आज २३ जुलै आज गुरुपौर्णिमा ........
आपल्या जीवनाच्या प्रवासात पावलोपावली जे -जे गुरु भेटले. ज्यांच्याकडून आपण सुसंस्कार शिकलो असे प्रत्येकजण आपल्या गुरुस्थानीच असतात
पृथ्वी, वारा, अग्नी, सुर्य,जल, नद्या, झाडे, फुले, पाने, ढग, डोंगर , प्राणी ,पक्षी निसर्गातली प्रत्येक घटक आपल्याला काही ना काही तरी बोध देतच असतो. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्या प्रत्येका विषयी कृतज्ञता बाळगतो.
जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. सर्वोच्च स्थानी आहे. म्हणूनच म्हटले आहे....
गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा ||
गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः |
जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, व्यक्तिपासून काही ना काही तरी शिकतच असतो. आणि म्हणूनच तर आपण जगण्यायोग्य बनत जातो. म्हणून असे सर्वजण आपले गुरुच असतात.
जे आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा करुन
जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून, आनंदी जीवन कसे जगावे, हे आपल्याला शिकवतात.
ते 'गुरु ' .........माझ्या जीवनाच्या प्रवासात असे , जे- जे गुरु पावलोपावली भेटले . त्या सर्व गुरूंच्या पवित्र पावलांना पदस्पर्श करुन मी आज नतमस्तक होतो. मला ज्यांनी प्रकाशवाट दाखवली त्या सर्व गुरुंचा मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्या सर्व गुरूंचा ऋणी आहे.
मूल जेव्हा-जेव्हा घरात असते तेव्हा आई-वडील त्याच्यावर संस्कार करत असतात. त्याला छोट्या- छोट्या गोष्टीतून जीवन कसं जगायचे ते समजावत असतात. आईवडील हेच तर आपले प्राथमिक अवस्थेतले प्रथम आणि महत्वाचे गुरू असतात.
या प्राथमिक अवस्थेमध्ये सुसंस्कारित आई-वडील भेटणं हेही खूप महत्त्वाचं असतं. कारण घरांमधील साध्या - साध्या घटनांवरून मूल शिकत असतं. आणि त्याच्यावरती आई-वडिलांच्या दैनंदिन वर्तनाचे तसेच संस्कार त्या मुलांवरती होत असतात.
घरातील या अनौपचारिक वातावरणात ते बरंच काही शिकत असतं .बोलावं कसं ,वागावं कसं इतरांसोबत रहावं कसं अशा बऱ्याच गोष्टी ते कुटुंबात शिकत असतं. आई-वडिलांच्या या गुरु म्हणून भूमिकांचे ,संस्काराचे बीजारोपण मुलांच्या वर्तनातून दिसत असते.
आपण या अशा अनौपचारिक वातावरणातून जेव्हा एका औपचारिक वातावरणात जातो तेव्हा
आई- वडीलानंतर आपले पहिले गुरू शाळेत गेल्यावर ‘ शिक्षक’ असतात. ते आपल्याला ज्ञान देतात. शाळेमधले ‘ गुरु’ आपल्याला मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांचे ज्ञान देतात.
त्यासोबतच मैदानावर खेळणे, चांगले लेखन, वाचन चार लोकांसमोर बोलण्याचे धाडस शाळेतील गुरुंपासूनच प्राप्त होते.कॉलेजमध्येही आपल्याला वेगवेगळे ‘ गुरु’ मिळतात. भावी पिढीचे डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक घडविण्याचे काम हे गुरु करत असतात. ते आपणाला जीवन जगण्याची कला शिकवतात ते आपल्यापायावरती उभे राहण्याची क्षमता देतात. या ठिकाणीही चांगल्या गुरुंचे संस्कार त्याला त्याच्या आयुष्यात चांगली दिशा देण्यासाठी दिशादर्शक ठरत असतात
गुरु आपला संशय आणि अज्ञान नाहीसे करतो, दुष्ट प्रवृत्ती आणि मानसिक संस्कारांना रुपांतरीत करतात.गुरु फक्त ज्ञानच देत नाहीत तर आपल्यामध्ये प्राणशक्ती, जीवनऊर्जा जागृत करतात. अतिशय तीक्ष्ण बुद्धी म्हणजे बुद्धीमत्ता.गुरूच्या सानिध्यात आल्यावर शोध थांबतो आणि बहरणे सुरु होते.गुरु म्हणजे अनंत, अमर्याद, विशाल आणि सर्व समावेशक अस्तित्व.गुरूच्या एका असण्यामुळे सर्व नाते संबंधांना परिपूर्णता येते.
पण असे गुरु आपल्या आयुष्यात पावलोपावली भेटणे खूप महत्त्वाचे असते. मग ते कोणत्याही क्षेत्रातले असोत.
पण.... असे आज घडते का ❓
आजचे कटू सत्य आपणाला या उदाहरणावरून लक्षात येईल. याला एखादा अपवादही असू शकतो.
एकवेळ एका महाराजांच्याकडे एक आजीबाई तिच्या एका सहा- सात वर्षांच्या नातवाला घेऊन गेली. ती महाराजांना म्हणाली, "महाराज, हा माझा नातू खूप गूळ खातो हो ! यावर काहीतरी उपाय सांगा."
महाराज अगदी विनम्रपणे त्या आजीबाईंना म्हणाले "आठ ते दहा दिवसांनी तुम्ही परत या!"
त्याप्रमाणे त्या आजीबाई आठ दहा दिवसांनी पुन्हा
परत आल्या त्या वेळी महाराजांनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि महाराज म्हणाले, " हे बाळ ! तू गूळ खात जाऊ नकोस ! "
यावेळी त्या आजीबाई त्या महाराजांवरची खूप चिडल्या आणि म्हणाल्या, " एवढंच सांगायचं होतं, तर ते आठ दिवसांपूर्वीच सांगायचं होतं, मला कशाला परत हेलपाटा घालायला लावला ? "
यावेळी महाराज अत्यंत विनम्रपणे म्हणाले ,
"हे माते ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा नातवाला घेऊन आलात , त्या वेळी मलाच गूळ खाण्याची सवय आणि मोह होत होता. आणि त्यामुळेच मला त्या मुलाला गुळ खाऊ नको म्हणून सांगण्याचा अधिकार पोहोचत नव्हता. म्हणून मी त्यावेळी त्याला उपदेश केला नाही. गेल्या आठ- दहा दिवसात मी स्वतः गुळ खाण्याचा मोह सोडून, गुळ खाणे सोडले .त्याच वेळी मी या मुलाला अधिकारवाणीने गुळ खाऊ नको म्हणून उपदेश करु शकतो.तसे सांगण्याचा अधिकार पोहोचतो. म्हणूनच मी आज त्याला गुळ खाऊ नकोस म्हणून सांगू शकलो."
तर असे हे पूर्वीचे गुरु आपल्याला आपल्या जीवन प्रवासात प्रत्येक क्षेत्रात पावलोपावली भेटत होते. ज्यांची तात्विक बैठक शुद्ध होती आणि करणी आणि कथनी समान असायची म्हणूनच अशा गुरूंविषयी मनामध्ये एक आदरयुक्त भीती असायची. त्यांचे हृदयसिंहासनावरती स्थान अढळ असायचे. आणि अशा गुरूंच्या पावलावरती मस्तक नतमस्तक व्हायचे.
म्हणून जीवनात प्रत्येक ठिकाणी असे योग्य गुरू आपणास लाभले तर योग्य संस्कार होऊन आपण आदर्श जीवन जगू शकतो.
पण.... आज मात्र समाजामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अध्यात्मिक, कौटुंबिक अशा सर्वच क्षेत्रात असे गुरु लाभणे दुर्मिळ झाले आहे. ज्यांच्या करणी आणि कथनी मध्ये कसलाच मेळ नसतो असेच सारे उपदेशक गुरु झालेत.मार्गदर्शक झालेले सर्वत्र दिसतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे.
- धनाजी माने....✍️

