Monday, April 21, 2025

वेदांत वाईंगडेने तुंगच्या मातीच्या कुशीतून, देशसेवेसाठी घेतलेली उत्तूंग भरारी



तुंगच्या मातीच्या कुशीतून, देशसेवेसाठी घेतलेली उत्तूंग भरारी : वेदांत वाईंगडे याची असामान्य वाटचाल -

शेतात काम करणाऱ्या हातांमध्ये जर देशसेवेची स्वप्नं असतील, तर ती साकार होऊ शकतात, हे उदाहरण म्हणजे  तुंगचा -वेदांत वाईंगडे.
ग्रामीण भागात वाढून, कठीण परिस्थितीवर मात करत, लाखो स्पर्धकांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या या युवकाची गोष्ट ही केवळ प्रेरणादायी नाही, तर लाखो ग्रामीण भागातील तरुणांना दिशा देणारी आहे.
📌 बालपण
वेदांत यांचा जन्म एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. आई  योगीता ,प्रगतशील शेतकरी -आजोबा शामराव वाईंगडे व वडील प्रविण वाईंगडे यांनी वेदांतला शिक्षणासाठी नेहमीच प्रेरणा दिली.वेदांतचे आई- वडील, पालक, आपल्या वेदांतने शिकून मोठं व्हावं, हीच त्यांची इतर पालकाप्रमाणे धडपड आणि स्वप्न होती. आजोबा,आई-वडील यांनी मेहनत करून अनेक आव्हानात्मक परिस्थितीतीशी तोंड देत त्याला इथपर्यंत पोहचवण्यासाठी पालक म्हणून खडतर प्रयत्न केले.आणि वेदांतनेही याला आपल्या या उत्तूंग यशातून न्याय दिला.स्वप्न साकाराला योग्य अशी यशस्वीतेची दिशा दिली.
📌 शिक्षणातील प्रामाणिकपणा आणि चिकाटी  -
वेदांत लहानपणापासून अभ्यासात हुशार होता, पण हुशारीपेक्षा त्याची मेहनत जास्त मोठी होती. दहावीमध्ये त्याने ९८ टक्के गुण मिळवले. गावात आणि शाळेत त्याच्या नावाची चर्चा झाली. पण त्याचं यश इथेच थांबलं नाही.
दहावीनंतर औरंगाबाद येथील SPI ( महाराष्ट्र शासनाच्या सैनिकी सेवा प्रशिक्षण केंद्रामध्ये)  निवड होण्यासाठी विशेष निवड परिक्षेमद्धे  हजारो विद्यार्थ्यांमधून फक्त ६० विद्यार्थ्यांची निवड झाली. या निवडीतही वेदांतने स्वतःचे वरचे स्थान पटकावले. ही निवड  केवळ अभ्यासाची नव्हे, तर मानसिक आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी होती.या कसोटीला तो उतरला.दोन वर्षाच्या या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली. एक-एक अवघड पायरी तो सर करत  होता. प्रत्येक टप्प्यावर तो यशस्वी होत प्रवास करत होता.
📌 NDA – देशसेवेचं स्वप्न
वेदांतने त्याचं खरं स्वप्न ठरवलं होतं – भारतीय लष्करात अधिकारी होणं. देशासाठी काहीतरी करून दाखवायचं होतं. त्यासाठी त्याने NDA (National Defence Academy) परीक्षेची तयारी सुरू केली.केंद्रीय लोकसेवा आयोग  ( UPSC  ) मार्फत घेतली जाणारी NDA परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. यामध्ये वेदांतने देशात १६० वा क्रमांक मिळवला – हे कोणत्याही ग्रामीण युवकासाठी स्वप्नवत यश आहे.
📌 SSB आणि मेडिकल - अंतिम कसोटी
UPSC -NDA लेखी परीक्षा पास झाल्यावर येते ती , खरी परीक्षा – SSB (Services Selection Board). या पाच दिवसांच्या मुलाखतीमध्ये फक्त बौद्धिक नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमतांची चाचणी घेतली जाते. वेदांतने या कठीण प्रक्रियेत देशभरातून ७ वा क्रमांक मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
त्यानंतर आलेल्या मेडिकल टेस्टमध्येही १००% फिटनेस दाखवत त्याने पूर्णता साधली.
📌 एका शेतकऱ्याचा मुलगा – देशाच्या नौदलात अधिकारी होणार
वेदांत वाईंगडे यांची ही वाटचाल ही एका सामान्य ग्रामीण मुलाची असामान्य गाथा आहे. त्याने केवळ स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या गावासाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी ही घवघवीत कामगिरी केली आहे. शाळेत दप्तर घेऊन जाणारा आणि सुट्टीत शेतात आजोबा,वडिलांना मदत करणारा हा मुलगा, आज देशाच्या संरक्षण सेवेत अधिकारी होण्यासाठी  , त्याचे पुणे (खडकवासला ) येथील प्रशिक्षण त्याला खुणावत आहे.प्रशिणासाठी तो सज्ज झालाय. हे सारे यश पाहून डोळे अभिमानाने पाणावतात.

📌 तरुणांसाठी प्रेरणा
आजच्या घडीला अनेक तरुण मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. पण वेदांत वाईंगडे यांच्यासारख्या युवकाने सिद्ध केलं की जर मनात ठाम निर्धार असेल, तर कोणतीही अडचण आड येऊ शकत नाही. त्याने वेळेचा सदुपयोग केला, मार्गदर्शन घेतलं, आणि सातत्याने मेहनत घेतली.
"वेदांत वाईंगडे हे नाव आता केवळ एका विद्यार्थ्याचं नाही, तर प्रेरणेचं प्रतीक बनलं आहे. त्याने दाखवलेला मार्ग हा प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्याला हे दाखवतो  की ...
" स्वप्न मोठं असावं, आणि प्रयत्न अखंड."
आज वेदांत वाईंगडे केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण समाजाचा अभिमान आहे. त्याचं यश हे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे – की स्वप्न कोणतीही सीमा पाहत नाहीत आणि यशासाठी गरज असते ती फक्त जिद्दीची!

-धनाजी माने.....✍️
====================

 

Saturday, September 28, 2024

शिक्षकांचा आक्रोश मोर्चा.....










 महाराष्ट्रातील शिक्षकांची व्यथा.....✍️

राज्यभर शिक्षक हे शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आक्रोश का करत आहेत ? रस्त्यावर का येत आहेत ?

एक अनाहूत पत्र……✍️
🙏 आदरणीय साहेब !
प्रत्येकजण येतो आणि शिक्षकालाच शहाणपण शिकवतो.त्याने कसे वागावे याचे डोस पाजतो.शिक्षकांच्या समोर उभी राहयची लायकीही नसते, अक्कल नसते असेही येऊन शिक्षकांना डोस पाजतात.शिक्षक मात्र निमुटपणे सहन करतात.कारण ते मुलांना संस्काराचे धडे देतात, समोरच्याच्या पातळी इतके विचार खाली येऊ इच्छित नसतात.आणि याचाच अनेकजण फायदा घेताना दिसतात. पात्रता नसणारेही गुरुजणांना शहाणपणाचे डोस पाजत राहतात.अशांनी थोडे आत्मभान ठेऊन आत्मपरीक्षण केले तर ते स्वतःच काय पात्रतेचे आहेत हे समजते तेवढे भान आणि संस्कार मात्र त्या व्यक्तीकडे हवेत !पात्रता असणाऱ्यांनी शिक्षकांना जरुर मार्गदर्शन करावे , त्याला शिक्षकांचीही ना नसते , कारण शिक्षकही ज्ञानपिपासू असतातच.त्यालाही गरज असते मार्गदर्शनाची आणि मार्गदर्शकाची.आज शिक्षक पदवीधर ,पदव्युत्तर M.A,M.Com, M.Sc,M.Phil,P.hd असे उच्चविद्याविभूषित आहेत.तंत्रज्ञानाचा वापर करुण मुलांना आधुनिक शिक्षणाची संधी देणारे , दोन ,तीन तपांची सेवा बजावत ज्ञानदान करणारे तज्ज्ञ शिक्षक आज कार्यरत आहेत. अनेक अशैक्षणिक कामांची आव्हाने स्वीकारत ,सहन करत तो पुढे चालतोच आहे. म्हणून ,एवढीतरी  गुणवत्ता आज टिकून आहे , काही ठिकाणी याला असतीलही अपवाद , पण तिथलीही प्राप्त परिस्थिती काय आहे ? याचा लेखा-जोखा तपासून तिथल्या शिक्षकाचे मुल्यमापन व्हायला हवे.आणि सारेच कसे एका मापाने मोजून चालेल ?समाजात प्रत्येक क्षेत्रात अपवाद हे असतातच ,म्हणून का त्या क्षेत्रातील सारेच तसे नसतात हो !
आज अनेक ठिकाणी दोन- तीन वर्ग व शाळेची कागदोपत्री इतर काम सांभाळून शिक्षक काम करत आहेत.( द्विशिक्षकी शाळेत तर आज अनेक ठिकाणी आज एकाच शिक्षकावर काम सुरु  आहे) तिथली गुणवत्ता कशी मागणार ? तुम्हीच सांगा ? आणि सगळेच तुमच्या सोईनुसार कसे तोलता हो ? जरा समोरचा शिक्षकही माणूस आहे.त्यालाही कुटुंब आहे,त्यालाही मन आहे.तो काय ब्रम्हदेवाचा अवतार नाही.समोरचाही कोणत्या अवस्थेततून जात आहे ,तेही पहा ना?
शिक्षकांची नसणारी पण, त्याच्यावर लादली जाणारी अनेक कामे  तो निमुटपणे करत आला.करतो आहे. (ही यादी खूप मोठी आहे, ती सर्व  काम फिल्ड वर येऊन करुन पाहिल्याशिवाय कळणार नाहीत. लांबून ढपल्या मारण आणि माप~ काढण , इतक सोप ते नक्कीच नाही बर !)
प्रत्येकजण येतो आणि शिक्षकांच्या पगारावर बोलतो. मोठ-मोठे पगाराचे आकडे सांगतो.अहो पण साधा आडाणी माणूस सांगू शकतो की......एका गावात इतर खात्यातील कर्मचारी संख्या आणि शिक्षक संख्या यांची खूप मोठी तफावत असते.१० ते १५ हजार लोकवस्तीच्या गावात तलाठी,ग्रामविकाअधिकारी यांची संख्या प्रत्येक गावासाठी  फक्त एक आणि एकच असते .शिक्षकांची संख्या अशा गावात ,मुलांच्या पटाप्रमाणे ७० ते ८० असते मग तुम्हीच सांगा ही तफावत एवढी मोठी असेल तर शिक्षणांवरील खर्चाचा आकडा मोठा दिसणारच ना?शेतकरी सुद्धा सांगू शकेल हे गणित एका माणसाच्या आणि ८० लोकांच्या पगारात फरक असणारच .शिक्षकाबाबत नेहमीच अर्धसत्य सांगून त्याच्या बदनामीचा अगदी रचनात्मक खेळ सुरु आहे.काहीजण तर हवे तसे शिक्षणाच ,शिक्षकाच आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करत आहेत.अहो शिक्षक म्हणजे काय जादूगार आहे का? शिक्षण ही प्रक्रिया फक्त शिक्षकावर अवलंबून आहे का?यातील सगळे गुण दोष तपासायला नकोत का ?
एखाद्या फाईलवर सही केली, झाले पूर्ण काम इतक हे सोप्प काम आहे का ,तुम्हीच सांगा.(आणि आम्हाला कुठे अधिकार राहायला आहे ,व्यक्त व्हायचा आणि सत्य सांगायचा?)
अहो शिष्यवृत्तीमद्धे मुले पास होण्यासाठी गुणवत्ता यादीत आणण्यासाठी पाच-पाच वर्षे काम पूर्ण क्षमतेने करावे लागते , तेव्हा त्या शिक्षकाचे काम दिसते.एका रात्रीत इमारत उभी करण्याएवढे हे काम सोप्पे नाही हे सर्वमान्य असूनही , काही जण लगेच जादूच घडेल अशी गुणवत्ता मागत आहेत.खरचं हे सद्सदविवेकी बुद्धीला पटत का हो?
शिक्षकांच्यावर नको ते आरोप करून  त्यांची बदनामी सुरुच आहे.शिक्षक मात्र सत्तेपुढे शहाणपण नको म्हणून निमूटपणे सहन करतायत.दुर्लक्ष करतात याचा अर्थ शिक्षक दोषास पात्र आहेत असा होत नाही.यावर चिंतन आणि मंथन व्हायला हव.
विद्यार्थ्यांना हा पाढा म्हण तो पाढा म्हण ,हे कोण....ते कोण.....यांचे नाव काय.....त्यांचे नाव काय ?या प्रश्नांची उत्तर विचारली जातात.काही मुले उत्तर देतात काही देत नाहीत.यात शिक्षकांचा दोष काय ? सारखीच बुद्धी असते का सर्वांची.दहावी ,बारावी ,MPSC .......अशा सगळ्याच परीक्षेत कुठे १००℅ सारी पास होतात? रात्र-दिवस अभ्यास करुन तिथेही नापास होतातच की हो ! मग....गुरुजींना आणि खेळकर वयातील साऱ्याच मुलांना १००℅ चा रिझल्ट कसा मागता येईल.....तुम्हीच सांगा ना हो !
मुलांना तिसरी-चौथी -पाचवी मद्धे गुरुजींनी पाढे शिकवले. काहींना आले, काहींनी पाठ केले , यात काही विसरले .त्यात सर्वांचीच बुद्धिमत्ता एकसारखी असते का हो ? 
मानसशास्त्र काय सांगते - काही मुले अलौकिक बुद्धीची , काही कुशाग्र बुद्धीची,काही बुद्धिमान, काही मतिमंद,तर काही गतीमंद असतात. ग्रहण शक्ती स्मरणशक्ती ही व्यक्तीपरत्वे भिन्न असते. ज्यांनी उत्तरे दिली त्यांनाही त्याच शिक्षकांनी शिकवलेलं, आणि ज्यांनी उत्तर दिली नाहीत, त्यांनाही त्याच शिक्षकांनी शिकवलेल असतं , मग तुम्हीच सांगा .यात  दोष कोणाचा ? मग...तुम्हीच सांगा... कुणीतरी का- गुरुजींच्या नावाने खडे फोडावे❓आणि विचारणाराचे तरी आता पाठ आहेत का ? मग हा प्रश्न विचारणाऱ्या कुणाला तरी अधिकार  पोहचतो का हो ?
( इथे प्रामाणिकपणे उत्तराची अपेक्षा आहे. No Politics please. ...टाळी  एका हाताने वाजत नसते हो ! )
म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे लायकी नसणाऱ्या कुणीही सोम्या -गोम्याने आपण धुतल्या तांदळागत स्वच्छ असल्यागत आणि ज्या-ज्या ठिकाणी आपण काम करतो ,अशा ठिकाणी अगदी प्रमाणिकपणे काम करतो .या अविर्भावात शिक्षकांच्यावर  उगीच शिंतोडे उडवू नयेत.ज्यांना अंतर्मन प्रामाणिकपणाचा कौल देते ,त्याने जरुर हे सारे शिक्षकांना  विचारावे .स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी उगीच रोज उठ-सुठ शिक्षकांच्या घरावर दगड मारत बसू नये.शहाणपणाचे डोस देत बसू नये.विद्यार्थ्यांनप्रती आज शिक्षक प्रामाणिकपणे राहतो आहे आणि राहायला हवे याचे भान तो आजही विसरलेला नाही.आणि हो ...विस्मरण हे असतेच ना? आज अनेक मुलांचे पालक - डॉक्टर ,इंजिनिअर ,वकील ,प्राध्यापक, पोलीस अधिकारी ,विविध पदावर उच्चपदस्थ आहेत.त्यांचेही पाढे त्यावेळी  तोंडपाठ असतीलच की? ,आज किती जणांना तोंडपाठ आठवतात ? ( हे ही  पालक अगदी प्रामाणिकपणे  खुल्या मनाने सांगतील ,आम्ही आता विसरलो हो Sorry ) म्हणून त्यांचेही शिक्षक अप्रामाणिकच का हो ❓ सांगा तुम्हीच ! मग सांगा ते पाढे  त्यांना त्यावेळी तोंडपाठ होते आता त्यांना ते आठवत नाहीत. तर मग त्यांचे शिक्षक दोषी होते का?खरच हे न्यायप्रिय वाटते का हो ?असे अनेक प्रश्न घेऊन शिक्षकांना बदणाम केले जात आहे.
साहेब ! ही चर्चा खूप मोठी होऊ शकते , त्यावर भाष्य करण्यापेक्षा , चर्चेत शक्ती खर्च करण्यापेक्षा ,नेमका या क्षेत्रातील रोग कोणता आहे हे  चांगल्या तज्ज्ञाकडून शोधयला हवे.समिती पुन्हा एकवेळ गठित करायला हवी.त्यामद्धे राज्यात तळागाळात काम करणारे शिक्षक हवेत.संघटना प्रतिनिधी हवेत .नेमक रोगाचे निदान झाल्याखेरीज रोज उठून प्रत्येकाने डॉक्टर नसताना ,डॉक्टर असलेच्या अविर्भावात गुरुजींना डोस पाजत फिरु नये ही माफक अपेक्षा सर्वच शिक्षकांची आहे। जिथ रोग आहे, तो कसा नष्ट होईल ते सर्वजण मिळून पाहूया ! हे अगदी लेकरांना स्मरुन प्रत्येक प्रामाणिक शिक्षकांना वाटते.
यासाठी तुम्ही जरुर कठोर पावल उचला ,स्वागत आहे.कारण यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे.या प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम न करणाऱ्यांना गुणवत्ता न देणाऱ्यांना जरुर कायमचा घरचा रस्ता दाखवा ,एखादाच अपवाद वगळता या मतावर तमाम सारे शिक्षक अगदी ठाम राहतील.
पण...... हे कधी ? हे - ही आपल्या यंत्रणेण ऐकूण घ्यायला हव ना? मत मांडायला ,व्यक्त व्हायला स्वातंत्र्य द्यायला हवे.बर बोलण्यापेक्षा ,खर-खर बोला आपण सारे मिळून ही यंत्रणा दोषविरहीत करुया.गोरगरीब लेकरांच जीवन फुलवूया हा आत्मविश्वास खालून -वरपर्यंत राबणाऱ्या साऱ्या यंत्रणेन शिक्षकांना द्यायला हवा.यासाठी या क्षेत्रात काही बदल लवकरात - लवकर घडायला हवेत-
◆यासाठी शिक्षकांची हजारो रिक्त पदे भरणे क्रमप्राप्त आहे.
◆ शिक्षकांचा नेमका job चार्ट हवा.
◆त्याला नेमूण दिलेल कामच द्यायला हवे.
◆तो कामाच्या ठिकाणी राहत नाही अशी टीका करण्या आगोदर , जसे प्रा.आरोग्य केंद्राशेजारी निवासी यंत्रणा असते तशी शिक्षकांनसाठीही निर्माण करुन द्यायला हवी.आणि त्यानंतरही शिक्षक कामाच्या ठिकाणी नाही राहिले तर कठोर कारवाई केली जावी.फक्त अर्धसत्य सांगून अवघ्या शिक्षक वर्गाला बदनाम करणे कितपत योग्य आहे ?तुम्हीच सांगा
◆त्याला फक्त आणि फक्त शिकवण्याचे काम द्यायला हवे.
◆इतर विभागातील कोणतेही काम त्याच्यावर लादू नये.(इतर विभागाचे लोक ,शिक्षकाचे काम कितीजण येऊन करतात हो ? हे पहिल बंद होऊन शिक्षक - मुलांनसमोर ठेवयला हवा.)
◆वार्षिक नियोजन ,घटक नियोजनात दिलेल्या आणि वर्षातील कामाच्या दिवसाइतक्या तासिका तो पूर्ण वेळ , विद्यार्थ्यांच्या समोर राहील हे पहायला हवे.यासाठी इतर विभागांना सक्त आदेश काढून , " शिक्षकांनवर इतर विभागाने आदेश लादू नयेत , लादले तर , असे आदेश देणाऱ्यांच्यावर कारवाईचा अंकूश राहयला हवा ! " यावर का कुणी बोलत नाही?
◆समाजातूनही उठाव व्हायला हवा ,सत्य समोर यायला हवे…
पालकांनी यंत्रणेला खडसावून सांगायल हवे - ‘आमच्या लेकरांच्या समोरुन शिक्षकांना इतर यंत्रणेन हालवल तर , आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होते आणि अस आम्ही करु देणार नाही. आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही .त्याना फक्त आणि फक्त शिकवण्याचे काम द्या! अशी भूमिका पालकांचीही हवी.यासाठी का कोणी आवाज उठवत नाही ? उलट समाजातील सर्वांनी यावर आवाज उठवायला हवा, जाब विचारला हवा.पण अस होताना दिसतच नाही. 
'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' अशीच अवस्था !
◆त्याचबरोबर शिक्षण विभागामार्फतही मागवली जाणारी आकडेवरी , online माहिती ,Online link भरणे याच्यासाठी ,शा.पो.आहाराची किंवा इतर वेळोवेळी मागवली जाणारी माहिती देण्यासाठी , वेगळी यंत्रणा उभी करायला हवी.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना शैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई केली आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान २०० दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान २२० दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे. असे असूनही शिक्षकांना अशी अशैक्षणिक कामे दिली जातात. 
शिक्षकांच्या अध्यापनावर या गोष्टी बाधा आणतात हे सर्वमान्य असताना ते दोष दूर न करता शिक्षकांना का दुषने दिली जातात?
◆ काही महिला शिक्षकांचे पती  इतर खात्यात सेवेत आहेत,तर काहींच्या पत्नी इतर खात्यात सेवेत आहेत.तर काही पती-पत्नी वेगवेगळ्या गावात १० किलोमीटर पासून १०० किलोमीटर इतक्या अंतरावर कार्यरत आहेत.तर दोघापैकी नेमक कुणी मुख्यालयी राहावे ? अशांना कोणता शासन निर्णय लागू करणार ? यावर पर्याय सांगावा.
👁️ मुद्दा Vip 👁️
 आपल्या सरकारी शाळा मुख्यत्वे ग्रामीण भागात आहेत, दुर्गम भागात आहेत.काही अपवाद वगळता त्या चौथीपर्यंत आहेत.अशा ठिकाणी राहणाऱ्या शिक्षकांची मुले ५वी पासून कुठे शाळेला घालायची? अशा वेळी त्या शिक्षकांच्या मुलांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था गावात नसेल तर त्याने काय करावे ?( पर्याय सांगावा , नुसते दोष देणे टीका करणे सोपे असते.सकारात्मक विचार हवेत.टीका करणे कुणालाही येते हो !)
◆ या क्षेत्रातील अशा अनेक समस्या आहेत ही यादी खूप मोठी आहे,  जे प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारालाच समजते.नुसत्या लांबून गोळ्या मारुन चालत नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.या क्षेत्रातील समस्या तशाच लोंबकळत न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊन त्या दूर करायला हव्यात.फक्त शिक्षकाला दुषने देण्यात काय अर्थ आहे ? मुळात तो दोषी नसताना त्याला समाजासमोर दोषी ठरवल जात आहे.काही लोक चुकतही असतील म्हणून का साऱ्यांना त्याच तराजूंनी तोलायचे का ?
आहो एवढ्या साऱ्या पसाऱ्यात कुठेतरी चूक होणारच ना ?
स्वार्थी राजकारणी असतात तसे अवघे आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतानाच की.काही लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या आरोपाखाली  तुरुंगात सजा भोगत आहेत, म्हणून का सगळेच लोकप्रतिनिधी तसे नसतात.म्हणून समाज साऱ्याच लोकप्रतिनिधींना आरोपी समजत नाही. तद्वतच ,
खूप मोठ्या पांढऱ्या पडद्यावर ,एखाद्या काळ्या ठिपक्याचा डाग असणारच की , म्हणून सारच लक्ष त्या काळ्या ठिपक्यांवर केंद्रीत न करता , जरा शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाच्या ,तो ठिपका तेवढा  सोडून अख्ख्या पांढऱ्या पडद्यावरही लक्ष द्या ना !
जरा उघडा डोळे पहा नीट , किरकोळ चुकानपेक्षा , त्यांचे चांगले कामही पहा जरा.दिसूदे तुमच्या डोळ्यांना.
चोर सोडून सन्याशाला फाशी ,आणि साप ,म्हणून भुई धोपटण्यासारखे फक्त शिक्षकांना नका दुषने देऊ...........
◆ मुख्यालयी राहतो असे खोटे , दाखले दिले जातात हा शिक्षकांच्यावरील आरोप...हा शिक्षकांचा दोष नाही. ते करण्यास वरील 👆(👁️ मुद्दा Vip 👁️) या मुद्द्यामुळे अडचणी आहेत , याला आपली सिस्टीम चुकीची आहे वाटते.यासाठी वरील या मुद्द्यावर खोलवर विचार करुन ,शासन निर्णय करा ना की.....( कर्मचाऱ्यांच्या वरीलप्रमाणे असणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन - कर्मचाऱ्यांनी सोईच्या ठिकाणी राहिले तरी चालेल ,पण नेमून दिलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असून. त्याने त्याचे नेमूण दिलेले काम पूर्ण क्षमतेने करणेचे आहे. असा स्पष्ट निर्णय काढा ना एकदाच.
कशाला कुठला कर्मचारी असे दाखले लिहून देईल ? तुम्हीच सांगा
◆फक्त भौतिक सुविधा देऊन,चकाचक इमारती करुन किंवा आधुनिकता आनून गुणवत्ता नाही सुधारणार , त्यासाठी "शिक्षक-विद्यार्थी दिलेल्या वेळेत समोरा-समोर अध्ययन-अध्यापनाच्या प्रक्रियेत सक्रिय राहायला हवेत.आणि हेच नेमक घडत नाही.रोग रेड्याला आणि दंड पखाल्याला अशीच काही अवस्था झाल्याचे शिक्षकांच्याबाबत घडते आहे.
का .....हे सारेजाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे ?
आहो स्पर्धा जरुर लावा आमच्यात आणि इतरांच्यात आमचा तमाम प्राथमिक शिक्षक कुठेही कमी पडणार नाही.
आहो आमच्यासमोर असणारी गोरगरिबांची ,दीन-दलित पिचलेल्या समाजातील मुले असतात.आमच्या अनेक शिक्षिका .त्या लेकरांची माय बनतात. त्यांच्या सुखदुःखात समरस होतात. फक्त अध्यापनच करीत नाहीत तर
त्या विद्यार्थ्यांचे हवे- नको ते पाहतात.  शिक्षणाचे महत्त्व माहिती नसणारे बहुतांश पालक असतात.अनेक गोष्टींची त्यांना वानवा असते.अशा संघर्षमय स्थितीत तो काम करत हा सर्व बाजूंनी खिळखिळा झालेला गाडा ओढतोच आहे.
याच्या सर्व उलट खाजगी शाळेतील विद्यार्थी-पालक यांची अवस्था असते.(हा खूप मोठा विषय आहे.तो मर्यादित शब्दात नाही मांडता येणार)
आज आमचे शिक्षक किती समस्यांना तोंड देत , काम करत आहेत यासाठी एखादी कमेटी नेमा ,त्यावर समाज मंथन होऊदे आणि यानंतर खरे दोष कुठे आहेत ते पहा.
त्यावेळी शिक्षकांना दोष देणाऱ्यांनाच ,पश्चाताप होईल.
" अरेरे ! खरचं आपण आजपर्यंत ' चोर सोडून सन्याशाला फाशी ' या न्यायाने वागलो. खरे दोष वेगळेच आहेत पण आपण शिक्षकांच्या नावाने खडे फोडत बसलो , त्यांना दुषने देत बसलो. त्यांना बदनाम केले. यासाठी मात्र तेवढे निरागस ,पारदर्शी मोठ मन हवं."
 अशा अनेक समस्या आहेत की , ज्याचा अशा एका लेखात परामर्श घेता येणार नाही.
सर्व पातळीवर हे क्षेत्र सर्व समस्यामुक्त  झाल्यानंतरच ......
◆ शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना  काम करण्याची संधी द्यावी, समोर असणाऱ्या विद्यार्थ्याची वर्षाच्या सुरवातीला त्याचे मुल्यमापन करून मुले शिक्षकांच्या ताब्यात द्यावीत. व वर्षाच्या शेवटी मुल्यमापन करावे.
अपेक्षित बदल घडले तरच शिक्षकांना पगार वाढ द्यावी अन्यथा देऊ नये.( या पर्यायाला कोणताही शिक्षक बांधव विरोध करणार नाही. कारण शिक्षकांना माहिती आहे वरील सर्व समस्या ,दूर झाल्यास , गुणवत्ता देणे त्याला काहीच अवघड नाही.)
◆ ज्यावेळी शिक्षकांच्या हातात नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण वेळ खडू , मुलांनसमोर शिक्षक आणि शिक्षकासमोर मुले राहतील याचे काटेकोर पालन होईल. तसेच 
 " आमच्या मुलांच्यावर शिक्षकांना अध्यापनाचे पूर्णवेळ समाधानाने काम करु द्या ! , शाळेच्या वेळेत त्यांना ,आमच्या मुलांच्या अध्यापनाव्यतिरीक्त कोणतेही काम देऊ नका,त्यांची कारकुनी बंद करा,अध्यापनाशिवाय शिक्षकांना इतर काम दिल्यास पालक आंदोलने करतील.SMC तसे ठराव करतील, त्यावेळी शैक्षणिक गुणवत्तेची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की." हा विश्वास तमाम शिक्षकांना आणि जाणकार पालकांनाही आहे.आणि तो सोन्याचा दिन लवकर येवो , ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
कारण वाडीवस्तीवरील ,दिन - दलित, गोरगरीब घरची लेकर या साऱ्या प्रक्रियेत भरडली तर जात नाहीत ना ? ही अनाहूत भिती प्रत्येक शिक्षकाच्या  मनाला सारखी बेचैन करते !
 तेव्हा बघा साहेब ! हातजोडून विनंती आहे शिक्षकांबाबत - अर्धसत्य सांगून , त्याला बदणाम करुन  समाजातच वाईट संदेश पसरवण्यापेक्षा ,पसरण्यापेक्षा नेमके निदान लाऊन रोग दूर करुयात.
जर असच खरे वास्तव न पाहता शिक्षकांना दुषने देत राहिललात तर ,जीव ओतून काम करणारे शिक्षक नाऊमेद होतील.त्यांचे खच्चीकरण होईल आणि याचे आत्ता नाही.... तर भविष्यात दूरगामी परिणाम दिसतील ,त्यावेळी वेळ टळून गेलेली असेल, आणि अशा वेळी काळ कुणालाच माफ करणार नाही.  तेव्हा मिळून सारेच - यंत्रणा,समाज ,पालक ,शिक्षक ,विद्यार्थी पारदर्शी राहूयात! , गोरगरीब लेकरांचे आयुष्य उज्ज्वलतेकडे सारे मिळून नेऊयात !
शिक्षक दिनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिक्षकांचा गौरव केला जातो. शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी, शिक्षकांचा गौरव करणारी भाषणे होतात. सत्कार समारंभ होतात. काहींना पुरस्कार दिले गेले. किती हा शिक्षकांचा मान सन्मान ! आणि दुसऱ्या दिवशी? शिक्षकांच्या वाट्याला काय, तर अवहेलना दुजाभाव, अपमान! मग हा दांभिकपणा कशाला हवा? समाज इतका असंवेदनशील कसा असू शकतो? माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. गुरूशिवाय विद्या नाही अन् गुरूशिवाय जीवनाला अर्थही नाही! एका बाजूला गुरूंची थोरवी सांगणाऱ्या या समाजात गुरुपदाची इतकी अवहेलना कधीच झाली नसेल इतकी अवहेलना, गुरूंना वर्गावरून शाळेबाहेर काढून इतर अशैक्षणिक कामाला जपून केली जावी हे असंवेदनशीलतेचे गाठलेले टोकच म्हणावे लागेल.
मंगेश पाडगावकर हे एका कवितेत म्हणतात-
" पायात काटे रुतून बसतात , हे अगदी खर असतं.आणि ,फुल फुलून येतात हे काय खर नसतं? फुलासारखं फुलायचं की, काट्यासारख सलायचं ,तुम्हीच ठरवा !
तेव्हा सारे सकारात्मक राहूया ! आणि हे शिक्षणाचे शिवधनुष्य सारेचजण पेलूया एवढेच...... 
- धनाजी माने .....✍️ 



Saturday, August 10, 2024

वास्तव......




 

वास्तव....

वर्षे ७५ होऊन गेली ,
#स्वातंत्र्य मिळून देशाला
समस्या अजूनही त्याच आहेत,
सर्वांच्याच वाट्याला.


रस्त्यावरून जाताना ,
#खड्डे अजूनही तसेच आहेत .
#पैसे मात्र रस्त्यांवरती ,
भरमसाठ #खर्च झाले आहेत.


तरुणांचे लोंढेच्या -लोंढे ,
शिकून बाहेर पडत आहेत .
नोकऱ्यांचे प्रश्न मात्र ,
आवासून उभे आहेत.


बळीराजाने केले कितीही #कष्ट ,
तो ,आहे  तिथेच आहे .
शेतीमालाच्या योग्य भावासाठी ,
#लढा त्याचा  सुरुच आहे.


#पाऊस बरसतो , #पूर येतो ,
पाण्याचा प्रश्न निर्माण होतो ,
#पूरग्रस्तांच्या समस्यांचा #पाढा ,
आहे तसाच सुरु आहे.


नोकरीमद्धेही #घोटाळे,सुरुच आहेत.
चुकीचे दाखले जोडून ,
खरे -खुरे #लाभार्थी ,
बाजूला फेकले जात आहेत.


नोकरीवरती #पोट ज्याचे ,
तोही अजून लढतोच आहे.
#जुन्या - पेन्शनसाठी ,
त्याचाही #आक्रोश सुरु आहे.


राजकारणात राजकारण्यांची ,
स्पर्धा मोठी सुरु आहे .
विकासावरती बोलण्यापेक्षा ,
टिका -टिप्पणीच सुरु आहे.


समस्यांचे गुंते ... वाढत चाललेत,
चार दिवस सुखाचे ,
नशीबी आपल्या यावेत ,
याच  प्रतिक्षेत सारे आहेत.

- धनाजी माने...✍️


Sunday, February 25, 2024

पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला ' - वर्ष ३५ वे

 




'पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला ' - वर्ष ३५ वे


धनाजी माने दि.२६  - मार्च महिना आला की या परिसरातील लोकांना आठवण होते ती येडेनिपाणीच्या ' पद्मविभूषण वसंत व्याख्यानमालेची '...

मार्च महिन्याच्या सुरुवातीला येडेनिपाणी (ता.वाळवा) या पी.सावळाराम यांच्या नगरीत  आसमंतात एक सुखद गारवा भरून राहिलेला असतो. अशा या उल्हासित वातावरणात येडेनिपाणी येथील संस्कार मंदिराजवळील बाजारपेठेचे मैदान दि.१ मार्च ते ५ मार्च, सायंकाळी ७ ते रात्री ९ श्रोत्यांच्या उपस्थितीने फुलून गेलेले असते. पाच दिवस श्रवणभक्तीची आस असलेले या परिसरातील श्रोते ज्ञानरसांच्या तुषारात अक्षरशः न्हाऊन निघतात. 

येडेनिपाणी येथील जय किसान तरुण मंडळाची ‘पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला’ म्हणजे गेली ३५ वर्ष अविरतपणे चाललेला एक ज्ञानयज्ञ.जवळ जवळ तीसऱ्या तपाच्या अंतिम टप्प्यात असणारी ही व्याख्यानमाला १ मार्च पासून सुरु होते आहे.

 या ज्ञानयज्ञातून या गावातील ,परिसरातील अनेक पिढ्या वैचारिकदृष्ट्या समृद्ध झाल्या. अक्षय विचारांचे समृद्ध धन मुक्तपणे या व्यासपीठाद्वारे समाजात संक्रमित झाले. विविध विषयातील अभ्यासकांनी श्रोत्यांचं अवघं विचारविश्व ढवळून काढलं. श्रवणभक्तीतील तल्लीनता काय असते याची प्रचिती या व्याख्यानमालेस उपस्थित राहिल्यावरच अनुभवायला मिळते. महाराष्ट्रातील नामांकित वक्त्यांनी आपल्या ज्ञानाचे भांडार येथे रिते केले. व्याख्यानमालेने आपल्या या दीर्घ प्रवासात श्रोत्यांना अक्षरशः घडवले आहे. आजच्या बदलत्या अभिरूचीच्या जगात विचारांचा हा जागर अखंडपणे सुरु ठेवणं हे देखील एक आव्हान आहे. आणि हे शक्य झालं आहे ते मंडळाच्या निस्पृह कार्यकर्त्यांमुळे.

जय किसान मंडळाचे संस्थापक माननीय आनंदराव पाटील (काका)अध्यक्ष प्रा.डॉ. दीपक स्वामी, संयोजक शंकर पाटील ,सचिव कालिदास पाटील ,सहसंयोजक प्रा.स्वप्निल पाटील यांच्याबरोबरच या व्याख्यानमालेसाठी बाळकृष्ण पाटील, सचिन शेवाळे, शिवानंद माळी, कविता पाटील, जयश्री पाटील ,हिंदुराव रसाळ ,शरद घाडगे, मयूर थोरात, अरुण पाटील, विद्याराणी शेवाळे ,विजय पाटील, नंदकुमार बनसोडे ,जयसिंग पाटील ,कुंडलिक कोळी, अर्जुन थोरात, धोंडीराम पाटील ,दिनकर पाटील, सतीश पाटील ,शंकर गोपाळ पाटील, सतीश कांबळे, प्रा.संजय थोरात हे सर्वजण निस्पृह भावनेने हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू राहावा या प्रामाणिक भावनेने यासाठी झटत असतात.

संस्थापक आनंदराव पाटील ( काका) व प्रा.डॉ. दीपक स्वामी यांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. या  वटवृक्षाला असाच बहर येत राहो याच साऱ्या शुभेच्छा !

♨️ ३५ व्या व्याख्यानमालेचे उद्घाटन -

१ मार्च रोजी जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख (भाऊ) यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील-साखराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

♨️ २०२४-या वर्षीचे व्याख्यानमालेतील वक्ते आणि विषय ⤵️

,🎤 १ मार्च -इतिहास संशोधक प्रा. अरुण घोडके इस्लामपूर यांचे 'असे होते शिवशंभू संभाजीराजे' 

 🎤 २ मार्च- 'संस्कार : काळाची गरज' या विषयावर प्रा. डॉ. शोभा लोहार (सातारा) 

 🎤 ३ मार्च-  'घराचे घरपण... गावाचं गावपण टिकवूया' या विषयावर ज्येष्ठ पत्रकार दत्ता थोरे ( सोलापूर)

🎤  ४ मार्च - 'कविता नात्या-गोत्याच्या' अरुण पवार (परळी वैजनाथ) 

🎤 दि. ५ मार्च - 'लोकशाहीच्या प्रवासाची दिशा व सद्य:स्थिती' या विषयावर विधी तज्ज्ञ व संविधान विश्लेषक असीम सरोदे (पुणे) यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सांगता होणार आहे.

वेळ - दररोज सायंकाळी -७ वा.

💢  ठिकाण - संस्कार मंदिरा जवळील मैदान , येडेनिपाणी


- धनाजी माने....✍️



 

आगळा वेगळा लग्नसोहळा....

 


शिवविवाह सोहळा ...मोरे -कारंडे कुटूंबियांचा.....

छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्या जयघोषात रविवारी एक विवाह सोहळा पार पडला

 ' शिवविवाह सोहळा 'जो मी आयुष्यात या भागातील हा लग्नसोहळा पहिल्यांदाच अनुभवला आणि उपस्थित असणाऱ्या या परिसरातील लोकांनाही हा असा विवाह सोहळा पाहिल्यांदाच  पाहण्याचा दुर्मिळ योग आला असावा.

आपण आजपर्यंत जे अनेक विवाह सोहळे पाहिले ते विविध कर्मकांडामद्धे अडकलेले विवाह सोहळे पाहिले.

 यामध्ये  अंगावर हळद लावणे / ओतणे , अक्षताच्या नावाखाली वधू- वरांवरती अक्षता टाकणे भटजीला  तांदूळ मारणे . विषारी फोमचे स्प्रे मारणे .पारंपरिक मंगलाष्टका म्हणने ,होम हवन ,सप्तपदी अशा वातावरणात पार पडणारे विवाह आजपर्यंतआपण पाहिले,आणि पाहत आलो आहोत.

पण या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन , एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणारा ,चांगल्या संस्काराचे समाजात रोपन करणारा एक आगळावेगळा ' शिवविवाह सोहळा ' याची देही याची डोळा मी या परिसरात आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला.

पुणे-बेंगलोर हायवे जवळील इंदिरा पॅलेस या ठिकाणी  त्याचे साक्षीदार होता आले. 

खऱ्या अर्थाने दोन कुटुंबांना एकत्र आणणारा आनंद सोहळा असे त्या विवाहाचे स्वरूप होते. त्यामध्ये पारंपरिक काव्याक्षता नव्हत्या की वधु-वरावरती अक्षता टाकने नव्हते.पारंपरिक मंगलाष्टका म्हणने नव्हते. तर...

शिवविवाह पद्धतीच्या रचलेल्या आणि विवाहाचा त्यातील बंधनांचा अर्थ सांगणाऱ्या काव्याक्षता होत्या. 

व्यासपीठावरुन आपण ज्यांचा इतिहास सांगतो , वैचारिक वारसा सांगतो त्या  जिजाऊमाता ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. 

निमित्त होत शिवश्री इंजिनिअर  विक्रांत व शिवमती इंजिनिअर सोनल यांच्या विवाह सोहळ्याचे.

हा विवाह सोहळा होता ,या परिसरातील अभियंते महेश मोरे यांच्या मुलाचा तर उद्योजक जयंत मोरे यांच्या पुतण्याचा हा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील कोपार्डे येथील कारंडे कुटुंबातील वधु सोनल यांच्याशी पार पडला.

आदरणीय स्व.संपतराव मोरे व आदरणीय माई या प्राथमिक शिक्षक दांपत्यांच्या पोटी ... वर पिता महेश मोरे यांचा जन्म, त्यांच्या संस्काराची शिदोरी ते आजपर्यंत जपत आले आणि त्या संस्कारांच्या जडणघडणीतून घडलेल्या संस्काराचे संस्कारक्षम फलित म्हणजे हा विवाह सोहळा होता असेच म्हणावे लागेल !

या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होताना एक वेगळाच आनंद देणारा अनुभव येत होता. क्षणाक्षणाला घडणाऱ्या विवाह सोहळ्यातील प्रसंगाने, उपस्थितांच्या मनावर विधायक संस्कारांची पेरणी होत होती.

 तुतारीच्या रोमांचकारी वाद्यांच्या गजरात राजमाता जिजाऊ आणि छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नव वधूवरांनी हार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांच्या नवाचा  जयघोष झाला ! .....चैतन्याचा, आनंदाला भरते आनणारा  सोहळा या पहिल्याच प्रसंगाने सुरु झाला.

' जिजाऊ माऊली घे...  ही तुला वंदना....जय जय जिजाऊ ......च्या स्वरात जिजाऊ वंदना पार पडली.

इतिहासातील या महान व्यंक्तिच्या मानवंदनेनंतर....

ज्यांनी या वधू-वरांना इथपर्यंत पोहचवण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले ,संस्कारीत केले त्या कुटुंबातील व्यक्तीचा सन्मान केला गेला.

प्रथम मान मुलीकडच्या नातेवाईकांना देण्यात आला.मुलीचे आजी -आजोबा, आई -वडिल चुलते - चुलती ,भाऊ, बहिण दाजी यानंतर

मुलाचे आजी -आजोबा, आई -वडिल, चुलते - चुलती भाऊ, बहिण दाजी या सर्वांची ओळख उपस्थित हजारो समुदायाला करुन दिली.पुष्प गुच्छ देऊन नातेवाईक यांचा सत्कार करण्यात आला.

वधू- वर सोनल - विक्रांत यांनी वृक्षाला, तुळशी मातेला पाणी घातले , ज्या निसर्गाने आपले पालन पोषण केले त्याचे जणू ऋणच या प्रसंगातून व्यक्त केले.

यानंतर .....।

वधू -वर यांनी एकदुसऱ्याला हार घालत ते विवाहबंधनात बंधित झाले.तसे तुतारींचा आवाज आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.....

वधू- वरांनी उपस्थितांच्या साक्षीने एक दुसऱ्याचा स्वइच्छेने स्वीकार केल्याची व आयुष्याच्या एखाद्या वळणावर मतभेद झाले तर ते समंजसपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करु व यातूनही नाहीच मिटले मतभेद तर परस्परांशी कसलीही बाधा येणार नाही याची काळजी घेत बाजूला होऊ अशी सर्वांच्या साक्षीने जाहीर शपथ घेतली.... वराने - वधूला मंगळसूत्र घातले.....

आणि शिवसप्तकाला सुरुवात झाली.....

' वंदा...जिजाऊ ,शहाजी या महान व्यक्तींची जरित्रे जपा ....शिवमंगल सत्यध्यान .....(टाळ्या)

या सप्तकाच्या माध्यमातून

सासू -सासरे ,काका ,ननंद ,भावजय ही नाती जपण्याचा...सामाजिकभान ,कर्तव्य करताना चुकू नये.विद्या घेताना विज्ञान व खेळ हेही जपा.व्यसनाधीन होऊ नका.शिवाजींचा आदर्श जपून कर्तृत्व करा....दोघांची हृदये प्रसन्न ठेवा....असे संदेश दिले.

झाले शिवमंगलम्  या वाक्याने शिवसप्तक संपले .......टाळ्या झाल्या

वधू व वरांना शिवविवाह दाखला देण्यात आला व वाचन करण्यात आले .......

शिवधर्मपीठ, मातृतीर्थ, सिंदखेड राजा

|| शिवविवाह दाखला ।।

शिवमती सोनल.......आणि शिवश्री विक्रांत यांचा

|| शिवविवाह ।।

शिवशक ३५० रविवार दि. २५/०२/२०२४ रोजी इंदिरा पॅलेस पुणे-बेंगलोर हायवे, वाघवाडी फाटा येथे संपन्न झाला. दाखल्यावरती नव वधु - वरांच्या सह्या घेतल्या गेल्या आणि हा आगळा - वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला.

एकूणच खऱ्या अर्थाने दोन कुटुंबांना एकत्र आणणारा हा आनंद सोहळा , अगदी शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. अशा या मोरे-कारंडे यांच्या विवाह सोहळ्यातून अनेक चांगले संदेश समाजापर्यंत जातील हे नक्की !

धन्यवाद मोरे आणि कारंडे कुटुंबीयांना त्यांनी अशा विधायक सोहळ्याचे साक्षीदार बनण्याचा योग आनला !

- धनाजी माने......✍️

जनगणना… आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत

 ===================🇮🇳=================== 🇮🇳 जनगणना … आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत 🇮🇳 ========================== पहाट अजून पूर्ण उज...