Sunday, October 01, 2023

जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा बंद होणार ❓पेन्शनच काय होणार❓











 
🏠 जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा बंद होणार❓
📚 शिक्षकांची नोकरी धोक्यात

✍️आम्हाला शिकवू द्या ! 
 जुनी पेन्शन द्या !
खाजगीकरण थांबवा !


महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात, कड्या- कपारीत शिक्षणाची गंगा पोहचावी म्हणून उघडलेल्या हजारो  शाळांचे कंत्राटीकरण, कंपनीकरण करत शाळा बंद करण्याचा सरकारने घाट घातला आहे. सरकार गांभीर्यपूर्वक यावर वाटचाल करीत आहे.


 कारण खेडेगावातील ,वाड्या-वस्तीवरील  कमी पट संख्या असणाऱ्या अशा सर्व शाळा बंद करायच्या. त्या गावातील चार-दोन मुला- मुलींनी शेजाच्या गावातील शाळेत जायचं. अशा पंचक्रोशीतील पाच-दहा गावांची तथा वाड्या वस्त्यांची एकच शाळा चालू ठेवायची. बाकीच्या , अशा कमी पटाच्या  हजारो शाळा बंद करायच्या हे  सरकारने ठरवलं आहे.


त्या दिशेने एक - एक पाऊल सरकारचे पुढे पडत आहे.

 कमी पट संख्या असणाऱ्या शाळा बंद करून... त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या प्रस्तावित समूह शाळेत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


समूह शाळेची संकल्पना ही खरच शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवेल की सर्व सर्वसामान्य गरीब दिन-दलित वाड्या-वस्तीवरील मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेईल हे काळच ठरवेल.


ज्या महाराष्ट्रासाठी १०८ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते, त्या हुतात्म्यांनी अशा महाराष्ट्राचे स्वप्न कधीच पाहिले नसेल .....


ज्या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू राजांनी १०० वर्षांपूर्वी वाडी-वस्तीवरील  गोरगरीब मुलांसाठी 'वतनी शाळा ' सुरू केल्या होत्या. त्याच  धर्तीवर  ही ज्ञानाची गंगोत्री तळागाळातील , रंजल्या -गांजलेल्या लोकापर्यंत पोहचावी , गावकुसातील ,डोंगर - कपारीच्या कणखर महाराष्ट्रात सर्वदूर पसरावी म्हणून ' राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 'वस्ती शाळा ' सुरू  करण्यात आल्या. 


परंतु, समूह शाळेचा निर्णय ,शाळांचे कंत्राटीकरण, कंपनीकरण यामुळे गोर- गरीब मुलांच्या शाळांवर किंबहुना त्यांच्या भविष्यावरच वरवंटा फिरणार आहे.

महाराष्ट्रामधील वाडी-वस्तीवरील मुलांची शिक्षणापासून मोठी हेळसांड होणार आहे.एकवेळ खाजगी कंपन्यांच्या घशात शाळा गेल्या की , सर्वसामान्यांना शिक्षण मोफत मिळणार नाही, ही सामान्यांची शिक्षणाची कवाडे कायमची बंद होतील अशी या क्षेत्रातील जाणकारांच्यातून ,समाजातून खंत,खदखद ,भिती व्यक्त होत आहे.


कारण कमी पट असणाऱ्या अनेक शाळा डोंगरावर डोंगरकपारीत ,दूर्गम भागात आहेत. तिथे वाहतुकीची व्यवस्थाच नाही. समूह शाळेपासून हे अंतर एक ते तीन किलोमीटरपेक्षा जास्त असल्याने लहान गटातील पहिली, दुसरीची मुले शाळेला चालत जाऊ शकणार नाहीत. आणि डोंगराळ आणि दुर्गम भागातील रस्ते खडकाळ व दगडधोंड्याचे असल्याने तिथे स्कूलबस पोहोचणार नाही  अशी अनेक वाड्यांस्त्यांवरची अवस्था आहे.तरीही हा घाट घातला जात आहे.


अशा डोंगरी व दुर्गम भागात कधीही सेवा न केलेल्या , या भागातील समस्या , त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन गरजा ,समस्या ,कौटुंबिक समस्या याचा कोणताही दुरगामी विचार नकरता ,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वातानुकूलित खोलीत बसून केलेली ही योजना,  असल्याने प्रत्यक्ष सर्वसामान्य विद्यार्थी ,वाडी -वस्तीवरील विद्यार्थी ,पालक कोणत्या अवस्थेतून जात असतात हे या योजना आखणाऱ्यांना काहीच माहिती नसताना आखलेला डाव आहे . असा नाराजीचा सूर पालक,शिक्षक,लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांच्यातून उमटत आहे. 


सरकारच्या या धोरणाबाबत सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.याचाच एक भाग म्हणून ३० सप्टेंबर रोजी -

' सरकारने आता आमचे ऐकले नाही तर पालक विद्यार्थ्यांसह मोर्चा काढू, प्रसंगी शाळा- बेमुदत बंद ठेवू, असा इशारा कोल्हापूर येथे विविध संघटनांनी 

दिला. ' शिक्षकांनी मोर्चा काढला.पावसाची तमा न बाळगता जिल्ह्यातून हजारो शिक्षक या निषेध मोर्चात सामील झाले  होते.कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयावर शिक्षकांनी मोर्चा काढला.


' शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा! आम्हाला शिकवू द्या ! गोरगरीब मुलांना शिकू द्या !  या सरकारचं करायचं काय खाली डोकं.. वर पाय... शाळांचे कंत्राटीकरण, कंपनीकरण चालणार नाही.....' अशा घोषणा देत शनिवारी शिक्षकांनी शाळांच्या समूहकरण, कंत्राटीकरण व खासगीकरणाला विरोध केला. 


दिल्लीत जुन्या पेन्शनसाठी देशातून शिक्षक एकवटला.आपला असंतोष, न्याय्य मागण्या मांडल्या. आपली व्यथा, कुटुंबाची परवड मांडली.


सांगलीत तर चक्क शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर  जोरदार घोषणाबाजी केली.

सावरकर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी सांगलीत आलेल्या मंत्री.केसरकर यांना पदवीधर तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला. 


पवित्र शिक्षक संघर्ष समितीने ' समूह शाळा पद्धती बंद करा. कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया करू नका ! स्थायी पद्धतीने भरती करावी अन्यथा कृष्णा नदीत जलसमाधी घेऊ ! ' असा इशारा पवित्र शिक्षक संघर्ष समितीने त्यांना दिला.यावरुन या धोरणाविषयी लोकांची खदखद ,उद्विग्नता दिसून येते.


खरंच ! आज शिक्षण क्षेत्रात खूप मोठे मंथन होणे गरजेचे आहे .यासाठी एखादी ,तज्ञांची ' समिती ' गठित करुन   यावर अभ्यासपूर्ण अभ्यास होणे खूप गरजेचे आहे .

नेमक्या समस्या ,अडथळे यावर उपाय व त्याची तात्काळ अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.कारण शिक्षण क्षेत्रातील समस्या लोंबकळत ठेवण हे कोणत्याही राज्याला ,देशाला परवडणारे नसते , याचे दूरगामी परिणाम अनेक पिढ्या भोगावे लागतात. कारण देशाची उज्ज्वल पिढी प्रत्येक शाळेत घडत असते.


आज महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांची एकच मागणी वेळोवेळी पुढे येते....' अशैक्षणिक कामे बंद करा ! आम्हाला फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना शिकवूद्या ! '

ही मागणी अगदी रास्त असताना , शासन का ठोस निर्णय घेत नाही ❓

 आज , शिक्षकांना फक्त आणि फक्त अध्यापनाचे काम देणं गरजेचं आहे .शिक्षक, विद्यार्थी, खडू, फळा.....

हे अध्यापनाचे कार्य दररोज नियमित विना व्यत्यय घडले तर महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रगती कोणीही टाळू शकणार नाही.पण हेच आज दुरापास्त झाले आहे.आणि याला सर्वसामान्यांचा आधार असणारा ,गरिब घरातील विद्यार्थी बळी जात आहे.

कारण सर्वसामान्यांची मुलेच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असतात.

मोठ्यांची मुल या समस्यांना कधीच फेस करीत नाहीत ,कारण अशांची मुल खाजगी शाळा ,इंग्रजी माध्यमाच्या, CBSC च्या शाळेत विनाव्यत्यय शिक्षण घेत असतात. कारण अशा ठिकाणी अशैक्षणिक काम नसतात.आणि अपवादात्मक असलीच तर ती पार पाडणारी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची फौज या संस्थामधून दिमतीला असते.


आज रोजी जिल्हा परिषद  शिक्षकाकडे १५१ पेक्षा अधिक अशैक्षणिक कामे अध्यापना व्यतिरिक्त शिक्षकांना वर्षभर करावी लागतात .याची यादी अनेक वेळा मोर्चे, उपोषण, प्रसारमाध्यम यातून ही यादी व्हायरल झाली आहे, याची खदखद व्यक्त झाली आहे.विशेष करून द्विशिक्षकी शाळेतील शिक्षकांना याला मोठ्या प्रमाणावरती तोंड द्यावे लागत आहे.


आज या शिक्षकांना एवढी अशैक्षणिक कामे दिली जातात की, त्याला वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दिलेला वेळ  हा ज्या अध्यापनाच्या कामासाठी द्यायला हवा तो अशैक्षणिक कामामुळे देताच येत नाही किंवा तो खूप कमी दिला जातोय ,द्यावा लागतोय. याचं कारण अध्यापना व्यतिरिक्त इतरच कामांमध्ये शिक्षकांचा वेळ जातोय.


निव्वळ आकडेमोड करणे, विविध माहिती गोळा करणे, पासवर्ड लक्षात ठेवणे ,लिंक भरणे ,फोटो अपलोड करणे विविध पद्धतीचे सर्वे करणे , शालेय पोषण आहार योजना आकडेमोड, आर्थिक  हिशोब ,विद्यार्थ्यांची वजन ,उंची आधार अपडेट ,आधार लिंकिंग ,सरल माहिती ,विद्यार्थी डीट्याच्,,अटॅच्  करणे, निवडणूक आयोगाची कामे - BLO हे काम तर वर्ष-वर्ष भर चालते.अशा अनेक विविध गोष्टीत त्याचा बहुमूल्य वेळ जातो. आणि विद्यार्थ्यांसमोर वेळ देणं त्याला दुरापास्त होतं.मग....त्याच्याकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा का केली जाते❓

त्यातच हजारो पदांची भरती गेल्या दहा वर्षात या क्षेत्रात झालेली नाही , तो ही अतिरिक्त भार सहन करत शिक्षक निमूटपणे सहन करत ते आव्हान पेलत आहेत , पण आज ते न पेलवण्यापलिकडे झाल्याचे ,अनेक व्याधींना बळी पडत असल्याचे शिक्षक खाजगीत व्यक्त होतात आपल्या व्यथा मांडतात.


हे कधी थांबणार❓कोण थांबवणार❓शिक्षकांच्या , विद्यार्थ्यांच्या किती पिढ्या उद्ध्वस्त होणार❓

हे प्रश्न खरच ! राज्याला , देशाला न परवडणारे आहेत असे शिक्षणतज्ञांच्यातून बोलले जात आहे.


ज्या विद्यार्थ्यांचे अध्यापन करून त्यांचे उज्वल भविष्य घडवणे यासाठी शिक्षकांची नेमणूक असते हे कामच शिक्षकांना आजची यंत्रणा करू देत नाही.

यातच भरीस भर म्हणून गेल्या दहा वर्षांमध्ये शिक्षक पदांची नेमणूक न झाल्याने, हजारो पदे रिक्त आहेत.

 त्याचा अतिरिक्त कार्यभार हा उपलब्ध असणाऱ्या शिक्षकांच्याच वाट्याला येतोय.  त्यामुळेही विद्यार्थ्यांच्या अध्यापनात  अडथळे निर्माण होतात .


अनेक केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी ,शिक्षणाधिकारी यांची पदे रिक्त आहेत. अनेकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.यामुळेच एकूणच शिक्षण व्यवस्थेवर याचा दूरगामी परिणाम होत असताना दिसत  आहे.


द्वि -शिक्षकी शाळेतील शिक्षकांच्या  सहनशक्तीची तर परिसिमाच झाली आहे. या शिक्षकांवरती तर अतिरिक्त कामाचा ताण असतानाच, एका -एका शिक्षकाला चार -चार वर्ग अध्यापनाचे  कामे करावे लागत आहे.

 आणि अशातच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांची आणि अशा शाळेतील विद्यार्थ्यांची तुलना करून शिक्षकांना बदनाम केलं जात आहे.किती मोठा विरोधाभास हा !


अशा द्विशिक्षकी शाळेतील शिक्षक शिकवतच नाहीत, आणि त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला आहे ,असे खापर या शिक्षकांच्या नावाने फोडले जाते .

अशा शाळेतील शिक्षक समपातळीवर स्पर्धा व तुलना करण्याचे आवाहन करतात. समान सुविधा देऊन मगच मुल्यमापन करण्याचे हे शिक्षक माफक अपेक्षा करतात.

'रोग रेड्याला आणि दंड पखाल्याला ' अशी त्यांची अवस्था आहे


 खोलवर विचार केल्यानंतर नेमकं दोषी हे शिक्षक नसून यंत्रणेतील दोष लक्षात येतात. 

 या सदोष यंत्रणेमुळे शिक्षक दोषी नसतानाही त्यांच्या कपाळी हा दोष येतो. आज सर्वच शिक्षक तळमळीने काम करतात .अनेक शाळा आदर्श घडवल्या आहेत .

लोकसहभागातून कोट्यावधी रुपयाचा निधी शिक्षकांनी जमा करून शासनावर अवलंबून न राहता , शाळेच्या भौतिक सुविधा स्वतः निर्माण केल्या आहेत.


अनेक शिक्षक आव्हान करतात की आम्हाला फक्त शिकवू द्या ! फक्त आणि फक्त शिकवण्याचे काम द्या ! अतिरिक्त कामाचा बोजा काढून घ्या. 


आम्ही, विद्यार्थी, खडू आणि फळा या मध्ये कोणताही व्यत्यय  न आणता शाळेच्या वेळेत फक्त आम्हाला अध्यापनाचे पवित्र काम करू द्या . आणि शाळेच्या वेळेत व्यतिरिक्त आम्हाला आमच्या बायका पोरांच्या आनंदाने जगू द्या ! मग पहा ' ऑल इज वेल ' कसे घडते ते !

आम्हाला आमच्या पद्धतीने आमच्या अनुभवाप्रमाणे अध्यापनाचे काम करू द्या. 

कोणतेही येशील बसून सुपीक डोक्यातून आलेले प्रकल्प ,प्रोजेक्ट आमच्यावरती लादू  नका. 

आम्ही ज्या परिस्थितीत, ज्या बोलीभाषेच्या वातावरणात अध्यापनाचे काम करतो, तिथल्या अनुभवांप्रमाणे तिथल्या परिस्थितीनुसार आम्हाला आमचे काम प्रामाणिकपणे करण्याचे स्वातंत्र्य द्या.

आमच्या दीर्घ अध्यापनाचा अनुभव आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या पद्धतीने देऊ द्या !

मग पहा ! महाराष्ट्राचं  शैक्षणिक भवितव्य पाहत राहावे असेच उज्वल घडेल असे आवाहन शिक्षक करीत आहेत.  बोलून दाखवत आहेत.



ज्या महाराष्ट्रमद्धे  विविध क्षेत्रातील मान्यवरांनी , यामध्ये आचार्य अत्रे ,साने गुरुजी,बाबा आमटे,एन. डी. पाटील,एस. ए. डांगे,एस. एम. जोशी,कृष्णराव धुळप,क्रांतीसिंह नाना पाटील,गणपतराव देशमुख,गोविंदभाई श्रॉफ,जी. डी. (बापू) लाड,दत्ता देशमुख,दत्ता पाटील,दि. बा. पाटील,नागनाथअण्णा नायकवडी,प्रमिला दंडवते,,प्रा. मधु दंडवते,बापू काळदाते,बाबा आढाव,बाळासाहेब देसाई,भाऊसाहेब हिरे,मृणाल गोरे,यशवंतराव मोहिते,यशवंतराव चव्हाण,राजारामबापू पाटील

राम कापसे,राम नाईक,रामभाऊ म्हाळगी,वसंतदादा पाटील,वसंतराव नाईक,शंकरअण्णा धोंडगे,शंकरराव चव्हाण,संतराम पाटील अशा दूरदृष्टीच्या व्यक्तींनी महाराष्ट्राचे उज्वल भविष्य पाहिले .अशांच्या स्वप्नातील भविष्यातील महाराष्ट्र घडावा ! शिक्षण क्षेत्रात क्रांती व्हावी ! सुरु असणारी हेळसांड थांबावी . एवढ्याच माफक अपेक्षा सर्वसामान्यांच्या, शिक्षकांच्या, शिक्षणतज्ञांच्या आहेत !

अशा सर्व शिक्षकांच्या, समाजाच्या आणि सर्वसामान्य पद-दलित, दीन-दलितांच्या मापक अपेक्षा खरोखरच  महाराष्ट्राचे भवितव्य घडवतील !

एकूणच ,शिक्षकांना शिकविण्याचा अधिकार आहे, हेच त्यांचे मूळ काम आहे. शिक्षकांना शिकवू द्या! आणि मुलांना शिकू द्या ! कंत्राटीकरण , खासगीकरणाचे धोरण रद्द करा, अन्यथा नवे शिक्षक घडणार नाहीत हे नक्की म्हणता येईल.


- धनाजी माने....✍️


dhanajimane123@gmail.com











Sunday, September 10, 2023

सार्वजनिक गणेशोत्सव

 

नवसाला पावणारा गणपती


।। सार्वजनिक गणेशोत्सव ।।

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना तत्कालीन परिस्थितीनुसार समाजाने एकसंघ व्हावे, संघटित होऊन लोकांमध्ये एकता बाणली जावी हे उद्दिष्ट ठेवले होते. पण त्याचाच आज विसर पडल्याचे दिसत आहे.सार्वजनिक मंडळांचे मंडप रस्तेच्या- रस्ते व्यापू लागताना दिसतात.


सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानमद्धे गणपती मूर्तींच्या उंचीची सगळीकडे चढाओढ सुरू असताना दिसते.डेकोरेशन, प्रकाशाचा झगमगाट यामध्ये विजेची कोट्यावधी युनिट विनाकारण बरबाद होताना या काळात दिसतात.

महाराष्ट्रातील तसेच भारतातील लाखो खेडी अजूनही अंधारात चाचपडत असताना विद्युत रोषणाईचे अतोनात स्तोम माजलेले दिसत असते. एका बाजूला ऊर्जेची बचत करण्याचे संदेश, तर दुसऱ्या बाजूला चाललेला हा विजेचा अपव्यय  हा विपर्यास सहज डोळ्यांनी दिसतो, समजतो पण......

माणसाच्या मनात श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी या निमित्ताने घडू नयेत , पण त्याही आज घडताना दिसत आहेत.

श्रद्धाळू भक्तांना भूलवित नवसाला पावणाऱ्या गणपतींचे गल्लोगल्ली, नाक्यानाक्यावर पेव फुटलेले या गणेशोत्सव काळामध्ये दिसते.

अनेक सामाजिक उपक्रम राबविणारी मंडळं झगमगाट, देखावे, रोषणाई, ढोलताशे यावर अमाप पैसा उधळताना दिसतात. हे विचार गणेश भक्तांना कडवट वाटत असतील , मनात चिडही निर्माण करतील पण हे सारे वास्तव आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय , अनुभवतो आहे. कडवा तो है , लेकिन सच भी है.....


या साऱ्या घडामोडीमद्धे , काही मंडळे पैशाचा अपव्यय टाळून सामाजिक बांधिलकीचे भान आणि जाण ठेवून ,उल्लेखनीय असे उपक्रम आपल्या मंडळांच्या मार्फत राबवत असतात.काही मंडळे या उत्सव काळामध्ये आपल्या मंडळाच्या श्रीमंतीचे प्रदर्शन न मांडता अनावश्यक, अवास्तव खर्चांना कात्री लावतात. वाचवलेला पैसा समाजाच्या गरजा लक्षात घेऊन यावर खर्च करताना दिसतात , हा आदर्श गल्लोगल्ली स्थापन झालेल्या गणेश मंडळापासून राज्यभर पसरलेल्या मोठमोठ्या गणपती मंडळांनी घ्यायला हवा. जेणेकरून समाजात एक चांगला संदेश जाऊन समाजामध्ये विघातक न घडता विधायक गोष्टी घडत राहतील .

समाजामध्ये असे अनेक गोरगरीब, दीनदलित गरजू उपेक्षित घटक आहेत जे मूलभूत गरजांपासून वंचित आहेत.


देणगी मधून जमा होणारा लाखो कोट्यावधी रुपयाचा निधी अशा उपेक्षित आणि वंचित घटकांच्या अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य, शिक्षण याकडे वळता केला तर देणगीदारांनी खुल्या मनाने दिलदारपणे दिलेली देणगी सत्कारणी लागेल आणि समाजातील एक -एक विघ्न दूर होऊन ' गणपती बाप्पाला ' आणि ' समाजालाही आनंद होईल !देणगीदारांची मंडळाला झालेली मदत सत्कारणी लागल्याचं समाधान लाभेल.


आज पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत , अशा वेळी मंडळाचे कार्यकर्ते , गणेश भक्त एकत्र जमत असतात अशा वेळी पर्यावरणाबाबत जाणीव जागृती करता येईल.आज झाडे लावणे ,जगवणे हे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी काळाची गरज आहे , यासाठी काय - काय करता येईल? यावरती चर्चा होऊन योग्य त्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत !


 आणि या आदर्शवत उपक्रमामुळे देणगीदार न मागताच पुढील वर्षी मोठ्या मनाने आणखी देणगीत भर देऊन मंडळांना मदत करतील.

या उत्सवाच्या निमित्ताने मंडळांच्याकडे जमा होणाऱ्या लाखो रुपयांतून आपणाला काय करता येईल व काय टाळता येईल याचे प्रत्येकाने भान ठेवले तर खरोखरच समाजामध्ये चांगल्या घटना या उत्सवाच्या निमित्ताने घडत राहतील.


💥 काय टाळता येईल आणि काय करता येईल......✍️

▪️पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या गोष्टींचा वापर देखाव्यांत टाळता येईल.

▪️बाप्पाची मुर्तीची उंची मर्यादित ठेवता येईल , जेणेकरून यातून निर्माण होणाऱ्या  विसर्जनाच्या वेळच्या पुढील अनेक समस्या टाळल्या जातील.

▪️अवाढव्य मूर्तीची विसर्जनानंतर जी विटंबना होते ती टाळता येईल.

▪️रस्त्यांची आधीच अवस्था बिकट असताना, मंडपासाठी खणलेले खड्डे भर घालणार नाहीत किंवा यानिमित्ताने पर्यायी व्यवस्था यावर संशोधन आणि उपयोजन करता येईल.

▪️वर्गणी गोळा करताना दमदाटीपेक्षा ,ऐच्छिकतेवर भर देता येईल.

▪️मंडळांच्या दरवर्षीच्या हिशोबांत पारदर्शकता आणता येईल.

▪️अवैध वीज जोडणी टाळून , सुरक्षित आणि नियमाने वीज जोडणी करता येईल. 

▪️दर्शनाला येणाऱ्या भक्तांना कार्यकर्त्याकडून धक्काबुकी होऊ नये! यासाठी उत्सव काळामध्ये कार्यकर्त्यांना ठराविक दिवशी ड्युटी देऊन रांगेचे नियोजन करता येईल.

▪️ खेडेगावातील अनेक शाळा अनेक सुविधांपासून वंचित आहेत अशा शाळांना मंडळाकडे जमा होणाऱ्या लाखो रुपयांच्या निधीतून सुविधा पुरवता येतील.

▪️ समाजामध्ये असणाऱ्या अनेक दिव्यांग घटकांना विविध साधनांसाठी मंडळांच्याकडून निधी देता येईल.

▪️ परिस्थितीमुळे शिकू न शकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मंडळांच्या मार्फत दत्तक घेता येईल.

▪️ अनेक गोरगरीब गरजू घटकांच्या शस्त्रक्रिया असतात या शस्त्रक्रियांसाठी मदत देता येईल.

▪️ अनेकांच्या घरातील कर्ते पुरुष निघून गेलेले असल्याने निराधार झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत करून आधार देता येईल.

▪️ पोलिसांच्याकडून व शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करता येईल.

▪️ गणरायाच्या समोर भक्तिमय वातावरणातील गीते मोटिवेशन स्पीच , पोवाडे असे, ऐकणाऱ्या भक्तांच्या कानाला सुमधुर वाटेल असे संगीत असावे धाबडधिंगा टाळता येईल.

▪️ डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज टाळून ध्वनी प्रदूषण यावर आळा घालता येईल.

▪️ गणेश विसर्जनाच्या वेळीही भक्तीमय वातावरण कसे राहील याचे भान ठेवता येईल. गुलाल ,फक्की व इतर रंगीबेरंगी शरीरास घातक रसायनांचा वापर कमी करता येईल.टाळता येईल।


एकूणच या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजासाठी अनेक चांगल्या गोष्टी करता येतील.व अनेक चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी टाळता येतील फक्त  प्रत्येकाने आपली मानसिकता बदलायला हवी, विधायक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांचे आदर्श घ्यायला हवेत व तसे आदर्श अमलात आणायला हवेत तरच हे शक्य आहे. 

गणरायासमोर नतमस्तक होऊन विनम्रतेने अशी मानसिकता प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तयार केली तर अशक्यही काहीच नाही. 


आणि यातूनच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असा गणेश उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता येईल.महाराष्ट्रातील गाव खेड्यांपासून मोठ्या शहरापर्यंत पसरलेल्या सर्व मंडळांच्या समोर निर्भेळ, निकोप आणि श्रद्धेने पावन झालेले वातावरण प्रत्येक मंडळांतून अनुभवास येवो !हीच गणराया चरणी विनम्र प्रार्थना !

एकूणच जे वाटल , ते व्यक्त केलं.पटल तर बघा , नाहीतर सोडून द्या !

- धनाजी माने......✍️




Tuesday, September 05, 2023

' तुकाई देवी '


।।तुकाई ।।
'तुकाईच्या नावानं चांगभलं'


 ®️ Created by - @dhanajimane2681 

®️ धनाजी माने (इटकरे)✍️

आमचे #ग्रामदैवत 

- वाळवे तालुक्यातील #इटकरे हे एक छोटसं #खेडेगांव. या गावातील प्रत्येकाचे लहानांपासून, आबालवृद्धांचे श्रद्धास्थान 'तुकाई देवी! तशी गावामध्ये #बिरोबा मंदिर, #हनुमान मंदिर, #जोतिर्लिंग मंदिर, #विठ्ठल- रुक्मिणी, #गणपती मंदिर अशी वेगवेगळी मंदिरे आहेत. तुकाई देवी हे गावातील सर्वांचेच 'श्रद्धास्थान' आहे.

इटकरे गावच्या उत्तरेस #राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या १ कि.मी. अंतरावर दोन्ही डोंगरांच्या कुशीत एका टेकडीच्या उतारावर हे ठिकाण आहे.शेकडो वर्षाच्या डेरेदार वटवृक्षाच्या (वडाच्या) छायेखाली देवीचे मंदिर शोभून दिसते.

'वटवृक्षाच्या छायेखाली , देवीचे मंदिर आहे.

तर देवीच्या छत्रछायेत जणू गाव आहे.'

कारण आयुष्यात येणाऱ्या संकटात , भक्तगण देवीचाआवर्जून धावा करतो , तेव्हा ' तुकाई ' संकटाला धावून येते.आपल्या भक्ताला आपल्या छत्रछायेत घेते अशी देवीची लीला आहे व भक्तांची अशी अगाध श्रद्धा आहे.

देवीचे #मंदिर राष्ट्रीय महामार्गावरून सहज दृष्टीस पडते. देवस्थान समितीमधील सर्वच कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमातून एक मोठी वास्तू या #नैसर्गिक वातावरणात उभी राहिली आहे. मंदिराच्या टेकडीवरून सभोवताली #वाळवा, #वारणेचा हिरवागार नयनरम्य परिसर दिसतो.

देवीच्या 'तुकाई ' नावाबाबत अनेक अख्यायिका आहेत.

देवीच्या नावाचा उल्लेख विविध ग्रंथात असल्याचे भक्तगण सांगतात.


#श्रावण महिन्यामध्ये मंदिर व परिसराचे दृश्य #विलोभनीय असते आणि श्रावण महिन्यातील शेवटच्या #मंगळवारी किंवा #शुक्रवारी भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून या ठिकाणी येतात, तर वर्षभर मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारादिवशी लोक गर्दी करतात, तर नियमित दर्शन घेणारेही भाविक आहेत.

ऐन उन्हाळ्यातही या ठिकाणी मोठी पाण्याची सोय असल्याने या ठिकाणी #ज्ञानेश्वरी, #शिवलीलामृत व इतर ग्रंथाचे पठण होते, परिसरातील मुलांच्या #सहली या निसर्गरम्य वातावरणात येतात. परिसरातील हे  एक भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ  आहे. 


श्रावण महिन्यातील यात्रेदिवशी देवीची #पालखी #मिरवणूक गावातून देवीच्या डोंगरावर जाते. बेल भंडाऱ्यामध्ये व #धनगरी ढोलाच्या गजरात 'तुकाईच्या नावानं चांगभलं' च्या गजराने सर्व परिसर दुमदुमतो, बेल भंडाऱ्यात अनेकजण नाहून निघतात.

देवीच्या मंदिरासमोर विविध #स्टॉल लागलेले असतात.

गावातील सर्व भावीक भक्त ,माहेरवाशिणी आपल्या कुटूंबासमवेत देवीच्या डोंगरावर येतात.नारळ, दही - भात देवीला अर्पण करतात.

सोबत #दही-धपाटे (#थालीपीठ) ,#आळूवडी सोबत आणतात. कुटुंबातील सर्व सदस्यांनसोबत याचे सहभोजन करतात , एक भक्तीमय माहोल तयार होतो.

अनेकांच्या अनेकदिवस न झालेल्या नातेवाईक, मित्र,माहेरवाशिणी यांच्या दुर्मिळ भेटी देवीच्या यात्रेनिमित्त एका छत्राखाली होतात. जणू ' तुकाई देवीच '

या भेटी घडवून आणते.

गावातील लोक मिळून मसाले भात ,गव्हाची खीर याचा मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद करतात.

गावातील सर्व लोकांच्याबरोबर देवीला #नारळ द्यायला आलेल्या #माहिरवासिनी ,त्यांचे कुटुंबातील सदस्य व परिसरातील विविध गावातून आलेले भक्तगण या महाप्रसादाचा लाभ मोठ्या आनंदाने घेतात.

ही यात्रा पारपाडणेसाठी यात्रा कमेटी व भक्तगण,कार्यकर्ते मुख्य यात्रे आगोदर काही दिवस , #रात्रदिवस कष्ट घेत असतात.

यात्रेमद्धे सारा गाव मनोभावे सामिल झालेला असतो.

सर्व जाती-धर्माचे लोक अगदी आनंदाने या यात्रेत सहभागी होतात , अनेकजण देवीला #नवस बोलतात व देवी नवसाला पावते अशी देवीच्या भक्तांची #श्रद्धा आहे.


====================================

◆◆◆◆◆◆◆◆ ■ ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

====================================

परंपरा आजही यांचेकडूनही जपली जातेय.....

अशीच परंपरा माने भावकी यांनीही पिढ्यानपिढ्या जपली आहे आणि आजही ती सुरु आहे.देवीचा वार असतो त्या दिवशी श्रावणातील मंगळवारी किंवा शुक्रवारी , #माने भावकीतील लोक परंपरेनुसार प्रतिवर्षी  बेल भंडाऱ्यामध्ये व #धनगरी ढोलाच्या गजरात #'तुकाईच्या नावानं चांगभलं' च्या गजरात देवीची #पुजा करतात , देवीच्या मंदिराजवळील पाण्याच्या टाक्यामद्धे #परडी सोडतात. #बेल-भंडाऱ्याची उधळण करतात. रात्री  #माने-वाड्यात महाप्रसादाचे आयोजन केले जाते.भावकीतील लोक एकत्र येतात , हिस्स्याची येणारी वर्गणी देतात. कधी शिरा-भात ,आमटी तर कधी भावकीतील लोक प्रत्येक घरातून १०...२०..२५ अशा भाकरी एकत्र जमा करतात. या बरोबर #भात , #आमटी ,भाजीचा मेनू करतात.


भावकीतील लहान मुलानंपासून , आबालवृद्धांपर्यंतचे सर्व स्री-पुरुष एकत्र येतात व #महाप्रसाद सोबत घेतात.

गावातील इतर लोकांनाही या महाप्रसादासाठी बोलवले जाते व #महाप्रसाद दिला जातो. भावकीबरोबर गावातील इतरही सर्वजण #गुण्यागोविंदाने एकत्र प्रसाद घेण्याचा आनंद घेतात.एक दुसऱ्याच्या ,यानिमित्ताने एकत्र भेटी होतात. महाप्रसादाबरोबरच आपली सुख-दु:खही share केली जातात.एक आनंदमय ,#भक्तीमय माहोल तयार होतो.

ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आली असून ,त्यामध्ये खंड नपडता अखंडपणे सुरु आहे.


रात्री धनगरी ओव्यांचा #कार्यक्रम असतो.

या #ओव्या ऐकण्यासाठी लोक येतात.

पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही #परंपरा आजही तेवढ्याच नेटाने नव्या पिढीकडून सांभाळली जात आहे.

एकूणच तुकाई देवीची यात्रा म्हणजे इटकरेवासियांनबरोबरच ,परिसरातील भक्तांचा एक भक्तीमय आनंदउत्सवच असतो.........

बोला ----

'तुकाईच्या नावानं चांगभलं !'

'तुकाईच्या नावानं चांगभलं !!'

'तुकाईच्या नावानं चांगभलं !!!'

----- ®️ धनाजी माने (इटकरे)...…..✍️

☎️ ९४०३९६३९३४


=======================================

तुकाई महात्म्य


प्रथम तुकाई भक्त व वाचक व हितचिंतक इटकरे पंचक्रोशीतील भक्त मंडळी व शुभेच्छुक यांचे आभार मानून श्री तुकाई देवी चरणी लीन होऊन करतो तुकाई देवीचा ' चांगभल '


भारतीय संस्कृतीत जे जे उत्तम, उदात्त आहे त्यांची पूजा केली जाते व आनंदाची निर्मिती त्यातुनच होत असते. आषाढानंतर येणारा श्रावण हा आनंदाचा महिमा गाणारा महिना आहे.


अशा श्रावणात येणारे सारे सण हे निसर्गाशी मानवाचे असणारे अतूट नाते सांगणारे असतात. आपली भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यांची आपल्या पुर्वजांनी एक सांगड घालून दिली आहे. आचार-विचार, व्रत-वैकल्ये, सण उत्सव यांची योग्य सांगड घालून घरातील, समाजातील वातावरण प्रसन्न राहावे, रोजचे व्यवहार सुरळीत चालावेत, आरोग्य, आयुष्य सुखी व्हावे, बंधु- , भाव प्रेम वाढावे म्हणून आपण सण उत्सव साजरे करतो. प्रत्येक सणामागे काही ना काही तरी शिकवण असते. आणि अशीच बंधुभावाची, भक्तीची, पेमाची, एकात्मतेची श्रद्धेची शिकवण देणारी इटकरे गावची तुकाईदेवी व तिची श्रावणातील शेवटच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी होणारी यात्रा होय.


श्री तुकाई देवीचे मंदिर व रम्य परिसरामुळे इटकरे येथील ग्रामस्थांना तीर्थक्षेत्राची प्रसन्नता मिळाली आहे. याबरोबरच गावाजवळून जाणाऱ्या पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाने वैभव मिळवून दिले आहे. या महामार्गापासून अवघ्या दीड किलोमिटर अंतरावरील हे श्रद्धेचे मंदिर व प्रसन्नतेचे प्रतिक असलेला डोंगर उतारावरील हिरवा परिसर भाविकांना साद घालीत असतो. हा विलक्षण देखावा येथे येणाऱ्या प्रत्येकालाच भूरळ घालतो आहे. दळण वळणाची सोय झाल्याने दिवसेंदिवस भाविकांची ओघ वाढतच चालला आहे. श्रावण मासातील हिरवे, आनंदी वातावरण, भरत आलेले आभाळ, पाण्यानं ओथंबलेले ढग, पक्षांची मधूर किलबिल, शांतपणे वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोरावर झुलणारी पाने, गाभाऱ्यातील गारवा अन् समोर श्रद्धेची मूर्ती यामुळे भविकांच्या अंत:करणातील भक्तीचा झरा वाहू लागतो.


सुसंस्कृत अशा या गावास सधनतेची किनार आहे. पुर्वांपार चालत आलेल्या देवीचया रूढी, परंपरा काळाबरोबर काहीशा बदललेल्या आहेत.


श्री तुकाई देवी स्थानास व इटकरे गावास फार प्राचीन असा इतिहास आहे. इ.स. पूर्व काळात या डोंगर उतारावरच गाव वसले होते. 'पांढरी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वस्तीस त्याकाळी हिस्त्रपशु तसेच राक्षसगणाकडून त्रास होऊ लागला. यामुळे तेथून स्थलांतर करून डोंगराच्या पायथ्याशी (सध्याचे गाव) वस्ती केली. मात्र त्या ठिकाणी देवीची शिला तशीच राहीली.


या गावातील धनगर समाजाचा हरीबा नावाचा एक मेंढपाळ होता. त्याने अनेक पुर्व भाकनुक (भविष्य) वर्तविले होते. त्याची भविष्यवाणी सत्यात उतरू लागल्याने सारा गाव हरीबास महान पुरूष मानू लागला. पुढे पुढे ते 'हरीबा देवऋषी' म्हणून परिचित झाले. असेच एकदा ते मेढ्या हाकत डोंरावर गेले. त्यांना त्याठिकाणी देवीची शिला दिसली. त्याच रात्री या देवीने हरीबा देवऋषींच्या स्वप्नात साक्षात्कार दिला. तो असा " मी पार्वती स्वरूप तुकाई. तुमच्या पांढरीत मी आहे. पण माझ्याकडे कोणाचेही लक्ष नाही.” हा साक्षात्कार त्यांनी ग्रामस्थांना सांगितला. त्या सर्वांनी एकत्र येऊन या शिलेवरती छोटासा निवारा केला.


श्री तुकाई देवीची अख्यायिका सांगितली जाते. त्यावरून देवीचे महात्म्य लक्षात येते. राम युगात घडलेल्या एका घटनेमुळे 'तुकाई' हे नांव रूढ झाले आहे. त्याचे असे झाले, लंकापती रावणाने सिता मातेस लंकेस पळवून नेले होते. त्यावेळी प्रभुरामचंद्र सितेच्या शोधासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे निघाले होते. दंडकारण्यातून मार्ग काढीत ते या ठिकाणी आले. व्याकुळ अवस्थेतील श्रीराम 'सिता - सिता' म्हणत ध्यानस्थ बसले. त्यावेळी श्री शंकर व पार्वती यांना विमानातून जात असताना खाली श्रीराम दिसले. पार्वतीने शंकरांना विचारले "प्रभु रामचंद्र सितेसाठी इतके व्याकूळ का झाले आहेत?


पत्नी प्रेमाचा हा गर्वच म्हणावा लागेल." या प्रेमाची परीक्षा घ्यायच्या इराद्याने पार्वतीने सितेचे रूप घेतले व प्रभुरामचंद्रांच्या पुढे प्रकट झाली. डोळे मिटून ध्यानस्थ बसलेल्या विष्णू अवतारी प्रभु रामचंद्रांच्या हा प्रकार लक्षात आला. अंतर्यामी राम पार्वतीस म्हणाले "तू का आई इथे ?" असे म्हटल्यावर पार्वतीने स्वत:चे खरे रूप दाखविले आणि अदृश्य झाली. अशी अख्यायिका आहे. प्रभुराम तुकाआई बोलण्यावरून तुकाई हे नांव प्रसिद्ध झाले. याबरोबरच केदारविजय या ग्रंथात २१ व्या अध्यायात उल्लेख आढळतो. कोल्हासूर व रत्नासूर राक्षसाचा वध करण्यासाठी श्री जोतिबास श्री तुकाई देवीने मदत केलेली आढळते.


सन १८०० ते १८१० चे दरम्यान देवीने काही भक्तांना दृष्टांत दिला असे सांगितले जाते. या दृष्टांतात ती म्हणते, "माझ्या मंदिराचा जिर्णोद्धार करा. तो ही एका रात्रीत ! पन्हाळ्याचा दगड व कृष्णेचे पाणी आणून एकाच रात्रीत देवळाचे बांधकाम पूर्ण झाले पाहिजे." हि बाब या भक्तांना अशक्य वाटली. पण देऊळ उभे करण्याच्या निर्धाराने पायी चालत जावून पाणी व दगड आणून छोटेसे देऊळ बांधण्यात आले.


सन १९०० च्या सुरूवातीस देवी रोगाची व प्लेगची (पटकी) मोठ्या प्रमाणात साथ होती. त्यावेळी श्री तुकाई देवीचे छत्र ग्रामस्थांच्यावर असल्यामुळे


या रोगास एकही बळी पडला नाही अशी लोकांची धारणा झाली. ही बातमी वाऱ्यासारखी या गावच्या पंचक्रोशित पसरली. इटकरे गावाच्या पुर्वेकडील गावातील काही लोकांनी देवीच आपल्या गावात आणायची आणि साथीच्या रोगाचा अटकाव करायचा या हेतुने मूर्ती चोरून नेण्याचा बेत आखला. त्याप्रमाणे ही मूर्ती बैलगाडीतून नेण्याचा प्रयत्न झाला. पण इटकरे गावाच्या शीवेपर्यंतच काय ती मूर्ती गेली. त्यापुढे बैलगाडी हाकणे कठीण झाले. शिवेवरच मूर्ती गाडीतून खाली पडली. त्यावेळी मूर्तीचे नाक तुटले. ते आजही तसेच आहे. शिला उचलण्याचा प्रयत्न झाला पण शिला काही उचलेना. अखेरीस ते रिकाम्या हातानेच निघून गेले. हा प्रकार इटकरे येथील गावकऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी ती मूर्ती पुन्हा पाठीमागे आणून स्थापना केली.


श्री तुकाई देवीच्या उजव्या बाजूस एक जीवंत पाण्याचा झरा आहे त्यास गंगा कुंड म्हणतात व डाव्या बाजूस एक कुंड आहे त्यास भागिरथी कुंड म्हणतात. या झऱ्यामध्ये अंघोळ केल्यास अंगावरील खरूज, गजकर्ण, नायटे अथवा चमडीचा कसलाही रोग बरा होतो. अशी लोकांची धारणा आहे. आजही लहान मुलांना त्यात अंघोळ घालण्याची प्रथा आहे. देवीच्या पाठीमागे कारीचे झाडाखाली मसोबाचे दैवत आहे. त्यास आषाढ महिन्यात नैवेद्य पूजा होते. अलीकडच्या काळातही असाच एक चमत्कार लोकांनी अनुभवला आहे.


कराड येथील एका भाविकाच्या स्वप्नात देवी प्रगटली. देवीने सांगितले "सध्याचे मंदिर हे फारच अपुरे आहे. तेंव्हा तू या मंदिराचा विस्तार कर." त्याप्रमाणे त्या भक्ताने मंदिराच्या समोर पत्र्याचे शेड बनविले. काही दिवसानंतर या शेडच्या पत्र्याची चोरी करण्याच्या इराद्याने रात्रीच्या वेळेत संपूर्ण पत्रा काढून नेण्याचा प्रयत्न केला. पण हाही पत्रा ठराविक मर्यादेच्या बाहेर नेणे कठीण झाले. हा पत्रा तेथेच टाकून अखेर चोरट्यांनी पळ काढला.


या दृष्टांतावरून देवीच्या जागृततेवर लोकांची गाढ श्रद्धा बसली. ग्रामदैवत श्री तुकाई देवी भक्तांना पावते घराघरामध्ये तीचा वास दरवळतो. रात्री बारा वाजल्यानंतर देवी गावामध्ये येते. संपूर्ण गावाला वेढा घालून पहाटे ती परतते अशी येथील लोकांची धारणा आहे. त्यासाठी ते त्या मार्गावरील देवीची पाऊले व काठीचा व्रण प्रमाण मानतात.


सन २००२ मध्ये या ठिकाणी प्रशस्त मंडप व सुंदर मंदिर बांधण्याचा संकल्प येथील प्रमुख व्यक्तींनी केला. पहिल्या टप्प्यात सांगली - शिराळा रस्त्यापासून मंदिरापर्यंतचा १ किलोमिटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला. श्री तुकाई देवी मंदिर व मंडपाच्या जिर्णोद्धाराचे काम कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, सोसायटीचे चेअरमन आनंदराव पाटील, शिवाजी भानुसे, सुरेश पाटील, संभाजी पाटील, सतिश पाटील आदिंच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली


सुरू करण्यात आले. वास्तू रचनाकार दीपक पवार यांनी उत्कृष्ट असे मंदिर व मंडपाचे डिझाईन केले. या बांधकामासाठी गावातून व परिसरातून मोठ्या प्रमाणात भक्तांनी देणगी, वस्तू देऊन मोलाचे सहकार्य केले.


मंदिराचा जिर्णोद्धार, श्री तुकाई देवी मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण • समारंभ गुरूवार तारीख ५ जून, २००३ रोजी १२ - ३५ मिनिटांनी संपन्न झाला. परमपुज्य योगीराज पूर्णानंद महाराज व वेदशास्त्र संपन्न प्रदीप वासूदेव शास्त्री जोशी यांचे हस्ते कलशरोहण विधी संपन्न झाला. तर सरपंच श्री. सुभाष नामदेव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमन सुभाष पाटील यांचे हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न झाला.


दरवर्षी अश्विन, कार्तिक व श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम होतात. विजया दशमीस (दसरा) याठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतात. भजन, किर्तनाने अवघा परिसर दुमदुमून जातो. श्रावण मासातील प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी सात सुवासिनी गावातून पाणी घेउन जावून देवीची पूजा करतात. ढोलाच्या गजरात पालखीतून पादुका नेवून त्याचे पूजन केले जाते. पालखीचा मान येथील पांडुरंग आण्णा पाटील व नांगरे पाटील कुटुंबियांना आहे. तर परडी सोडण्याचा मान बापू नरसू पाटील व भाऊबंदकीचा आहे.


श्रावणातील शेवटच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी या ठिकाणी देवीची मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगांव जिल्ह्यातून तसेच मुंबईहून येथे भाविक आवर्जून उपस्थित राहतात. मोठ्या प्रमाणात महाप्रसाद केला जातो. यात्रा व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी यात्रा समितीवर असते. यात्रा समितीचे काम संभाजी दत्तू पाटील, अशोक सुतार, संजय कृष्णात पाटील, शंकर देवाळे, पांडुरंग बापू पाटील व इतर सहकारी पाहतात. अशा पध्दतीने श्री तुकाई देवीचे महात्म्य आहे.


ॐ सर्व मंगल मांगल्ये ॥ शिवे सर्वार्थ साधिके ॥


शरण्ये त्र्यंबके गौरी ॥ नारायणि नमोस्तुते ॥


◆ धनाजी माने…✍️


dhanajimane.blogspot.com

dhanajimane123@gmail.com


(सदरचा माझा हा लेख- तुकाई देवी महात्म्य पुस्तकात सन-२००४ ला पसिद्ध झाला आहे.)






Wednesday, August 09, 2023

बापमाणूस...

 


बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


बाप माझा शेतामध्ये राबराब राबायचा ,

उन्ह-पावसात ,थंडी -वाऱ्यात....

तो  सार  सोसायचा.

फाटक्या संसाराला ठिगळ लावण्यात,

तो सारा खपायचा.

दु:ख सार उरात दाबून, हसत-हसत

सार काही आमच्यासाठी  करायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


वर- वर तो नेहमी हसत दिसायचा ,

आत मात्र गरीबीने पुरा फाटलेला असायचा.

लागलं काही संसाराला , लगेच आणून दयायचा

एक-दोन घास स्वतः कमी खायचा,

आम्हाला मात्र तो, पोटभरुन  द्यायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


सणासुदीला गोड-धोड , कमी पडू नाही द्यायचा.

दिवाळी असो वा पाडवा , कपडे तो साऱ्यांना आणायचा.

स्वतःच  मात्र फाटक दंडक, तो तसाच झाकून ठेवायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


आईसाठी कवितेच्या ,कविंच्या मैफली व्हायच्या .

आई दुधावरची साय असते.वासराची गाय असते ,

साहित्यात आईचाच प्रभाव अधिक असायचा.

ढालीसारखे वार झेलणारा ,

सुपाएवढ्या काळजाचा

बाप माझा , तिथही दुर्मिळच असायचा.

खरचं..बापातला बापमाणूस ,

आम्हाला कधी कळायचा ?


- धनाजी माने....✍️

dhanajimane.blogspot.com


Sunday, August 06, 2023

राजं परतं तुम्हाला याव लागणारं.....


 


राजं परत तुम्हाला याव लागणार,

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

तुम्ही  रयतेचं राजे होता ,
सारा कसा आनंदी आनंद होता,
राजे जरी असला तुम्ही
जनतेत मनापासून मिसळत होता.

आता असे काही उरले नाही .
नवे नेते ,नवे कायदे आले तरी.
रयतं काही सुखी झालीच नाही.
म्हणूनच.......                           

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

तुम्ही कशी सगळ्यांची ,
मोठ बांधली होती.
अठरा पगड जातीची माणसं कशी ,
गुण्यागोविंदाने राहत होती.

आता राज इथं अस घडत नाही,
जाती-जातीत  धर्मा-धर्मात,कलह सुरु आहेत.
तसे घरा-घरात , गल्ली- बोळात तेढ सुरु आहे.
गटा-गटाने आणि वार्ड कमेटीने ही जंग चालू आहे.
म्हणून.....

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

तुमच्या सोबत तेव्हा ,
जीवाभावाचे एकनिष्ठ मावळे होते.
जीवाची बाजी लावणारे ,बाजी होते.
रयतेच्या सुखासाठी प्राणाचे बलिदान देत होते.

आता राज इथ अस काही उरल नाही.
विश्वासू , निष्ठावानांची वानवा आहे.
इकडून- तिकडे पळणारांची आणि पळवणारांची
स्पर्धा इथे सुरु आहे.
म्हणून......

राजं परत तुम्हाला याव लागणार,
विस्कटलेली घडी नीट करावी लागणार.

राज तुमच्या काळात ,लगेच न्याय मिळायचा.
आया-बहिनीनकडे वाकडी नजर करणारांचा,
आणि भ्रष्टाचाऱ्यांचा  तुम्ही कडेलोट करायचा.

राज  जनतेला आता न्यायासाठी,
वर्षानुवर्षे लढाव लागतयं.
रोज नव्या गुन्ह्यांचे आणि भ्रष्टाचाराचे,
पेव इथ फुटलयं, मन कस खिन्न झालयं !
म्हणूनच म्हणतोयं , हात जोडून विनवणी करतोयं......

राजं परत तुम्हाला याव लागतयं..
राजं परत तुम्हाला याव लागतयं...
राजं परत तुम्हाला याव लागतयं.......

- धनाजी माने....✍️
dhanajimane.blogspot.com


जनगणना… आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत

 ===================🇮🇳=================== 🇮🇳 जनगणना … आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत 🇮🇳 ========================== पहाट अजून पूर्ण उज...