Tuesday, November 02, 2021

नराधम आणि......आपल्या लाडक्या लेकी,बहिणी .....?

 


नराधम आणि......आपल्या लाडक्या लेकी,बहिणी .....?

१ नोव्हेंबर २१ चे दैनिक उघडले आणि या दैनिकामध्ये ' रिजन अपडेट ' मध्ये एक बातमी वाचनात आली मन सुन्न करणारी बातमी ....
आपण राहत असलेल्या #वाळवा तालुक्यालगतच्या #हातकणंगले तालुक्यातील #खोची येथील ही दुर्दैवी घटना वाचून मन सुन्न झाले .
सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण खून केल्याची घटना खोची (ता. हातकणंगले) येथे घडली. या #दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेने सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे .
त्या कुटुंबातील एकुलती एक आणि लाडाची लेक अशा अवस्थेत पाहून तीच्या आईवडिलांनी अक्षरशः #आक्रोश केला होता . हृदय पिळवटून टाकणारी घटना खरंच माणुसकीला काळीमा फासणारी आहे .
ती मुलगीसर्वांना आपुलकीने बोलवणारी
बोलकी, हुशार होती. लहान मुलांसोबत ती गल्लीत हसतखेळत असायची. एकुलती एक असल्याने प्रेमळ, लाडकी होती. घटना घडली त्या दिवशी त्या ६ वर्षाच्या लेकिने सकाळी  आपल्या वडिलांना जेवणाचे ताट दिले  होते.व जेवावयास सांगितले आणि घराबाहेर गेली होती. गेली ती गेलीच...ती परत आलीच नाही. ...
म्हणून , तिचा शोध सुरू झाला आई-वडील शेजारी-पाजारी यांनी सर्वत्र तिला शोधले. अखेर गावाच्या प्रवेश द्वाराजवळ असणाऱ्या. जुन्या दफनभूमीच्या झुडपात तिचा #मृतदेह आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर व पायाला जखमेचे व्रण दिसून आले होते. अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
याप्रकरणी संशयित त्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले .त्यावेळी त्या नराधमाने  निर्लज्जपणे गुन्ह्याची कबुली दिली होती.
पोलिसांनी आपली कामगिरी कितीही चोख बजावली .याबाबतचे #कायदे कितीही कडक झाले तरीही अशा घटना समाजात घडतच आहेत .
#महिला, #मुली ,अल्पवयीन मुली यांच्यावर असे व यापेक्षाही  भयावहअत्याचार  घडण्याचे प्रमाण खरोखरच खूपच मन सुन्न करणारे आहे .
▪️१६ डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीच्या 'वसंत विहार ' भागात तरूणीवर #पाशवी #बलात्कार करून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर अतिशय वाईट परिस्थितीत तिने #झुंज दिली व तिचा #मृत्यू झाला. दिल्लीमध्ये फिजिओथेरपीचे #शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय निर्भयावर दोषींनी चालत्या बसमध्ये पाशवी बलात्कार करून तिला तिच्या मित्रासह मरणासन्न अवस्थेत महामार्गावर फेकून दिले होते. या प्रकरणाने पूर्ण देश हादरला होता
▪️नगर - जिल्ह्यातील #कोपर्डी (ता. #कर्जत)येथे १३जुलै २०१६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास असाच गुन्हा घडला होता. येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या गुन्ह्यत सामील असणाऱ्या तीन नराधमांना  विशेष #जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची #शिक्षा ठोठावली होती.
▪️ ऑक्टोंबर २१ मधील वणी येथील अशीच घटना. वणी येथे #बसस्थानक परिसरात  एका ४० वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचाराची घटना घडली.मानवतेवर घाला घालणारी ही #गुन्हेगारी #प्रवृत्ती

समाजात सर्वत्र फोफावताना दिसत आहे.
महिला, तरुणींच्या छेडछाडीच्या घटनांत अलिकडे वाढ झाली आहे. अशा घटना आपल्या आजूबाजूला दररोज घडू लागल्या आहेत. अशा प्रवृत्तीविरोधात कारवाई करण्यासाठी आणि महिला, मुली, तरुणींच्या मदतीसाठी पोलिसांनी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. 'जेथे भय तेथे निर्भया '  हे ब्रिदवाक्य घेवून स्थापन करण्यात आलेल्या या पथकांच्या कारवाईने चांगलाच दबदबा निर्माण झाला असला  आणि पोलीस आपले काम चोख बजावत असले तरी अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतच आहेत.
अशा घटनांची आकडेवारी पाहिली म्हणजे खरोखरच #समाज नेमका कुठे चालला आहे? समाजातील ही नराधम प्रवृत्ती कोणत्या टोकाला जाऊन पोचलली आहे असे वाटते.

२०१९ मद्धे देशभरात २८६ महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) ३० सप्टेंबर १९ जारी केलेल्या अहवालानुसार  २०१९ मध्ये भारतात बलात्काराच्या घटनांत मोठी वाढ झाली. ३०,६४१ केसेस बलात्काराच्या बाबतीत नोंदवण्यात आल्या, देशात दर १७ मिनिटांनी बलात्कार होत असल्याचे #NCRB अहवालातून
स्पष्ट झाले आहे.

भारतात एकूण गुन्हेगारीमध्ये बलात्कार हा गुन्हा अव्वल क्रमांकावर येतो. दरवर्षी साधारण तीस ते चाळीस #हजार बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद देशात होते. हे झाले #नोंद झालेल्या गुन्ह्यांबद्दल; पण समाजातील लोक काय म्हणतील या भीतीपोटी अनेक प्रकरणात बलात्काराची नोंददेखील केली जात नाही.अजून एक दुर्दैवी बाब म्हणजे, बलात्काऱ्यांना शिक्षा मिळण्याची आकडेवारी फारशी समाधानकारक नाही. दुर्दैवाने दिवसेंदिवस या गुन्ह्याची आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढत चालली असल्याचे एनसीआरबीच्या (#राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग) अहवालातून स्पष्ट होत आहे. 

एकूणच #निर्भया प्रकरणानंतर अशा बाबतीत अनेक कडक कायदे करण्यात आले. विविध पथकांची #स्थापना करण्यात आली. विविध #हेल्पलाइन #नंबर देण्यात आले .तरीही अशा घटना समाजात घडतच आहेत. की ज्या तुम्हा आम्हाला सर्वांनाच  मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत.
आणि त्याच बरोबर अशा घडणाऱ्या घटना पाहून, ऐकून, मनात एक भीतीची #पाल चुकचुकते की आपल्याही लाडक्या लेकी,बहिणी  शिक्षणाच्या निमित्ताने ,काही कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या तर ,त्या  पुन्हा घरी सुरक्षित येतील ना?

यासाठी प्रत्येक लेक सुरक्षित पाहिजे .....

- धनाजी माने ......✍️




Monday, November 01, 2021

आर्यनखान पेक्षाही, जिव्हाळ्याचे.......

 


▪️ आर्यन खान की आज की रात भी जेल में ही गुजरेगी। दरअसल शाम 5.30 बजे तक रिलीज #ऑर्डर की कॉपी जेल नहीं पहुंची। ऐसे में कल सुबह 11 बजे के बाद ही आर्यन की रिहाई संभव है।

▪️ #मन्नत के बाहर फॅन्स  ने किया आर्यन का स्वागत

क्रूज ड्रग्स केस में 28 दिन जेल में बिताने के बाद आर्यन खान को अब घर के दर्शन हुए हैं। वहीं शाहरुख के फॅन्स मन्नत के बाहर वेलकम बैक का बैनर लेकर खड़े हैं। इससे पहले भी फॅन्स ने लगातार शाहरुख के सपोर्ट में अपनी आवाज बुलंद की थी।
▪️#आर्यन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर #शाहरुख खानची मुलगी आणि आर्यनची बहीण सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रेशन करत आहे. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे....वगैरे- वगैरे


या आणि अशाच अनेक #आर्यन खान याच्याशी संबंधित बातम्या प्रसार माध्यमातून आणि विविध दैनिकातून आणि #टिव्ही #चैनल वरून एक महिना होत आला या बातम्यांचा भडिमार सतत सुरू होता आणि आहे.
आर्यन खान हेच काही सर्वस्व आहे अशा पद्धतीने मीडियामध्ये या बातम्या सतत झळकत होत्या.

मुंबईतील  #कोर्डेलिया या अलिशान क्रुझवर एका शनिवारची रात्र पार्टीने रंगली होती. या पार्टीदरम्यान, एनसीबीने छापा टाकला आणि पार्टीचं ड्रग कनेक्शन समोर आलं. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान  याचाही   सहभाग असल्याचे दिसताच त्याला अटक झाली. #एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानला अटक केली होती.सध्या तो जामिनावर विविध अटींच्या अधिन राहून मोकळा आहे.
हे प्रकरण कोर्टात असून  आर्यन खान या प्रकरणात दोषी आढळणार की नाही हे आता येणाऱ्या काळातच समजणार आहे.
मात्र या प्रकरणाने त्याच्या बातम्यांचे पेव फुटले.......याच्या अटकेशिवाय आणि सुटकेशिवाय जनतेसमोर समस्याच नाहीत.
अरे बाबांनो #महाराष्ट्राचे आणि #देशाचे अनेक प्रश्न आहेत. 

सर्वसामान्यांच्या जगण्यामरण्याचे,जिव्हाळ्याचे #प्रश्न आहेत,कोरोनाने कुटूंबच्या - कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत त्यांचे अनेक  प्रश्न आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी आपले हात टेकलेत ,हतबल झालेत त्यांचेही अनेक प्रश्न आहेत.एस.टी कामगार  गाडीलाच फास लावून घेतायतं त्यांचे अनेक प्रश्न आहेत ,त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत,शेतकरी ,खाजगी कर्मचारी, पेन्शन धारक, #पेन्शन बंद झालेले कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे,लघुउद्योजक,कारागीर ,विद्यार्थी ,#शाळा ,शिक्षक,#शिक्षण ,#रस्ते, भौतिक सुविधा अशा एक ना अनेक  ,अनेकांच्या अनेक समस्या आहेत.
यावर कुठे आवाज नाही , या वरती कुठेही चर्चा होताना दिसत नाही.

ऊस उत्पादक #शेतकरी ,#FRP,  अनेक ठेवीदारांच्या पतसंस्था, बँका यामधून ठेवींची लागलेली वाट,#बेरोजगार तरुणांची बेरोजगारी, वाढणारी #गुन्हेगारी ,शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने कुणी,कसे घशात घातले ❓

असे एक ना अनेक प्रश्न सभोवताली घोंगावताना दिसत आहेत , यावर मात्र समाजातून आणि समाज माध्यमातून या काळात ब्र निघत नव्हते ,नाही ,उठ - सूट एकच #आर्यन खान........

शेतकऱ्यांचे तर पिढ्यानपिढ्या झाले तरी अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत , त्याचे कंबरडे मोडून गेले आहे.ऐन दिवाळीच्या सनात , अनेकांच्या घरी शिमगा सुरु आहे.अनेक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेली पिके होऊन गेलेल्या #अतिवृष्टीने मातीमोल झाली. काहींच्या शेतातील मातीही जागेवर राहिली नाही , ती ही  वाहून गेली .#पेरणी करायला मातीच उरली नाही.

त्याच सगळं आभाळचं फाटलयं ,ठिगळं लावायचं कुठं❓अशी त्याची दयनीय अवस्था याच कुणालाच देण - घेण उरलचं नाही. जो - तो आपल्या पुरत पाहतोयं आणि नको त्यालाच जास्त महत्त्व देतोयं.

एकूणच आर्यन खानच्या अटकेला आणि सुटकेला किती महत्त्व द्यायचं ❓याचं काय मोलच राहिले नाही. गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये कोणतेही चैनल घेतलं आणि कोणताही #पेपर उघडला तर आर्यन खान याचीच बातमी समोर दिसत होती. आर्यन खानच सर्वांच्या ,सर्व प्रसारमाध्यमांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला होता की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत होता.

#चंदेरी दुनियेतील अनेक #कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय आजवर वेगवेळ्या प्रकरणांमध्ये विशेषत: #अमली पदार्थ सेवन व सोबत बाळगने या संबंधाने येणारे संबंध अशा प्रकरणात आढळून आले आहेत असे बातम्यातून तर पुढे येते , येत होते.अभिनेता #शाहरूखखान चा मुलगा आर्यन खानचे सुद्धा  एनसीबीने  टाकलेल्या  छाप्यामद्धे अशाच पार्टीचं ड्रग कनेक्शन समोर आलं अस प्रसिद्ध माध्यमातून चित्र पुढे आले.

बॉलिवूडचा #बादशाह असलेल्या शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात सापडल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे. तर अनेकजण शाहरुख आणि त्याच्या मुलावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आर्यन खानची प्रसिद्धि वाढत असल्याचे दिसते आहे. १.४ दशलक्ष पर्यंत असलेल्या आर्यन खानच्या #Instagram फॉलोअर्सची संख्या १.५ दशलक्ष एवढी झाली. त्यामुळे एकीकडे टीकेचा धनी ठरत असलेल्या आर्यन खानला दुसरीकडे  मीडियावर खूपच प्रसिद्धि मिळतेय.


एकूणच, शेवटी म्हणावेसे वाटते की.......

चारोळी.....

कशाला किती महत्त्व द्यावे ?

प्रश्न आहेत भरपूर, शेतकऱ्यांचे, समाजाचे 

आणि अशाच साऱ्या घटकांचे 

आर्यनखान पेक्षाही, जिव्हाळ्याचे.......

- धनाजी माने.......✍️











बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...