणि पर्यायाने या जिल्ह्याचे मागासपण अजूनपर्यंत कायम आहे. ऊसतोड कामगार हे पारंपारिक पद्धतीने टोळीमध्ये काम करतात 
ऊस तोड़णीशिवाय या कामगारांना कोणताच पर्याय नसतो .गेली कैक वर्ष झाले कामगार व त्यांची पुढची येणारी पिढी ही ऊसतोड कामगार म्हणूनच काम करत आहे .ऊसतोड कामगाराला गावाकडे काम नसते, अल्पशा जमिनीतून त्याला खाण्यापुरत पीक येत, तर कधी पीक येत नाही. काहींना कसण्यासाठी जमीनसुद्धा नसते,काहींचे कुटुंब मोठे असल्यामुळे मुलींच्या लग्नाची जबाबदारी येते,मग लग्नासाठी काढलेले सावकाराचे कर्ज, वयोवृद्ध लोकांचे आजारपण,मुलांचे शिक्षण, यासाठी 
ऊसतोड़ कामगार ऊचल घेतो. 
आणि उचल भागवण्यासाठी ऊसतोड कामगार त्याच्या पूर्ण कूटुंबाला घेऊन ६ महिन्यासाठी स्थलांतरीत होतो.प्रचंड थंडीत ऊसतोड़ कामगार कुटुंबाचा पसारा हा  ट्रक, टेंपो , ट्रॅक्टरा मध्ये भरतो, मुले-बाळे, गाई- गुरे घेतो आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर , बोचणाऱ्या थंडीत ,सतत चालणारा कोयता हातात घेऊन ,त्याची जगण्याची लढाई सुरु होते.......✍️




गुलाबी थंडीचा , हा झोंबतोय गारवा,
फुटून गेले अंग सारे,बोचतोय गारवा.
कधी मिळेल उबदार कपडा,
जाते मन माझे या स्वप्नांच्या गावा.  

झोंबणाऱ्या गारव्याची तमा न करता,
तळपतोय बांधाबांधावर ,माझा कोयता.
पोटाची खळगी भरण्यास,
हा संघर्ष माझा.

उगड्या - नागड्या लेकरांना माझ्या,
उब देण्यासाठी हा संघर्ष सारा.
वाट्याला येवू नये त्यांच्या, हा झोंबणारा गारवा,
त्याचसाठी हा सारा,प्रपंच माझा.

कोसोदूर येवून सारा,
हा गारवा मी सोसतो आहे.
उबदार घरटी,मिळावी लेकरांना,
यासाठीच ही लढाई लढतो आहे. 

कधी वाडेविक्रीची कमाई, 
कधी वाहतुकीची हमाली.
फाटलेल्या संसाराला ,असे ठिगळ लावतो आहे.
झोंबणारा गारवा हा, मनी माझ्या टोचतो आहे. 

होरपळणाऱ्या या प्रपंच्यात माझ्या,
मिळावा थोडातरी गारवा.
यासाठीच हा अखंड प्रपंच माझा !
अखंड प्रपंच माझा !! 

- धनाजी माने....✍️

dhanajimane123@gmail.com

Saturday, May 15, 2021

कोराणा लढा आणि तरुणांचे क्रांतीकारी पाऊल !




ॐ क्रांती  तरुण मंडळाच्या ,तरुणांनी एक क्रांतिकारी उपक्रम सुरु  करुण क्रांतीकारी पाऊल उचलले आहे

हा नवतरुणांचा उपक्रम कोरोणाच्या प्रवासात गांवागांवातील तरुण  मंडळांना मैलाचा दगड ठरणार आहे.
कोरोणाच्या महामारीत निर्माण झालेल्या आणिबाणीच्या परिस्थितीत या तरुणांनी गावातील ग्रामपंचायत ,कोरोणा कमेटीवर अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टाच्या मिळकतीमधून पैसा खर्च करुण हे तरुण आठवड्याला हैड्रोक्लोराईड जतूंनाशकांची फवारणी करत आहेत.आपल्यापरीने खारीचा वाटा उचलत आहेत.
या उपक्रमात रघुनाथ पाटील,अक्षय पाटील,दत्तात्रय पाटील ,सयाजी पाटील ,प्रशांत नरके,गजानन पाटील,सुशांत पाटील,जयदीप पाटील,विजय पाटील,सचिन पाटील,घनश्याम नरके,सागर पाटील, सुशांत पाटील,अभिजित पाटील,राहुल पाटील,दिगंबर पाटील,मनोज पाटील,रणजीत पाटील हे क्रांती ग्रुपचे लढवय्ये योद्धे हिरहिरीने या कामात आपला अमुल्य वेळ देत आहेत.
या त्यांच्या उपक्रमाच्या मागे एकच विधायक विचार आहे.
'गड्या आपला गाव कोरोणामुक्त राहिला पाहिजे.
आणि गाव - गाड्यातील आपल्या जीवाभावाच्या माणसांचा जीव वाचला पाहिजे. '
कारण याच क्रांती चौकात , गतवर्षी एकाला ,आणि यावर्षी दोघांना कोरोणामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
हा चौक सोडूनही गावातील अनेकजणांना कोरोणाची बाधा झाली आहे.तर काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज कोरोनामुळे लॉकडाऊनचे चक्र कधी सुरु तर कधी बंद यामुळे सर्वच क्षेत्रातील कामकाज अगदी ठप्प आहे. तरुणांच्या हाताला काम नाही . तर अनेकांचे असलेले कामही गेले आहे.अशा हताश परिस्थितीही हताश न होता  या तरुणांनी समाजाच्या हिताच्या दृष्टीने , गावाच्या संरक्षणाच्या दृष्टीने टाकलेले हे क्रांतीकारी पाऊल विधायकतेची मशाल पेटवेल.
व इटकरे गावातील व इतर मंडळे आणि महाराष्ट्रातील इतर मंडळही ही मशाल अशीच तेवत ठेवतील.या मशालींचा वणवा पेटेल आणि कोरोणाचा समुळ नायनाट होईल अशी आशा करुया !
गावगाड्यातील आपल्या जीवाभावाचा प्रत्येक माणूस सुरक्षित राहील याची काळजी घेऊया.
कारण आज अत्यावश्यक असे काहीच नाही .
जीव वाचणे एवढेच म्हत्वाचे आहे.
📌 कोरोणा वाढतोयं ! काळजी घेऊया !!
📌 नियम पाळुया ,सुरक्षित राहुया !!
📌 काळजी करु नका.आधार देत राहुया !!
📌हसत रहा ! होईल सर्व ठीक !
📌 खबरदारी हीच ,आपली जबाबदारी !
📌 भेटता येत नसले ,तरी आपल्या माणसांना
फोन करा ,बोला आधार द्या!
📌 त्याचीच आज नितांत गरज आहे.
📌 कोरोणाने बरेच काही शिकवले आहे.
प्रतिष्ठा,जात ,धर्म ,इगो, सारे गौण आहे.माणसाने- माणसाशी - माणसासम वागणेच सर्वश्रेष्ठ आहे.
📌 आपला दिवस आनंदात जावो !!!

- धनाजी   माने ....✍️


📧dhanajimane123@gmail.com

https://youtube.com/channel/UC7IKD6ZKYNfw2W7E19Dcn_w








Friday, May 14, 2021

शहीद जवान ! तुझे सलाम !!

 

भारतीय सैनिकाचा बराच मोठा काळ कठोर प्रशिक्षणात जातो. त्यानंतर खऱ्या सेवेला सुरुवात होते. कुटूंबातील सर्व सदस्यांचा बहुतांश काळ त्याग करावा लागतो. भारतातील प्रत्येक सैनिक आपल्या भारतमातेला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आणि प्राणापेक्षा प्रिय मानतो. तो जन्मभूमीला आपली आई मानतो. तिचा सन्मान आणि अभिमानाचे रक्षण करण्यासाठी तो आपला जीव धोक्यात घालत असतो. प्रत्येक भारतीय सैनिक प्रेमाने भरलेला आहे. ती शौर्याची खरी मूर्ती आहे. धैर्य आणि त्याग त्यांच्या रक्तात आहे. तो देशाची सेवा करण्यासाठी घर, नातेवाईकांपासून दूर निघून जातो. खरोखर, आपल्या सैनिकांमुळेच, शत्रू देशाकडे डोळा वर करूनही पाहू शकत नाही.
त्यांच्या शौर्यामुळेच आपण आपल्या कुटुंबात आनंदाने जगत असतो.
तो देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतो, अशाच शहीद सैनिकाने आपल्या , मातेला वीरमरणानंतर दिलेला आधार......😥


शहीद जवान! तुझे सलाम!!

वीरमाता तू सावर स्वतःला
मी गेलोय आता दुरच्या गावाला,
परत कधीच न येण्याचा प्रवासाला..........

लेकरांन समोर आता ,
आसवं ढाळू नको, 
खचून इतकी तू जावू नको.
सैनिकाची माय तू ,कुटूंबाचा आधार तू.
वीरमाता तू आता सावर  स्वतःला .

आता तुलाच खंबीर ,
व्हायला पाहिजे.
दु:ख ऊरात दाबून ,
धीराने तोंड द्यायला पाहिजे.
हे माते तुला सावरायला पाहिजे.

बापाविना पोरकी माझी लेकरं,
त्यांचा बाप आता ,तुलाच व्हायला पाहिजे.
तुझ्या सुनेलाही आधार, 
आता तुलाच द्यायला पाहिजे.
वीरमाता तू ,आता तुला सावरायला पाहिजे.

मुलं माझी ,पोरकी झाली  बापा विना .
बाप माझा ,पोरका झाला मुला विना .
वीरपत्नी विधवा झाली माझ्या विना.
या सर्वांना आता,तूच आधार द्यायला हवा.
वीरमाता तू,हा भार सारा तूलाच वहायला हवा......

तूला हे सांगताना ,ऊर माझा भरून येतोयं,
डोळ्यातून झरुन येतोयं,
तुमच्यापासून दूर जाताना,
जीव कासावीस होतोयं.

तरीही मला अभिमान वाटतोयं,
देशाची सेवा बजावतानाच , मी दूर चाललोयं
परत कधीच न येण्याच्या प्रवासाला...
-धनाजी माने...✍️

😥।।वरुणराजा ।।😥

 😭😭

पृथ्वीतलावर येणा-या अनेक पाहुण्यांपैकी पावसाळा हा सर्वाचा सगळ्यात आवडता ऋतू. परंतु, एखाद्या पाहुण्याने अनेक दिवस ठाण मांडल्यावर तो जसा नकोसा होतो, तसाच अती झालेला पाऊसही आता लोकांना नकोसा झाला आहे.

 ‘काही ठिकाणी ये रे ये रे पावसा’ म्हणण्याची तर ‘काही ठिकाणी  ‘जा रे जा रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कुठे महापूराचे  अस्मानी संकट,तर कुठे दुबार पेरणीचे संकट सार आभाळचं फाटलं ,तर ठिगळ लावायचे कोठे❓........✍️







😥।।वरुणराजा ।।😥

बस कर आत्ता पुरे झाले,
तुझे बरसने मला अजिर्ण झाले.
यायला सांगितले म्हणून,
असे यायचे का ?
होते - नव्हते तेवढे !
सोबत घेऊन जायचे का?

नव्हतास तेव्हा,
डोळे लावून बसलो.
काही दिवस समाधान देऊन गेलास,
आणि..... इतकं बरसलास ,
होत्याच नव्हत करून गेलास.

पंचगंगा , वारणा , कृष्णामाय
तुडुंब भरल्या....
तुझ्यामुळे त्या ,
सोबतं माझा संसार घेऊन गेल्या.
घरदार आणि माझी गुरढोरं...
साऱ्या आपल्या कवेत घेऊन गेल्या.

काही गरिबीचे ओझे घेऊन,
आयुष्यभर जगले.
तुझ्या अतिबरसण्याने,
मातीखालीच गढून गेले.
चार-दोन माणस, राहिली गावात.
काही मात्र कायमचेच निघून गेले.


सारेजण आता तुझ्या जाण्याच्या,
प्रतिक्षेत आहेत.
वरुणराजा आता तू जा,
विश्रांती घे ,विश्रांती घेऊन ये.
पण...असा येऊ नकोस,
सर्वांना धडकी अशी भरवू नकोस.

बस कर आत्ता पुरे झाले,
पुरे झाले.......
तुझे बरसने मला,
अजिर्ण झाले , अजिर्ण झाले .

- धनाजी माने....✍️


Thursday, May 13, 2021

मी जिल्हा परिषद शाळा बोलतेय !

मराठी मायबोली जिवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. तरच महाराष्ट्राची संस्कृती जिवंत राहून मराठीची अस्मिता जपली जाईल. जिल्ह्यातील आजही अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा आपला नावलौकिक कायम ठेवून आहेत.  इंग्रजीच्या झगमगाटामध्ये आपले अस्तित्व टिकवून आहेत.
इंग्रजी शाळेत पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढला आहे. इंग्रजी शाळेच्या आकर्षणाचा तोटा बालवयातील मुलांच्यावर होत असतो. त्यामुळे मुलांमधील आवडी निवडीला पालकांमुळे मूठमाती देण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे. पालकांच्या इच्छा मुलांवर लादल्याने मुले खरच असे शिक्षण समर्थपणे पेलू शकतील का याचा विचार ही होणे तितकेच गरजेचे आहे. तसे पाहिले तर इंग्रजी पेक्षा मराठी माध्यमातील विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न व दर्जेदार असतो हे अनेकवेळ सिद्ध झाले आहे......✍️



दि.२०/०१/२०२१

प्रासंगिक  .........✍️

मी कामेरीची जिल्हा परिषद 

शाळा  बोलतेय !

' शिक्षण हि माणसाची मूलभूत गरज आहे. माणसाकडे रंगरूप, सोन- नान,धन- संपत्ती, सर्व काही असेल आणि त्याच्याकडे शिक्षण नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. शाळा हा आपल्या शिक्षणाचा प्रमुख आणि अविभाज्य घटक आहे. एक लहान मूल शाळेत जाते पण शाळेतून बाहेर पडते ते एक सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक म्हणून. अनेक यशस्वी व्यक्तींनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या शाळेला आणि शिक्षकांना दिले. अनेकांनी शाळेचे तोंडभरून कौतुक केले.'

पण कधी आपण विचार केला आहे का ? कि हि आपल्या कामेरी गावची जिल्हा परिषद  शाळा, जिच्यामुळेच आज आपण घडलो, जिच्या आंगाखांद्यावर खेळून ,अक्षरांचा श्रीगणेशा गिरवूनच आज  या पदापर्यंत  पोहचलो.समाजात एवढा मानसन्मान मिळाला,मिळतोय तो , माझ्या या शाळेमुळे.

हो  ना रे ?

मला अभिमान आहे माझी लेकर समाजात नाव कमवत आहेत ,मोठ - मोठी पद पादाक्रांत करत  आहेत आणि केलीही आहेत.

पण ....मला वाईट एवढ्याच गोष्टीच वाटत की तुम्ही

माग फिरुन कधी पाहिलंच नाही. अरे जरा थोडीतर

कृतज्ञता बाळगा रे !

तुम्ही सारी लेकर म्हणत असाल की ही आम्हाला आरे - तुरे का करते ?

अरे बाबांनो माझा तेवढा अधिकारच आहे. माझ वय आता दिडशे वर्षापेक्षाही जास्त झालयं.अरे तुम्ही माझी जन्म तारीख विसरला असाल (आईची जन्म तारीख कशाला कोन ध्यानात ठेवील?)पण  तुमची आणि माझी जन्मतारीख  ...मी नाही विसरले.

तुमच्या सर्वांच्या जन्मतारखा माझ्याकडे आहेत.

पण  माझी  तुमच्याकडे आहे? मला महिती आहे उत्तर नाहीच येणार .

तर सांगते ऐका.... अरे सन- १८७० साली ,मार्च महिन्याच्या १ तारखेला माझा जन्म झालायं, तब्बल दीडशे वर्षाची मी.समजलं आता माझं वयं.

माझ्या आंगाखांद्यावर खेळलेली अनेक लेकर वार्धक्याने म्हातारी होऊन काळाच्या पडद्याआड गेली.

आणि आज कामेरी गावात हयात असणारी सर्वांत वयोवृद्ध माझी लेकरं माझ्या पेक्षा वयाने कितीतरी लहान आहेत, म्हणून मी तुम्हाला अधिकार वाणीने

आरे - तुरेच बोलवणार ,रागावणार ,तुम्हाला हक्काने दरडावणार समजलं.

म्हणूनच मी आज तुमच्याशी बोलतेयं रागाने आणि तेवढीच व्यथीत होऊन .

होय तुमचीच ,कामेरीची जिल्हा परिषदेची शाळा बोलतेय, हो-हो तुमचीच शाळा बोलतेय बाळांनो… अस अनोळखी होवून पाहू नका. खरच मी तुमची शाळा बोलतेय, 

ओळखल नाहीत का मला?  पण मी मात्र ओळखते तुम्हाला… आता बरेचसे चेहरे बदललेत….  ज्या बालवयात मी तुम्हाला पाहिलं होत…  ते चेहरे बदलले. 

तुम्ही मोठे झालात, आपापल्या संसारात रमलात. मी मात्र आहे  तिथेच आहे तशीच आहे.

राष्ट्रीय महामार्गाला लागून , गावाच्या पश्चिमेला वाहनांची घरघर ऐकत कुडते आहे,अगदी खिन्न मनाने.

आता थोडा बदल झालाय माझ्यात, तुमाच्यातल्याच काहींनी हात दिला मला मदतीचा. आणि मी पूर्वी पेक्षा  थोडी बदलले. आपलं संपुष्टात येणार अस्तित्व टिकवण्यासाठी.

वाटलं होत कि तुम्ही माझ्या अंगणात खेळलात, शिकलात, पडलात, रडलात आणि घडलात सुद्धा.  

तुम्ही माझ्या बाजूने जाताना कधी आपल्या मुलांना सांगत ही नाही की, बाळांनो ही माझी जिल्हा परिषदेची शाळा… मी याच शाळेत  शिकलो, इथेचं घडलो… चल तुला मी माझी शाळा दाखवतो…

अस बोलला असतात तरी माझ समाधान झाल असत. मी आनंदाने सद्गदित झाले असते.

जाऊदे....उगाचच मी हे तुमच्यासमोर उगाळत बसलेय.

पण ....एक सांगते अजूनही वेळ गेलेली नाही. आजही तुमच्या नात्या- गोत्यातील मुल माझ्या  अंगणात,छताखाली घडतायत…

 मोठी होतायत, खूप हुशारही आहेत हो ,ही लेकर. . त्यांना मी तुमचीच मुले… तुमचच रूप समजते.

तुम्ही आज आधुनिक होत गेलात. पण मी मात्र तशीच अभागी दोन पावले मागेच राहिले. माझ्याकडे या नव्या आणि आधुनिक जगात काही अपुर आहे .ते तुमच्या लेकरांना देण्यासाठी, तुमचे हात दातृत्वासाठी खुले करा.तेच जुने पुराने मोडके - तोडके साहित्य बदला, मी रस्त्याकडेलाच असल्याने आणि माझ्याकडे कोणाचे लक्ष नसल्याने गावातील तर बाहेरील लोक मला इजा करुन जातात,एवढ मोठ दोन एकराच अंगण असूनही उघड- बोडकंच, माझ्या  काही भिंतीही आता जुनाड आन ढिसाळ दिसू लागल्यात, ना सभागृह, ना ग्रंथालय, ना प्रयोगशाळा अशा अनेक माझ्या समस्या आहेत.या लेकरांच्या प्राथमिक गरजाच मी पूर्ण करू शकत नाही. तर आधुनिक पद्दतीच शिक्षण कस देवू शकेन?. हे पाहून माझी मलाचं खंत वाटतेयं.

माझ्या या अवस्थेला आज जबाबदार कोण? तुम्हीच सांगा मी कुणाकडे बोट दाखवू.  तुमच्यासाठी येथे राबतेय, तुम्हास घडवतेय, सावरतेय अस आपलं आई मुलाच नातं… मला आधार देण्यास तुम्ही का नाही पुढे येत? का नाही खुलवत  येथे नंदनवन…?

अरे तुम्ही सर्वांनी मनावर घेतलतं तर किती वेळ लागेल माझ रुप बदलाय ?

मला तुमच्या सगळ्या लेकरांचा अभिमान आहे, माझ्या च आंगा -खांद्यावर खेळलेली लेकरं , वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताय , कोणी देशाची सीमा लढवली, कोणी लढवत आहेत ते शुर सैनिक,स्वातंत्र्यसैनिक, अनेकांनी ज्ञानदान केले ,कोणी करत आहेत ते गुरुजन, कोण आधुनिक शेती करत हरित क्रांती घडवत आहेत ती माझी कष्टकरी लेकरं, कुणी हाँटेल व्यवसाय थाटलाय-वाढवलाय, तर कुणी सिनेसृष्टीत नाव कोरलयं, तर काहींनी लेखनीन लेखन करुन लेखक म्हणून नाव कमवलयं,तर अनेकजन विविध क्षेत्रात उच्च  पदावर कार्यरत आहेत.कोणी डॉक्टर  ,तर कोणी इंजिनिअर आहेत. तर अनेकांनी राजकीय क्षेत्रात वलय निर्माण केलयं, माझ्या अनेक लेकरांनी तर ट्रँक्टर, जेसीबी, पोकलँड सारखी अवजारे घेतली आहेत ,अनेक तरुण मंडळ आहेत, संस्था आहेत आणि त्या- त्या ठिकाणी सारे नाव कमवत आहेत.अशी सारी माझी लेकरं सगळीकडे काम करत आहेत , हे सार माझ वैभव पाहून माझा ऊर भरुन येतो.

पण..... तुम्ही माग वळून माझ्याकडे कधी पाहिलचं नाही याच मला खूप दु:ख होतयं.

तेव्हा लेकरांनो तुम्ही मनावर घेतल्यावर किती वेळ लागेल रं माझ रुप बदलायला.

म्हणून बाळांनो, मी आज तुम्हास मी साद घालतेय….

 अस काहीतरी करा कि तुमची मुलं माझ्या अंगाखांद्यावर बागडतील.माझ्या समोर ,माझ्या कुशीत. माझे बनून…

अरे.. ज्या काही वेदना होतात त्या माझ्या मलाच ठावूक.

तेव्हा माझ्या गुणी लेकरांनो ! मी बदलायला तयार आहे. पण माझ्यात तो बदल तुम्ही घडवायला हवा.

 माझं वैभव द्या नारे  पुन्हामिळवून

उठा! सारे एक व्हा!

आणि घडवा  पुन्हा ,तो इतिहास तुमच्या सेवेसाठी.मी खूप आशेने तुमच्याकडे पाहत आहे.

 मी दयेची याचना करतेय. घडवा पुन्हा आयुष्य तुमच्या पाल्यांच जे आज माझ्या अंगणात शिकतायत. मला पहायचय की माझा विद्यार्थी हा गाव सोडून शहरात नाही तर गावात राहून मोठा झालेला. शिकून मोठा अधिकारी झालेला, डॉक्टर, इंजिनिअर, कलेक्टर,आधुनिक शेतकरी, शिक्षक, शास्त्रज्ञ ,उत्कृष्ट खेळाडू झालेला.विविध क्षेत्रात नावारुपास आलेला पहायचयं मला.

पदर पसरते मी तुमच्यासमोर.माझी एवढी इच्छा पूर्ण करा.करशी ला नारे माझ्या लेकरांनो !

माझी शेवटची इच्छा पूर्ण ?

निघते ………

बघा थोडा विचार करा.तुमच्याने जमेल तेवढी,तुम्हाला शोभेल अशी ,

सढळ हाताने मदत करा.माझी तुम्ही थोडी तरी सेवा करा.

मातेच्या मोलाने , कारण आईने तुम्हाला जन्म दिलाय आणि 

मी तुम्हाला घडवलयं, तुमच्या पायावर उभं केलयं.शिकवून जगण्याचा आत्मविश्वास दिलायं.


▪️ शब्दांकन -धनाजी माने.....✍️

Ⓜ️9403963934

         





✌️इस्लापुरातील जोडी नंबर वन

 


👹 आज करोणाच्या महामारीत अनेकजण अनेक क्षेत्रांत जमेल तशी सर्व सामान्यांची आर्थिक लुट करताना दिसत आहेत.यात वैद्यकीय क्षेत्रातील काही लोक सुद्धा सामिल आहेत.

पण याला अपवादही अनेकजण आहेत त्यातीलच , ही डॉ.जोडी. आपली सेवा प्रामाणिकपणे देत आहेत.अनेकांचा आधार ठरले आहेत...........

प्रासंगिक............✍️


✌️इस्लापुरातील जोडी नंबर वन - डॉ. प्रवीण पोरवाल व डॉ.अतुल मोरे 

Salute या ' माणसातील ,देवमाणसांना ! '

आज कोरोनाचे वारे खूपच घोंगावू लागले आहे.

चालतीबोलती आपलीच माणसं आपल्यातून कायमची निघून चालली आहेत. गेली आहेत. हे गेले वर्षभर आपण अनुभवतो आहे. आणि आजही ते अनुभवत आहे.

या वाऱ्याचे वादळात रुपांतर कधी झाले समजलेच नाही. अनेकांच्या जीवनज्योती

या वादळात विझून गेल्या.

पण अशाही संकटात आधार देणारे पण भेटतात.....

या वादळात आपल्या परिने  डॉ.अतुल मोरे व डॉ. प्रवीण पोरवाल या विझणाऱ्या जीवनज्योती तेवत ठेवण्यासाठी गेले वर्षभर अविरत झटत आहेत.

हे देवदूत सामान्यांचे आधार झाले आहेत.

कोरोना झाला आहे हे ऐकताच अनेकजण गलितगात्र होतात.रोगापेक्षा या रोगावरील चाचण्या व उपचारावरील खर्च कसा पेलायचा यानेच हे बाधित रुग्ण व कुटुंबातील सदस्य ढासळून जातात पण......

या जोडीने इस्लामपूरात नंबर वन काम करुन गेल्या

वर्षभरात हजारो रुग्णांवर अत्यल्प खर्चात उपचार , योग्य मार्गदर्शन व मानसिक आधार देत कोरोना रुग्ण बरे केले आहेत.ते अनेक रुग्ण यांचे ऋण व्यक्त करत आहेत.

सध्या या क्षेत्रातील काही लोक ,उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लूट करत असताना.कशा- कशात पैसे खावे.समोरच्या व्यक्तीच्या दु:खाचा विचार न करता हा गोरख धंदा सर्वत्र सुरुच आहे.हे आपण उघड्या डोळ्यांनी माध्यमातून पाहतोच आहे.

पण.... या जोडीने या सर्वाला फाटा देत,

रुग्णांना योग्य वेळी आवश्यक असेल तिथेच चाचणीचा आधार घेत , रु.५०० ते १००० व

यातूनही बरे न झालेल्या रुग्णांवर अवघ्या ६ ते ७ हजार रुपयात योग्य ते उपचार दिले जातात.आणि वैशिष्ट्ये म्हणजे त्या रुग्णाला त्याच्याच परिवारात राहून योग्य खबरदारीच्या सूचना देऊन घरीच शेकडो रुग्ण बरे केले आहेत.

आणि आजही , ही सेवा ते अविरतपणे देत आहेत.

स्वाईन फ्लू असो अथवा करोना. संसर्गजन्य आजाराचे वारे घोंघावू लागले की सारेच धास्तावतात. स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी धडपडत असतात.

स्वाईन फ्लूचे वारे आता कमी झाले असले तरी जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने सर्वांपुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. याच पार्श्वभूमीवर अशा कोरोणाच्या परिस्थितीतही संसर्गबाधित व संसर्ग संशयित रुग्णांच्या सेवेत कसूर न करता, 'सेवा परमो धर्म:' या वृत्तीची जोपासना ही जोडी नंबर वन अहोरात्र करीत आहेत. Salute या माणसातील देवमाणसांना ,देवदुतांना !

हे कार्य आपल्या हातूनअसेच घडत राहो ! सामान्यांच्या कल्याणासाठी आपण शतायुषी व्हावे ही विधात्या चरणी प्रार्थना !

◾जाता- जाता  - -

👌जपा यांच्यासारखा ,मानव सेवेचा फंडा |

उपचाराच्या नावाखाली , जे घालतात रुग्णांना गंडा |

- धनाजी माने......✍️


===============================

📌 कोरोणा वाढतोयं ! काळजी घेऊया !!

📌 नियम पाळुया ,सुरक्षित राहुया !!

📌 काळजी करु नका.आधार देत राहुया !!

📌हसत रहा ! होईल सर्व ठीक !

📌 खबरदारी हीच ,आपली जबाबदारी !

📌 भेटता येत नसले ,तरी आपल्या माणसांना 

फोन करा ,बोला आधार द्या!

📌 त्याचीच आज नितांत गरज आहे.

📌 कोरोणाने बरेच काही शिकवले आहे.

 प्रतिष्ठा,जात ,धर्म ,इगो, सारे गौण आहे.माणसाने- माणसाशी - माणसासम वागणेच सर्वश्रेष्ठ आहे.

📌 आपला दिवस आनंदात जावो !!!

- धनाजी माने......✍️


==============================




गुरुजींनी शिकवायचं कधी ?

 ◾केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध अशैक्षणिक कामांची जबाबदारी शिक्षकांना देण्यात येते त्यामुळे शिक्षक शिकविण्यासाठी कमी आणि अशैक्षणिक कामे करण्यात जास्त व्यस्त असल्याचे चित्र राज्यभरात आहे.
आम्ही जहाजांच्या कप्तानाकडून गुणवत्तेची अपेक्षा करतो आणि त्यांना २५०अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवतो, हे योग्य नाही. यात केंद्र सरकारपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व कामांचा समावेश आहे. शिक्षण सोडून बाकी अनेक अशैक्षणिक कामे  प्राथमिक शिक्षकांना करावी लागतात.
याची सविस्तर यादी पाहिली तर हे लक्षात येईल. पण ......हे सर्व सोसत प्राथमिक शिक्षक आपले काम इमाने इतबारे  करतात....
..✍️





गुरुजींनी शिकवायचं कधी  ?

 
तुम्हीच सांगा गुरुजींनी शिकवायचं कधी ?
खरखुर काम गुरुजींच मुलांना शिकवण्याच!
त्यासाठी त्यांना वेळ मिळतो किती?
तुम्हीच सांगा गुरुजींनी शिकवायच कधी?


रोज नवा दिवस ,नवा फतवा घेऊन येतो.
Whatsapp वर तो तात्काळ समोर येतो.
शिकवायचे सोडून .........
त्याचाच  अभ्यास गुरुजींना करावा लागतो.
अध्यापन सोडून यातच सारा वेळ जातो.

शाळेतल्या गुरुजीवर सारा गाव कारभारी,
किती त्या कमिट्या आणि किती ते कारभारी.
प्रत्येकाच ऐकूण जेरीस आलाय गुरुजी.
शपथं सांगतो मेटाकुटीस आलाय गुरुजी.


रोज नवा आदेश ,आणि रोज नव पत्रक,
शिक्षण खात सोडून ,इतरांचाही धडाका सुरुच आहे.
उपक्रमाचे फोटो आणि फोटोupload करण्यात
वेळ वाया जातो आहे.नुसतीच ही प्रसिद्धी

 मुलांच्या पदरात काय पडत आहे?

निवडणुकीची काम तो इमानेइतबारे करतो,
राष्ट्रीय काम म्हणून ,तो त्याला सामोरे जातो.
मग..BLO च्या कामात तो वर्षभर गुंतून राहतो.
शिकवायचं सोडूनत्यातचं तो हरुन जातो.

Online कामाचा  ससेमिरा सुरुच आहे.
तात्काळ माहिती देण्याचा आदेश समोर आहे.
नाही तर ,कारवाईचा बडगा तयार आहे.
अध्ययन-अध्यापन सोडून हेच काम सुरु आहे.

आत्ता तुम्हीच सांगा !
गुरुजींनी शिकवायचं कधी ?
गुरुजींनी शिकवायचं कधी ?

- धनाजी  माने

बाप..... एक बाप माणूस !

बाप नावाचा बाप माणूस जेव्हा आयुष्यातून कायमचा निघून जातो.तेव्हाच त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते.भरलेल्या घरातही त्याच रितेपण जाणवत. आयुष्यातील प्रत्येक क्षण जबाबदारीची जाणीव करून देते.
स्वतःचा बाप कष्ट करून घरी दमुन येतो तेव्हा पोराला ते दिसत नाही. पण...
धोनी, सचिन किंवा एखादा क्रिकेटर मैदानात दमतो त्यावेळी ही पोरं स्टेटस ठेवतात. तो पैशासाठी खेळतो.आपला बाप परिवाराच पोट भरण्यासाठी दमतो हे पण लक्षात असुद्या !

अनेक  कुटुंबातील बापला आजार, अपघात,घातपात ,आत्महत्या अशा अनेक कारणांनी या जगाचा निरोप घ्यावा लागतो.   आणि त्या कुटूंबातील भाऊ ,बहिण ,आई या सर्वांची जबाबदारी कुटुंबातील मोठ्या मुलावर-मुलीवर येते. बाप नसलेल्या बहुतांश कुटूंबामद्धे जबाबदारी पेलणाऱ्या त्या घरातील कर्त्या मुलाची कमी-अधिक प्रमाणात हीच अवस्था असते , हे वास्तव या कवितेतून व्यक्त केले आहे......✍️😥


 






बाप.....  एक बाप माणूस !


एके दिवशी उपचारातच बाप निघून गेला.
त्याचा आधाराचा हाथ , निसटून गेला.
बापाच छत्र हरपल्याने,
तो  आता आत-बाहेर मोडून पडला.
बापा विना पोरकेपणात ,
अश्रू ढाळू लागला.


बापाच्या आठवणीत,
खिन्न मनाने,तो पुरा कोसळून गेला.
बाप , म्हणजे .......
घराच घरपण आणि आधारवड असतो.
बाप नसलेल्या घराच्या पोकळीत,
तो सारे समजून जातो.


मोडून पडलेला संसार बापाचा ,
हळूहळू तो आता सावरतो.
कुटूंबाला तो आता आधार देतो.
घरच्यांना आधार देत, भावनांना आवरतो.
वर्षा मागून वर्ष जाते, काळ हळुहळु सरत जातो.


फाटलेल्या संसाराला,
तो आता ठिगळ लावत बसतो.
भावंडांना सांभाळता - सांभाळता,
बाप नसलेल्या ,आपल्या बहिणींचे,
तोच आता कन्यादान करतो.


शाळा शिकता- शिकता ,
छोटी- मोठी काम करत ,
येणाऱ्या प्रत्येक संकटाला,
संघर्षातून सामोरा जातो.

बाप, नसलेल्या संसारात ,
आता त्याचाही संसार फुलतो.
पण..आनंदाच्या या क्षणात,
मिरवाय त्याचा बाप कुठे असतो?
दु:खाचा आवंढा गिळत,
बापाच्या फोटो समोर नतमस्तक होतो.

 बाप असताना, बापाचे मोठेपण समजलेच नाही.
याचा त्याला आता पश्चाताप होतो.
बाप म्हणजे , बाप माणूस असतो,
हे बाप झाल्यावरच , समजून जातो.

त्याच्याही संसाराच्या या वेलीवर ,
फुलांना आता बहर येतो.
दोन चिमुकल्यांच्या बरोबर,
आता तो ही त्यांचा बाप होतो.

खरचं , बाप हा बापच असतो,
हे तो समजून जातो.
बापा विना निर्वात पोकळीतही,
त्याला आता त्याचाच बाप दिसतो.

- धनाजी माने......✍️


Wednesday, May 12, 2021

विकी राठोडचा केक



विद्यार्थी शिक्षकाचे नाते खरचं....एक वेगळ नात असतं.हे नात जो तो आपापल्या परीने सांभाळत असतो

........... ✍️

◾#विकी  राठोड चा #केक !◾

    प्रिय ! विकी तू आनलेला वाढदिवसाचा #केक ! मला हिऱ्या मोत्यांच्या आणि #सोन्या-चांदीच्या तुलांनपेक्षाही #मौल्यवान वाटला !

 तुझ्या मनाचा मोठेपणा खूप #मोठा आहे !

खरचं ! वाढदिवस प्रत्येकाच्या जीवनात येतात, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने #साजरे केले जातात. कोणाचे वाढदिवस   हे त्या व्यक्तीच्या वजनाएवढे #सोने-चांदी ,पैसे - यांच्या तुला करून करतात .काही जणांच्या अशाचप्रकारे अनेक पद्धतीच्या तुला करतात ,आणि वाढदिवस साजरा करतात.

 त्या प्रत्येकाच्या पाठीमागे प्रेम असतं पण.... स्वार्थही असतो. पण आपण मुलांनी निष्पाप ,निरागस , निरपेक्ष भावनेने केलेला #वाढदिवस मला खूप मोठा वाटतो , त्यामागे तुमचा कोणताही #स्वार्थ नसतो. .असते ते फक्त  प्रेम ,माया,आपुलकी आणि जिव्हाळा.

विद्यार्थ्यांनी #निरपेक्ष  भावनेने व्यक्त केलेले #प्रेम हे खरोखरच शिक्षकांच्या जीवनात खूप #मौल्यवान असतं , त्याची बरोबरी जगातील कोणतीच मौल्यवान वस्तू  त्याच मोल करु शकत नाही. अस मला वाटतं. किमान आम्हा शिक्षकांना तरी हा विद्यार्थ्यांचा लळा खूप मोठा वाटतो.आणि याचे प्रत्यंतर प्रत्येक शिक्षक बंधु-भगिनींच्या #जीवनात कधीना कधी वाट्याला येते. माझ्या जीवनात नोकरीच्या निमित्ताने असे अनेकवेळा प्रसंग आले.चंदगड ,शिरोली, घुणकी या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रेम दिले.

तसाचं काहीसा पण वेगळा प्रसंग कामेरीतही घडला .....निमित्त माझ्या वाढदिवसाचे, काही दिवसापुर्वी मी माझ्या इ.५वी मधील आर्यन या विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा केला. 

असे  वाढदिवस केक न कापता विद्यार्थ्यांना  किमान फुल देऊन आम्ही परिपाठावेळी सर्वच शाळामधून शुभेच्छा देऊन असे विद्यार्थ्याचे वाढदिवस हा उपक्रम घेतोच.

 त्यावेळी शाळेतील  ५ वी ते ७ वी चे विद्यार्थी- विद्यार्थ्यींनी उपस्थित होते. त्यावेळी मुलांनी विचारले होते ,' सर !तुमचा वाढदिवस कधी आहे हो?'

त्यांना मी त्यावेळी सांगितले , माझा कागदोपत्री #नोंद केलेला ,आमच्या गुरूजींनी लावलेली जन्मतारीख १ जून आहे.पण माझा #जन्मदिवस  तो #२१ जुलै  त्यामुळे खरा #वाढदिवस २१ जुलै हाच आहे.

त्यांनी बरोबर हे लक्षात ठेवले होते. याचा अनुभव त्या दिवशी आला.

त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेचा #परिपाठ सुरु होता.

त्यादिवशी मात्र परिपाठाच्या वेळी  #टेबल आणि काही खुर्च्या  , बाहेर दिसत होत्या आम्ही शिक्षक आपसात चर्चा करत होतो हे टेबल ,खुर्च्या का? कोण येणार आहे का?.हे वेगळेपण आज होतं.दोन -तीन  विद्यार्थी शाळेच्या गेटजवळ घुटमळत होते.त्यांना माईकवरुन बोलवले तर ते शाळेच्या आत येत नव्हते. बाजुला जायचे आणि थांबायचे.

परिपाठ झाला आजचा परिपाठ मुलींनी उत्कृष्ट घेतला होता, पण लगेच माईकचा ताबा एका मुलाने घेतला.त्याने सर्वांना त्याच्या #मोडक्या - तोडक्या शब्दात सांगून टाकलं , " आज , आमच्या माने सरांचा वाढदिवस आहे.आम्ही तो साजरा करणार आहोत." हे जाहीर होताचं 

त्या टेबलावर एक केक एका विद्यार्थ्यांने आनून ठेवला , सोबत काही छोट्या- छोट्या #मोमबत्त्या आनल्या. विद्यार्थ्यांनी मला खुर्चीवर बसण्यास सांगितले. ज्यांनी #आयोजन केले होते ते विद्यार्थी वरती आले.विद्यार्थ्यांनी केक कापला ,मला भरवला,शुभेच्छा दिल्या आणि गेटसमोर  असणाऱ्या रस्त्यावरुन फटाक्यांचा #आवाज आला.काही वेळापुर्वी ते #विद्यार्थी का तिथे घुटमळत होते , त्याचा प्रत्यय सर्वांनाच आत्ता झाला.

काहींनी #छोट्या- छोट्या #भेटवस्तू दिल्या.काहींनी आपल्या मोडक्या- तोडक्या शब्दात लिहलेली ,पण प्रेमाने #ओतप्रोत भरलेली पत्र दिली.

यावेळी दोन्ही शाळेतील मुख्याध्यापिका आदरणीस सौ.सूरेखा पाटील मँडम , सौ.संजिवनी गर्जे मँडम दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका हजर होते.

मी या प्रसंगाने भारावून गेलो. तो कार्यक्रम सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी ,शिक्षक सहकारी यांच्या समोर पार पडला.

पण......

यापुढचा #वर्गात घडलेला प्रसंग खूपच वेगळा होता.

५ वी ते ७वी चे विद्यार्थी एका वर्गात एकत्र झाले होते. फळ्यावर आगोदरच त्यांनी लिहून ठेवलेले ,

 🎂 ' HAPPY BIRTHDAY MANE SIR ! '🎂

' Many many happy returns of the Day ! '

अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याप्रती असणाऱ्या त्यांच्या भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.

मी त्यांना सहज म्हटलं , कशाला तुम्ही दोन - दोन केक आनले रे !

तेव्हा त्यांनी  जे सांगितले तो प्रसंग ......खूपच भावनिक जिव्हाळा निर्माण करणारा होता.विद्यार्थी- शिक्षक नातं एका निस्वार्थी भावनेने किती आपुलकीने भरलेले असतं हे दाखवणारा होता.त्या प्रसंगात त्यांचा माझ्या प्रती असणारा जिव्हाळा ,निस्वार्थी प्रेम ,माया ,आपुलकी, आत्मीयता ,आदरभाव या सर्व माणुसकीच्या ओलाव्यांनी ओतप्रोत भरलेला, तो सुखद क्षण होता 

ती निष्पाप ,निरागस मूले आनंदाने आणि भावनिक होऊन ,उत्साहाने सांगत होती..... एक केक आम्ही प्रत्येकी १० रु. वर्गणी काढून आणला.शाळा सुटली की आम्ही एकत्र यायचो आणि वर्गणी गोळा करत होतो तूम्हाला काय कळू दिल  नव्हत.आर्यनच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही सांगितलेली तुमच्या वाढदिवसाची खरी तारीख २१ जुलै आम्ही लिहून ठेवली होती.

तर दुसरा केक विकी राठोड ने एकट्याने आणला आहे सर !.तो सुट्टी दिवशी कामाला गेला होता. आणि त्या पैशाचा केक त्याने आणला !

ते ऐकून मी गलबलून गेलो विकीला जवळ घेतला.त्याला घट्ट मिठी मारली ! त्याला कवटाळले.माझ्या अश्रूंना आपोआपच वाट मोकळी झाली , मला ते आवरताच आले नाहीत.काही मुलांच्याही डोळ्यातून पाणी आले.

त्या मिठीत तो मला खूप मोठा दिसला.त्याचे अंतरंग मला दिसले , जाणवले.जवळ काहीचं नसताना त्याने मला त्या केकच्या माध्यमातून सर्व काही दिले होते.

अपुऱ्या अभ्यासाच्या प्रसंगात मी त्याला अनेकवेळ  रागावलोही असेल तरीही ते मनात न ठेवता ,( अलिकडे अनेक मुले आणि पालकही असे शिक्षकांचे रागावने मनात धरतात त्याला शासनाच्या GR चा आधार घेतात.)

विकी मात्र या सर्वाहून वेगळ्याच आदर्श उंचीवर दिसला. हातावर पोटभरणाऱ्या कुटुंबात जन्मलेला विकी ,  त्यावेळी माझ्यासाठी, तो जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या 'बिलगेट्स , झुकेसबर्ग , अंबानी बंधूपेक्षाही मोठा श्रीमंत वाटला.माझा मलाचं हेवा वाटला.आणि त्याच्या या उंचीच्या समोर मी ही खूप खुजा वाटलो.

इतक्या गरिबीतही त्याचे हे मोठपण, मनाची श्रीमंती, माझ्याप्रती व्यक्त केलेले प्रेम, माया, आपुलकी, आणि केक आणन्यासाठी कामाला जावून केलेले त्याचे कष्ट ,मला त्या दिवशी तो प्रसंग जीवन जगण्याची कला शिकवून गेला. एक वेगळाच संस्काराचा परिपाठ शिकवून गेला.

पुढे काही दिवसांनी विकीच्याही वाढदिवसाला त्याला माझ्याकडून छानशी कपडे घेतली.त्याच्या त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. पण....विकीच्या त्या केक समोर सारचं शुन्य असल्याच जानवलं,एवढा मौल्यवान त्याचा तो केक मला आजही अमुल्य असल्याचे जाणवते आणि त्याच्या ऋणात असल्याचे जाणवते.

विकीला चार अक्षर भलेही कमी वाचता येत असली , तरी जीवनाच्या वाटचालीत संस्काराच्या आणि माणुसकीच्या धड्यामद्धे तो अनेक पावले पुढेच वाटला. ( आज सर्व क्षेत्रात याचीच कमतरता आहे.)

एकूणच, प्रिय विकी तू आनलेला वाढदिवसाचा केक ! मला हिऱ्या मोत्यांच्या आणि सोन्या-चांदीच्या तुलांनपेक्षाही मौल्यवान वाटला !

राष्ट्रपती पुरस्कारा पेक्षाही , तू आनलेला केक सर्वांत मोठा पुरस्कार देऊन गेला.

नम्रपुर्वक सँल्युट तुला विकी  ! तुझे ऋण मी व्यक्त करणार नाही ! तुझ्या ऋणातच मला राहूदे ! या तूझ्या ऋणातच मानवतेचा मान आणि सन्मान , ओतप्रोत भरला आहे रे विकी  !  

- धनाजी माने  ....✍️


 


बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...