Sunday, September 10, 2023

सार्वजनिक गणेशोत्सव

 

नवसाला पावणारा गणपती


।। सार्वजनिक गणेशोत्सव ।।

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना तत्कालीन परिस्थितीनुसार समाजाने एकसंघ व्हावे, संघटित होऊन लोकांमध्ये एकता बाणली जावी हे उद्दिष्ट ठेवले होते. पण त्याचाच आज विसर पडल्याचे दिसत आहे.सार्वजनिक मंडळांचे मंडप रस्तेच्या- रस्ते व्यापू लागताना दिसतात.


सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानमद्धे गणपती मूर्तींच्या उंचीची सगळीकडे चढाओढ सुरू असताना दिसते.डेकोरेशन, प्रकाशाचा झगमगाट यामध्ये विजेची कोट्यावधी युनिट विनाकारण बरबाद होताना या काळात दिसतात.

महाराष्ट्रातील तसेच भारतातील लाखो खेडी अजूनही अंधारात चाचपडत असताना विद्युत रोषणाईचे अतोनात स्तोम माजलेले दिसत असते. एका बाजूला ऊर्जेची बचत करण्याचे संदेश, तर दुसऱ्या बाजूला चाललेला हा विजेचा अपव्यय  हा विपर्यास सहज डोळ्यांनी दिसतो, समजतो पण......

माणसाच्या मनात श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी या निमित्ताने घडू नयेत , पण त्याही आज घडताना दिसत आहेत.

श्रद्धाळू भक्तांना भूलवित नवसाला पावणाऱ्या गणपतींचे गल्लोगल्ली, नाक्यानाक्यावर पेव फुटलेले या गणेशोत्सव काळामध्ये दिसते.

अनेक सामाजिक उपक्रम राबविणारी मंडळं झगमगाट, देखावे, रोषणाई, ढोलताशे यावर अमाप पैसा उधळताना दिसतात. हे विचार गणेश भक्तांना कडवट वाटत असतील , मनात चिडही निर्माण करतील पण हे सारे वास्तव आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय , अनुभवतो आहे. कडवा तो है , लेकिन सच भी है.....


या साऱ्या घडामोडीमद्धे , काही मंडळे पैशाचा अपव्यय टाळून सामाजिक बांधिलकीचे भान आणि जाण ठेवून ,उल्लेखनीय असे उपक्रम आपल्या मंडळांच्या मार्फत राबवत असतात.काही मंडळे या उत्सव काळामध्ये आपल्या मंडळाच्या श्रीमंतीचे प्रदर्शन न मांडता अनावश्यक, अवास्तव खर्चांना कात्री लावतात. वाचवलेला पैसा समाजाच्या गरजा लक्षात घेऊन यावर खर्च करताना दिसतात , हा आदर्श गल्लोगल्ली स्थापन झालेल्या गणेश मंडळापासून राज्यभर पसरलेल्या मोठमोठ्या गणपती मंडळांनी घ्यायला हवा. जेणेकरून समाजात एक चांगला संदेश जाऊन समाजामध्ये विघातक न घडता विधायक गोष्टी घडत राहतील .

समाजामध्ये असे अनेक गोरगरीब, दीनदलित गरजू उपेक्षित घटक आहेत जे मूलभूत गरजांपासून वंचित आहेत.


देणगी मधून जमा होणारा लाखो कोट्यावधी रुपयाचा निधी अशा उपेक्षित आणि वंचित घटकांच्या अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य, शिक्षण याकडे वळता केला तर देणगीदारांनी खुल्या मनाने दिलदारपणे दिलेली देणगी सत्कारणी लागेल आणि समाजातील एक -एक विघ्न दूर होऊन ' गणपती बाप्पाला ' आणि ' समाजालाही आनंद होईल !देणगीदारांची मंडळाला झालेली मदत सत्कारणी लागल्याचं समाधान लाभेल.


आज पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत , अशा वेळी मंडळाचे कार्यकर्ते , गणेश भक्त एकत्र जमत असतात अशा वेळी पर्यावरणाबाबत जाणीव जागृती करता येईल.आज झाडे लावणे ,जगवणे हे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी काळाची गरज आहे , यासाठी काय - काय करता येईल? यावरती चर्चा होऊन योग्य त्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत !


 आणि या आदर्शवत उपक्रमामुळे देणगीदार न मागताच पुढील वर्षी मोठ्या मनाने आणखी देणगीत भर देऊन मंडळांना मदत करतील.

या उत्सवाच्या निमित्ताने मंडळांच्याकडे जमा होणाऱ्या लाखो रुपयांतून आपणाला काय करता येईल व काय टाळता येईल याचे प्रत्येकाने भान ठेवले तर खरोखरच समाजामध्ये चांगल्या घटना या उत्सवाच्या निमित्ताने घडत राहतील.


💥 काय टाळता येईल आणि काय करता येईल......✍️

▪️पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या गोष्टींचा वापर देखाव्यांत टाळता येईल.

▪️बाप्पाची मुर्तीची उंची मर्यादित ठेवता येईल , जेणेकरून यातून निर्माण होणाऱ्या  विसर्जनाच्या वेळच्या पुढील अनेक समस्या टाळल्या जातील.

▪️अवाढव्य मूर्तीची विसर्जनानंतर जी विटंबना होते ती टाळता येईल.

▪️रस्त्यांची आधीच अवस्था बिकट असताना, मंडपासाठी खणलेले खड्डे भर घालणार नाहीत किंवा यानिमित्ताने पर्यायी व्यवस्था यावर संशोधन आणि उपयोजन करता येईल.

▪️वर्गणी गोळा करताना दमदाटीपेक्षा ,ऐच्छिकतेवर भर देता येईल.

▪️मंडळांच्या दरवर्षीच्या हिशोबांत पारदर्शकता आणता येईल.

▪️अवैध वीज जोडणी टाळून , सुरक्षित आणि नियमाने वीज जोडणी करता येईल. 

▪️दर्शनाला येणाऱ्या भक्तांना कार्यकर्त्याकडून धक्काबुकी होऊ नये! यासाठी उत्सव काळामध्ये कार्यकर्त्यांना ठराविक दिवशी ड्युटी देऊन रांगेचे नियोजन करता येईल.

▪️ खेडेगावातील अनेक शाळा अनेक सुविधांपासून वंचित आहेत अशा शाळांना मंडळाकडे जमा होणाऱ्या लाखो रुपयांच्या निधीतून सुविधा पुरवता येतील.

▪️ समाजामध्ये असणाऱ्या अनेक दिव्यांग घटकांना विविध साधनांसाठी मंडळांच्याकडून निधी देता येईल.

▪️ परिस्थितीमुळे शिकू न शकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मंडळांच्या मार्फत दत्तक घेता येईल.

▪️ अनेक गोरगरीब गरजू घटकांच्या शस्त्रक्रिया असतात या शस्त्रक्रियांसाठी मदत देता येईल.

▪️ अनेकांच्या घरातील कर्ते पुरुष निघून गेलेले असल्याने निराधार झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत करून आधार देता येईल.

▪️ पोलिसांच्याकडून व शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करता येईल.

▪️ गणरायाच्या समोर भक्तिमय वातावरणातील गीते मोटिवेशन स्पीच , पोवाडे असे, ऐकणाऱ्या भक्तांच्या कानाला सुमधुर वाटेल असे संगीत असावे धाबडधिंगा टाळता येईल.

▪️ डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज टाळून ध्वनी प्रदूषण यावर आळा घालता येईल.

▪️ गणेश विसर्जनाच्या वेळीही भक्तीमय वातावरण कसे राहील याचे भान ठेवता येईल. गुलाल ,फक्की व इतर रंगीबेरंगी शरीरास घातक रसायनांचा वापर कमी करता येईल.टाळता येईल।


एकूणच या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजासाठी अनेक चांगल्या गोष्टी करता येतील.व अनेक चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी टाळता येतील फक्त  प्रत्येकाने आपली मानसिकता बदलायला हवी, विधायक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांचे आदर्श घ्यायला हवेत व तसे आदर्श अमलात आणायला हवेत तरच हे शक्य आहे. 

गणरायासमोर नतमस्तक होऊन विनम्रतेने अशी मानसिकता प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तयार केली तर अशक्यही काहीच नाही. 


आणि यातूनच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असा गणेश उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता येईल.महाराष्ट्रातील गाव खेड्यांपासून मोठ्या शहरापर्यंत पसरलेल्या सर्व मंडळांच्या समोर निर्भेळ, निकोप आणि श्रद्धेने पावन झालेले वातावरण प्रत्येक मंडळांतून अनुभवास येवो !हीच गणराया चरणी विनम्र प्रार्थना !

एकूणच जे वाटल , ते व्यक्त केलं.पटल तर बघा , नाहीतर सोडून द्या !

- धनाजी माने......✍️




No comments:

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...